ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारतीय मनाची गुरूकिल्ली

भारत – एक दर्शन ०४

‘आध्यात्मिकता’ ही भारतीय मनाची गुरूकिल्ली आहे; भारतीय मनामध्ये अनंततेची जाणीव उपजतच आहे.

जीवनाच्या बाह्यवर्ती गोष्टींची जी शक्ती असते केवळ त्यामध्ये जीवन परिपूर्णत्वाने जगता येत नाही, जीवन योग्य प्रकारे समजावून घ्यायचे तर ते केवळ त्या प्रकाशामध्ये समजावून घेता येत नाही, याची जाण भारताला प्रारंभापासूनच होती. आणि ही अंतर्दृष्टी भारताने अगदी तर्कबुद्धीच्या युगामध्ये आणि वाढत्या अज्ञानयुगामध्येसुद्धा कधीही गमावलेली नाही. भारताला जडभौतिक नियम आणि शक्तींच्या माहात्म्याची जाण होती; भौतिक शास्त्रांच्या थोरवीवर त्याची बारकाईने नजर होती; सामान्य जीवनाच्या कलेचे व्यवस्थापन कसे करायचे हे भारताला ज्ञात होते.

परंतु भारताला हेही समजले की, जोपर्यंत अति-भौतिकाशी (supra-physical) योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भौतिकाला आपली सार्थकता प्राप्त होत नाही; ब्रह्मांडाच्या जटिलतेचे स्पष्टीकरण मानवाच्या उथळ दृष्टीने पाहून किंवा त्याच्या सद्यकालीन परिभाषेमध्ये करता येत नाही, हे भारताच्या लक्षात आले. त्याच्या हे लक्षात आले की, मानवाला सहसा ज्याची जाणीव नसते अशा शक्ती मानवाच्या अंतरंगामध्येच आहेत, त्याच्या पाठीशी आहेत; मानवाला स्वतःच्या अगदी अल्प भागाचीच जाणीव आहे हे त्याला ज्ञात होते. अदृष्याने दृश्याला नेहमीच परिवेष्टित (surrounds) केलेले असते; ऐंद्रिय जाणिवेच्या सभोवताली अतिंद्रिय असते, एवढेच काय पण सांताच्या सभोवती अनंत नेहमीच व्यापून असते, याची जाण भारताला होती.

मनुष्यामध्ये स्वतःच्या पलीकडे विस्तारीत होण्याची शक्ती आहे, तो स्वतः आत्ता जसा आहे त्याहूनही अधिक पूर्ण आणि अधिक सखोल बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हेही भारताला ज्ञात होते – हे सत्य युरोपला आत्ता नुकते कुठे उमगू लागले आहे आणि त्यांच्या सामान्य बुद्धिमतेला ते आत्तासुद्धा खूपच महान असे वाटत आहे.

 

– श्रीअरविंद [CWSA 20 : 06-07]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago