Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कृतज्ञता – २५

निराशा आपल्याला कोठेच घेऊन जात नाही. सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण स्वतःलाच एक गोष्ट सांगितली पाहिजे की, आपण प्रगती करत आहोत की नाही, हे जाणण्यासाठी आपण पूर्णतः अक्षम असतो. कारण आपल्याला जेव्हा साचलेपण (stagnation) आल्यासारखे वाटते तेव्हा ती स्थिती बरेचदा दीर्घकाळाची असू शकते, परंतु ती निश्चितच अंतहीन नसते तर ती पुढे झेप घेण्यासाठीची पूर्वतयारी असते. कधी कधी या पूर्वतयारीचा कालावधी काही आठवडे किंवा महिने चालू असल्याचे आपल्या निदर्शनास येते. आणि नंतर दीर्घकाळपर्यंत ज्याची तयारी चालू होती ती गोष्ट एकदम अचानक प्रत्यक्षात उतरलेली दिसून येते आणि मग आपल्याला बराच लक्षणीय बदल झालेला दिसून येतो आणि हा बदल एकाच वेळी अनेक बाबतीत झालेला असतो.

योगातील सर्व गोष्टींप्रमाणेच, प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे देखील प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रेमाखातरच केले गेले पाहिजेत. प्रयत्नांचा आनंद, प्रगतीची आस या गोष्टी स्वयमेव पुरेशा असल्या पाहिजेत, त्या त्याच्या परिणामांवर अवलंबून असता कामा नयेत. व्यक्तीने योगामध्ये केलेली प्रत्येक कृती ही, ती कृती करण्याच्या आनंदासाठीच केली पाहिजे, त्यापासून व्यक्तीला ज्या फळाची अपेक्षा असते, त्या फळासाठी ती कृती व्यक्तीने करता कामा नये. खरोखरच, जीवनामध्ये नेहमीच, कोणत्याही गोष्टीचे फळ आपल्या हाती नसते. आपल्याला जर योग्य दृष्टिकोन बाळगण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण जे करणे आवश्यकच आहे, तीच गोष्ट आपण अगदी उत्स्फूर्तपणे केली पाहिजे, ती गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे, आपण त्या गोष्टीचाच विचार केला पाहिजे, आणि त्याचा काहीतरी परिणाम साध्य करून घेण्याच्या दृष्टीने नव्हे तर, ती गोष्ट मिळविण्यासाठीच धडपड केली पाहिजे. आपण ज्या क्षणी परिणामाचा विचार करायला लागतो त्या क्षणीच सौदेबाजी करायला सुरुवात करतो आणि अशा रीतीने त्या प्रयत्नांमधील सारी प्रामाणिकता हरवून जाते. तुम्ही प्रगतीसाठी प्रयत्न करता कारण तुम्हाला प्रयत्न करण्याची, प्रगती करण्याची एक अनिवार्य अशी निकड आतूनच जाणवते; आणि हे प्रयत्न म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरंगातील ‘ईश्वरी चेतने’ला, ‘विश्वा’तील ‘ईश्वरी चेतने’ला अर्पण केलेली भेट असते, कृतज्ञता व्यक्त करण्याचा, स्वतःला अर्पण करण्याचा तो तुमचा मार्ग असतो…

समजा, तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा आहे, तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहात, उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्यातील विशिष्ट दोषांवर मात करायची आहे, कमतरतेवर, उणिवांवर मात करायची आहे पण तुमच्या प्रयत्नांचे तुम्हाला कमीअधिक परिणाम लवकरात लवकर दिसून यावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर, अशा वेळी तुमच्या प्रयत्नांमधील सर्व प्रामाणिकपणा तुम्ही हरवून बसता, कारण आता तो एक व्यवहार बनलेला असतो. तुम्ही म्हणता, ”मी आता प्रयत्न करणार आहे, पण ते याचसाठी की, त्या प्रयत्नांच्या मोबदल्यात मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे.” अशा वेळी तुमच्यातील उत्स्फूर्तता, सहजता नाहीशी झालेली असते.

तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. परिणाम काय असायला हवा हे ठरविण्यासाठी आपण अक्षम असतो. आपण जर आपला विश्वास ईश्वरावर ठेवला, आणि आपण जर म्हणालो की, ”मी आता सारे काही प्रदान करू इच्छितो, अगदी सारे काही, मला जे जे देणे शक्य आहे, ते ते सारे प्रयत्न, एकाग्रता या साऱ्या गोष्टी मी देऊ इच्छितो आणि त्याच्या मोबदल्यात मला काय द्यायचे किंवा काही द्यायचे की नाही, हे देखील तो ईश्वरच ठरवेल आणि त्याचे परिणाम काय असतील हे मला माहीत नाहीत.” आपल्यामधील कोणतीही गोष्ट रूपांतरित होण्याआधीच आपल्याला आपण कोणती दिशा पकडणार आहोत, कोणता मार्ग निवडणार आहोत याविषयी काही कल्पना असते का? या रूपांतरानंतर कोणता आकार त्याला प्राप्त होणार आहे, याची थोडीतरी कल्पना आपल्याला असते का ? नाही, अजिबात नसते. त्यावेळी, ती केवळ आपली कल्पना असते आणि सहसा जे परिणाम घडून येणार आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणात मर्यादित करतो, आणि त्यांना आपण अगदी किरकोळ, क्षुद्र, वरवरचे आणि सापेक्ष बनवितो. खरोखरच परिणाम काय असू शकतात, काय असायला हवेत, ते आपल्याला कळत नाहीत. आपल्याला ते नंतर कळतात. जेव्हा तो परिणाम घडून येतो तेव्हा आपण मागे वळून बघतो, आपण म्हणतो, ”अच्छा! म्हणजे माझी वाटचाल या दिशेने चालू होती तर…” पण आपल्याला मात्र ते नंतर, उशिरा समजते. त्याआधी आपल्याला त्याची फक्त धूसर कल्पना असते आणि ती कल्पना आपल्या खऱ्या प्रगतीच्या, खऱ्या रूपांतराच्या तुलनेत काहीशी वरवरची, बालिश असते.

तेव्हा पहिला मुद्दा हा की, आपल्याला एक आस असते पण त्याचे खरे परिणाम काय असायला हवेत हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकत नाहीत. एका ईश्वरालाच केवळ ते कळू शकतात.

आणि दुसरा मुद्दा असा की, आपण जर ईश्वराला असे सांगितले की, ”मी तुला माझे प्रयत्न अर्पण करत आहे, पण त्या बदल्यात मला माझी प्रगती झालेली हवी आहे, अन्यथा मी तुला काहीही देणार नाही.” तर ही निव्वळ सौदेबाजी झाली.

उत्स्फूर्त, सहजस्वाभाविकपणे केलेली कृती, मी या व्यतिरिक्त अन्य काहीही करू इच्छित नाही असे म्हणून व्यक्तीने केलेली कृती आणि सदिच्छायुक्त भावनेने अर्पण केलेली कृती ही अशी एकमेव कृती असते की, जिला खरोखर काहीतरी मूल्य असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 316-318)

कृतज्ञता – २३

कधीकधी व्यक्ती अगदी उदारतेने केलेली एखादी कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये अचानकपणे एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील मार्गदर्शक सूत्र पकडण्याचा एक मार्ग आहे.

*

‘ईश्वरा’प्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आनंदी राहणे.

