ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समत्व

घटनाप्रसंगाकडे पाहण्याची समत्व दृष्टी

आपण सर्व घटनांच्या बाबतीत मनाचे आणि आत्म्याचे समत्व राखले पाहिजे; मग त्या घटना दुःखद असोत वा सुखद, आपला पराभव होवो वा जय, आपल्याला मानसन्मान मिळो वा आपला अवमान होवो, आपली सत्कीर्ती होवो किंवा अपकीर्ती, आपल्याला सद्भाग्य लाभो वा दुर्भाग्य. कारण या सर्व घटनांमध्ये, सर्व कर्मांच्या आणि कर्मफलांच्या ‘स्वामी’ची म्हणजे ईश्वराची इच्छा कार्यरत आहे, तसेच प्रत्येक घटना ही त्या ईश्वराच्या विकसनशील आविष्कारातील एक पाऊल आहे, हे आपल्याला पाहता आले पाहिजे.

सर्व शक्तींमध्ये, त्यांच्या लीलेमध्ये, त्यांच्या परिणामांमध्येही तसेच सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्येही त्या ईश्वराचे दर्शन घेण्याची अंतर्दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासमोर तो ईश्वर स्वतःला आविष्कृत करतो. प्रत्येक अनुभव, दुःखभोग, आदी सर्व गोष्टी एका दिव्य घटनेकडे वाटचाल करत असतात; आणि आनंद व समाधान यांपेक्षा त्यांना काहीही उणे नको असते; वैश्विक वाटचाल चालू राहाण्यामधील हा एक आवश्यक दुवा आहे; ही वाटचाल समजावून घेणे आणि त्याला साहाय्य करणे, हे आपले काम आहे.

त्यांच्या विरोधात बंड करणे, त्यांचा धिक्कार करणे, त्यांच्या विरोधात ओरडणे या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या अप्रशिक्षित आणि अज्ञानी प्रेरणांचे आवेग असतात. अगदी इतर सर्व गोष्टींप्रमाणेच या बंडाचेही ईश्वरी लीलेमध्ये काही उपयोग असतात आणि एवढेच काय पण अशी बंडे आवश्यकही असतात, साहाय्यभूतही ठरतात, दिव्य विकासाला त्या त्या योग्य वेळी व योग्य दशेमध्ये त्यांची आवश्यकताही असते आणि तशीच त्यांची योजनाही केलेली असते; परंतु अज्ञानी बंडखोरीचे आंदोलन हे आत्म्याच्या बाल्यावस्थेशी किंवा त्याच्या अर्ध्या-कच्च्या पौगंडावस्थेशी निगडित असते.

प्रौढ आत्मा मात्र त्यांचा धिक्कार करत नाही, तर त्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो; तो आरडाओरडा करत नाही, तर त्या गोष्टी स्वीकारतो किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करतो; तो आतल्या आत बंड करत राहत नाही तर मिळालेला आदेश पाळण्याचा, त्याची परिपूर्ती करण्याचा आणि त्यात रूपांतरण घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्या स्वामीकडून, त्याच्याकडून आलेल्या सर्वच गोष्टी समत्वबुद्धीने ग्रहण केल्या पाहिजेत.

दिव्य विजयाची घटिका जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यशअपयश या दोन्ही गोष्टी त्या दिव्य विजयाच्या मार्गावरील आवश्यक टप्पे म्हणून सारख्याच शांतपणे स्वीकारले पाहिजेत. ईश्वरी संकेतानुसार जर वेदना, दुःखभोग, अगदी तीव्र दुःख आपल्या वाट्याला आले असेल तर त्यावेळी आणि अत्यानंद आणि सुख अनुभवाला आले तरी त्यानेही हुरळून न जाता, आपले आत्मे, आपली मने, आपली शरीरे तशीच अविचल राहतील; अशा रीतीने उत्तम समतोल राखत, आपण धिमेपणाने आपला मार्ग चालत राहू; जोपर्यंत परमोच्च आणि वैश्विक आनंदामध्ये प्रवेश करण्याची पात्रता आपल्यामध्ये येत नाही आणि त्या अतिशय उन्नत, श्रेष्ठ अवस्थेसाठी आपली तयारी होत नाही तोवर, मार्गावर भेटणाऱ्या सर्व गोष्टींना सारख्याच स्थिरपणाने सामोरे जाऊ.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 225)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago