खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता
(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…)
साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला असे वाटले की, मी निदान आजतरी शांत, निश्चल-नीरव (silent) राहिले पाहिजे. पण निश्चल-नीरवतेचे काही क्षण गेल्यानंतर माझ्यामधीलच दुसरा एक भाग मला सांगू लागला की, “ही काही खरी निश्चल-नीरवता नाहीये, त्यामध्ये फारसा आनंद व उत्साह नाहीये. त्यामुळे ती निश्चल-नीरवता नसून, ते प्राणाचे असमाधान आहे.” आणि मग मला असे वाटले की, दुसरा भाग जे सांगत आहे ते बरोबर आहे.
श्रीमाताजी : दोन्ही गोष्टी काही अंशी बरोबर आणि काही अंशी चुकीच्या आहेत. अवतरित होणारी शक्ती निश्चल-नीरवतेमध्ये, एकाग्रतापूर्वक ग्रहण करणे कधीही योग्यच, परंतु प्राणाला त्याच्या लहरीप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याचा जो त्रागा होतो त्यातून, ती नीरवता किंवा एकाग्रता आलेली असता कामा नये. तसेच ही एकाग्रता आणि निश्चल-नीरवता फक्त शांतिमयच असणे पुरेसे नाही तर त्यामध्ये एक प्रकारचा अतिशय उत्कट आनंदही असला पाहिजे. असे असेल तर ती एकाग्रता, ती निश्चल-नीरवता ही खरी आणि विशुद्ध आहे, असे तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही.
– श्रीमाताजी (CWM 17 : 54)
- खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता - August 15, 2026
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026




