श्रीमाताजी : सच्चा ऑरोविलवासी होण्यासाठी व्यक्तीने कसे असले पाहिजे ? असाच प्रश्न विचारला आहेस ना तू ? (‘अ’ला उद्देशून) त्याविषयी तुझ्या काही कल्पना आहेत का?
अ : खऱ्या अर्थाने ऑरोविलवासी (Aurovilian) होण्यासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे – भगवंताला पूर्णपणे आत्मार्पण करण्याचा दृढसंकल्प असणे.
श्रीमाताजी : छान, चांगलेच आहे; पण असे लोक फार थोडे असतात. मी हे पहिल्या क्रमांकावर लिहिणार आहे… आता आपण क्रमांक दोनचा विचार करू.
वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून पाहता, अगदी नित्याच्या व्यवहारातील गोष्टी, उदाहरणार्थ : आपल्याला सर्व नैतिक आणि सामाजिक रूढी, संकेतांपासून मुक्त व्हायचे आहे. पण अगदी ह्याच बाबतीत आपल्याला अत्यंत सावधगिरीने राहिले पाहिजे ! व्यक्तीने जणू परवानाच मिळाल्याच्या थाटात, वासनांधपणे भोग घेत, त्यांच्या गर्ततेत जात, नैतिक-सामाजिक बंधनांतून मुक्तता मिळविता कामा नये; तर मुक्तता मिळवावयास हवी ती या रूढीपरंपरांच्या अतीत होऊन ! वासनांचे निर्मूलन करून, उच्चाटन करून, आणि नीतिनियमांच्या जागी परमेश्वराच्या आज्ञेची प्रस्थापना करून !
…आपल्याला देह देण्यात आलेला आहे तो त्यास नाकारण्यासाठी नव्हे तर त्याचे अधिक चांगल्या गोष्टीत रूपांतर करण्यासाठी. आणि निश्चितपणे ऑरोविलच्या ध्येयांपैकी हे एक ध्येय आहे. मानवी देहात सुधारणा केलीच पाहिजे, तो निर्दोष व परिपूर्ण बनविलाच पाहिजे जेणेकरून तो माणसापेक्षाही उच्चतर जीवयोनीच्या अभिव्यक्तीसाठी सक्षम असणारा असा अतिमानवी देह बनेल. आणि आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ते तसे घडणार नाही हे निश्चित ! ज्ञानसंपन्न शारीरिक संस्कृतीच्या पायावर, शारीरिक क्रियाप्रक्रियांचा उपयोग करून घेत, योग, आसनांद्वारे, व्यायामाद्वारे, देहाला सक्षम बनवले पाहिजे. लहानशा व्यक्तिगत अशा गरजा व त्यांच्या पूर्ततेसाठी नव्हे तर, उच्चतर सौंदर्य व चेतना अभिव्यक्त करण्यासाठी देह सक्षम बनविणे आवश्यक आहे. आणि यासाठी शारीरिक शिक्षणाला त्याचे महत्त्वाचे असे योग्य ते स्थान दिले पाहिजे…..
आणि अशा प्रकारची शरीराची जोपासना व त्यावरील संस्कार हे जाणीवपूर्वक, जागरूकपणे केले पाहिजेत. काहीतरी अतिरेकी टोकाच्या किंवा अदभुत् गोष्टी करण्यासाठी नव्हे तर, उच्चतर चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी देह सशक्त आणि लवचीक बनण्याची क्षमता त्या देहात यावी म्हणून ही शरीरोपासना केली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की : “ऑरोविलवासी हा स्वत:च्या इच्छावासनांचा गुलाम बनू इच्छित नाही.” हा महत्त्वाचा ठराव आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 335)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…