Tag Archive for: प्रामाणिकपणा

 

साधक : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नकोय, फक्त ईश्वरच हवा आहे. पण मी जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो किंवा साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेला असतो, तेव्हा साहजिकच मला माझ्या ध्येयाची म्हणजे ईश्वराची आठवण राहत नाही. हा ‘अप्रामाणिकपणा‌’ आहे का?

श्रीमाताजी : होय. हा अप्रामाणिकपणा आहे. ज्यावेळी व्यक्तीच्या एका घटकाला ईश्वर हवा असतो आणि दुसऱ्या घटकाला मात्र निराळेच काहीतरी हवे असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणाच असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक बनते. परंतु इच्छाशक्ती दृढ असेल आणि ईश्वरी कृपेवर संपूर्ण विश्वास असेल तर, हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68)

साधक : आपल्या पूर्णयोगाच्या दृष्टीने प्रामाणिकपणा याचा अर्थ कृपया सांगाल का?

श्रीअरविंद : ईश्वराप्रत असलेल्या अत्युच्च अभीप्सेशी विसंगत होण्यास, अस्तित्वाच्या कोणत्याही घटकाला अनुमती न देणे म्हणजे प्रामाणिकपणा.

(Guidance from Sri Aurobindo to Nagin Doshi, Vol 01 : 110)

*

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांनी ईश्वराप्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक असते. म्हणजे असे की, एखाद्या घटकाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे घटक मात्र त्याला नकार देतात किंवा बंड करतात, असे असता कामा नये.

प्रसिद्धी किंवा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा शक्ती मिळविण्यासाठी नव्हे अथवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठीदेखील नव्हे, तर ईश्वरासाठीच ईश्वर हवा असणे, म्हणजे अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असणे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

 

प्रामाणिकपणा ही ईश्वराप्रत जाणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे.
*
प्रामाणिक व्हा. प्रामाणिकपणा हे दिव्यत्वाचे‌ महाद्वार आहे.
*
तुम्ही प्रामाणिक राहा आणि मग जर आवश्यकता पडलीच तर हजार वेळासुद्धा तुमच्या चुका सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक-कवच आहे.
*
साधासरळ प्रामाणिकपणा हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा प्रारंभ असतो.
*
तुमचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता, प्रामाणिक व्हा, म्हणजे असे की, प्रामाणिकपणाला तुमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनवा.
*
पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.
*
प्रामाणिकपणा व निष्ठा हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.
*
जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते व ईश्वराकडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकपणा असतो तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.
*
जेथे प्रामाणिकपणा आणि सदिच्छा असते तेथे ईश्वरी साहाय्यसुद्धा असते.
*
प्रत्येकालाच संधी देण्यात आलेली असते आणि सर्वांसाठी ईश्वरी साहाय्यदेखील उपलब्ध असते. पण प्रत्येकाला त्याचा किती लाभ होणार हे त्याच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 68, 86)

 

साधक : अहंभावात्मक व अज्ञानी शक्ती आणि श्रीमाताजींची दिव्य शक्ती यामध्ये एखाद्या साधकाला जर पूर्णतः फरक करता येत नसेल आणि तो कनिष्ठ शक्तींना नकार देऊ शकत नसेल, तर त्या साधकाची अवस्था कशी होईल? त्या साधकाने योगमार्गाचा अवलंब करण्यासाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे?

श्रीअरविंद : कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीलाच दिव्य शक्ती आणि अदिव्य व कनिष्ठ शक्तींमध्ये पूर्णपणे फरक करू शकत नाही किंवा त्या कनिष्ठ शक्तींना लगेचच पूर्णपणे नकारही देऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण यश येईपर्यंत त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणे, ही गोष्ट अनिवार्य असते. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगी संपूर्ण प्रामाणिकपणा असतो तोपर्यंत ईश्वरी कृपा निश्चितपणे व्यक्तीसोबत असते आणि ती कृपा त्या व्यक्तीला योगमार्गावर प्रत्येक क्षणी साहाय्य करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 225)

 

तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि साक्षात्‌‍ अनुभूतीच्या सर्व क्षमता तो गमावून बसतो. ही त्याला मिळालेली शिक्षा असते. तो स्वत:मध्ये आणि ईश्वरामध्ये आवरणे निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेतो. ईश्वर त्याच्यापासून दूर जात नाही तर, तो मनुष्य ईश्वराचे स्वागत करण्यास स्वत:ला अक्षम बनवितो. म्हणजे, ईश्वर हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस हे असे मुळातच काही नसते.

जी व्यक्ती अप्रामाणिक असते, जी दुरिच्छा बाळगत असते, जी विश्वासघातकी असते ती व्यक्ती स्वत:हून स्वत:वर शिक्षा ओढवून घेत असते. अप्रामाणिक माणसांकडे जी थोडीफार चेतना शिल्लक असते आणि जिच्यामुळे त्यांना ते दुष्ट आहेत, हे कळू शकले असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. इतके की जणू काही ते अचेतन असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी त्यांना (सत्य-मिथ्या, खरे-खोटे इ.) काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 21-22)

 

(आंतरिक धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन म्हणजे यातनाघरच कसे असते, ते श्रीमाताजींनी सांगितले. आपण तो मुद्दा कालच्या भागात विचारात घेतला. आता, अशा दुराचारी व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिकपणाचा काय उपयोग होतो, ते श्रीमाताजी स्पष्ट करत आहेत.)

