ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

दुर्दैवाने, या जगामध्ये मोठ्या प्रमाणात दुरिच्छा सुद्धा आहे. आणि त्या विविध प्रकारच्या दुरिच्छांमध्ये, काही अज्ञान व मूर्खपणातून येणाऱ्या छोट्या छोट्या दुरिच्छा असतात; दुष्टपणातून येणाऱ्या काही वाईट दुरिच्छा असतात आणि अदैवी शक्तींचा परिणाम म्हणून उद्भवणाऱ्या अत्यंत भयावह अशा दुरिच्छासुद्धा असतात. तर, अशा सगळ्या दुरिच्छा वातावरणात असतात (मी हे तुम्हाला घाबरविण्यासाठी सांगत नाहीये. कारण व्यक्तीने कशालाच घाबरता कामा नये.)

आणि मग या गोष्टी तुमच्यावर हल्ला करतात, कधीकधी हेतुपुरस्सर, तर कधी अहेतुकपणे. अहेतुकपणे कशा? तर इतर व्यक्तींच्या माध्यमातून. ज्यांच्यावर हल्ला झालेला असतो, त्याविषयी त्यांना काहीच माहीत नसते आणि त्याविषयी काही कल्पनाही नसताना, त्या व्यक्ती तो संक्रमित करतात. खरंतर, ते पहिले शिकार झालेले असतात. आणि ते त्यांचा आजार दुसऱ्यामध्ये संक्रमित करतात.

पण काही हल्ले हे हेतुपुरस्सर केलेले असतात. आपण एके दिवशी दुष्ट माणसं आणि त्यांच्या मानसिक रचनांविषयी बोलत होतो, ती माणसं तुमचं नुकसान व्हावं म्हणून हेतुपूर्वक तशा मानसिक रचना निर्माण करतात. आणि याहीपलीकडे जाणारी काही माणसं असतात.

ज्याला ‘काळी जादू’ म्हणतात, ते म्हणजे दिशाभूल झालेले विकृत गूढशास्त्र आहे, व्यक्तीने कधीही त्याच्या वाट्यास जाता कामा नये. पण दुर्दैवाने काही जण मात्र अगदी दुष्टपणाने त्याच्या नादी लागतात. तो भ्रम असतो किंवा ती अंधश्रद्धा असते, असे मानू नका, कारण ते खरेखुरे आहे. अशी काही माणसं असतात, त्यांना ही जादू कशी करावयाची ते माहीत असते आणि ती ते करतात. आणि त्यांच्या त्या जादूने ते अत्यंत घृणास्पद असे परिणाम घडवून आणतात.

अर्थात हे लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा तुमच्यामध्ये भीती नसते आणि तुम्ही संरक्षणामध्ये रहात असता तेव्हा तुम्ही सुरक्षित असता. पण हे केव्हा, ती अट महत्त्वाची आहे. आणि जर ती अट तुम्ही सदासर्वकाळ पाळली नाहीत तर, अत्यंत अनिष्ट अशा गोष्टीसुद्धा घडू शकतात. जोवर तुम्ही ताकदवान अशा स्थितीत असता, अगदी शुद्ध अशा स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआपपणे त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच ताकदवान बनून जाते आणि अशा रीतीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध ती काळी जादू करण्यात आली होती, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago