Tag Archive for: पूर्णयोग

पूर्णयोगा’मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी ‘सत्या’चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात आणलाच पाहिजे.

– श्रीमाताजी
(White roses : 33)

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

कर्म आराधना – ३५

एखादी व्यक्ती हिमालयात निघून गेली तर, ती स्वतःला अक्रिय ध्यानासाठी (inactive meditation) सुयोग्य बनवू शकेल, पण ती जीवन जगण्यासाठी आणि ‘श्रीमाताजीं’ची सेवा करण्यासाठी काहीशी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर, पुढच्या जन्मामध्येही तिचे ते व्यक्तित्व तसेच कायम राहील. (हिमालयात निघून जाणे इ.) हा निव्वळ पारंपरिक कल्पनांचा प्रभाव आहे, त्यांचा पूर्णयोगात काहीही उपयोग नाही. या इथल्या जीवनात, ‘श्रीमाताजीं’च्या जवळ राहून, कर्म करत असतानाच, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे परिपूर्ण साधन बनण्यासाठी स्वतःला सुपात्र बनविले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

कर्म आराधना – २४

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही, वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा व्यक्तिनिष्ठ कल्पनांमध्ये हरवून बसाल….

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 248]

कर्म आराधना – २२

सामान्य जीवनामध्ये असलेले कर्म हे कधीकधी एखाद्या मानसिक आदर्शाने स्पर्शित होऊन, कोणत्यातरी मानसिक किंवा नैतिक नियंत्रणाखाली, कोणत्यातरी वैयक्तिक हेतुसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी केले जाते.

‘गीता’प्रणीत योगामध्ये, ईश्वराप्रत केलेला यज्ञ या भूमिकेतून व्यक्तीचे कर्म अर्पण केले जाते. इच्छाजय, अहंकारविरहित आणि इच्छाविरहित कृती, ‘ईश्वरा’विषयी भक्ती, वैश्विक चेतनेमध्ये प्रवेश, सर्व जीवमात्रांविषयी एकत्वाची भावना, ‘ईश्वरा’बद्दलची ऐक्यभावना यांचा ‘गीता’प्रणीत योगातील कर्मामध्ये समावेश होतो.

अतिमानसिक ‘प्रकाशा’चे व ‘शक्ती’चे अवतरण आणि प्रकृतीचे रूपांतरण ही ‘पूर्णयोगा’ची अंतिम उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांची पूर्णयोग ‘गीता’प्रणीत योगामध्ये भर घालतो.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 238]

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘अधिमानस’ आणि ‘अतिमानस’ यातील फरक स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात, पृथ्वी-रूपांतरणाचे एक आगळेवेगळे कार्य हे श्रीअरविंदांचे मुख्य कार्य आहे. मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ते सत्याचे विश्व आहे. परंतु त्या दरम्यान (पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान) ज्याला त्यांनी ‘अधिमानस’ (Overmind) म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या ‘अधिमानसा’ने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोहोचले होते त्यांच्या मनात, त्यांनी सत्य-चैतन्याला स्पर्श केला आहे, याविषयी तीळमात्रही शंका नव्हती. कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने याचे (अधिमानसाचे) वैभव एवढे महान असते, ते एवढे चमकदार असते की, त्यामुळे आपण अंतिमतः शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते. तथापि वास्तव हे आहे की ‘अधिमानस’ हे अस्सल ‘दिव्यत्वा’च्या पुष्कळ खाली आहे. ते सत्याचे खरेखुरे धाम नाही. तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे, सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे. पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी-प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविलेले नाही. याचे कारण हेच की, आजवर ‘अधिमानसा’लाच ‘अतिमानस’ म्हणून समजण्याची चूक झाली. वैश्विक देवदेवता सत्य-चेतनेमध्ये पूर्णतः वसती करत नाहीत : तर त्या केवळ त्या ‘सत्य-चेतने’च्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.

….’अधिमानसा’मध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही. त्यासाठी, ‘अतिमानस’ हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे. आणि येथेच आमचा योग (पूर्णयोग) हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ‘अधिमानसा’चे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर, मन आणि अस्सल ‘दिव्यत्व’ या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पायरी आहे, हे आमचा योग (पूर्णयोग) जाणतो. (क्रमश:)

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

साधनेची मुळाक्षरे – ३५

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार पुढीलप्रमाणे –

१) ज्यामुळे संपूर्ण भक्ती हीच हृदयाची मुख्य प्रेरणा आणि विचारांची स्वामिनी बनेल अशा प्रकारचे चैत्य परिवर्तन (psychic change) घडणे आणि जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहणे.

२) ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण घडणे, ज्यामुळे शरीराच्या अगदी पेशी न् पेशी भारल्या जातील.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ‘ईश्वरा’ची व ‘श्रीमाताजीं’ची अनुभूती येणे आणि त्या अनंत अशा चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 319)

साधनेची मुळाक्षरे – ३४

प्रश्न : पूर्णयोग म्हणजे काय?

श्रीअरविंद : संपूर्ण ‘ईश्वरी’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे तर, येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्मदान, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे अंतर्भूत आहे. आपले मन, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन आणि अवचेतन घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे. हे ‘पूर्णयोगा’चे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 358)

साधनेची मुळाक्षरे – ३३

(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)

हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.

याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.

या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.

व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.

एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)