‘ईश्वरा’ प्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शांतीपूर्वक आनंदी राहण्यासारखा अन्य कोणताही चांगला मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 405), (CWM 14 : 154-155)

कृतज्ञता – २०

रोज सकाळी तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा, तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही मानववंशाचे त्राते असणाऱ्या महान समुदायाविषयी कृतज्ञतेने, प्रेमाने आणि स्तुतीने करा. (येथे श्रीमाताजी आध्यात्मिकतेची शिकवण देणाऱ्या संतमंडळींबद्दल सांगत आहेत.) ते सारे एकसारखेच असतात. पूर्णत्वाची अवघड चढण चढता येण्यासाठी मदत करावी या हेतुने ते मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून, त्यांच्या बांधवांचे विनम्र आणि अद्भुत सेवक म्हणून, आजवर जन्म घेत आले आहेत, ते आत्ताही आहेत, आणि काळाच्या अंतापर्यंत असणार आहेत. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचे विचार पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने त्यांच्यावर एकाग्र करा. लवकरच या एकाग्रतेचे लाभदायक परिणाम तुमच्या अनुभवास येतील. तुमच्या हाकेला त्यांचे अस्तित्व प्रतिसाद देत आहे असे तुम्हाला जाणवेल, त्यांच्या प्रकाशाने व प्रेमाने तुम्हाला कवळले आहे, त्यांच्या प्रकाशाच्या आणि प्रेमाच्या रंगात तुम्ही न्हाऊन निघाले आहात असे तुम्हाला जाणवेल. आणि मग थोडेसे अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठीचे, थोडे अधिक प्रेम करण्यासाठीचे, अधिक सेवा करण्यासाठीचे तुमचे दैनंदिन प्रयत्न अधिक परिणामकारक आणि अधिक सहजसुलभ होतील. तुम्ही इतरांना जी मदत कराल ती अधिक परिणामकारक ठरेल आणि तुमचे हृदय एका अतूट आनंदाने भरून जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 115-116)

कृतज्ञता – १९

(धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत…)

मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे जग बदलावे म्हणून जर द्वेषभावनेला प्रेमभावनेने प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद द्यावा हे अधिक जास्त स्वाभाविक नाही का?

हे जीवन, कृती आणि माणसांची हृदये जशी आहेत तशीच विचारात घेतली तर, ‘ईश्वरी कृपा’ या विश्वावर ‘प्रेमा’चा जो अपरिमित वर्षाव करते त्या प्रेमाला प्रत्युत्तर म्हणून मिळणारा सर्व द्वेष, तिरस्कार तसेच अलिप्तता पाहून आश्चर्यचकित होण्याचा व्यक्तीला नक्कीच अधिकार आहे; कारण या विश्वाला ईश्वरी आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून हे अपरिमित ईश्वरी ‘प्रेम’ प्रत्येक क्षणाला कार्य करत असते आणि तरीसुद्धा त्याला मानवी हृदयामध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळतो.

परंतु लोकांना दुष्ट, अपंग, ज्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेले असते अशांविषयी, अपयशी व्यक्तींविषयी, अपयशाविषयी कणव असते – वास्तविक हे एक प्रकारे त्या दुष्टतेला आणि अपयशाला दिलेले प्रोत्साहनच असते. समस्येच्या या पैलूचा व्यक्तीने थोडा अधिक विचार केला तर कदाचित द्वेषाला प्रेमाने प्रतिसाद देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज कमी भासेल. कारण मानवी हृदयामध्ये ज्या ईश्वरी प्रेमाचा वर्षाव केला जात असतो त्या प्रेमाला, जर त्याने, जे समजून घेऊ शकते आणि जे दाद देऊ शकते अशा प्रेमाच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेनिशी आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी प्रतिसाद दिला तर, विश्वामध्ये गोष्टी त्वरेने बदलू शकतील.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 187)

कृतज्ञता – १८

कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम कोणता प्रसंग, जर विनाअपघात सुरळीत पार पडला, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित अशी ‘ईश्वरी कृपा’ आहे, याची त्यांना कधीच जाणीव नसते. म्हणजे खरंतर, काहीही विपरित घडू नये अशा रीतीनेच तेथे सुसंवाद प्रस्थापित झालेला असतो. पण लोकांना मात्र ते अगदी सहजस्वाभाविक असल्यासारखे वाटते.

