प्रामाणिकपणा आणि चिकाटी
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेलच, हे अगदी खरे आहे. पण म्हणून कोणताही विलंब न होता तो, अगदी लगेच, अगदी सहजपणे ईश्वरापर्यंत पोहोचेल, असा याचा अर्थ होत नाही. ईश्वरप्राप्ती पाच-सहा वर्षातच झाली पाहिजे अशी काहीतरी एक मुदत तुम्ही ठरवत आहात आणि अजूनपर्यंत तसा कोणताच परिणाम तुम्हाला दिसत नाहीये म्हणून तुम्ही (ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच) शंका घेत आहात, हीच तुमची खरी अडचण आहे.
एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असूनसुद्धा साक्षात्कार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्यांमध्ये परिवर्तन व्हावे लागते. त्याच्यापाशी असलेल्या प्रामाणिकपणाने त्याला चिकाटी बाळगण्यासाठी नेहमीच सक्षम बनविले पाहिजे. कारण ईश्वराबद्दलची आस इतर कशानेही मावळत नाही. विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी यांच्यामुळे ती मावळू शकत नाही.
तुम्ही पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहात कारण तुम्ही तुमच्या मनाला पुन्हा त्याच्या अज्ञानामध्ये, शंकेखोरपणामध्ये सक्रिय होण्यास मुभा दिली आहे. परिणामी, अगदी साधीसरळ आणि अगदी सुप्रस्थापित असणारी अशी जी आध्यात्मिक सत्यं आहेत ती तुम्ही नाकारू पाहात आहात. आंतरिक ज्ञान मिळण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही (ईश्वरच अस्तित्वात नाही असे) ठरवून मोकळे होत आहात. या साऱ्या गोष्टी तुमच्यामधून काढून टाका आणि तुम्ही ईश्वरप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहात ते तसेच अविचलपणे करत राहा. त्यासाठी किंवा चेतना खुली होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तो कमी आहे की जास्त आहे, याचा कोणताही विचार तुम्ही करू नका. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा तुम्ही निर्धार केला होतात (याचे स्मरण ठेवा.) तो निर्धार कायम ठेवा. म्हणजे मग भलेही सावकाशपणे का होईना, पण एक ना एक दिवस तुमची चेतना खुली होईल आणि प्रकाश अवतरेल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 116–117)
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026





