ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समत्व

घटनाप्रसंगाकडे पाहण्याची समत्व दृष्टी

आपण सर्व घटनांच्या बाबतीत मनाचे आणि आत्म्याचे समत्व राखले पाहिजे; मग त्या घटना दुःखद असोत वा सुखद, आपला पराभव होवो वा जय, आपल्याला मानसन्मान मिळो वा आपला अवमान होवो, आपली सत्कीर्ती होवो किंवा अपकीर्ती, आपल्याला सद्भाग्य लाभो वा दुर्भाग्य. कारण या सर्व घटनांमध्ये, सर्व कर्मांच्या आणि कर्मफलांच्या ‘स्वामी’ची म्हणजे ईश्वराची इच्छा कार्यरत आहे, तसेच प्रत्येक घटना ही त्या ईश्वराच्या विकसनशील आविष्कारातील एक पाऊल आहे, हे आपल्याला पाहता आले पाहिजे.

सर्व शक्तींमध्ये, त्यांच्या लीलेमध्ये, त्यांच्या परिणामांमध्येही तसेच सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्येही त्या ईश्वराचे दर्शन घेण्याची अंतर्दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासमोर तो ईश्वर स्वतःला आविष्कृत करतो. प्रत्येक अनुभव, दुःखभोग, आदी सर्व गोष्टी एका दिव्य घटनेकडे वाटचाल करत असतात; आणि आनंद व समाधान यांपेक्षा त्यांना काहीही उणे नको असते; वैश्विक वाटचाल चालू राहाण्यामधील हा एक आवश्यक दुवा आहे; ही वाटचाल समजावून घेणे आणि त्याला साहाय्य करणे, हे आपले काम आहे.

त्यांच्या विरोधात बंड करणे, त्यांचा धिक्कार करणे, त्यांच्या विरोधात ओरडणे या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या अप्रशिक्षित आणि अज्ञानी प्रेरणांचे आवेग असतात. अगदी इतर सर्व गोष्टींप्रमाणेच या बंडाचेही ईश्वरी लीलेमध्ये काही उपयोग असतात आणि एवढेच काय पण अशी बंडे आवश्यकही असतात, साहाय्यभूतही ठरतात, दिव्य विकासाला त्या त्या योग्य वेळी व योग्य दशेमध्ये त्यांची आवश्यकताही असते आणि तशीच त्यांची योजनाही केलेली असते; परंतु अज्ञानी बंडखोरीचे आंदोलन हे आत्म्याच्या बाल्यावस्थेशी किंवा त्याच्या अर्ध्या-कच्च्या पौगंडावस्थेशी निगडित असते.

प्रौढ आत्मा मात्र त्यांचा धिक्कार करत नाही, तर त्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो; तो आरडाओरडा करत नाही, तर त्या गोष्टी स्वीकारतो किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करतो; तो आतल्या आत बंड करत राहत नाही तर मिळालेला आदेश पाळण्याचा, त्याची परिपूर्ती करण्याचा आणि त्यात रूपांतरण घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्या स्वामीकडून, त्याच्याकडून आलेल्या सर्वच गोष्टी समत्वबुद्धीने ग्रहण केल्या पाहिजेत.

दिव्य विजयाची घटिका जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यशअपयश या दोन्ही गोष्टी त्या दिव्य विजयाच्या मार्गावरील आवश्यक टप्पे म्हणून सारख्याच शांतपणे स्वीकारले पाहिजेत. ईश्वरी संकेतानुसार जर वेदना, दुःखभोग, अगदी तीव्र दुःख आपल्या वाट्याला आले असेल तर त्यावेळी आणि अत्यानंद आणि सुख अनुभवाला आले तरी त्यानेही हुरळून न जाता, आपले आत्मे, आपली मने, आपली शरीरे तशीच अविचल राहतील; अशा रीतीने उत्तम समतोल राखत, आपण धिमेपणाने आपला मार्ग चालत राहू; जोपर्यंत परमोच्च आणि वैश्विक आनंदामध्ये प्रवेश करण्याची पात्रता आपल्यामध्ये येत नाही आणि त्या अतिशय उन्नत, श्रेष्ठ अवस्थेसाठी आपली तयारी होत नाही तोवर, मार्गावर भेटणाऱ्या सर्व गोष्टींना सारख्याच स्थिरपणाने सामोरे जाऊ.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 225)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago