Tag Archive for: व्यावहारिक जीवन

साधक एकमेकांपासून पूर्णतः अलिप्त असले पाहिजेत आणि त्यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असले पाहिजे, ही जी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, तिचा त्याग केलाच पाहिजे. ‘निर्वाण’ हे ध्येय मानणाऱ्या परंपरागत समजुतीमधून ही कल्पना उदयाला आली असावी; परंतु ‘निर्वाण’ हे येथील उद्दिष्ट नाही. संघर्ष नव्हे, तर सुसंवाद हा योगमय जीवनाचा धर्म असतो. जीवनामध्ये ‘ईश्वरा’ची परिपूर्ती हे येथील ध्येय आहे आणि त्यासाठी एकता व ऐक्य या गोष्टी अनिवार्य आहेत…

…सारे काही ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’भोवती केंद्रित झालेले असले पाहिजे आणि साधकांचे जीवन हे त्याच दृढ पायावर आधारलेले असले पाहिजे, साधकांच्या वैयक्तिक नातेसंबंधांच्या केंद्रस्थानीदेखील ‘ईश्वर’च असला पाहिजे. इतकेच नव्हे तर, सारी नाती ही प्राणिक पाया ओलांडून, आध्यात्मिक पायावर उभारली गेली पाहिजेत, ज्यामध्ये प्राण हा आध्यात्मिकतेचे केवळ एक रूप आणि साधन असेल. – याचा अर्थ असा की, परस्परांचे परस्परांशी कोणतेही नातेसंबंध असले तरी त्या नात्यांमधून मत्सर, संघर्ष, तिरस्कार, तिटकारा, द्वेष आणि इतर साऱ्या वाईट प्राणिक भावनांचा त्याग केला पाहिजे कारण त्या भावना आध्यात्मिक जीवनाचा भाग असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, जे प्रेम केवळ अहंकारासाठीच प्रेम करते आणि ज्या क्षणी अहंकार दुखावला जातो व असमाधानी होतो तेव्हा, जे प्रेम नाहीसे होते किंवा जे प्रेम द्वेष आणि तिरस्कारांचा परिपोष करते, अशा प्रकारचे अहंकारात्मक प्रेम आणि आसक्ती या साऱ्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. प्रेमामागे एक खरेखुरे जिवंतपण आणि टिकाऊ एकत्व असलेच पाहिजे. अर्थात हे गृहीतच आहे की, लैंगिक अशुद्धीसारख्या गोष्टीसुद्धा नाहीशा झाल्याच पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 288-289)

(आश्रमात वास्तव्यास येऊ पाहणाऱ्या एका साधकास उद्देशून श्रीअरविंदांनी लिहिलेले पत्र…)

तुम्हाला या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व समजलेले दिसत नाही. पूर्वीचा योग सर्वस्व त्यागाची अपेक्षा करत असे; त्यामध्ये या भौतिक जीवनाच्या त्यागाचादेखील समावेश असे. हा योग (पूर्णयोग) मात्र त्या ऐवजी एका नवीन आणि रूपांतरित जीवनाला आपले लक्ष्य मानतो. हा योग मन, प्राण आणि शरीर यांमधील इच्छा आणि आसक्ती यांचा अत्यंत कठोरपणे संपूर्ण त्याग करण्यावर भर देतो. चैतन्याच्या सत्यामध्ये जीवनाची पुनर्स्थापना करणे आणि या हेतुसाठी, आपण जे काही आहोत आणि आपण मन, प्राण, शरीर यांद्वारे जे काही करतो त्या साऱ्याची रुजलेली पाळेमुळे, मनाच्याही वर असणाऱ्या महत्तर चेतनेमध्ये रुपांतरित करणे, हे या योगाचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा की, या नवीन जीवनामध्ये सारे संबंध हे आध्यात्मिक आत्मीयतेवर आणि आपल्या सद्यकालीन संबंधांना आधार पुरविणाऱ्या सत्यापेक्षा एका निराळ्या सत्यावर स्थापित केले पाहिजेत. उच्चतर हाक येताच, ज्यास स्वाभाविक संग (affections) असे संबोधण्यात येते त्या सर्व संगाचा त्याग करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. आणि जरी ते तसेच ठेवण्यात आले तर ते त्यांच्यातील बदलांनिशीच ठेवले जाऊ शकतील; की जे बदल त्यांच्यात आमूलाग्र रुपांतर घडवून आणतील. पण त्या संबंधांचा परित्याग करायचा की ते कायम ठेवायचे व परिवर्तित करायचे या गोष्टी व्यक्तिगत इच्छांनुसार ठरविता कामा नयेत, तर ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सत्याद्वारेच त्या निर्धारित केल्या गेल्या पाहिजेत. सारे काही या ‘योगाच्या परमश्रेष्ठ स्वामी’वर सोपविले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 369)

लोकांमध्ये मिसळणे, हास्यविनोद करणे, चेष्टामस्करी करणे हा एक प्रकारचा प्राणिक विस्तार असतो, ते प्राणिक सामर्थ्य नव्हे – हा विस्तार खर्चिकसुद्धा असतो. कारण जेव्हा अशा प्रकारचे एकमेकांमध्ये मिसळणे घडून येते तेव्हा, प्राणिकदृष्ट्या जे सुदृढ असतात त्यांना त्यापासून बळ मिळते; परंतु प्राणिकदृष्ट्या जे दुर्बल असतात ते त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य खर्च करतात आणि अधिकच दुर्बल बनतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 326)

इतरांविषयीची विषमतेची भावना, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये जणू भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी (vital temperament) सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार (vital ego) दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

काही लोकांच्या प्राणिक प्रकृतीला नेहमीच गोंधळ, विसंवाद, क्षुद्र भांडणं आणि गोंधळगडबड हवाहवासा वाटतो; त्याचप्रमाणे त्यांना बहुधा दु:ख-कष्टाचे एक प्रकारचे खूळ असते आणि त्यांना वाटत असते की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात आहे.

यामध्ये सुधारणा करणे खूप अवघड असते आणि त्यासाठी प्रकृतीच्या आमूलाग्र रूपांतरणाची आवश्यकता असते. अशा लोकांशी वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया मनावर घ्यायच्या नाहीत आणि जे करणे आवश्यक आहे ते तुम्ही साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने करत राहायचे.

*

प्रश्न : माताजी, आमच्यामध्ये दोष असतात म्हणूनच आम्ही ते दुसऱ्यांमध्ये खपवून घेऊ शकत नाही, असेच नां? आम्हाला जो धक्का बसतो त्याचे मूळ कशामध्ये असते?

श्रीमाताजी : हो, सर्वसाधारणपणे, तुमच्यामध्ये जे दोष असतात तेच दोष इतरांमध्ये असल्याचे आढळून आल्यावर तुम्हाला खूप धक्का बसतो. आणि कालांतराने मग तुम्हाला उमगते की, इतर जण म्हणजे तुम्ही जे काही आहात त्याचे प्रतिबिंब दर्शविणारे आरसे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 280 & 16 : 297-298)

व्यक्ती जर दुर्बल नसेल तर ती कधीच हिंसक होणार नाही. दुर्बलता आणि हिंसा या दोन गोष्टी हातात हात घालून जातात. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, जो माणूस खरोखर बलवान असतो तो कधीही हिंसक नसतो. हिंसा ही नेहमीच कोठेतरी दुर्बलता असल्याचे लक्षण असते. एखादा पीळदार स्नायू असणारा दणकट माणूस स्वतःच्या सर्व ताकदीनिशी दुसऱ्या एखाद्या माणसाला ठोसे लगावत असतो, तेव्हा ते पाहिल्यावर आपण मनात म्हणतो की, “तो माणूस किती बलवान आहे.” पण हे खरे नाही. त्याच्याकडे भलेही पीळदार स्नायू असतील पण तो नैतिकदृष्ट्या दुर्बल असतो. त्यामुळे तो येथे बलवान तर दुसरीकडे दुर्बल असू शकतो. आणि बहुधा हे असेच घडते.

…क्षोभ, हिंसा, क्रोध या गोष्टी नेहमीच निरपवादपणे दुर्बलतेच्या द्योतक असतात. आणि विशेषतः व्यक्ती जेव्हा त्या भरात वाहवत जाऊन, नको नको ते बोलते, तेव्हा ते खरोखरच भयानक मानसिक दुर्बलतेचे – मानसिक आणि प्राणिक (mental and vital) दुर्बलतेचे लक्षण असते – भयानक दुर्बलतेचे लक्षण असते. तुम्ही असे असाल तर, कदाचित या जगातील सगळे अपमान तुम्हाला ऐकावे लागतील, लोक तुम्हाला शक्य तेवढ्या मूर्खपणाच्या सगळ्या गोष्टी सांगत राहतील; मात्र तुम्ही जर कमकुवत नसाल तर, त्याकडे बघून बाह्यतः तुम्ही हसणारही नाही कदाचित, कारण हसणे ही काही प्रत्येक वेळीच चांगली गोष्ट असते असे नाही, पण खोलवर, आत तुम्ही हसत असता आणि ती गोष्ट तशीच जाऊ देता, ती गोष्ट तुम्हाला स्पर्श करत नाही… साधी गोष्ट आहे, तुम्ही जर तुमच्या मनाला शांत राहण्याची सवय लावून घेतली असेल आणि तुम्हाला जर का तुमच्या अंतरंगात असलेल्या सत्याची जाणीव असेल तर, तुम्ही काहीही ऐकून घेऊ शकता (आणि तरीही त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.) एखादा हलकासा तरंगदेखील उमटत नाही; सारे काही अगदी अचल, शांत, स्थिर असते. आणि आपण मगाशी बोललो तसे, आपल्यामध्ये असणारा साक्षी जर या साऱ्या हास्यास्पद गोष्टींकडे पाहत असेल, तर तो त्याकडे पाहून नक्कीच हसतो.