लोक आजारपणातून जेव्हा पटकन बरे होतात, तेव्हा त्यांच्याठायी कृतज्ञता असते; पण एरवी जेव्हा ते ठणठणीत बरे असतात तेव्हा त्यांना कृतज्ञ असावे असे कधीच वाटत नाही. खरंतर, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे !

– श्रीमाताजी
(CWM 05 : 406)

कृतज्ञता – १७

(श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.)

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे, असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकपणा, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे जे काही तुमच्यामध्ये सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे तुम्हाला वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण आजवर जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती, ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्यास योग्य नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती असते, उपलब्धी असते. जणू काही नुकत्याच बाहेर घालवून दिलेल्या धूसरतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

तुम्ही जर योगसाधना करत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.

अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते…

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला असतो, त्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 220-221)

कृतज्ञता – १६

प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्याशी कोणी प्रेमाने वागले तर, त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

पण हेच जर माणसांबाबतीत घडले तर, १०० पैकी ९९ वेळा माणसे विचार करायला लागतात. मनाशीच म्हणतात, ”अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली, त्यामध्ये तिचा नक्की काय हेतू असेल बरे?” मानसिक क्रियांपैकी ही एक मोठी दुःखद बाब आहे. मात्र प्राणी यापासून मुक्त असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी ममत्वाने वागता तेव्हा, ते अगदी सहजपणे तुमच्याविषयी कृतज्ञ राहतात. त्यांचा विश्वास असतो. त्यांचे प्रेम तशा प्रकारचे असते आणि मग त्याचे रूपांतर अगदी घट्ट अशा जवळिकीमध्ये होते. तुमच्या भोवती भोवती घुटमळत राहण्याची एक अदम्य अशी निकड त्यांना भासू लागते.

त्यात आणखीही काही असते. म्हणजे जर मालक खरोखरच चांगला असेल आणि प्राणी विश्वासू असेल तर, त्यांच्यामध्ये एक प्रकारे प्राणिक आणि आंतरात्मिक शक्तींचे आदानप्रदान होते; हे आदानप्रदान प्राण्यांच्या दृष्टीने खूपच सुंदर, अद्भुत असते; ते त्यांना उत्कट आनंद मिळवून देते. अशा प्रकारे, जेव्हा त्यांना तुमच्या जवळ राहायचे असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना हृदयाशी कवळून घेता तेव्हा, त्यांना आतूनच ते स्पंदन जाणवते. व्यक्ती त्यांना ती शक्ती देते – प्रेमाचे सामर्थ्य, हळुवारतेचे, सौहार्दाचे, संरक्षणाचे, सारे सारे काही – त्यांना जाणवते आणि त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयीचा एक खूप गाढ असा अनुबंध निर्माण होतो. इतकेच काय पण त्यामधून, कुत्री, हत्ती आणि घोड्यांसारख्या वरच्या श्रेणीतील प्राण्यांमध्ये तर, अगदी उत्स्फूर्तपणे एक प्रकारची भक्तीची गरज निर्माण होते. (मनाच्या सर्व तार्किकतेनेही किंवा युक्तिवादांनीही ती नाकारता येत नाही.) ती मुळातच अगदी विशुद्ध आणि उत्स्फूर्त अशी भावना असते.

मनुष्यामध्ये मनाचे कार्य सुरू झाले तेव्हा, त्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याच्या पहिल्यावहिल्या आविष्करणामध्ये, त्याने अनेक गोष्टी बिघडवून टाकल्या, ज्या वास्तविक पूर्वी खूप सुंदर होत्या.

