Tag Archive for: व्यावहारिक जीवन

एकत्व – ०९

 

इच्छावासना आणि त्यासारख्या इतर गोष्टी शंभरापैकी नव्वद वेळा तरी तुमच्याकडे इतर कोणाकडून तरी, किंवा एका विशिष्ट परिस्थितीमधून, किंवा परिस्थितीच्या संचाकडून आलेल्या असतात किंवा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तिकडून किंवा इतर अनेक लोकांकडून आलेले ते स्पंदन असते. त्यामधील फरक कळणे ही गोष्ट खूपच सोपी आहे, फरक करण्याची पहिली कोणती गोष्ट असेल तर ती हीच. ते एक असे स्पंदन असते की, जे अचानकपणे तुमच्या मधील त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कशाला तरी जागे करते. कशाचातरी तुमच्यावर प्रभाव पडतो आणि ह्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये एक प्रतिसाद जागा होतो, ज्याप्रमाणे तुम्ही एखादा स्वर वाजवत असता तेव्हा होते तसेच. वासनेचे एक स्पंदन येते आणि विशिष्ट प्रकारे तुमच्यावर हल्ला करते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता.

व्यक्ती सातत्याने सामूहिक सूचनांच्या गर्दीमध्ये वावरत असते, अगदी सातत्याने. उदाहरणार्थ, मला माहीत नाही, तुम्ही कधी अंत्ययात्रेला गेलेला आहात की नाही ते, किंवा एखाद्या घरात जिथे व्यक्तिचे निधन झाले आहे, अशा घरात तुम्ही गेला आहात की नाही ते मला माहीत नाही. अर्थातच तुम्ही स्वतःचे थोडेफार तरी निरीक्षण करत असला पाहिजेत, तसे नसेल तर मग तुम्हाला काहीच जाणवणार नाही – परंतु तुम्ही थोडेफार जरी निरीक्षण करत असाल तर, तुमच्या असे लक्षात येईल की, त्या निधन पावलेल्या व्यक्तिबद्दल दुःख वाटावे, शोक वाटावा असे खरंतर काहीच कारण नव्हते; तुमच्या लेखी ती व्यक्ती इतर अनेक व्यक्तिंप्रमाणेच होती. वास्तविक सामाजिक परिस्थितीचा सामायिक परिणाम म्हणून तुम्ही त्या घरी गेलेला असता. आणि तेथे, का कोण जाणे पण एकाएकी, काहीही कळत नसताना, तुम्हाला एकदम खूप दुःख, गहिरे दुःख जाणवते, तशी खूप तीव्र भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, “मी इतकी का बरे दुःखी आहे ?” तर त्याचे उत्तर असे की, ती भावना म्हणजे दुसरी तिसरी काही नसते, तर त्या स्पंदनांनी तुमच्यामध्ये प्रवेश केलेला असतो.

हे निरीक्षण करण्यासाठी अगदीच सोपे आहे. मी अगदी लहान होते तेव्हा हा अनुभव मला आलेला होता. तेव्हाही मी योगसाधना करत होते पण ती जागरुकपणे करत नव्हते. आणि तरीदेखील मी याचे अगदी स्पष्टपणे निरीक्षण केले होते. मी मलाच समजावून सांगितले, “नक्कीच, जे मला जाणवत आहे ते त्या इतरांचे दुःख आहे, कारण त्या व्यक्तिच्या जाण्याचा माझ्यावर काही खास परिणाम व्हावा असे काहीच कारण नाहीये.” आणि त्याचवेळी अचानक माझे डोळे अश्रूंनी भरून आले; गळा दाटून आला आणि मला रडावेसे वाटू लागले, जणू काही मी खूप दुःखामध्ये आहे – मी तेव्हा अगदीच लहान होते पण तेव्हा देखील चटकन माझ्या लक्षात आले की, “त्यांच्या दुःखाने माझ्यामध्ये प्रवेश केला आहे.”

हीच गोष्ट रागाबाबत देखील असते. हे अगदी उघड आहे, व्यक्ती कोणत्यातरी व्यक्तिकडून किंवा वातावरणातून – हो, वातावरणामध्ये तो असतो – त्या वातावरणातून अचानकपणे तो राग तुमच्यामध्ये शिरतो आणि तो सहसा खालून तुमचा ताबा घेतो, तो वर वर चढत जातो आणि तो राग मग तुमच्या मस्तकात जातो. अगदी एक मिनिटापूर्वी तुम्ही शांत असता, तुम्ही अगदी स्वतःमध्ये मग्न असता, तुमचा तोल ढळण्याचे तसे कोणतेच कारणही नसते. आणि अचानक तो राग तुमचा इतक्या ताकदीने ताबा घेतो की, तुम्हाला तो आवरतच नाही कारण तुम्ही पुरेसे जागृत नसता, तुम्ही त्याला खुशाल आत शिरकाव करू देता आणि मग तो तुमचा वापर करतो.. ज्याला तुम्ही स्वतः असे म्हणता, त्याचा वापर तो करतो. म्हणजे तुमच्या शरीराचा ! कारण वरवर पाहता तरी, शरीर हीच तुमच्यातील अशी गोष्ट असते की, जी तुम्हाला तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तिच्या शरीरापेक्षा वेगळी करते. अर्थात, हा सुद्धा एक दृष्टिभ्रम आहे; कारण वस्तुतः सदासर्वकाळ ज्याला सूक्ष्मकण म्हणता येतील असे अगदी भौतिक कण असतात, फाकले जाणारे किरण असावेत तसे ते तुमच्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि इतरांच्या सूक्ष्मकणांमध्ये मिसळत असतात. आणि त्यामुळेच व्यक्ती जर पुरेशी संवेदनशील असेल तर, दुसऱ्याचे अस्तित्व एखाद्या व्यक्तिला दूर अंतरावरून देखील जाणवू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 53-55)

अज्ञानमूलक चुका सुधारणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो; पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा प्रज्ज्वलित केलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा!… हे असे करणे म्हणजे, अंधकाराला हेतुपुरस्सर परत बोलावण्यासारखेच आहे.

-श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

एकत्व – ०८

 

भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असत की, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे स्पंदन वातावरणामध्ये सोडता, उदाहरणार्थ एखादी इच्छा, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयीची इच्छा, तेव्हा ती इच्छा एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, दुसऱ्या व्यक्तिकडून तिसऱ्या व्यक्तिकडे अशी जगभर संक्रमित होत जाते आणि नंतर ती फिरून परत तुमच्यापाशीच येते. आणि वातावरणात सोडलेली ती काही एकमेव अशी गोष्ट नसते, तर गोष्टींचे एक आख्खे विश्वच असते आणि पुन्हा असे की, तुम्ही या विश्वातील प्रक्षेपण करणारे एकमेव केंद्र नसता तर, प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रक्षेपणाचे एक केंद्र असते – तेव्हा हा एवढा गोंधळ असतो की, तुम्ही तुमची भूमिकाच तेथे गमावून बसता. परंतु ही सर्व स्पंदनं अगदी एकाच, अगदी एकसारख्या क्षेत्रातूनच संक्रमित होत असतात. केवळ त्या स्पंदनांचे एकमेकांवर धडकणे, त्यांची व्यामिश्रता, यामुळे काहीतरी वेगळे, स्वतंत्र असल्याची भावना तुम्हाला होते.

स्वतंत्र, अलग असे काहीच नसते. एकच एक मूलद्रव्य आहे, एकच शक्ती आहे, एकच चेतना आहे, एकच संकल्प आहे जो अगणित अशा व्यक्तिमत्त्वांमधून संचार करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे की, व्यक्तिला त्याची जाणच नसते, परंतु जर व्यक्ती थोडी मागे सरकेल आणि त्या विचारप्रवाहाचा मागोवा घेत जाईल, मग तो विचारप्रवाह कोणता का असेना, तेव्हा व्यक्तिच्या लक्षात येईल की, ही विचारस्पंदनेच स्वतः एकातून दुसरे या पद्धतीने फैलावत जातात. वस्तुतः प्रत्यक्षात तेथे एकमेव एकत्व असते – मूलद्रव्याचे एकत्व, चेतनेचे एकत्व, संकल्पाचे एकत्व. येथे एकच एक सत्यता आहे. बाह्यतः एक प्रकारचा आभास असतो. अलगपणाचा, वेगळेपणाचा आभास असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 52-53)

एकत्व – ०७

जर तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण केलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुम्ही जे काही विचार करत असता, ते इतरांनी केलेले विचार असतात. त्यांचे ते विचार फिरत असतात आणि तुमच्या मधून जात असतात, परंतु ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तुम्ही त्या विचारांचे निर्माणकर्ते नसता. तुमच्या सर्व प्रतिक्रिया या अनुवंशिकतेतून येतात, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो, ज्या परिसरात तुम्ही जीवन जगत असता, आजवर ज्या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात, त्यातून तुमची घडण झालेली असते. आणि तुम्हाला वाटत असते की, त्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही आहात. असे असूनसुद्धा ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तर तुम्हाला ते जाणवलेले असतात, तुमच्या अनुभवास आलेले असतात. ते विचार जेव्हा तुमच्यामधून जात असतात, तेव्हा तुम्हाला त्यांची जाणीव होते, पण तुम्ही त्यांचे निर्माणकर्ते नसता, म्हणजे तुम्ही त्या विचारांना जन्म दिलेला नसतो.

उदाहरण द्यायचे झाले तर, असे म्हणता येईल की, ते विचार ध्वनींसारखे असतात. कोणत्याही प्रकारचे ध्वनी घ्या – शब्द, संगीत, कोणतेही ध्वनी – जे एका उपकरणाने ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ग्रामोफोनसारख्या दुसऱ्या एका उपकरणाच्या माध्यमातून ते परत वाजविण्यात आलेले असतात, त्याप्रमाणे हे असते. तुम्ही जो ध्वनी ऐकत आहात तो ग्रामोफोनने निर्माण केला आहे, असे तुम्ही म्हणाल का? नाही, असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भास होत असल्याने, तुमच्या मनाच्या माध्यमातून जे विचार दुसरीकडे जातात, ते विचार अभिव्यक्त होतात, तुमच्या प्राणिक अस्तित्वातून ज्या संवेदना जात असतात, त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि तुम्हाला असे वाटते की, ते विचार, त्या संवेदना तुमच्याकडून आल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काहीही येत नाही. निर्माण करण्यासाठी मुळात ‘तुम्ही’च असता कुठे ?

तुमच्या अस्तित्वातील सर्जक वास्तवेची तुम्हाला जाण येण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा जो शाश्वत गाभा आहे, तो शोधावयास हवा, त्यासाठी तुम्ही खूप आत, आत, अंतरंगात गेले पाहिजे.

आणि एकदा का तुम्हाला त्या शाश्वत गाभ्याचा शोध लागला की, तुम्हाला जाणीव होईल की, ती एकच एक अशी एकमेव सद्वस्तु आहे, इतर सर्वांमध्येही तीच सद्वस्तु आहे आणि मग असे असेल तर, तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व शिल्लक रहातेच कोठे? काहीच शिल्लक रहात नाही.

हो, ती केवळ ध्वनिमुद्रण करणारी आणि पुन्हा ध्वनी वाजवणारी उपकरणे असतात आणि त्यामध्ये नेहमीच विकार निर्माण होत राहतात. काही विकार चांगल्यासाठी असतात, काही विकार वाईटासाठी असतात, मुळातील विचारांमध्ये फार मोठे बदल घडण्याचीही शक्यता असते. एका व्यक्तिमधून दुसऱ्यामध्ये ते विचार संक्रमित होत असताना, ते जसेच्या तसे संक्रमित होत नाहीत कारण आंतरिक रचनाच तशा असतात, ते उपकरण अतिशय जटिल असे असते.

परंतु ती एकच आणि समान अशी गोष्ट असते की, जी जागृत संकल्पाद्वारे संचालित होत असते, ती सर्व वैयक्तिक इच्छांपासून स्वतंत्र अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 51-52)

एकत्व – ०६

 

भांडणं न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. असे म्हणणे हे काहीसे विचित्र वाटेल कारण गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडाभांडी करणे, मग ती उघडपणे असोत किंवा छुपी असोत, हाच असतो. आपण अगदी प्रत्येक वेळीच बाचाबाची करतो असे नाही, किंवा अगदी हमरीतुमरी वर येतो असेही नाही – सुदैवाने – पण आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता कारण, तुम्हाला स्वतःमध्ये जी परिपूर्णता आणावयाची इच्छा असते ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडत नाही. वास्तविक ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे तुम्हाला देखील अवघड असते – परंतु तुम्हाला मात्र असे वाटत असते की, ती इतरांनी प्रत्यक्षात आणलीच पाहिजे.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन हे अधिक शांतिपूर्ण आणि अधिक प्रभावीदेखील असेल. कारण जी परिपूर्णता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ती तुम्हाला इतरांमध्ये दिसली नाही तर, तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये निश्चितपणे तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता.

