पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १३
हठयोग
हठयोगाचे परिणाम हे डोळे दिपविणारे असतात आणि लौकिक किंवा शारीरिक मनाला त्याची सहजी भुरळ पडते. आणि तरीही एवढ्या सगळ्या खटाटोपामधून सरतेशेवटी नक्की काय मिळविले, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शारीरिक प्रकृतीचे उद्दिष्ट, केवळ शारीरिक जीवनाचे जतन, त्याचे उच्चतम पूर्णत्व, अगदी शारीरिक जीवनाचा महत्तर उपभोग घेण्याची क्षमता, या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट अर्थाने, अस्वाभाविक स्तरावर घडून येतात. हठयोगाची उणीव अशी की, या कष्टकर आणि अवघड प्रक्रियांसाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो आणि खूप शक्तिवेच करावा लागतो. तसेच हठयोगामध्ये माणसांवर सामान्य जीवनापासून इतकी समग्र पराङ्मुखता (Severance) लादली जाते की, मग त्याच्या परिणामांचा या लौकिक जीवनासाठी उपयोग करणे, हे एकतर अव्यवहार्य ठरते किंवा मग ते उपयोजन आत्यंतिक मर्यादित ठरते. हा जो तोटा आहे त्याच्या मोबदल्यात, अन्य जगांमध्ये, अंतरंगामध्ये ज्या अन्य जीवनाची, मानसिक, गतिशील जीवनाची प्राप्ती आपल्याला होते; तीच प्राप्ती आपल्याला राजयोग, तंत्रमार्ग इ. अन्य मार्गांनी, कमी परिश्रमकारक पद्धतींनी आणि तुलनेने कमी कठोर नियमांच्या आधारे होऊ शकते. दुसरे असे की, याचे शारीरिक परिणाम म्हणून प्राप्त होणारी वाढीव प्राणशक्ती, दीर्घकाळ टिकून राहणारे तारुण्य, आरोग्य, दीर्घायुष्य या साऱ्या गोष्टींचा जर वैश्विक कृतींच्या एका सामायिक संचितामध्ये विनिमय केला नाही, त्यांचा सामान्यांच्या जीवनासाठी उपयोग केला नाही आणि जसा एखादा कंजुष मनुष्य सर्व काही स्वतःकडेच राखून ठेवतो त्याप्रमाणे, केवळ स्वतःसाठीच त्याचा वापर केला, तर मग ही प्राप्ती खूपच अल्प स्वरूपाची आहे. हठयोगामुळे मोठे परिणामही साध्य होतात पण त्याची किंमत अवाजवी असते आणि त्याने अतिशय अल्प हेतूच साध्य होतो.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 35)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…