तेव्हा हे उघड आहे की, माणूस जर उच्चतर पातळीवर जाईल आणि त्याच्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करेल तर, त्यामुळे गोष्टींना अधिक मूल्य प्राप्त होईल. पण या दोहोंच्या दरम्यान, एक असा प्रांत आहे की, जेथे माणूस त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर अगदी असभ्य आणि खालच्या पातळीवरून करतो. तो मनाला हिशोबाचे, वर्चस्वाचे, फसवणुकीचे साधन बनवितो आणि त्यामुळे ते मन कुरूप होऊन जाते. मला जीवनात असे काही प्राणी माहीत आहेत की, ज्यांना मी माणसांपेक्षाही अधिक श्रेष्ठ समजत असे. कारण तो घृणास्पद हिशोबीपणा, दुसऱ्यांना फसवायचे आणि स्वतःचा लाभ करून घेण्याची इच्छा त्या प्राण्यांच्या ठिकाणी नसायची. असेही काही प्राणी असतात की, जे माणसाच्या सहवासात आल्यानंतर या साऱ्या गोष्टी शिकतात, पण काही प्राणी असे असतात की, ज्यांच्या ठायी याचा लवलेशही नसतो.

या जगातील चैत्य जाणिवेच्या (psychic consciousness) अनेकविध सुंदर रूपांपैकी, ‘निरपेक्ष, निर्व्याज कृती’ हे एक सर्वोत्तम रूप आहे. (उत्क्रांतीच्या श्रेणीमध्ये प्राणिजगताकडून मनुष्यजगताकडे) तुम्ही मानसिक गतिविधींच्या दिशेने जसजसे वरवर चढू लागता तसतशी ही निरपेक्ष, निर्व्याज कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, देवाणघेवाण यांची सुरुवात होते.

उदाहरणार्थ असे पाहा की, जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदाने, मधुर सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते; कोणत्याही लाभहानीचा ते विचार करत बसत नाही, त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते, ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येते. आणि आता याच्या जागी, उदाहरण म्हणून मनुष्याचा विचार करू. काही सन्माननीय अपवाद वगळता, ज्या क्षणी मनुष्याचे मन सक्रिय होते त्याच क्षणी मन त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहते; त्यापासून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते, लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्याहीपेक्षा जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामत: चैत्य दृष्टिकोनातून पाहिले असता, गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 239-240)

कृतज्ञता – १५

शारीरिक चेतनेने प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे; ती अशी की, आपल्याला जीवनात ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या साऱ्या अडीअडचणी – आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या साहाय्यासाठी फक्त आणि फक्त ‘ईश्वरा’वरच विसंबून राहत नाही – या एकाच वास्तवातून उद्भवतात.

वैश्विक ‘प्रकृती’च्या यंत्रणेपासून केवळ ‘ईश्वर’च आपल्याला मुक्त करू शकतो. नव्या वंशाच्या जन्मासाठी आणि विकसनासाठी ही मुक्ती अपरिहार्य आहे. ‘ईश्वरा’ प्रत पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने स्वतःचे समग्रतया अर्पण केल्यानेच सर्व अडीअडचणींवर मात केली जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 433)

कृतज्ञता – ११

कृतघ्नता ही एक अशी गोष्ट आहे की, जी मला नेहमीच अतिशय वेदनादायक वाटत आली आहे. कृतघ्नता अस्तित्वातच कशी राहू शकते हे मला वेदनादायक वाटते. माझ्या जीवनात बघितलेल्या सर्व गोष्टींपैकी ही एक अशी गोष्ट आहे की जी सर्वाधिक असह्य अशी आहे. ‘ईश्वरा’बद्दलची ही एक प्रकारची विखारी कटुता आहे.

…कृतघ्नता ही ‘मना’च्या बरोबरीने उदयाला आली. प्राण्यांमध्ये ती आढळत नाही. आणि म्हणूनच मला प्राण्यांमध्ये एक प्रकारचा गोडवा जाणवतो, अगदी जे अतिशय क्रूर समजले जातात त्यांच्यामध्येसुद्धा तो गोडवा असतो, जो मनुष्यामध्ये नसतो.

