ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

विचारशलाका ०६

श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.”

साधक : “एखाद्या गोष्टीला खाली खेचून आणणे’’ ही अनेकांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसांना घाई असते आणि त्यांना ताबडतोब फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, ते जणूकाही ‘अतिमानस’ खाली उतरवीत आहेत – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व (vital individuality) खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: ते त्यांना मूर्ख बनविते. बहुतेक वेळा म्हणजे, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हे असेच घडते. एखादे छोटेसे व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकचकीत, दिखाऊ असा खेळ उभा करते. मग तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला ‘खाली खेचले’ होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “अरे, हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

तुम्हाला जेव्हा खरोखरच खऱ्या ‘ईश्वरी प्रकाशा’चा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्याच्याशी जेव्हा तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ आणि प्राणिक प्रकाश यामधील फरक ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो जणू काही रंगमंचावरील प्रकाशाचा कृत्रिम खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरजण त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ पाहिलेला असतो, त्या ‘सत्या’शी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्या कृत्रिम प्रकाशाकडे फक्त पाहता आणि हसता. (तो कृत्रिम प्रकाश) ही फसवणूक असते, पण ती फसवणूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महा-रंगमंच असतो — तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ म्हणजे काय हे माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन ते जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला हे नको आहे.” जेव्हा तुम्ही ‘खेचून आणता’, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते… लाखातूनच एखाद्या वेळीच असे घडते की, एखाद्याने खरोखरच ‘सद्वस्तु’ खाली आणलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, त्याची तयारी झालेली होती. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचून आणता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे काहीतरी असे, ते त्या सद्वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती ‘सद्वस्तु’ नसते.

एखादी गोष्ट खाली खेचून आणणे ही नेहमीच अहंमन्य प्रक्रिया असते. ते आकांक्षेचे विकृत रूप असते. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे अथवा आत्म-दान समाविष्ट असते तर खेचून आणण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना, ती अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नसतो, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार असतो.

– श्रीमाताजी [CWM 11 : 23]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago