ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

चालत्या गाड्याला खीळ…

 

“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तुम्हाला असेसुद्धा सांगण्यात आले आहे की, “श्रद्धा आणि सद्भावना बाळगा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित राहाल.” खरोखरच तुम्ही दिव्य चेतनेमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, दिव्य संरक्षणामध्ये न्हाऊन निघत आहात आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या ठायी श्रद्धा असेल आणि जेवढे तुम्ही स्वतःला खुले करू शकाल तेवढ्या प्रमाणात वरील गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. छोट्याछोट्या आंतरिक क्षोभाच्या गोष्टींना नकार देण्यासाठी आणि या गोष्टी उद्भवल्याच तर पुन्हा एक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते. तुमच्याबाबतीत ज्या कोणत्या दुर्घटना घडू शकल्या असत्या किंवा जे बारीकसारीक हल्ले होऊ शकले असते त्या सगळ्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठीसुद्धा त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते.

पण जर तुमच्या अस्तित्वामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, किंवा तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये, अनेक घटकांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येदेखील जर अवतरित होणाऱ्या शक्तीस ग्रहण करण्याची क्षमता नसेल तर, यंत्रामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण अडकला तर तो चालत्या कामात जशी खीळ घालू शकतो, तसे घडून येते. म्हणजे एखादे चांगले यंत्र अतिशय सुरळीतपणे चालू असते, सारे काही सुरळीत चालू असते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण टाकलात (फार मोठा नाही, अगदी एखादा छोटासा कण) तर, अचानक त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि यंत्र एकाएकी बंद पडते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा जरी अभाव असेल, तुमच्यामधील कोणता तरी एखादा घटक ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्यास अक्षम असेल तर, म्हणजे तो पूर्णपणे मिटलेला असेल तर, त्यातून ताबडतोब एक प्रकारचा मोठा असमतोल निर्माण होतो. म्हणजे तो भाग कोठेतरी एखाद्या छोट्याशा काळ्या डागासारखा झालेला असतो. तो अगदी छोटासा असला तरी दगडासारखा कठीण असतो. ईश्वरी शक्ती ग्रहण करण्यास तो नकार देतो; म्हणजे एकतर ती शक्ती त्याला ग्रहण करता येत नाही किंवा ती त्याला ग्रहण करायची इच्छा नसते. कारण काहीही असो पण त्यामुळे ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जी गोष्ट ऊर्ध्वदिशेने प्रगत होत होती, जी अतिशय उत्कृष्ट रितीने बहरून येत होती, ती एकाएकी कोमेजून जाते. कधीकधी तर तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे संतुलित स्थितीत असता, तुमची तब्येत उत्तम असते, सारे काही सुरळीत चालू असते, तक्रार करण्यास कोठे जागाच नसते अशा वेळीसुद्धा कधीकधी असे घडून येऊ शकते.

एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी अभिनव कल्पना सुचलेली असते, एक नवीन उर्मी आलेली असते, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्कट आस असते आणि त्यासाठी तुम्हाला महान शक्ती लाभलेली असते, एखादा उत्कृष्ट अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्या सुंदर अनुभवाने तुमची आंतरिक द्वारं खुली केलेली असतात, पूर्वी नसलेले असे काही नवीनच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले असते, जेव्हा तुम्हाला अशी खात्री असते की सारे काही व्यवस्थित चालू आहे…

मात्र अगदी पुढच्याच दिवशी, तुम्ही आजारी पडता. आणि मग तुम्ही म्हणता, “हे काय? पुन्हा तेच? अशक्य आहे हे! हे असे घडता कामा नये.” पण हे असे घडलेले असते याचे कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तेच असते – वाळूचा एक बारीकसा कण! तुमच्यामध्ये असे काहीतरी होते की जे ग्रहण करण्यास अक्षम ठरले. त्यातूनच ताबडतोब असंतुलन निर्माण झाले. ती गोष्ट अगदी आंशिक असली तरी तेवढीदेखील पुरेशी असते. परिणामतः तुम्ही आजारी पडता.

– श्रीमाताजी (CWM 05 : 176)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

1 day ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

2 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

3 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

4 days ago

दिव्य शक्तीस आवाहन का?

  आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू…

5 days ago

दिव्य शक्तीचे अवतरण कशासाठी?

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि…

6 days ago