Posts

एक गोष्ट महत्त्वाची आहे; ती अशी की, असे एक म्हातारपण आहे की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा वाढणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)

मानसिक तपस्येचा प्रश्न असे म्हणताच, विचारनियंत्रण आणि त्याची परिणती म्हणून आंतरिक शांती प्राप्त करून देणाऱ्या दीर्घ ध्यानाची कल्पना मनात येऊ लागते. योगसाधनेमधील ध्यानाभ्यास इतका प्रसिद्ध आहे की, त्याविषयी अधिक लिहिण्याची जरूरी नाही.

पण साधारणत: लोकांचे लक्ष जात नाही असे योगाभ्यासांत अंतर्भूत असलेले दुसरेही एक अंग आहे. ते अंग म्हणजे वाक्संयम. काही अगदी थोडे अपवाद सोडले, तर बहुधा बोलण्यातील स्वैरपणास आळा घालण्यासाठी संपूर्ण मौनाचाच मार्ग स्वीकारावा, असे सांगितले जाते. पण तरीही बोलणे अजिबातच बंद करण्यापेक्षा त्यावर संयम मिळविणे ही अधिक मोठी व अधिक लाभदायक अशी तपस्या आहे.

शब्दोच्चाराचा उपयोग करू शकणारा पृथ्वीवरील पहिला प्राणी मनुष्य हाच आहे. पण त्याचबरोबर या वाक्शक्तीचा त्याला विशेष अभिमान असून, कोणताही संयम व विवेक न बाळगता, तो त्याचा उपयोग करतो. त्याच्या शब्दांच्या गोंगाटाने जगाचे कान बधीर झाले आहेत; आणि कधी कधी तर वनस्पतिसृष्टीत आढळून येणाऱ्या सांमजस्यपूर्ण शांतीसही मनुष्य पारखा झाल्यासारखे दिसते.

शिवाय, मानसिक शक्ती जितकी कमी, तितका वाणीचा जास्त उपयोग करावा लागतो ही गोष्टही सर्वांना चांगलीच माहीत आहे. उदाहरणार्थ, अगदी आदिम काळातील माणसे किंवा अशिक्षित माणसे; की ज्यांना बोलल्याशिवाय मुळी विचारच करता येत नाही आणि कमीअधिक मोठ्याने ते स्वत:शी काहीतरी शब्द पुटपुटताना आपल्याला दिसतात. कारण, विचारप्रवाहाचे अनुसरण करण्याचा त्यांच्याकडे तो एकच मार्ग असतो. शब्दोच्चाराशिवाय त्यांच्या ठिकाणी विचाराला मूर्त रूप येऊच शकत नाही.

आपल्याला काय म्हणावयाचे आहे हे प्रत्यक्ष बोलल्याशिवाय ज्यांना कळत नाही असे कितीतरी लोक सुशिक्षितांतही असतात. कारण, ते सुशिक्षित असले, तरी त्यांची मानसिक शक्ती दुर्बळ असते. त्या मुळेच त्यांचे बोलणे संपता संपत नाही आणि कंटाळवाणे होते. कारण, ते बोलू लागले म्हणजेच त्यांचे विचार अधिकाधिक स्पष्ट आणि नेमके होऊ लागतात. त्यामुळे जे काही सांगावयाचे, ते तंतोतंत बरोबर सांगता येईपर्यंत तीच गोष्ट पुन:पुनः सांगणे त्यांना भाग पडते.

असेही काही लोक असतात की, त्यांना जे काही बोलावयाचे असते त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. आयत्या वेळी काही बोलण्याची वेळ आली, तर ते अडखळतात, कारण त्यांना नेमके जे काय म्हणावयाचे असते त्याकरता योग्य शब्दांची क्रमवार सुसंगत जुळणी करण्यास त्यांना आधी वेळच मिळालेला नसतो.

शेवटी, वाणीवर संपूर्ण प्रभुत्व असलेले असेही काही जन्मजात वक्ते असतात. त्यांना जे काही व्यक्त करावयाचे असते, त्यासाठी त्यांना अगदी सहज योग्य शब्द सुचतात आणि त्यामुळे त्यांच्या मनातील आशय ते चांगल्या रीतीने व्यक्तही करतात.

तरीपण, मानसिक तपस्येच्या दृष्टीने या सर्वच गोष्टी ‘वायफळ बोलणे’ या सदरांत मोडतात. कारण, अगदी अटळ, अनिवार्य शब्दांखेरीज कोणताही शब्द उच्चारणे याला मी ‘वायफळ बोलणेच’ म्हणेन. पण हे ओळखावयाचे कसे? असे कोणी विचारील. त्यासाठी उच्चारित शब्दांच्या विविध प्रकारांचे व्यक्तीस ढोबळमानाने वर्गीकरण करावे लागेल.

सुमेळ व प्रगतीसाठी विचार करून नंतर बोला –

प्रथमत: भौतिक जगात व्यवहारासाठी आपण वापरतो ते शब्द. अशा शब्दांची संख्या फार मोठी असून सामान्य जीवनात त्याचाच उपयोग बहुतेक वेळा सर्वात अधिक असतो.

दररोजच्या कामासोबत शब्दांचा एकसारखा गोंगाटही जणू अनिवार्यच होऊन बसलेला दिसतो. तरीही हा गोंगाट कमीत कमी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात, तर शांततेत कितीतरी गोष्टी अधिक चांगल्या आणि जलद करता येतात असे तुम्हास दिसून येईल. त्याचप्रमाणे आंतरिक शांती आणि एकाग्रता टिकविण्यासाठीही त्याचे फार साहाय्य होते हेही तुमच्या ध्यानी येईल.

तुम्ही एकटे नसाल, इतरांबरोबर राहत असाल, तर अशी सवय स्वत:मध्ये विकसित करा की, एकसारखे मोठ्याने बोलून स्वत:स तुम्ही बहिर्मुख करणार नाही. असे केल्याने तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये हळूहळू एक प्रकारची आंतरिक समजशक्ती निर्माण झाली आहे असे तुम्हास दिसून येईल. त्यानंतर अगदी थोड्या शब्दांत किंवा काही न बोलताही तुम्ही परस्परांत व्यवहार करू शकाल. अशी ही बाह्य शांतता, आंतरिक शांतीसाठी अत्यंत अनुकूल असते; आणि त्याच्या जोडीस तुमच्या ठिकाणी सदिच्छा व अखंड अभीप्सा असेल तर तुमच्या प्रगतीस अत्यंत पोषक असे वातावरणही तुम्ही तुमच्या भोवती निर्माण करू शकाल.

सामाजिक जीवनात, भौतिक जीवन आणि व्यवसायादींशी संबंधित वापरावयास लागणाऱ्या शब्दांप्रमाणेच संवेदना, मनोवृत्ती आणि भावभावना व्यक्त करणारे देखील शब्द असतील. येथे बाह्य मौनाची सवय अत्यंत साहाय्यकारी ठरते. कारण, जेव्हा तुमच्यावर एखाद्या भावनेच्या वा संवेदनाच्या तरंगाचे आक्रमण होते, त्यावेळी तुमची ही मौनाची सवय तुम्हाला सारासार विचार करावयास सवड मिळवून देते आणि आवश्यकता पडल्यास, संवेदना वा भावना शब्दांद्वारे व्यक्त करण्यापूर्वी तुम्ही स्वत:वर परत ताबा मिळवू शकता. असे केले तर कितीतरी भांडणे टळतील. केवळ वाणीवर संयम नसल्यानेच निर्माण होणाऱ्या कितीतरी मानसिक अनर्थांपासून व्यक्तीचा बचाव होऊ शकेल.

अशा रीतीने कोणताही अतिरेक न करता, व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नेहमी संयम ठेवला पाहिजे. क्रोध, हिंसा आणि संताप यांच्या आवेगाच्या आहारी आपल्या जिभेला कधीही जाऊ देता कामा नये. भांडणाचे परिणाम वाईट असतात म्हणूनच नव्हे, तर त्यामुळे वातावरणांत अनिष्ट स्पंदने फेकण्यास व्यक्ती आपल्या जिभेला वाव देते, म्हणून ही गोष्ट वाईट आहे कारण, ध्वनींच्या स्पंदनांएवढी दुसरी कोणतीच गोष्ट इतकी सांसर्गिक नसते. वरील भावावेगांना व्यक्त होण्याची संधी देऊन व्यक्ती स्वत:मध्ये आणि इतरांमध्येही अशा गोष्टी चिरस्थायी करावयास संधी देते.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 57-58)

दुसऱ्यांबद्दल आपण जे काय बोलतो ते सर्व अनिष्ट, अयोग्य प्रकारच्या ‘वायफळ’ बोलण्यातच अंतर्भूत केले पाहिजे.

पालक, शिक्षक किंवा विभागप्रमुख या नात्याने दुसऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर नसेल, तर ते काय करतात वा काय करीत नाहीत याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य असता कामा नये. इतरांबद्दल बोलणे, त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कृतीविषयी तुमचे मत व्यक्त करणे, किंवा इतर लोक त्यांच्याबद्दल काय समजू वा बोलू शकतात ह्याचा पुनरुच्चार करणे हे तुम्ही टाळले पाहिजे. Read more

शांत, विश्रांतियुक्त झोप घेण्यासंबंधीची ही रात्रीची तपस्या झाल्यानंतर आता दिवसभर करण्याची तपस्या पाहू. Read more

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more

(श्रीमाताजी ‘चार तपस्या व चार मुक्ती’ या पुस्तकातील काही भाग वाचतात.) अंध:कार आणि अचेतनता यांच्यावर ईश्वरी प्रेमशक्तीने आपली पाखर घातली,….वनस्पती-जगतामध्ये या प्रेमाचा स्पष्टपणे प्रादुर्भाव झालेला असतो; आपल्या वाढीसाठी अधिक प्रकाश, अधिक हवा आणि अधिक मोकळी जागा मिळविण्याची वनस्पती व वृक्ष यांच्यामध्ये जी गरज दिसते, ते प्रेमाचेच स्वरूप आहे. फुलांमध्ये दिसणारे त्याचे स्वरूप म्हणजे त्यांच्या प्रेमळ बहरण्यामध्ये सौंदर्य आणि सुगंध यांची उधळण. Read more

इतर काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, असावधानता यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय पवित्र फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही एवढे त्याज्य काहीही नसते. भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

जे तुम्ही बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, मार्गदर्शक. जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्टी नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24)