पण दुसऱ्या व्यक्तीने स्वत:चा सारा राग, स्वत:चा उद्रेक तुमच्यावर काढला असेल तेव्हा जर, तुमच्यामध्येही तुम्हाला काही तरंग जाणवले तर… (सुरुवातीला कधीकधी होते असे…) अचानकपणे तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता, आणि तुम्हीही त्याच्यासारखेच चिडता, रागावता; तेव्हा निश्चितपणे असे समजा की, तुम्हीसुद्धा त्याच्या इतकेच कमकुवत आहात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 372-373)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा आणि दुखावलेल्या भावनांनिशी व्यक्तीचा अहंकारच स्वत: बाहेर उफाळून येतो आणि त्यामुळे विसंवाद अधिकच वाढीस लागतो. ईश्वराचे विभिन्न व्यक्तींबाबत विविध पद्धतीने कार्य चालू असते, हे अहंकाराला कधीच उमगत नाही आणि व्यक्तीने स्वतःच्या अहंकारी दृष्टिकोनातून गोष्टींचे मूल्यमापन करणे, ही एक अशी मोठी चूक असते की ज्यामुळे, गोंधळच वाढीला लागतो. आपण आवेगाने आणि असहिष्णुतेने जे जे काही करतो ते ईश्वरी असू शकत नाही कारण ‘ईश्वर’ शांती आणि सुसंवादामध्येच कार्य करतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 279)

मी याआधीही सांगितले आहे की, भांडणतंटे, एखाद्याशी संबंध तोडून टाकणे हा साधनेचा भाग असू शकत नाही; ज्या संघर्षाविषयी आणि मतभेदांविषयी तुम्ही बोलत आहात ते म्हणजे बाह्य जगामध्ये, प्राणिक अहंकार (vital ego) जसे परस्परांना भिडतात, तसलाच प्रकार आहे. …एका साधकाचे दुसऱ्या साधकाशी जे संबंध असतात त्या नात्यामध्ये सुसंवाद, सदिच्छा, सहिष्णुता, समता या आवश्यक अशा आदर्श गोष्टी आहेत. व्यक्तीने सगळ्यांमध्ये मिसळलेच पाहिजे असे नाही, पण जर का व्यक्ती आपलीआपली एकटीच राहात असेल तर तो एकांतवास फक्त साधनेसाठीच असला पाहिजे, इतर कोणत्या प्रेरणा त्यामागे असता कामा नयेत; तसेच त्यात श्रेष्ठत्वाची किंवा इतरांविषयीच्या तिरस्काराची भावनादेखील असता कामा नये.

…एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने जर त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये कोणत्याही कारणाने, अवांछित प्राणिक भावना उदयाला येत असल्याचे आढळले तर, जोपर्यंत तो किंवा ती या दुर्बलतेवर मात करत नाही तोपर्यंत, एक विवेकी बाब म्हणून, तो किंवा ती त्या संगतीपासून स्वतःला निश्चितपणे दूर करू शकतात. परंतु सार्वजनिक संबंध तोडून टाकणे, संबंध वर्ज्य करण्याचे अवडंबर करणे, या व अशासारख्या गोष्टींचा समावेश आवश्यक बाबींमध्ये करण्यात आलेला नाही. इतर भावनांप्रमाणेच विश्वासघाताच्या भावनांवरदेखील मात केली पाहिजे. या गोष्टींबाबत पुष्कळसा वैचारिक गोंधळ असतो; कारण त्यामध्ये प्राणिक गोष्टींचा शिरकाव होतो आणि गोष्टींकडे पाहण्याच्या योग्य दृष्टिकोनामध्ये बाधा निर्माण होते. शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेतून, प्रामाणिकपणे केली जाणारी गोष्टच फक्त योगसुसंगत असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347-348)

भांडणतंटे आणि संघर्ष हे योगाची बैठक नसल्याचे लक्षण आहे आणि ज्यांना खरोखरच योगसाधना करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी या गोष्टींच्या वर उठायला शिकले पाहिजे. कलह, वादंग वा भांडणाचे कोणतेही कारण नसताना संघर्ष न करणे हे अगदीच सोपे आहे; पण जेव्हा असे कोणतेतरी कारण असते आणि दुसरी बाजू अगदी असह्य असते किंवा अविवेकी असते तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या प्राणिक प्रकृतीच्या वर उठण्याची संधी मिळते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347)

मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे.

*

व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते.

*

जेव्हा तुम्ही भांडणाला सुरुवात करता तेव्हा, तुम्ही जणू काही ईश्वरी कार्याविरोधात युद्ध पुकारता.

*

हो, भांडणे करणे ही अगदी दुःखद गोष्ट आहे – त्यांच्यामुळे कार्यामध्ये भयंकर बाधा येते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच अधिक कठीण होऊन जाते.

*

व्यक्तीला स्वतःच्या दोषांबद्दल वाईट वाटणे हे, एक वेळ गरज पडल्यास, स्वतःच्या दोषांमध्ये सुधारणा करण्याच्या संकल्पाचे दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

परंतु इतरांच्या दुराचरणामुळे व्यक्तीला स्वतःला अपमानित झाल्यासारखे वाटणे, याचा आध्यात्मिक जीवनाशी किंवा ईश्वराच्या सेवेशी काही संबंध नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 262-264)