मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०८
दुसरी लढाई असते ती भावनांची लढाई असते. व्यक्ती ज्यावर प्रेम करत असते, व्यक्तीने जे जे काही निर्माण केलेले असते, त्याविषयी असलेल्या आसक्तीच्या विरोधात ही लढाई असते. खूप मोठ्या परिश्रमाने, बरेचदा महत्प्रयासांनी तुम्ही तुमचे घर, कारकीर्द, काही सामाजिक, साहित्यिक, कलाविषयक, विज्ञानविषयक किंवा काही राजकीय कार्य उभे केलेले असते ; तुम्ही ज्याच्या केंद्रस्थानी आहात असे एक वातावरण तुम्ही निर्माण केलेले असते आणि जेवढे ते तुमच्यावर अवलंबून असते तेवढेच तुम्हीदेखील त्याच्यावर अवलंबून असता. माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी, साहाय्यक यांच्या घोळक्यात तुम्ही वावरत असता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करता तेव्हा तुमच्या विचारांमधील, तुमच्या स्वतःबद्दलच्या विचाराइतकाच हिस्सा या लोकांच्या विचारांनी व्यापलेला असतो. इतका की, जर त्यांना तुमच्यापासून अचानकपणे दूर केले तर तुम्हाला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागेल; जणू काही तुमच्या अस्तित्वामधील एखादा महत्त्वाचा भागच नाहीसा झाल्यासारखे तुम्हाला वाटू लागेल.
आजवर ज्या गोष्टींनी तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आणि प्रयोजन बहुतांश प्रमाणात ठरवलेले असते, त्या सर्व गोष्टींचा त्याग करायचा, असा येथे मुद्दा नाही. परंतु तुम्ही या गोष्टींविषयी असणारी आसक्ती सोडून दिली पाहिजे, त्यांच्याविनाही तुम्हाला जीवन जगता येते असे तुम्हाला जाणवले पाहिजे; किंवा, खरेतर ते जर तुम्हाला सोडून गेले तर नवीन परिस्थितीमध्ये, तुम्ही स्वतःसाठी एक नवीन जीवन घडविण्याची तयारी ठेवली पाहिजे, आणि हे अनिश्चित काळपर्यंत करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण अमर्त्यतेचा हाच परिणाम असणार आहे. या अवस्थेची मांडणी अशी करता येईल : अत्यंत काळजीपूर्वकपणे आणि लक्षपूर्वकतेने प्रत्येक गोष्ट करायची, त्याची व्यवस्था लावायची आणि तरीसुद्धा सर्व प्रकारच्या इच्छा आणि आसक्तीपासून मुक्त राहायचे, हे जमले पाहिजे; कारण जर तुम्हाला मृत्युपासून सुटका हवी असेल तर नाशिवंत असणाऱ्या कोणत्याच गोष्टीने तुम्ही बांधले जाता कामा नये. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 85-86)
(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…
“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…
(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…
(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…