मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०७
पहिली लढाई लढायची तीच मुळात भीषण असते; सामूहिक सूचनेच्या विरोधात ही मानसिक लढाई असते. प्रकृतीच्या अजूनपर्यंत निरपवाद भासणाऱ्या एका नियमावर आधारित, हजारो वर्षांच्या अनुभवांवर आधारित अशा प्रचंड आणि दबाव टाकणाऱ्या, सक्ती करणाऱ्या सामूहिक सूचनेविरुद्ध ही लढाई असते. “मृत्यू हा कायमचाच आहे, तो वेगळा असा काही असूच शकत नाही; मृत्यू अटळ आहे आणि तो काहीतरी वेगळा असू शकतो अशी आशा बाळगणे म्हणजे वेडेपणा आहे,’’ अशा एका हटवादी विधानामध्ये ती सामूहिक सूचना स्वतःला अनुवादित करते. आणि याबाबतीत सर्वांचे एकमत असते आणि आजवर एखाद्या अत्यंत प्रगत अभ्यासकानेदेखील याला विसंवादी सूर लावल्याचे म्हणजे भविष्याबद्दल आशा बाळगण्याचा सूर लावल्याचे धाडस केलेले दिसत नाही. बऱ्याचशा धर्मांनी तर मृत्युच्या वास्तवावरच स्वतःच्या कार्याची शक्ती आधारित केली आहे. आणि देवाने माणसाला नश्वर बनविलेले आहे त्यामुळे माणूस मृत पावावा हेच त्याला अपेक्षित आहे असे प्रतिपादन ते धर्म करतात. त्यातील अनेक धर्मांनी मृत्युकडे एक सुटका म्हणून, मुक्ती म्हणून आणि कधीकधी तर बक्षीस म्हणूनदेखील पाहिले आहे. त्यांचा असा आदेश असतो की, “सर्वोच्चाच्या इच्छेला शरण जा, कोणतेही बंड न करता, मृत्युची संकल्पना स्वीकारा म्हणजे मग तुम्हाला शांती आणि आनंद लाभेल.’’ हे सारे असे असतानादेखील, विचलित न होणारा संकल्प तसाच टिकून राहावा यासाठी मनाने स्वत:चा दृढ विश्वास अविचल राखला पाहिजे. अर्थात ज्याने मृत्युवर विजय मिळविण्याचा निश्चय केला आहे त्याच्यावर या सगळ्या सूचनांचा कोणताही परिणाम होत नाही आणि प्रगल्भ साक्षात्कारावर आधारित असलेल्या त्याच्या दृढ विश्वासावर याचा कोणताही परिणाम होऊ शकतही नाही. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 85)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…