भारत – एक दर्शन ११
(हिंदुधर्मातील देवदेवतांच्या वैपुल्याबद्दल अन्य धर्मांमध्ये काहीसा तिरकस सूर लावला जातो. त्या देवदेवतांचे नेमके मर्म काय, हेच श्रीअरविंद येथे एक प्रकारे स्पष्ट करत असल्याचे दिसते.)
ब्रह्मांडातील देवदेवतांच्या आंतरात्मिक गौरवाच्या विस्तारीकरणानिशी आंतरिक ‘वैदिक’ धर्माचा प्रारंभ झाला. जगतांची एक श्रेणी आहे आणि या विश्वामध्ये अस्तित्वाच्या पातळ्यांची एक चढती श्रेणी आहे अशी ‘वैदिक धर्मा’ची प्राथमिक कल्पना होती. त्या जगतांच्या श्रेणीसारखीच, त्याच्याशी संबंधित अशी, मनुष्याच्या प्रकृतीमध्येही चेतनेच्या प्रतलांची किंवा त्यांच्या परिमाणांची किंवा त्यांच्या स्तरांची एक चढती श्रेणी आहे, हे वैदिक धर्माने पाहिले. ‘सत्य’, ‘न्याय’ आणि ‘धर्म’ (Truth, Right and Law) यांची एक त्रयी प्रकृतीच्या या सर्व स्तरांना धारण करते, त्या स्तरांचे ती शासन करते; या त्रयीचे सारभूत स्वरूप एकच असले तरीदेखील ती विभिन्न पण सजातीय रूपं धारण करते.
उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाशाची एक मालिका असते. या मालिकेमध्ये बाह्य भौतिक प्रकाश असतो; मानसिक, प्राणिक आणि आंतरात्मिक चेतनेचे वाहन असणारा असा उच्चतर आणि आंतरिक प्रकाश असतो; तसेच आणखी एक आध्यात्मिक प्रदीपनाचा उच्चतम, आंतरतम असा प्रकाश असतो.
सूर्य म्हणजे सूर्यदेव हा भौतिक सूर्याचा स्वामी होता, परंतु त्याच वेळी वैदिक द्रष्ट्या-कवींसाठी मात्र तो मन उजळविणारे ज्ञान-प्रकाश किरण देणारा आहे, तसेच तो आध्यात्मिक प्रकाशाचा आत्मा, ऊर्जा आणि शरीरदेखील आहे. आणि या सर्व शक्तींमध्ये तो एकमेवाद्वितीय, अनंत ईश्वराचे एक ज्योतिर्मय रूप आहे.
सर्व वैदिक देवदेवतांना अशा प्रकारे बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अशी कार्ये असतात, त्यांना ज्ञात आणि गुप्त अशी ‘नामं’ असतात. या सर्वांची बाह्य व्यक्तित्वं पाहिली असता, त्या देवदेवता म्हणजे जडभौतिक प्रकृतीच्या शक्ती आहेत; आंतरिक अर्थाने पाहता, त्यांना काही आंतरात्मिक कार्य असते, त्यांना काही मनोवैज्ञानिक लक्षणांद्वारा ओळखले जाते. तसेच त्या देवदेवता या एका परमोच्च ‘सद्वस्तु’च्या, ‘एकम्’ सत्च्या, एकमेव अनंत ‘अस्तित्वा’च्या विविध शक्तीदेखील असतात. जाणण्यास अत्यंत कठीण असलेली ही परमश्रेष्ठ ‘सद्वस्तु’, वेदामध्ये बरेचदा ‘तत् सत्यम्’, ‘तद् एकम्’ या नावाने ओळखली जाते.
जे लोक या देवदेवतांना बाह्य भौतिक अर्थच देऊ पाहतात त्यांना वैदिक देवदेवता जी विविध रूपं धारण करतात त्यांचे जटिल स्वरूप समजत नाही आणि त्याविषयी त्यांचा पूर्णपणे गैरसमज होतो. वस्तुतः या देवदेवतांपैकी प्रत्येक देव हा त्या एकमेवाद्वितीय अस्तित्वाची स्वयमेव संपूर्ण आणि स्वतंत्र वैश्विक व्यक्तित्वं आहेत आणि त्यांच्या विविध शक्तींच्या संयोगाने त्या परिपूर्ण अशी वैश्विक शक्ती, ब्रह्मांडगत शक्ती, विश्वदेव्यम्, असे रूप धारण करतात. आणि पुन्हा, त्यांच्या या विशेष कार्याशिवाय, प्रत्येक देवदेवता ही दुसऱ्या देवदेवतांशी मिळून आणखी एक देव तयार होतो, ते देव स्वतःमध्येच वैश्विक दिव्यत्व धारण करून असतात, प्रत्येक देव म्हणजे इतर सर्व देव असतात.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 201-202]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…