इतरांनी परिपूर्णता प्रत्यक्षात उतरवली पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि जे उद्दिष्ट वास्तविक तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी तुम्ही क्वचितच जागरुक असता. जर तुम्ही त्याविषयी जागरुक झालात, म्हणजे, तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत तर, म्हणजे, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते प्रत्यक्षात आणावयास सुरुवात केलीत तर, इतर काय करतात, याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही. आणि खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगावयाचा झाला तर तो हाच की, “जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत, जी कोणती परिस्थिती जीवनात माझ्या वाट्याला आली आहे, माझ्या जवळच्या असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या म्हणजे, मी कोणती प्रगती करावयास हवी हे मला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसेच आहेत. इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.”

आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तिला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 22-23)

एकत्व – ०५

दुसऱ्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये काय चालू आहे, हे नेमकेपणाने जाणण्यासाठी तुम्ही कधीच त्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तुमची जाणीव त्या व्यक्तिमध्ये प्रक्षेपित करावयाची नाही; कारण तसे केलेत तर, तुम्हाला त्या व्यक्तिमध्ये स्वतःचेच दर्शन होईल आणि ते काही स्वारस्यपूर्ण नाही – त्याऐवजी त्या व्यक्तिच्या आतमध्ये असणाऱ्या जाणिवेच्या संपर्कात प्रवेश करावयाचा, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तिच्या काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा, तुम्ही अमुक एका गोष्टीकडे अमुक एका पद्धतीने पाहत असता, तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीकडे दुसऱ्याच पद्धतीने पाहत असते. जर माणसं समंजस असतील तर ती भांडत बसत नाहीत. पण जेव्हा माणसं समंजस नसतात तेव्हा, ती भांडाभांडी करायला सुरुवात करतात. तेव्हा, भांडत बसण्यापेक्षा एक चांगली गोष्ट अशी करावयास हवी; ती म्हणजे, दुसऱ्याच्या जाणिवेमध्ये प्रवेश करावयाचा आणि स्वतःला विचारायचे की, तो अमुक अमुक गोष्टी अशा का करत आहे, त्याला असे म्हणायला किंवा करायला लावणारे कोण आहे ? त्याने असा दृष्टिकोन बाळगावा यासाठी, वस्तुमात्रांकडे पाहण्याची त्याची कोणती दृष्टी कारणीभूत आहे, त्या पाठीमागचे आंतरिक कारण काय असेल ? हे खूपच रोचक असते. जर तुम्ही असे कराल, तर तुमचे रागावणे ताबडतोब बंद होईल. पहिली गोष्ट अशी घडेल की, तुम्ही रागावूच शकणार नाही. तेव्हा हा एक फारच मोठा फायदा आहे. आणि दुसरे म्हणजे, जरी दुसऱ्याचे रागावणे चालूच राहिले तरी त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि नंतर मग, हळूहळू, व्यक्तिने दुसऱ्याशी स्वतः पूर्णतया एकत्व पावण्याचा व त्याद्वारा मग भेदाभेदाच्या, विरुपतेच्या स्पंदनांना रोखण्याचा आणि भांडणं थांबवायचा प्रयत्न करायचा. हे अतिशय उपयोगी ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 424-425)

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच मनुष्याला समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्याला सहन होत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 267)

प्रेमगुणांच्या उपयोजनातून निर्धारित झालेली मूर्त आणि व्यवहार्य अशी कृती म्हणजे परोपकार ! कारण नेहमीच अशी एक शक्ती असतेच असते, की जी सर्वांमध्ये वितरित करता येणे शक्य असते, अर्थात ती अत्यंत व्यक्तिनिरपेक्ष रूपात प्रदान केली गेली पाहिजे. ती शक्ती म्हणजे प्रेम, ज्यामध्ये प्रकाशाचा आणि जीवनाचा समावेश असेल असे प्रेम; म्हणजेच बुद्धिमता, आरोग्य, बहरुन येण्याच्या सर्व शक्यता. हो, आनंदी हृदयामधून, प्रसन्न अशा जीवामधून उदित होणारी, ही सर्वात उदात्त अशी परोपकाराची भावना होय.

