Tag Archive for: शांती

एका विशिष्ट दृष्टीने पाहिले तर समता आणि तमस ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकमेकींच्या उजळ व अंधाऱ्या अशा प्रतिकृती आहेत. उच्चतर प्रकृती शांतीमध्ये आराम शोधते तर, निम्नतर प्रकृती उर्जेच्या विश्रांतीमध्ये आणि तमसामध्ये, अचेतनामध्ये परतण्यामध्ये आराम मिळविण्यासाठी धडपड करते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 477)

कशामध्ये तरी गढलेली प्रगाढ अशी स्थिरता म्हणजे शांती होय. ती अतिशय सकारात्मक असते, ती जणुकाही शांत, लाटाविरहित आनंदाच्या जवळ जाणारी असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद ह्या साऱ्या गोष्टी वर आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्या खाली अवतरण्यासाठी एक विशिष्ट ऊर्ध्वगामी असणारा झरोका असला पाहिजे. मनाची शांती आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या प्रभावाला खुली असणारी एककेंद्री क्रियाविरहितता ह्या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 482)

साधनेमधील पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे मनामध्ये स्थिर शांती आणि शांतता प्राप्त करून घेणे. अन्यथा तुम्हाला साधनेतील अनुभूती येऊ शकतील पण स्थायी असे काहीही नसेल. शांत मनामध्येच खरीखुरी जाणीव निर्माण करता येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 149-150)

श्रीमाताजी : तुमच्या अस्तित्वाच्या खूप आत खोलवर, तुमच्या छातीच्या खूप खोलवर आतमध्ये, तेजोमय, शांत, प्रेमपूर्ण आणि प्रज्ञावान असे ईश्वरी अस्तित्व कायमच असते. ते तेथे असते, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी एकत्व पावू शकता; मग तुम्हाला ते एका तेजोमय, प्रकाशमान अशा चेतनेमध्ये परिवर्तित करू शकेल.

तुम्ही आणि मी आपण दोघेही मिळून, तुमच्या अस्तित्वाच्या पृष्ठवर्ती स्तरावर असणारा सर्व बाह्य गोंगाट शांत करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मग शांततेमध्ये आणि शांतीमध्ये तुम्ही आंतरिक वैभवाशी एकत्व पावू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 365-366)

जीवामधील ईश्वरी उपस्थितीची पहिली खूण म्हणजे शांती होय.

– श्रीमाताजी (CWM 12 : 114)

प्रश्न : माताजी, मला अधिक शांत करा.

श्रीमाताजी : जेव्हा कधी तुम्हाला अशांत, अस्वस्थ वाटेल तेव्हा त्या प्रत्येक वेळी, माझे चिंतन करा. त्याच वेळी, कोणताही बाह्य आवाज न करता, तुमच्या आतमध्ये स्वत:शी पुन्हापुन्हा उच्चारा, “शांती, शांती, हे माझ्या हृदया, शांती!” हे सुस्थिरपणे करत राहा. तसे केलेत तर जो परिणाम दिसून येईल त्याने तुम्ही संतुष्ट व्हाल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 150)

दिवसातून किमान दोनदा तरी काही क्षणांसाठी मौनाची सवय करणे चांगले. परंतु केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे, तर ते खरेखुरे मौन असले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 196)

शांती आणि स्थिरता हे रोगावरील खात्रीशीर उपाय आहेत. जेव्हा आपण आपल्या पेशींमध्ये शांती आणू शकतो, तेव्हा आपण बरे झालेले असतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 151)