Tag Archive for: प्रामाणिकपणा

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

साधना करत असताना सुरुवातीला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे, शक्य तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे. दररोज काही वेळ हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करावे. शक्य तितका, त्या ‘दिव्य माता’ आहेत या भूमिकेतून त्यांचा विचार करावा. त्या तुमच्या अंतरंगामध्येच आहेत ही जाणीव तुम्हाला व्हावी अशी अभीप्सा बाळगावी, तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करावे आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे व तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी. हा प्राथमिक टप्पा आहे पण बहुतेक वेळा हा टप्पा ओलांडण्यासाठीच बराच वेळ लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीने हा टप्पा ओलांडला तर मग हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, ज्यामुळे साधकाला अंतरंगामधून श्रीमाताजींच्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. प्रकृतीमधील आणि जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला अन्य काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आणि त्यामधून साक्षात्काराच्या दिशेने द्वारं खुली होऊ लागतात.

*

तुम्ही तुमचे कर्म ईश्वराच्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर ध्यानामधून जेवढे तुमचे कल्याण होईल तेवढेच कर्मामधूनही होऊ शकेल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 186), (CWM 16 : 178)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

आम्हाला (मला व श्रीमाताजींना) तुमच्यामध्ये नेहमीच एक प्रकारची गहन अभीप्सा असल्याचे आणि त्या अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे आढळून आले आहे. आणि तीच सतत तुम्हाला आमच्या निकट संपर्कात ठेवते. जिथे अशा प्रकारची अभीप्सेची गहनता असते, प्रामाणिकपणा असतो आणि अशी निकटता आढळते तिथे व्यक्ती (ईश्वरी शक्तीप्रत) हळूहळू खुली होत जाणार हे निश्चित असते. आणि तुमच्यामध्ये तर हा खुलेपणा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेबाबत चिंता किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 52)

 

वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही योगमार्गामध्ये प्रवेश करण्याची स्वयमेव सर्वोत्तम साधने नाहीत. तर अंतरंगातून होणारे आत्मसमर्पण हे त्यासाठी उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे आणि प्रामाणिकपणे आत्म्याच्या अधिपत्याखाली आलेले मन, हृदय आणि संकल्प या गोष्टी (self-consecration) त्यासाठीची साधनं असतात.

श्रीमाताजींनी नेमून दिलेले काम हे त्यासाठी नेहमीच आत्म-निवेदनाचे क्षेत्र मानले जाते. ते काम श्रीमाताजींना अर्पण करण्याच्या भावनेतूनच केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या (self-offering) माध्यमातून व्यक्तीला, श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल आणि श्रीमाताजींची शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करत आहे हे तिला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 246)

 

साधक : मी कोणती गोष्ट सर्वाधिक विकसित केली पाहिजे? आणि मी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला नकार देण्याची गरज आहे?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणा विकसित करा. प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराच्या मार्गाशी समग्र निष्ठा बाळगणे. जुन्या मानवी सवयींकडे आपला ओढा असतो, त्याला नकार द्या.

*

साधक : मला वैयक्तिकरित्या श्रीअरविंदांना एक सर्वोत्तम गोष्ट अर्पण करायची आहे. मी काय अर्पण करू?

श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.

साधक : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?

श्रीमाताजी : तुम्ही ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी दिवसभरातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे एखादे पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग निश्चल-नीरव राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक निश्चल-नीरवता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत याची रोज पुन्हा नव्याने सुरूवात करा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 67), (CWM 12 : 205)

 