आणि तरीही सर्व गतिविधींमध्ये, कदाचित सर्वाधिक आनंद देणारी – अहंकाराने न डागाळलेला असा निष्कलंक, निर्भेळ आनंद देणारी एक गोष्ट म्हणजे ‘उत्स्फूर्त कृतज्ञता’.

ती काहीतरी एक खास अशी गोष्ट असते. ते प्रेम नसते, ते आत्मार्पणही नसते… तो एक अतीव ‘परिपूर्ण’ असा आनंद असतो, अगदी परिपूर्ण आनंद. त्याच्यासारखे तेच असे ज्याला म्हणता येईल असे ते एक खास स्पंदन असते. ती एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला व्यापक बनवते, ती तुम्हाला भारून टाकते, ती अतिशय उत्कट असते.

मानवी चेतनेच्या आवाक्यात असणाऱ्या सर्व गतिविधींपैकी, ही खरोखरच एक अशी गोष्ट आहे की, जी तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सर्वांत जास्त बाहेर खेचून काढते.

आणि जेव्हा ही कृतज्ञता निर्हेतुक असते तेव्हा, कृतज्ञतेच्या त्या स्पंदनामुळे अनेक मोठे अडथळे क्षणार्धात नाहीसे होऊ शकतात.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple: December 21, 1963)

कृतज्ञता – ०७

प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?

श्रीमाताजी : माझ्याप्रति तशी (कृतज्ञता व्यक्त करण्याची) तसदी कोणीच घेत नाही. जेव्हा कधी एखादी अडचण येते, एखादा अडथळा येतो, किंवा एखादा आघात होतो तेव्हा लगेच माझ्यापाशी प्रार्थना केली जाते, मदतीची अशी याचना केली जाते की, “कृपा करून मला वाचवा. कृपा करून मला संरक्षण द्या.” किंवा अडचणींवर मात करण्याच्या हेतुनेसुद्धा अशी विनवणी केली जाते की, “माताजी, आम्हाला साहाय्य करा, आमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातांचा आधार द्या. तुमचा करुणावर्षाव आमच्यावर होऊ द्या. आमच्यावर दया करा.”

आणि मग जेव्हा ईश्वरी ‘कृपे’ने तिचे कार्य पूर्ण केलेले असते… मी त्यांच्यासाठी ज्या हजारो गोष्टी सातत्याने करत असते त्याबद्दल ते कधीच कृतज्ञतेचा एक शब्दही उच्चारात नाहीत. मी जेव्हा त्यांचे रक्षण करते, किंवा त्यांच्यासाठी एखाद्या अडचणीवर मात करते, त्यानंतर मात्र एकही शब्द नसतो… ईश्वरी ‘कृपे’ ने जेव्हा त्यांच्यासाठी सारे काही केलेले असते म्हणजे त्यांना वाचविलेले असते, त्यांचे संरक्षण केलेले असते आणि सर्व अडचणींवर मात केलेली असते तेव्हा खालून कृतज्ञतेचा एक शब्दही ईश्वरी ‘कृपे’ बाबत उच्चारला जात नाही. त्यांना लगेचच विसर पडलेला असतो. ज्या प्रचंड ईश्वरी शक्तीने त्यांना संकटातून बाहेर खेचून काढले, त्या शक्तीविना ते कसे काय वाचू शकले असते किंवा ते कसे काय सुरक्षित राहू शकले असते, शांत कसे राहू शकले असते? पण याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना पूर्ण विसर पडलेला असतो आणि त्यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसतो, ज्या महान अद्भुत अपूर्व गोष्टीने त्यांना वाचविलेले असते, त्याची त्यांना साधी आठवणदेखील नसते. कृतज्ञतेचा दृष्टिकोन खरोखर अगदी दुर्लक्षित आहे, कृतज्ञतेची कृती या जगात शोधण्यात अर्थ नाही. किमान हे मात्र नक्की की, कृतज्ञता ही अगदी दुर्मिळ गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(The Supreme : 59-60)