आंतरिक धर्माचे पालन न करणारा मनुष्य जी कोणती गोष्ट करू पाहील त्यात त्याला यश मिळणारच नाही, असे नाही. तो ज्या गोष्टीची इच्छा बाळगेल ती गोष्ट संपादन करणे त्याला शक्यच होणार नाही, असेही नाही. पण यदाकदाचित, त्याच्या वाट्याला दुर्दैव आलेच तर, त्याच्या आंतरतम अस्तित्वामध्ये प्रामाणिकपणाची एक धुगधुगी अजूनही कुठेतरी शिल्लक आहे, याचे ते द्योतक असते. (त्या दुर्दैवाच्या माध्यमातून जीवन त्याला जो बोध देऊ पाहत असते त्या बोधास तो त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणामुळे पात्र ठरतो.) तेव्हा अगोदर त्याला यश, इच्छावासनांची परिपूर्ती इत्यादी गोष्टींचे जे बाह्य लाभ होत होते ते आता मिळेनासे होतात.

आणि म्हणूनच, जेव्हा एखाद्या दुर्वर्तनी मनुष्याच्या वाट्याला दुर्दैव येते आणि त्यामुळे तो जेव्हा दुःखीकष्टी होतो; त्याला जेव्हा पश्चात्ताप होतो तेव्हा, (तुम्ही त्याच्या दुःखकष्टावर उपहासाने न हसता) त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. त्याच्या अंतरंगातील प्रामाणिकपणाची ज्योत अजून पूर्णपणे विझलेली नाही आणि त्याच्या वाईट कृत्यांबद्दल अजूनही त्याच्या अंतरंगातील कोणीतरी त्याला समज देऊ पाहत आहे, असा त्याच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाचा अर्थ होतो. अंतिमतः पुन्हा आपण त्याच मुद्द्यापाशी येतो की, तुम्ही व्यक्तीच्या बाह्य रंगरूपाकडे पाहून, कधीही त्या व्यक्तीविषयीचे अडाखे बांधता कामा नयेत. तुम्ही बाह्य परिस्थिती पाहून काही निष्कर्ष काढाल तर, तुमचा तो अंदाज नेहमीच निश्चितपणे खोटा ठरेल, या निरीक्षणापाशीच आपण येतो.

सत्याची एक झलक मिळण्यासाठी, व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमध्ये किमान थोडेसे तरी वळले पाहिजे; तिने स्वतःच्या अंतरंगात थोडेतरी डोकावून पहिले पाहिजे आणि वरकरणी दिसणाऱ्या दृश्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींच्या खेळाकडे आणि त्या खेळाच्याही पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी उपस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 279)

 

(आंतरिक धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे आपण कालच्या भागात पाहिले. श्रीमाताजी आता येथे बौद्धमतामधील ‘निरय’ या शब्दाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, तिला जिथे शिक्षा केली जाते ती जागा म्हणजे एक प्रकारचा नरक, असा बौद्धमतातील ‘निरय‌’ (Niraya) या संकल्पनेचा प्रचलित अर्थ होतो. परंतु त्याचा अन्यही एक अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक विशिष्ट सत्य असते; खरंतर त्या सत्याकडून तिच्या चेतनेच्या सर्व गतिविधींचे आणि शरीराच्या सर्व कृतींचे संचालन झाले पाहिजे. पण व्यक्ती जेव्हा तिच्या या आंतरिक धर्मानुसार आचरण करत नाही — म्हणजे केवळ बाह्य नीतिनियम किंवा सामाजिक नियमांनुसार आचरण असे नव्हे — तर, जेव्हा ती स्वतःशीच विसंगत अशा रितीने आचरण करते तेव्हा, ती स्वतःभोवती जे एक प्रकारचे (अनिष्ट) वातावरण निर्माण करते त्या वातावरणाला ‘निरय‌’ असे म्हणता येईल. हा निरय या संकल्पनेचा खरा अर्थ आहे.

…जेव्हा एखादा माणूस त्याच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांचेच म्हणणे ऐकत असतो, त्याबरोबर वाहवत जात असतो किंवा आत्मपरीक्षण करण्यासाठी ज्याच्यापाशी वेळ नसतो, जो पूर्णपणे निंदानालस्ती करतच जीवन खर्च करतो, त्याच्या जीवनाचे इतरांवर काय परिणाम होतील, त्याच्या वर्तणुकीचे काय बरेवाईट परिणाम होतील याची जो पर्वा करत नाही, तो स्वतःभोवती कुरुपतेचे, स्वार्थीपणाचे, संघर्षाचे आणि दुरिच्छेचे एक वातावरण तयार करतो. आणि स्वाभाविकपणे त्या वातावरणाचा त्याच्या स्वतःच्या चेतनेवर परिणाम होतो आणि त्यातून एकंदरच जीवनाकडे तो कडवटपणे पाहू लागतो. आणि सरतेशेवटी त्याची ही वृत्ती म्हणजे कायमचे यातनाघर होऊन बसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)

(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण पाहिले.)

चेतनेचा एक घटक म्हणत असतो की, “नाही, अमुक एक गोष्ट मला नकोय.” पण त्याच्यामागे अनेक घटकांचा एक ढिगाराच जणू काही लपून बसलेला असतो. आणि तो मात्र त्याविषयी काहीच म्हणत नाही, तो ढिगारा स्वतःचे अस्तित्वसुद्धा जाणवू देत नाही. बहुधा अज्ञानामुळे, त्याला गोष्टी जशा आहेत तशाच चालू राहाव्यात असे वाटत असते. त्या घटकांना असे वाटत असते की, जगात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडत असते आणि म्हणून अमुक एखाद्या गोष्टीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांचा विश्वासच नसतो.

मला पूर्वी एकदा एक स्त्री भेटली होती. तिच्याविषयी मी तुम्हाला सांगितले होते ना? ती नेहमी म्हणायची, “व्यक्ती जेव्हा स्वतःमध्ये बदल करू पाहते, तेव्हा सगळे त्रास सुरू होतात.” एका फ्रेंच लेखकाने याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे आणि त्याने तर त्यापासून त्याचा आवडता सिद्धान्तच तयार केला आहे. “तुम्ही जेव्हा स्वतःला परिपूर्ण बनवायचे अशी इच्छा बाळगता, तेव्हा दुःखसंकटं यायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनवण्याचा संकल्प केला नाहीत तर तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.” हा होता त्याचा सिद्धान्त. हा सिद्धान्त पूर्णपणे चुकीचा आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट मात्र खरी आहे की, तुमच्यामधील बदलास नाखूष असणारे काही घटक मात्र म्हणत असतात, “काय कटकट आहे? आम्हाला एकटेच राहू द्या.” तुम्ही कोणताही त्रास दिलेला त्यांना चालत नाही, ते जसे आहेत तसेच ते राहावेत अशी त्यांची इच्छा असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 74-75)

(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष आहे आणि तो तुम्ही दूर करू इच्छित आहात पण तरीही तो जर टिकून राहिला आणि तुम्ही म्हणालात की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर खरंच तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता. कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात. तुमच्या चेतनेशी संबंधित नसलेली अशी कोणतीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या चेतनेशी संबंधित असतात त्यावर तुम्ही निश्चितपणे प्रभुत्व मिळवू शकता.

बाहेरून येणाऱ्या गोष्टी किंवा सूचना यासुद्धा तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला स्पर्श करू शकतात जेवढ्या प्रमाणात तुमच्या चेतनेने त्यांना संमती दिलेली असते. तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची जडणघडण झालेली असते.

तुम्ही जर असे म्हणाल की, “मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करूनसुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. ‘सगळे करून सुद्धा’, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट ‘जॅक इन द बॉक्स’ या खेळातल्याप्रमाणे अचानक उसळी मारून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते.

म्हणून, तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे-छोटे अंधारे कानेकोपरे शोधून काढले पाहिजेत. त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल. आणि एके काळी तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटली होती ती गोष्ट करणे तुम्हाला शक्य होईल. ती फक्त व्यवहार्यच होईल असे नाही, तर ती पूर्णदेखील झालेली असेल.

तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रितीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि ही गोष्ट सर्वच बाबतीत लागू पडते. म्हणजे अगदी शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू पडते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 74)

तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय, वासनाविकार इ.) नको असते, त्या अडचणीवर मात करण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असते, पण तुमच्या चेतनेच्या इतर घटकांमध्ये ज्या असंख्य गतिविधी चाललेल्या असतात त्याविषयी तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ असता; ही खरी समस्या असते.

तुम्ही म्हणत असता की, “मला त्यापासून सुटका हवी आहे.” पण दुर्दैव असे की, मला अमुक एक गोष्ट ‘हवी आहे’, असे नुसते म्हणणे पुरेसे नसते. कारण, तुमच्या चेतनेमधील काही घटक, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करू नये म्हणून, स्वतःला तुमच्यापासून लपवून ठेवतात. आणि जेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे वळते तेव्हा ते घटक जोरकसपणे पुढे येतात.

आणि म्हणूनच माझे नेहमी हे सांगणे असते की, पूर्णपणे प्रामाणिक व्हा. स्वत:ला फसविण्याचा प्रयत्न कधीही करू नका. ‘तुम्हाला जे जे करता येण्यासारखे होते ते सारेकाही तुम्ही केले आहे,’ असे म्हणू नका. तुम्ही अपयशी ठरलात तर, त्याचा अर्थ असा होतो की, जे जे करण्यासारखे होते ते सारे तुम्ही केले नव्हते. कारण तुम्हाला जे जे करता येणे शक्य होते ते ते ‘सर्व‌’ जर तुम्ही खरोखरच केले असते, (म्हणजे स्वत:च्या अस्तित्वातील सर्व कानेकोपरे तुम्ही शोधले असले आणि तेथे दडलेले घटक बाहेर काढले असते) तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळाले असते. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 04 : 73-74)