Tag Archive for: व्यावहारिक जीवन

(श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत…)

…नातेसंबंध कधीच पूर्ण किंवा स्थायी समाधान देऊ शकत नाहीत; तसे असते तर मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी धडपडण्याचे कारणच नव्हते. तो त्याच्या सर्वसामान्य ऐहिक जीवनामध्येच समाधानी राहिला असता. जेव्हा ईश्वर गवसतो आणि चेतना ही सत्य-चेतनेमध्ये उन्नत होते, तेव्हाच इतरांबरोबर खरी नाती निर्माण होऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)

ईश्वराच्या समीपतेसाठी व्यक्तीमध्ये प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव असणे गरजेचे नाही; उलट, इतरांशी निकटतेची व एकत्वाची भावना असणे या गोष्टी म्हणजे, ईश्वरसान्निध्यामुळे आणि ईश्वराशी ऐक्यभावामुळे साधक ज्या दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करतो, त्या दिव्य चेतनेचाच एक भाग असतात.

…तर दुसऱ्या बाजूने पाहता, मानवी समाज, मानवी मैत्री, प्रेम, स्नेह, सह-अनुभूती या गोष्टी, अगदी पूर्णतः किंवा सर्वच उदाहरणांबाबत असे नव्हे, पण मुख्यत्वेकरून आणि बऱ्याचदा प्राणिक (vital) आधारावर उभ्या असतात आणि त्यांच्या केंद्रस्थानी अहंकाराची पकड असते. आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे याचे सुख, संपर्कामुळे अहंकार व्यापक होण्याचे सुख, आत्म्याचा परस्परांमध्ये प्रवेश, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पोषण होते असा प्राणिक देवाणघेवाणीचा उल्हास, या साऱ्या गोष्टींवर माणसांचे सहसा प्रेम असते – आणि यामध्ये इतरही काही आणि याहूनही अधिक स्वार्थी अशा प्रेरणा असतात; त्या प्रेरणा वरील मूलभूत गतिविधींमध्ये मिसळतात. यामध्ये अर्थातच उच्चतर आध्यात्मिक, आंतरात्मिक, मानसिक आणि प्राणिक घटकही प्रवेश करतात किंवा प्रवेश करू शकतात; परंतु एकंदरच ही सर्व गोष्ट खूप गुंतागुंतीची असते, अगदी तिच्या सर्वोत्तम अवस्थेत देखील ती गुंतागुंतीचीच असते. आणि म्हणूनच एका विशिष्ट अवस्थेमध्ये कोणत्यातरी प्रत्यक्ष कारणामुळे किंवा कारणाविनादेखील हे जग, जीवन, मानवी समाज आणि नातेसंबंध तसेच परोपकार या गोष्टी नीरस वाटू लागतात. (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच हा परोपकारदेखील अहं-प्रेरित असाच असतो.)

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 285-286)

प्रकृतीची संपूर्ण ज्वाला ही ईश्वराकडे वळवावी आणि उर्वरित गोष्टींनी खऱ्या आधाराची वाट पाहावी, ही योगामधील प्रमाण गोष्ट आहे, असा आमचा दृष्टिकोन आहे; सामान्य चेतनेच्या चिखलमातीवर उच्चतर गोष्टींची उभारणी करणे सुरक्षित नसते. यासाठी मैत्री किंवा बंधुभाव सोडण्याची आवश्यकता नाही, परंतु मध्यवर्ती अग्नीच्या तुलनेत या गोष्टी गौण असल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळात, एखाद्याने ‘ईश्वराबरोबरचे नाते’ हेच चित्तमग्न करणारे असे स्वतःचे ध्येय बनवले, – जे अगदी स्वाभाविक असते – तर ते साधनेला अधिकच बळकटी देते. आपण ज्या दिव्य चेतनेच्या शोधात आहोत त्या दिव्य चेतनेची प्रभा जेव्हा उजळलेली असते तेव्हा, आंतरात्मिक प्रेमाला (Psychic love) स्वतःचाच पूर्णतया शोध लागतो; जोपर्यंत आंतरात्मिक प्रेमाला हा शोध लागत नाही तोपर्यंत त्याला त्याचे प्रकाशमान, अविभाज्य असणारे स्व आणि रूप कायम राखणे अवघड होते.

