शांती आणि शक्तीचे अवतरण
शांती किंवा शक्ती शरीरात अवतरित होऊ लागल्यामुळे शरीर ग्रहण-सुलभ होते. तेव्हा काही जणांना शरीर डोलत असल्याचा किंवा शरीरात स्पंदने निर्माण झाल्याची जाणीव होते. शरीराला जेव्हा हे शांतीचे किंवा शक्तीचे अवतरण सवयीचे होऊन जाते तेव्हा त्याचे हे हलणे-डुलणे थांबते. ध्यानाच्या वेळी शांती पूर्णपणे अवतरित होते कारण त्या वेळी श्रीमाताजींप्रति केलेल्या एकाग्रतेमुळे उच्चतर चेतनेची शक्ती खाली अवतरित होते आणि व्यक्ती जर सक्षम असेल तर, ती त्या शक्तीचा स्वीकार करू शकते.
एकदा का त्या शक्तीचे अवतरण सुरू झाले की, सहसा तिचे बळ वाढत जाते आणि त्याबरोबर साधकाची ग्रहणशीलतादेखील वाढत राहते. पुढे ती शक्ती सदा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये अवतरित होऊ शकते आणि अधिकाधिक काळ टिकून राहू शकते. ती स्थिर होईपर्यंत हे असे चालू राहते.
साधकाने मात्र त्याच्या बाजूने एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे, ती शक्ती ग्रहण करण्यासाठी म्हणून त्याने स्वतःची चेतना शक्य तितकी अविचल आणि स्थिर ठेवली पाहिजे. उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद या साऱ्या गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्यांच्या अवतरणासाठी एक प्रकारची उन्मुखता (opening) असली पाहिजे. मनाची अविचलता आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या दिव्य प्रभावाला खुली असणारी एकाग्र क्रियाविरहितता (concentrated passivity) या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 481-482)
- शांती आणि शक्तीचे अवतरण - September 3, 2026
- शांतीचे अवतरण - September 2, 2026
- स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव - September 1, 2026




