ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

एकाग्रतेच्या तीन शक्ती आहेत. या तीन शक्तींचा उपयोग करून आपल्याला आपले साध्य साधता येते.

ज्ञानविषयक एकाग्रता :
कोणत्याही वस्तूवर आपण एकाग्रतेचा प्रयोग केला की त्या वस्तूचे ज्ञान आपण करून घेऊ शकतो; त्या वस्तूची दडलेली रहस्ये तिला प्रकट करावयास लावू शकतो. ही एकाग्रतेची शक्ती अनेक वस्तूंचे ज्ञान होण्यासाठी नव्हे, तर एकमेव सद्वस्तु जाणून घेण्यासाठी आपण वापरावयाची असते. ही झाली ज्ञानविषयक एकाग्रता !

संकल्पविषयक एकाग्रता :
दुसरी असते इच्छाविषयक, संकल्पविषयक एकाग्रता. आजवर जे काही साध्य झालेले नसेल, जे काही आपल्या पकडीबाहेर व पलीकडे असेल, त्याच्या प्राप्तीसाठी सर्व संकल्पशक्ती, सर्व इच्छाशक्ती एकाग्रतेने एकवटता येते. ही शक्ती अगोदर पुरेशी शिक्षित केली असेल, ती पुरेशी एकलक्षी असेल, ती पुरेशी प्रामाणिक व स्वत:विषयी खात्री असणारी, केवळ स्वतःविषयीच श्रद्धा बाळगणारी, अतिबळकट श्रद्धा असणारी अशी असेल तर ती एकाग्रतेची शक्ती कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी वापरता येते. परंतु ह्या जगाकडून ज्या साऱ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, त्या मिळविण्यासाठी ही शक्ती न वापरता, पुरुषार्थाच्या योग्यतेचा आणि ज्ञानप्राप्तीच्या योग्यतेचा जो एकमेव विषय – आत्मा – त्याच्या प्राप्तीसाठीच आपण ती शक्ती उपयोगात आणली पाहिजे.

अवस्थाविषयक एकाग्रता :
आता एकाग्रतेच्या तिसऱ्या शक्तीकडे वळू. आपले सर्व अस्तित्व स्वत:च्या कोणत्याही विशिष्ट अवस्थेचे, तिच्या प्राप्तीसाठी एकाग्रतेने चिंतन करील, तर आपल्याला ही विशिष्ट अवस्था प्राप्त करून घेता येते. उदाहरणार्थ, समजा आपण दुबळेपणा व भीती यांचा गोळा असू आणि प्राप्तव्य म्हणून बळ व धैर्य यांचे एकाग्रतेने चिंतन करू तर, आपण बळ व धैर्य यांचा पुंज बनू शकतो. अशाच रीतीने, आपण महान शुद्धता, पावित्र्य आणि शांती ह्यांचे स्थान बनू शकतो; अशाच रीतीने आपण प्रेमाचा एकच एक असा विश्वव्यापी आत्मा बनू शकतो. परंतु, असे म्हटले जाते की, आपण आत्ता ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीच्या तुलनेत वर वर्णिलेली स्थिती कितीही उच्च असली तरी सुद्धा, ह्या गोष्टी मिळविण्यासाठी देखील ही एकाग्रता शक्ती उपयोगात आणता कामा नये. तर सर्व गोष्टींच्या अतीत असणारी, सर्व कृती आणि लक्षणे यांच्यापासून मुक्त असणारी, जी एकच एक शुद्ध आणि केवल सद्वस्तु, ती बनण्यासाठी ही शक्ती उपयोगात आणली गेली पाहिजे.

इतर सर्व काही, इतर सर्व प्रकारची एकाग्रता ही पूर्वतयारी म्हणूनच केवळ मोलाची असते. दुराचाराकडे घेऊन जाणाऱ्या आणि आत्मतत्त्वापासून दूर नेणाऱ्या विचारांना, इच्छेला आणि जीवाला त्या भव्य आणि एकमेवाद्वितीय सद्वस्तुकडे घेऊन जाण्याचे, क्रमाक्रमाने प्रशिक्षण देण्यासाठीच्या, आधीच्या पायऱ्या म्हणूनच केवळ त्यांचे मोल असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 318)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

12 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago