साधना, योग आणि रूपांतरण – १६५
पूर्णयोगांतर्गत भक्ती
(एका साधकाने श्रीअरविंद यांना दिव्य प्रेमासंबंधी काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)
‘दिव्य प्रेम’ हे मानवी प्रेमाप्रमाणे नसते, तर ते गहन, व्यापक आणि प्रशांत असते. त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने अविचल आणि विशाल झाले पाहिजे. जे गरजेचे आहे (असे त्या व्यक्तीला वाटते) त्याची पूर्ती करायची किंवा नाही हा निर्णय व्यक्तीने ‘दिव्य प्रज्ञे’वर आणि ‘दिव्य प्रेमा’वर सोपविला पाहिजे. आणि ‘दिव्य प्रेमा’प्रत समर्पित होणे हेच व्यक्तीचे समग्र उद्दिष्ट असले पाहिजे; जेणेकरून ती व्यक्ती धारकपात्र आणि साधन बनू शकेल.
“अमुक एका कालावधीमध्येच माझी प्रगती झाली पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि मला साक्षात्कार झाला पाहिजे,” अशा गोष्टींचा व्यक्तीने आग्रह धरता कामा नये, या गोष्टीची तिने मनामध्ये पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी कितीही कालावधी लागला तरी, त्यासाठी थांबण्याची आणि चिकाटीने प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. तिने तिचे संपूर्ण जीवन हे त्या एकमेव गोष्टीप्रत म्हणजे ‘ईश्वरा’प्रत असलेली उन्मुखता आणि अभीप्सा, यांसाठी वाहून घेतले पाहिजे.
कशाची तरी मागणी करणे आणि काहीतरी संपादन करणे हे नव्हे तर, स्वतःला अर्पण करणे हे साधनेचे रहस्य असते. व्यक्ती जेवढे आत्मदान करते तेवढ्या प्रमाणात तिची ग्रहणक्षमता वृद्धिंगत होते. परंतु त्यासाठी (तिच्या स्वभावातील) अधीरता आणि बंडखोर वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. “मला काही साध्यच होत नाहीये, मला कोणाचे साहाय्य मिळत नाहीये, माझ्यावर कोणाचे प्रेमच नाहीये, आता मी निघून जातो, आता मी अध्यात्मसाधनेचा किंवा या जीवनाचाच त्याग करतो,” (आतून उमटणाऱ्या) अशा प्रकारच्या सर्व सूचनांना त्या व्यक्तीने धुडकावून दिले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 345)
शिक्षक : माताजी, शिक्षकांनी आणि प्रशिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे ना? श्रीमाताजी : विद्यार्थ्यांना…
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…