मन, प्राण, शरीर ही आत्म्याची आणि जीवाची यथायोग्य साधने आहेत, जेव्हा ही साधने स्वतःसाठी कार्य करतात तेव्हा ती अज्ञानी आणि अपूर्ण गोष्टी निर्माण करतात – त्यांना जर आपण अंतरात्म्याची आणि जीवाची जागरूक साधने बनवू शकलो तर, त्यांना त्यांची स्वतःची दिव्यतर परिपूर्ती लाभते; पूर्णयोगामध्ये आपण ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो त्या पाठीमागची कल्पना हीच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 308)

केवळ प्राणामध्येच जोश असतो आणि आंतरात्मिक प्रेम (Psychic love) मात्र कोणत्याही ज्वालेविना काहीसे थंड असते, असे समजण्याची चूक करता कामा नये. …आंतरात्मिक प्रेमामध्ये सुद्धा जोश असू शकतो, प्राणिक प्रेमाइतकीच उत्कट किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट अशी ज्वाला असू शकते. तो शुद्ध अग्नी असतो, तो अहंकारात्मक इच्छावासनांच्या पूर्तीवर अवलंबून नसतो. तसेच, हे आंतरात्मिक-प्रेम ज्याला कवळते त्या समिधेचे (fuel) ते भक्षण करत नाही. ती ज्वाला लाल नसते, ती शुभ्र असते; परंतु उष्णतेच्या बाबतीत लाल उष्णतेपेक्षा ही धवल उष्णता कणभरदेखील उणी नसते. हे खरे आहे की, सहसा आंतरात्मिक प्रेमाला मानवी नातेसंबंध व मानवी प्रकृतीमध्ये पूर्ण वाव मिळत नाही; जेव्हा ते प्रेम ईश्वराभिमुख होऊन उन्नत होते तेव्हा तिथे त्याच्या अग्नीला अधिक सहजतेने पूर्णत्व आणि परमानंद गवसतो. मानवी नातेसंबंधांमध्ये हे आंतरात्मिक प्रेम इतर घटकांमध्ये मिसळून जाते; ते घटक लगेचच त्याला वापरण्याचा प्रयत्न करतात, त्याला झाकोळून टाकतात. अगदी क्वचितच काही क्षणी या प्रेमाला स्वतःची परिपूर्ण उत्कट अभिव्यक्ती करण्यास वाव मिळतो. अन्यथा, ते केवळ एक तत्त्व म्हणून प्रवेशते परंतु तरीसुद्धा ते प्राणप्रधान अशा त्या प्रेमामध्ये सर्व उच्चतर गोष्टी प्रदान करते – सुंदर असे माधुर्य, कोमलता, एकनिष्ठता, आत्मदान, आत्मत्याग, आत्म्याचे आत्म्याला भेटणे ह्या साऱ्या गोष्टी ते प्रदान करते. मानवी प्रेमाला स्वत:च्या अतीत जात, त्याला उन्नत करण्याची, त्याचे उदात्तीकरण करण्याची, त्याला आदर्श प्रेम बनविण्याची प्रक्रिया अंतरात्म्याकडूनच घडते. आंतरात्मिक प्रेम जर मानवी प्रेमाच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक या इतर घटकांवरही वर्चस्व राखू शकले आणि त्यांच्यावर शासन करू शकले आणि त्या घटकांचे परिवर्तन घडवू शकले तर, या द्वैती जीवनामध्ये (dual life), असे प्रेम म्हणजे, आत्मा आणि त्याच्या साधनांचे ‘परिपूर्ण ऐक्य’ हे जे वास्तव आहे त्याचे या पृथ्वीवरील काहीसे प्रतिबिंब असू शकते किंवा ती त्या वास्तवतेची पूर्वतयारी असू शकते, असे म्हणता येईल. परंतु आंतरात्मिक प्रेमाची अशा प्रकारची अपूर्ण रुपेसुद्धा खूप दुर्मिळ असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307-308)

