ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आता बाह्य कारणांचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करू. …अडचणी जशा आतमध्ये असतात तशाच त्या बाहेरदेखील असतात. तुम्ही एका मर्यादेपर्यंत स्वतःमध्ये आंतरिक संतुलन प्रस्थापित करू शकता, पण तुम्ही असमतोलाने भरलेल्या वातावरणात जीवन जगत असता. जोवर तुम्ही स्वतःला एखाद्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेत नाही (अर्थात हे केवळ अवघडच आहे असे नव्हे, तर ते तसे करणे नेहमीच ग्राह्य असते असे नाही.) तोवर जे काही बाहेरून येत असते, त्याचा स्वीकार करणे तुम्हाला भागच पडते. तुम्ही देता आणि तुम्ही घेता. तुम्ही श्वासोच्छ्वासाबरोबरच काहीतरी आत घेत असता. तेव्हा तिथे सगळी सरमिसळ असते आणि म्हणूनच तुम्ही असे म्हणू शकता की, सारे काही संसर्गजन्य असते, कारण तुम्ही सतत स्पंदनाच्या स्थितीतच वावरत असता. तुम्ही तुमची स्पंदने देत असता आणि दुसऱ्यांची स्पंदनेसुद्धा स्वीकारत असता आणि ती स्पंदने खूप जटिल स्वरूपाची असतात.

सोप्या भाषेत सांगावयाचे तर, मानसिक, प्राणिक, शारीरिक आणि इतरही पुष्कळ स्पंदने असतात. तुम्ही देता, तुम्ही घेता. देणे-घेणे हा सतत चालणारा खेळ असतो. अगदी असे गृहीत धरू की, तिथे दुरिच्छा नाहीये, तरीदेखील संसर्ग हा अपरिहार्यपणे असतोच असतो. आणि मी तुम्हाला आत्ता तेच सांगत होते की, सारे काही संसर्गजन्य असते.

समजा, तुम्ही एखाद्या अपघाताचा परिणाम काय झाला ते पाहत आहात; अशा वेळी तुम्ही ते विशिष्ट स्पंदन ओढून घेता. आणि जर का तुम्ही जास्तच संवेदनाशील असाल आणि त्यात भरीस भर म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटली किंवा घृणा वाटली (अर्थात ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत; घृणा हे शारीरिक भीतीचे फक्त नैतिक रूप आहे.) तर तो अपघात तुमच्या शरीरामध्ये अगदी शारीरिकदृष्ट्या प्रतिबिंबित होतो. तेव्हा साहजिकपणे तुम्हाला असे सांगण्यात येते की, ज्यांच्याबाबत अशा प्रतिक्रिया आढळून आल्या त्या व्यक्ती नाडीगत असमतोलाच्या स्थितीमध्ये होत्या. पण यात काही तथ्य नाही. त्या व्यक्ती प्राणिक दृष्ट्या आत्यंतिक संवेदनाशील होत्या, इतकेच. आणि हे काही न्यूनतेचे द्योतक नाही.

कारण जसजसे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होऊ लागता, तसतशी नसांमध्ये एकप्रकारची विशिष्ट अशी अतिसंवेदनशीलता आढळून येते. आणि जर का तुमच्या संवेदनशीलतेच्या प्रमाणात तुमचे आत्म-नियंत्रण वाढले नाही तर, तुमच्या बाबतीत सर्व तऱ्हेच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. पण ही तर केवळ एक बाब झाली.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

19 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago