आध्यात्मिकता १३
‘नैतिकता’ जीवनाच्या विविधतेच्या आणि आत्मस्वातंत्र्याच्या विरोधी असणारे असे एक कृत्रिम जीवनमान उचलून धरते. ती मानसिक, ठरीव, मर्यादित असे काहीतरी तयार करते आणि सर्वांनी त्याबरहुकूम वागावे अशी अपेक्षा बाळगते. सर्वांनी समानच गुण आणि समानच आदर्श प्रकृती आत्मसात करावी, त्यासाठीच सर्वांनी धडपडावे असे तिला वाटते. नैतिकता ही काही दैवी नाही किंवा तिच्यामध्ये ‘ईश्वरीय’ असेदेखील काही नाही; ती मानवी असते, माणसासाठी असते. नैतिकता ही चांगल्या आणि वाईटामध्ये निश्चित असा भेद आहे असे समजून, तोच मूलभूत घटक आहे असे मानून चालते. पण ही एक स्वैर, यादृच्छिक (arbitrary) कल्पना आहे. ती सापेक्ष अशा काही गोष्टी घेते आणि त्या निरपवाद आहेत असे समजून दुसऱ्यांवर लादू पाहते; हे चांगले आणि हे वाईट याबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. नैतिकतेची संकल्पना पुढे जाऊन असेही सांगते की, काही वासना चांगल्या असतात आणि काही वासना वाईट असतात. आणि त्यातील चांगल्या स्वीकाराव्यात आणि वाईट नाकाराव्यात असेही ही नैतिक संकल्पना सांगते.
पण आध्यात्मिक जीवनाची मात्र अशी मागणी असते की, वासना, कामना (desire) मग त्या कोणत्याही प्रकारच्या असोत तुम्ही त्या अव्हेरल्याच पाहिजेत, नाकारल्याच पाहिजेत. जी स्पंदने, ज्या गतीविधी तुम्हाला ‘ईश्वरा’पासून दूर घेऊन जातात अशी सर्व स्पंदने, अशा सर्व गतीविधी तुम्ही दूर सारल्याच पाहिजेत, असा नियम असतो. इच्छावासना वाईट आहेत म्हणून तुम्ही त्या नाकारल्या पाहिजेत असे नव्हे, – कारण त्या इतरांसाठी वा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याही ठरू शकतात, – पण वासना म्हणजे असे आवेग वा शक्ती असतात, ज्या प्रकाशहीन आणि अज्ञानी असल्याने, ‘दिव्यत्वा’कडे चालू असलेल्या तुमच्या वाटचालीमध्ये अडसर बनून उभ्या ठाकतात. सर्व प्रकारच्या इच्छावासना, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या याच वर्णनामध्ये बसतात कारण, वासना या मुळातच अप्रकाशमान अशा प्राणिक अस्तित्वाकडून आणि त्याच्या अज्ञानातून उदय पावतात.
दुसरी गोष्ट अशी की, ज्यांच्यामुळे तुम्ही ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये येऊ शकाल अशा सर्व गतीविधी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्या चांगल्या आहेत म्हणून, तुम्ही त्या स्वीकाराव्यात असे नव्हे तर, त्या तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जातात म्हणून, तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. जे काही तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाते त्याचा स्वीकार करा आणि जे त्यापासून तुम्हाला दूर नेते त्या सगळ्या गोष्टींना नकार द्या. पण अमुक अमुक या गोष्टी चांगल्या आहेत किंवा तमुक गोष्टी वाईट आहेत असे म्हणू नका आणि तुमचा दृष्टिकोन इतरांवर लादण्याचा प्रयत्नही करू नका. कारण ज्या गोष्टीला तुम्ही वाईट असे संबोधता, नेमकी तीच गोष्ट तुमच्या शेजाऱ्यासाठी, की जो ‘दिव्य जीवना’ची अनुभूती यावी म्हणून प्रयत्नशील नाही, त्याच्यासाठी चांगलीही असू शकेल.
– श्रीमाताजी [CWM 03 : 118-119]
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…