दोन पुरुषांमध्ये किंवा दोन स्त्रियांमध्ये मैत्री होणे हे पुरुष आणि स्त्रीमध्ये मैत्री होण्यापेक्षा निश्चितपणे अधिक सोपे असते, कारण सहसा तेथे कोणतीही लैंगिक लुडबुड नसते. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीला कोणत्याही क्षणी सूक्ष्मपणे किंवा थेटपणे लैंगिक वळण लागू शकते आणि त्यातून विकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु स्त्री-पुरुषांच्या बाबतीत शुद्ध मैत्री अशक्यच असते असे मात्र नाही; अशी मैत्री असू शकते आणि ती नेहमीच अस्तित्वात असते. मात्र एवढे सांभाळले पाहिजे की, कनिष्ठ प्राणाने मागल्या दाराने त्यात डोकावून पाहता कामा नये किंवा त्याला प्रवेश देता कामा नये, या खुल्या किंवा छुप्या कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या (लैंगिक) आधाराव्यतिरिक्त इतर गोष्टींवर आधारित अशी आत्मीयता किंवा एक प्रकारचे आकर्षण, एक प्रकारचा सुसंवाद हा पुरुष आणि स्त्रीच्या प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येतो. कधीकधी असा सुसंवाद प्राधान्याने मानसिक किंवा आंतरात्मिक किंवा उच्चतर प्राणाच्या पातळीवरील असू शकतो किंवा या साऱ्यांच्या मिश्रणामधूनही त्याला आधार लाभत असतो. अशी मैत्री ही स्वाभाविक असते आणि अशा वेळी इतर गोष्टी मिसळल्यामुळे ती निम्न स्तरावर उतरेल किंवा ती मैत्री मोडेल अशी शक्यता खूपच कमी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307)

…व्यक्ती ज्याला सारे काही सांगू शकेल, ज्याच्यासमोर सारे काही उघड करू शकेल असा तो ईश्वरच व्यक्तीचा सर्वोत्तम मित्र असू शकत नाही का? कारण खरोखरच तोच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, पुन्हा पुन्हा केल्या नाहीत तर, साऱ्या चुका दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो; जो सर्व जाणू शकतो, साऱ्यावर उपाय करू शकतो आणि जो मार्गावर नेहमीच साहाय्य पुरवितो. तुम्ही अपयशी होऊ नये, तुम्ही डळमळू नये, कोलमडू नये आणि तुम्ही तुमच्या ध्येयाप्रत सरळ चालत राहावे यासाठी साहाय्य करणाराही तोच असतो. तोच खरा मित्र असतो, तुमच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्येदेखील तो तुमचा साथी असतो, तोच तुम्हाला जाणून घेऊ शकतो, तुम्हाला बरे करू शकतो आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तोच तुमच्यासोबत असतो. तुम्ही जेव्हा त्याला अगदी प्रामाणिकपणे हाक मारता तेव्हा, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला कवेत घेण्यासाठी आणि तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासाठी तो नेहमीच उपस्थित असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)