ज्याने आंतरिक शांती प्राप्त करून घेतली आहे तो मुक्तिचा अग्रदूत असतो; तो जिथे जातो तेथे – आशा आणि आनंदाचा वाहक बनतो. गरीब बिचाऱ्या, रंजल्यागांजल्या मानवांना ह्या गोष्टींपेक्षा दुसरे तरी काय हवे असते? अशी काही माणसं असतात की, ज्यांचे विचार म्हणजे सर्व प्रेमच असते, ज्यांच्यामधून प्रेमच उदित होत असते. अशीही काही माणसं असतात आणि अशा व्यक्तींची केवळ उपस्थितीही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक कृतिशील, अधिक सच्चा असा परोपकार असते. अशा व्यक्तींनी एखादा शब्दही उच्चारला नाही किंवा कोणत्याही भावमुद्रा केल्या नाहीत तरीही, आजारी माणसं बरी होतात, दुःखितांना दिलासा मिळतो, अज्ञानी लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळतो, दुष्ट लोकदेखील शांत होतात, जे दुःखीकष्टी आहेत त्यांना सांत्वन लाभते आणि ज्यामधून त्यांच्यासाठी नवीन क्षितिजेच खुली होतील, अशा प्रकारचे सखोल रूपांतरण त्यांच्यामध्ये होते आणि त्यातूनच प्रगतीच्या अनंत अशा मार्गावर, निःसंशयपणे एक निर्णायक पाऊल पुढे टाकले जाण्याची क्षमता त्यांच्या अंगी येते. ज्या सर्वांच्या सेवक बनतात आणि आपल्या प्रेमाद्वारे सर्वांना स्वतःलाच देऊ करतात अशा व्यक्ती म्हणजे परम परोपकाराचे चालतेबोलते प्रतीकच असतात.

हे माझ्या बांधवांनो, जे जे कोणी परोपकारी होण्याची आस बाळगतात अशा तुम्हा सर्वांना मी निमंत्रित करत आहे, ही सदिच्छा अभिव्यक्त करण्यासाठी माझ्या विचारांमध्ये तुमचे विचार मिसळवा; त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यासाठी, आपण दररोज थोडे अधिक प्रयत्न करू. जेणेकरून आपणही त्यांच्यासारखेच या जगामध्ये प्रकाश आणि प्रेमाचे संदेशदूत बनू शकू.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 105-106)

जेव्हा भौतिक परिस्थिती ही काहीशी कठीण असते असते आणि त्यातून काहीशी अस्वस्थता येते अशा वेळी, त्या परमेश्वराच्या इच्छेसमोर पूर्णतः समर्पित कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल, म्हणजे जीवन किंवा मृत्यू, आरोग्य किंवा आजारपण, याच्याविषयी यत्किंचितही काळजी न करता, जर व्यक्ती समर्पित होऊ शकली तर, तिचे समग्र अस्तित्व त्वरेने त्या ईश्वराच्या जीवन आणि प्रेमाच्या कायद्याच्या सुसंवादामध्ये प्रवेश करते आणि सर्व शारीरिक अस्वास्थ्यता नाहीशी होऊन, त्याची जागा एका स्वस्थ, गहन आणि शांतिमय अशा कल्याणाने घेतली जाते.

माझ्या हे पाहण्यात आले आहे की, ज्यामध्ये व्यक्तीला प्रचंड शारीरिक सहनशीलतेची आवश्यकता असते, अशा कार्याला जेव्हा व्यक्ती सुरुवात करते, तेव्हा तिला ज्या अडचणींना सामोरे जावे लागणार असते, त्या कल्पनेनेच व्यक्ती हबकून जाते. त्यापेक्षा प्रत्येक क्षणी वर्तमानातील अडचणींकडे पाहणे हे अधिक शहाणपणाचे असते; त्यामुळे आपले प्रयत्न अधिक सोपे होतात; कारण आपल्या वाट्याला येणारा प्रतिकार हा नेहमीच आपल्या सामर्थ्याच्या प्रमाणात असतो.

वास्तविक, आपले शरीर हे एक अद्भुत साधन आहे; परंतु त्याचा उपयोग कसा करावयाचा हे आपल्या मनाला समजत नाही. शरीराच्या सौष्ठवाचे, त्याच्या लवचीकतेचे पोषण न करता, ते त्याला पूर्वाधारित कल्पना आणि प्रतिकूल सूचनांमधून येणाऱ्या विशिष्ट चौकटीमध्ये बसवते.

परंतु हे प्रभो, तुझ्याशी एकरूप होणे, तुझ्यावरच विश्वास ठेवणे, तुझ्यामध्ये निवास करणे, तूच होऊन राहणे हेच परम विज्ञान आहे; आणि मग असा माणूस जो तुझ्या सर्वसमर्थतेचे आविष्करण करणारा बनतो, तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट अशक्य असत नाही. हे प्रभो, एखादी मौन आराधना असावी, एक प्रकारचे शांत भजन असावे त्याप्रमाणे माझी अभीप्सा तुझ्याप्रत उदित होत आहे, आणि तुझ्या दिव्य प्रेमाने माझे हृदय उजळून निघत आहे. हे दिव्य स्वामी, मी तुला नतमस्तक होऊन, मी तुला प्रणिपात (प्रणाम) करत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 101)

आजारपणाचे शारीरिक किंवा मानसिक, बाह्य वा आंतरिक, कोणतेही कारण असू दे, परंतु त्याचा परिणाम शारीरिक देहावर होण्यापूर्वी, व्यक्तीभोवती असणाऱ्या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या अजून एका स्तराला त्या आजाराने स्पर्श करणे आवश्यक असते. या सूक्ष्म स्तराला वेगवेगळ्या शिकवणीमध्ये विविध नावे असतात. कोणी त्याला आकाशदेह म्हणतात तर कोणी त्याला नाडीगत आवरण किंवा प्राणमय कोश (Nervous Envelope) म्हणतात. एखादी खूप गरम आणि उकळती वस्तू असली तर तिच्या भोवती जशी धग जाणवणारी, सूक्ष्म संवेदना असते, तशीच काहीशी त्याची घनता असते, ती त्याच्या शरीरातून बाहेर उत्सर्जित होत असते आणि ती शरीरावर अगदी निकट आवरण घालून असते.

या स्तराच्या माध्यमातूनच बाह्य जगताशी व्यक्तीचे सर्व व्यवहार होत असतात आणि शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी या प्राणमय कोशावर हल्ला होणे आणि त्यातून आत शिरकाव होणे हे प्रथम आवश्यक असते. हे आवरण जर पूर्णपणे बलवान आणि अभेद्य असेल, तर मग प्लेग किंवा कॉलरासारख्या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही निरोगी राहू शकता. जोपर्यंत हे आवरण पूर्ण आणि समग्र आहे, एकसंध आहे, त्याचे घटक हे निर्दोष समतोल राखून आहेत, तोपर्यंत आजारांच्या सर्व संभाव्य हल्ल्यांपासून हे एक परिपूर्ण संरक्षण असते.

एका बाजूने शरीर हे जडतत्त्वाने बनलेले असते, जडद्रव्याने म्हणण्यापेक्षा भौतिक परिस्थितीने बनलेले आहे, असे म्हटले पाहिजे तर दुसऱ्या बाजूने ते आपल्या मानसिक स्थितीच्या स्पंदनांनी बनलेले असते. शांती, समता, आरोग्याबद्दल खात्री आणि श्रद्धा, स्वस्थ विश्रांती, प्रसन्नता आणि उजळ आनंदीपणा या तत्त्वांपासून हे आवरण बनलेले असते. आणि या आवरणाला ही तत्त्वे बळ आणि द्रव्य पुरवितात. अगदी सूक्ष्म आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे असे हे संवेदनशील माध्यम असते; ते अगदी त्वरेने सर्व प्रकारच्या सूचनांचा स्वीकार करते आणि स्वतःमध्ये त्वरेने बदल घडवून आणू शकते आणि त्याची परिस्थितीही जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकू शकते.

वाईट सूचनेचा त्याच्यावर खूपच जोरकसपणे परिणाम होतो; तसेच उलट, तितक्याच जोरदारपणे चांगल्या सूचनेचाही त्याच्यावर परिणाम होतो. नैराश्य आणि नाउमेद यांचा त्याच्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होतो; या गोष्टी त्या आवरणाला छिद्रे पाडतात, जणू त्याच्या द्रव्यामध्ये छेद करून त्याला कमकुवत, अप्रतिकारक्षम बनवितात आणि विरोधी हल्ल्यांना सुकर असा मार्ग खुला करून देतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 89)