अंतःकरणाची शुद्धी ही (आध्यात्मिक साक्षात्कारासाठी) केंद्रभूत आवश्यकता असतेच; पण मन, प्राण, शरीर यांच्या शुद्धीकरणाची देखील आवश्यकता असते. परंतु अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संपूर्ण प्रामाणिकपणा. कोणतेही ढोंग करता कामा नये. ईश्वरापासून, स्वतःपासून किंवा सद्गुरूपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे काटेकोर निरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःमधील दुष्प्रवृत्तींमध्ये सुधारणा करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना किती वेळ लागतो हे फारसे महत्त्वाचे नाही. ईश्वरप्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे अशी व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही काही साधीसुधी उपलब्धी नाही. आणि म्हणून, ती झाली नाही म्हणून हताश, निराश होण्याचे काही कारण नाही. कारण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन केले पाहिजे अशा गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये वेळोवेळी आढळतच राहतात. परंतु व्यक्तीने जर खरी इच्छा आणि योग्य दृष्टिकोन बाळगला असेल तर, अंतरंगातून येणाऱ्या सूचना किंवा अंतःप्रेरणा वाढीस लागतात, त्या अधिक सुस्पष्ट, नेमक्या, अचूक व्हायला लागतात आणि त्यांचे पालन करण्याची व्यक्तीची ताकदसुद्धा वाढीला लागते.

आणि तेव्हा मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी, तो ईश्वरच तुमच्याबाबतीत समाधानी होईल आणि मानवजात ज्या महान गोष्टीचे (परमेश्वराचे), आकलन करून घेण्याची आस बाळगू शकते त्या महान गोष्टीचे मानवजातीला तिची पुरेशी तयारी झालेली नसताना आकलन होऊ नये आणि त्यामुळे तिला धोका पोहोचू नये म्हणून, ईश्वर व साधक यांच्यामध्ये ईश्वरानेच जो पडदा निर्माण केलेला असतो आणि ज्या पडद्याच्या पाठीमागे राहून, तो स्वतःचे व साधकाचे संरक्षण करत असतो तो पडदा आता ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

 

प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेलच, हे अगदी खरे आहे. पण म्हणून कोणताही विलंब न होता तो, अगदी लगेच, अगदी सहजपणे ईश्वरापर्यंत पोहोचेल, असा याचा अर्थ होत नाही. ईश्वरप्राप्ती पाच-सहा वर्षातच झाली पाहिजे अशी काहीतरी एक मुदत तुम्ही ठरवत आहात आणि अजूनपर्यंत तसा कोणताच परिणाम तुम्हाला दिसत नाहीये म्हणून तुम्ही (ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच) शंका घेत आहात, हीच तुमची खरी अडचण आहे.

एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असूनसुद्धा साक्षात्कार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्यांमध्ये परिवर्तन व्हावे लागते. त्याच्यापाशी असलेल्या प्रामाणिकपणाने त्याला चिकाटी बाळगण्यासाठी नेहमीच सक्षम बनविले पाहिजे. कारण ईश्वराबद्दलची आस इतर कशानेही मावळत नाही. विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी यांच्यामुळे ती मावळू शकत नाही.

तुम्ही पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहात कारण तुम्ही तुमच्या मनाला पुन्हा त्याच्या अज्ञानामध्ये, शंकेखोरपणामध्ये सक्रिय होण्यास मुभा दिली आहे. परिणामी, अगदी साधीसरळ आणि अगदी सुप्रस्थापित असणारी अशी जी आध्यात्मिक सत्यं आहेत ती तुम्ही नाकारू पाहात आहात. आंतरिक ज्ञान मिळण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही (ईश्वरच अस्तित्वात नाही असे) ठरवून मोकळे होत आहात. या साऱ्या गोष्टी तुमच्यामधून काढून टाका आणि तुम्ही ईश्वरप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहात ते तसेच अविचलपणे करत राहा. त्यासाठी किंवा चेतना खुली होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तो कमी आहे की जास्त आहे, याचा कोणताही विचार तुम्ही करू नका. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा तुम्ही निर्धार केला होतात (याचे स्मरण ठेवा.) तो निर्धार कायम ठेवा. म्हणजे मग भलेही सावकाशपणे का होईना, पण एक ना एक दिवस तुमची चेतना खुली होईल आणि प्रकाश अवतरेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116–117)

 

अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

 

(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…

योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व‌’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)