तुम्हाला तुमच्या कनिष्ठ पातळीवर घसरण्यास प्रोत्साहन देणारा, त्याच्यासोबत तुम्हीही मूर्खपणाच्या गोष्टी कराव्यात म्हणून प्रोत्साहन देणारा किंवा त्याच्या सोबत चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणारा किंवा तुम्ही ज्या हीन गोष्टी करत आहात त्याचे कौतुक करणारा असा कोणी ‘मित्र’ असू शकत नाही; हे अगदी स्पष्ट आहे. आणि तरीसुद्धा, कनिष्ठ पातळीवर उतरल्यावर देखील ज्यांच्यासोबत असताना अस्वस्थता (चुकल्या-चुकल्या सारखे) जाणवत नाही अशांबरोबरच सहसा तुम्ही मैत्री करता. शाळेत जाण्याऐवजी इकडेतिकडे भटकणे, बागांमध्ये जाऊन फळे चोरणे, शिक्षकांची टिंगलटवाळी करणे आणि यासारख्या साऱ्या गोष्टी करणे, अशा तऱ्हेच्या मूर्खपणाच्या गोष्टी करत असताना जी व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देत असते तिलाच व्यक्ती आपला खास मित्र समजते. ते तुमचे खरे मित्र नसतात. पण असे असूनसुद्धा ते खूप सोयीस्कर मित्र असतात कारण तुम्ही काही चुकीचे वागत आहात याची जाणीव ते तुम्हाला करून देत नाहीत; मी अशा माणसांना मित्र म्हणत नाही; खरे तर ते तुमचे शत्रूच असतात. एखादा मित्र मात्र तुम्हाला येऊन सांगतो, ”हे बघ, इतस्ततः भटकण्यापेक्षा, काहीच न करण्यापेक्षा किंवा काहीतरी मूर्खपणाच्या गोष्टी करण्यापेक्षा, जर तू वर्गात आलास तर ते अधिक बरे, असे तुला वाटत नाही का?’ सहसा मग व्यक्ती त्याला असे उत्तर देते की, ”मला त्रास देऊ नको, तू माझा मित्र नाहीस.”…

…व्यक्ती ज्याप्रमाणे एखाद्या संसर्गजन्य रोगापासून स्वतःचे संरक्षण करते त्याचप्रमाणे सोयीस्कर मित्रांपासून सुद्धा व्यक्तीने स्वतःला जपले पाहिजे. ज्याला संसर्गजन्य आजार झाला आहे त्याचा सहवास आपल्याला आवडत नाही आणि आपण सावधपणे त्याला टाळतो; तो आजार पसरू नये म्हणून सहसा त्याला विभक्त करण्यात येते. त्याचप्रमाणे, जो तुमच्याबरोबर मौज-मजा करतो आणि जो तुमच्यातील वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालतो त्याच्याबरोबर तुम्ही मैत्री करता कामा नये; तर चांगले सांगणारा जो तुमचा मित्र असतो त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवले पाहिजेत.

…खरंतर, जे तुमच्यापेक्षा अधिक हुशार असतात, ज्यांच्या सहवासामध्ये तुम्ही अधिक प्रगल्भ होता, जे तुम्हाला प्रगती करण्यास, अधिक चांगल्या प्रकारे वागण्यास, आणि अधिक स्पष्टपणे बघण्यास, स्वतःवर प्रभुत्व मिळविण्यास साहाय्य करतात, अशांसोबतच तुम्ही मैत्री केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 56-58)

(श्रीमाताजींचे एक शिष्य ‘पवित्र’ पुढील वचन वाचून दाखवितात…)
“आपल्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे त्यानिशी जो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण जसे आहोत, त्यापेक्षा काहीतरी निराळे असावे, अशी अधिकची अपेक्षा जो बाळगत नाही, तो आपला उत्तम मित्र.” (CWM 14 : 288)

श्रीमाताजी : आपण जी गोष्ट नेहमी विसरतो त्याच्या अनुषंगाने मी हे विधान केले होते. ती गोष्ट अशी की, व्यक्ती स्वतःचे मित्र आणि आजूबाजूला असणाऱ्यांकडून, ते जसे आहेत तसे नव्हे तर, तिला स्वतःला ते (मित्र) जसे असायला हवेत असे वाटते, तशी त्यांच्याकडून व्यक्ती अपेक्षा करत राहते – व्यक्ती स्वतःसाठी एक आदर्श ठरवू शकते आणि तोच आदर्श सर्वांवर लादू पाहते, पण…

