ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सच्च्या ऑरोविलवासीयाची वैशिष्ट्ये

१. आपल्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वंशीय आणि आनुवंशिक बाह्यरूपाच्या पाठीमागील आपले खरे अस्तित्व काय हे जाणून घेण्यासाठी आंतरिक शोध घेणे ही पहिली आवश्यकता आहे.

केंद्रस्थानी मुक्त, विशाल आणि जाणते असे अस्तित्व विद्यमान असते व आपण त्याचा शोध घ्यावा याची ते वाट बघत असते. ते आपल्या जीवाचे, अस्तित्वाचे व ऑरोविलमधील आपल्या जीवनाचे सक्रिय केंद्र बनले पाहिजे.

२. व्यक्ती नैतिक आणि सामाजिक प्रथा-परंपरांपासून, मुक्त होण्यासाठी ऑरोविलमध्ये राहते, परंतु हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वासना आणि महत्त्वाकांक्षेची, अहंकाराची एक नव्या प्रकारची गुलामी बनता कामा नये. व्यक्तीच्या वासनांची तृप्ती आंतरिक संशोधनाच्या मार्गाला अवरूद्ध करते, हा आंतरशोध केवळ शांतीत आणि सुयोग्य, निरपेक्ष अशा पारदर्शीतेतच साध्य करता येतो.

३. ऑरोविलवासीयाने व्यक्तिगत मालकीची भावना पुसून टाकली पाहिजे. कारण जीवाच्या प्रवासामध्ये लौकिक जगत हा एक टप्पा आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे त्याचे असे एक स्थान असते. त्या त्या स्थानानुसार व्यक्तीला त्याच्या जीवनासाठी व त्याच्या कार्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ते येथे पुरविण्यात आलेले आहे. आपण जेवढे अधिक सजगतेने आपल्या अंतरात्म्याच्या संपर्कात येतो, तेवढ्याच प्रमाणात अधिक अचूक साधने आपल्याला पुरविण्यात येतात.

४. काम, मग ते अगदी अंगमेहनतीचे का असेना, आंतरिक शोधकार्यासाठी ते अनिवार्य असते. जर व्यक्ती काम करीत नसेल, जर स्वत:ची चेतना जडामध्ये स्थापित करीत नसेल तर, ते जड द्रव्य कधीच विकसित होणार नाही. एखाद्याच्या देहरूपी माध्यमाद्वारे चैतन्यशक्तीला जडाचा तीळमात्र भाग जरी सुसंघटित करू दिला गेला, तरी ते अधिक चांगले ठरेल. व्यक्तीने स्वत:च्या भोवती जर व्यवस्थितपणा सुस्थापित केला तर, त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्येही एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागतो.

व्यक्तीने स्वत:च्या जीवनाची आखणी बाह्यवर्ती, कृत्रिम नियमांच्या आधारे न करता, सुसंघटित झालेल्या आंतरिक चेतनेनुसार करावी. कारण, जर व्यक्ती स्वत:च्या जीवनाला उच्चतर चेतनेच्या नियंत्रणाखाली न ठेवता, बेलगामपणे पुढे जाऊ देत असेल तर, ते चंचल, अस्थिर होते आणि आविष्कारासाठी अक्षम बनते. जडद्रव्याचा जाणीवपूर्वक वापर न झाल्याने, जडद्रव्य तसेच शिल्लक राहते; म्हणजे एका अर्थाने, व्यक्तीने स्वत:चा वेळ व्यर्थ वाया घालविण्यासारखे होते.

५. अखिल पृथ्वीने नवीन प्रजातीच्या आगमनासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे आणि हे आगमन त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविल जाणीवपूर्णक कार्य करू इच्छिते.

६. ही नवी प्रजाती कशी असली पाहिजे हे एकेक करून आपल्यापुढे उघड होत जाईल आणि त्या दरम्यानच्या काळात स्वत:ला संपूर्णतया परमेश्वराधीन करणे हाच सर्वोत्तम मार्ग होय.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207-208)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

16 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago