प्रामाणिकपणा आणि अंतःकरणाची शुद्धी

 

अंतःकरणाची शुद्धी ही (आध्यात्मिक साक्षात्कारासाठी) केंद्रभूत आवश्यकता असतेच; पण मन, प्राण, शरीर यांच्या शुद्धीकरणाची देखील आवश्यकता असते. परंतु अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संपूर्ण प्रामाणिकपणा. कोणतेही ढोंग करता कामा नये. ईश्वरापासून, स्वतःपासून किंवा सद्गुरूपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे काटेकोर निरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःमधील दुष्प्रवृत्तींमध्ये सुधारणा करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना किती वेळ लागतो हे फारसे महत्त्वाचे नाही. ईश्वरप्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे अशी व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही काही साधीसुधी उपलब्धी नाही. आणि म्हणून, ती झाली नाही म्हणून हताश, निराश होण्याचे काही कारण नाही. कारण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन केले पाहिजे अशा गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये वेळोवेळी आढळतच राहतात. परंतु व्यक्तीने जर खरी इच्छा आणि योग्य दृष्टिकोन बाळगला असेल तर, अंतरंगातून येणाऱ्या सूचना किंवा अंतःप्रेरणा वाढीस लागतात, त्या अधिक सुस्पष्ट, नेमक्या, अचूक व्हायला लागतात आणि त्यांचे पालन करण्याची व्यक्तीची ताकदसुद्धा वाढीला लागते.

आणि तेव्हा मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी, तो ईश्वरच तुमच्याबाबतीत समाधानी होईल आणि मानवजात ज्या महान गोष्टीचे (परमेश्वराचे), आकलन करून घेण्याची आस बाळगू शकते त्या महान गोष्टीचे मानवजातीला तिची पुरेशी तयारी झालेली नसताना आकलन होऊ नये आणि त्यामुळे तिला धोका पोहोचू नये म्हणून, ईश्वर व साधक यांच्यामध्ये ईश्वरानेच जो पडदा निर्माण केलेला असतो आणि ज्या पडद्याच्या पाठीमागे राहून, तो स्वतःचे व साधकाचे संरक्षण करत असतो तो पडदा आता ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

श्रीअरविंद