यावरून मला टॉलस्टॉयच्या मुलाची गोष्ट आठवली. मी जपानमध्ये राहत असताना त्याची आणि माझी भेट झाली होती. जगातील माणसांमध्ये एकात्मता आणावी या आशेने तो जगभर प्रवास करत होता. त्याचा हेतू अतिशय उत्तम होता पण ते साध्य करण्याचा त्याचा मार्ग मात्र तितकासा चांगला नव्हता, असे दिसते. अत्यंत अविचल गांभीर्याने त्याने मला सांगितले की, जर प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण सारखेच कपडे परिधान करेल, एक सारखेच अन्नपदार्थ सेवन करेल आणि प्रत्येक जण समान रीतीनेच वागेल तर त्यामुळे अपरिहार्यपणे एकात्मता साधेल ! आणि जेव्हा त्याला विचारले की, हे तो कशा रीतीने साध्य करणार आहे, तेव्हा तो म्हणाला, ”देशोदेशी जाऊन एका नवीनच पण जागतिक भाषेची, एका नवीनच पण वैश्विक पोषाखाची आणि नवीनच पण वैश्विक सवयींची शिकवण दिली तर पुरेसे होईल.” तो हे अशा रीतीने करू इच्छित होता !

(श्रीमाताजी हसतात आणि म्हणतात,) खरे तर, प्रत्येक जण आपापल्या मर्यादित क्षेत्रात अशाच रीतीने वागत असतो. व्यक्तीचा स्वतःचा असा एक आदर्श असतो. सत्य, सुंदर आणि उदात्त कशाला म्हणावे, इतकेच काय पण ईश्वर म्हणजे काय, याचीदेखील प्रत्येकाची आपापली एक संकल्पना असते आणि ही संकल्पनाच तो इतरांवरही लादू इच्छित असतो. अशीही अनेक माणसं असतात की, ईश्वराबद्दलची त्यांची स्वतःची अशी एक संकल्पना असते आणि ते ती ईश्वरविषयक संकल्पना त्यांच्या सर्व शक्तिनिशी ईश्वरावरच लादू पाहत असतात आणि सहसा अशी माणसं स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत हिंमत हारत नाहीत !

आणि याच, अगदी स्वाभाविक आणि बहुतांशी अजाण अशा दृष्टिकोनाबद्दल बोलायचे माझ्या मनात होते; कारण मी जर तुमच्यापैकी एखाद्याला म्हणाले की, “हे बघा ! तुम्हीसुद्धा असेच करू इच्छित असता,” तर तो अगदी उसळून विरोध करेल आणि म्हणेल, “छे, छे! मी तरी माझ्या आयुष्यात असे कधीही केलेले नाही.” परंतु इतर लोकांबद्दल आणि विशेषतः त्यांच्या जीवनसरणीबद्दल एखाद्या व्यक्तीची जी मतं असतात ती याचसाठी असतात; कारण ते जसे असायला हवेत असे त्या व्यक्तीला वाटत असते, तशी ती माणसं असत नाहीत, वागत नाहीत म्हणून मग व्यक्ती त्यांना दोष देत राहते. या विश्वामध्ये दोन वस्तू अगदी एकसारख्या असू शकत नाहीत आणि असताही कामा नयेत; कारण तसे जर झाले तर ती दुसरी वस्तू निरूपयोगीच ठरेल कारण आधीपासून तशाच प्रकारची एक गोष्ट अस्तित्वात होती; तसेच हे विश्व अगणित बहुविधतेच्या सुमेळासाठी निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये कोणत्याही दोन प्रक्रिया – इतकेच काय पण कोणत्याही दोन चेतना या कधीच एकसारख्या असत नाहीत, हे आपण कधीच विसरता कामा नये. आणि असे जर का आहे तर, आपण हस्तक्षेप करण्याचा आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आपले विचार पटलेच पाहिजेत, अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कारण जर तुम्ही अमुक एका पद्धतीने विचार करत असाल तर हे उघडच आहे की, दुसरी व्यक्ती अगदी तुमच्याच पद्धतीने विचार करू शकणार नाही. तसेच, व्यक्ती म्हणून तुमचा जो एक विशिष्ट प्रकार आहे, अगदी त्याच प्रकारची दुसरी व्यक्ती असू शकणार नाही, हे निश्चित. या विश्वामध्ये असणाऱ्या साऱ्या विभिन्न गोष्टींना एकत्रित करून, प्रत्येक वस्तुला तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवून, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून, त्यांचा सुमेळ घडवायला तुम्ही शिकले पाहिजे. संपूर्ण सुसंवाद हा एकसारखेपणातून येत नाही तर, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य जागी ठेवल्यानेच सुसंवाद निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे आपला खरा मित्र आपल्यासारखाच असला पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला अधिकार नाही, तो जसा आहे तसाच असावा; हे लक्षात घेऊन त्यावर आपली प्रतिक्रिया आधारलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 55-56)

प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का?

श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते.

प्रश्न : मला समजले नाही.

श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना जर सामान्य माणसाची असेल तर तुम्ही सामान्य माणसासारखेच प्रेम कराल. तुमची चेतना ही जर अभिजनाची असेल तर तुमचे प्रेमदेखील उच्च व्यक्तीला साजेसेच असेल आणि तुमच्याकडे जर देवाची चेतना असेल तर तुमचे प्रेमदेखील देवासारखेच असेल. हे अगदी साधेसरळ आहे. आणि म्हणून, प्रगतीसाठी आणि आंतरिक रूपांतरणासाठी प्रयत्नपूर्वक, अभीप्सेच्या आणि विकासाच्या द्वारे, जर तुम्ही एका चेतनेमधून दुसऱ्या चेतनेमध्ये जाऊन पोहोचलात आणि तुमची चेतना जर अधिकाधिक विशाल होत गेली तर तुम्हाला येणारा प्रेमाचा अनुभव हा अधिकाधिक विशाल होत जाईल, हे अगदी उघड आहे.

समजा, तुम्ही अगदी स्फटिकवत स्वच्छ अशा खडकांमधून येणारे अगदी शुद्ध असे पाणी घेतलेत आणि ते एका बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये साठवलेत आणि त्या भांड्यामध्ये मात्र तळाशी काहीसा किंवा पुष्कळसा किंवा अगदी मोठ्या प्रमाणात गाळ असेल; तर जे पाणी खडकांमधून आले होते, ते आता अगदी जसेच्या तसेच शुद्ध आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यामध्ये त्या भांड्यामधील पुष्कळ गोष्टी मिसळल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे ते पाणी आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. अशा प्रकारे, प्रेम हे गाभ्यामध्ये अतीव शुद्ध, स्फटिकवत आणि परिपूर्ण अशी गोष्ट असते. मानवी चेतनेमध्ये असताना त्या प्रेमात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्या गाळाच्या प्रमाणात प्रेमदेखील अधिकाधिक गढूळ होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 102-103)

मानवी स्नेहसंबंधांचे मूल्य काहीही असले तरी त्याचे त्याचे स्वतःचे असे एक स्थान असते कारण दिखाऊपणापेक्षा खरेपणाला, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाला, मानवापेक्षा ईश्वराला पसंती देण्याइतपत जोवर चैत्य पुरुषाची (psychic being) तयारी होत नाही तोवर, त्याला आवश्यक असणारे सारे भावनिक अनुभव, या स्नेहसंबंधांमधून त्याला मिळत असतात. चेतना जशी उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आवश्यकता असते; तसेच हृदयाच्या साऱ्या कृतीदेखील उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आणि त्यांचा पाया व त्यांचे स्वरूप बदलण्याची आवश्यकता असते. सारे जीवन आणि चेतना ही ईश्वरामध्ये सुप्रतिष्ठित करणे म्हणजे योग होय, त्यामुळे प्रेम व स्नेह यांची मुळेसुद्धा ईश्वरामध्ये रुजली पाहिजेत तसेच ईश्वराशी आध्यात्मिक व आंतरात्मिक एकत्व हे त्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. इतर साऱ्या गोष्टी बाजूला सारून, प्रथमतः ईश्वराकडे पोहोचणे किंवा केवळ ईश्वराचाच शोध घेणे हा या बदलांच्या दिशेने घेऊन जाणारा सरळ मार्ग असतो. प्रेम हे अप्रीतीकडे किंवा थंड निर्ममतेकडे वळले पाहिजे असा याचा अर्थ नाही; तर त्यामध्ये आसक्ती असता कामा नये, असा याचा अर्थ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296-297)