ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आता बाह्य कारणांचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करू. …अडचणी जशा आतमध्ये असतात तशाच त्या बाहेरदेखील असतात. तुम्ही एका मर्यादेपर्यंत स्वतःमध्ये आंतरिक संतुलन प्रस्थापित करू शकता, पण तुम्ही असमतोलाने भरलेल्या वातावरणात जीवन जगत असता. जोवर तुम्ही स्वतःला एखाद्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेत नाही (अर्थात हे केवळ अवघडच आहे असे नव्हे, तर ते तसे करणे नेहमीच ग्राह्य असते असे नाही.) तोवर जे काही बाहेरून येत असते, त्याचा स्वीकार करणे तुम्हाला भागच पडते. तुम्ही देता आणि तुम्ही घेता. तुम्ही श्वासोच्छ्वासाबरोबरच काहीतरी आत घेत असता. तेव्हा तिथे सगळी सरमिसळ असते आणि म्हणूनच तुम्ही असे म्हणू शकता की, सारे काही संसर्गजन्य असते, कारण तुम्ही सतत स्पंदनाच्या स्थितीतच वावरत असता. तुम्ही तुमची स्पंदने देत असता आणि दुसऱ्यांची स्पंदनेसुद्धा स्वीकारत असता आणि ती स्पंदने खूप जटिल स्वरूपाची असतात.

सोप्या भाषेत सांगावयाचे तर, मानसिक, प्राणिक, शारीरिक आणि इतरही पुष्कळ स्पंदने असतात. तुम्ही देता, तुम्ही घेता. देणे-घेणे हा सतत चालणारा खेळ असतो. अगदी असे गृहीत धरू की, तिथे दुरिच्छा नाहीये, तरीदेखील संसर्ग हा अपरिहार्यपणे असतोच असतो. आणि मी तुम्हाला आत्ता तेच सांगत होते की, सारे काही संसर्गजन्य असते.

समजा, तुम्ही एखाद्या अपघाताचा परिणाम काय झाला ते पाहत आहात; अशा वेळी तुम्ही ते विशिष्ट स्पंदन ओढून घेता. आणि जर का तुम्ही जास्तच संवेदनाशील असाल आणि त्यात भरीस भर म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटली किंवा घृणा वाटली (अर्थात ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत; घृणा हे शारीरिक भीतीचे फक्त नैतिक रूप आहे.) तर तो अपघात तुमच्या शरीरामध्ये अगदी शारीरिकदृष्ट्या प्रतिबिंबित होतो. तेव्हा साहजिकपणे तुम्हाला असे सांगण्यात येते की, ज्यांच्याबाबत अशा प्रतिक्रिया आढळून आल्या त्या व्यक्ती नाडीगत असमतोलाच्या स्थितीमध्ये होत्या. पण यात काही तथ्य नाही. त्या व्यक्ती प्राणिक दृष्ट्या आत्यंतिक संवेदनाशील होत्या, इतकेच. आणि हे काही न्यूनतेचे द्योतक नाही.

कारण जसजसे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होऊ लागता, तसतशी नसांमध्ये एकप्रकारची विशिष्ट अशी अतिसंवेदनशीलता आढळून येते. आणि जर का तुमच्या संवेदनशीलतेच्या प्रमाणात तुमचे आत्म-नियंत्रण वाढले नाही तर, तुमच्या बाबतीत सर्व तऱ्हेच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. पण ही तर केवळ एक बाब झाली.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago