ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महायोगी श्रीअरविंद – ०७

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते.

श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. २४ च्या पहाटे, २.२० ते २.३० च्या दरम्यान श्रीमाताजींनी बेल वाजवली. मी जिन्यावरून धावतपळत वर जाऊन पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की, श्रीअरविंदांच्या पायाला अपघात झाला आहे आणि मी डॉक्टरांना बोलवावे. या अपघातामुळे त्यांच्या एकांतवासामध्ये बदल घडून आला आणि आता त्यांची देखभाल करणाऱ्या लोकांशी ते बोलू-भेटू लागले. येथे बारा वर्षांचा एक दीर्घ कालावधी सुरु झाला, ज्यामध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीनुसार कमीअधिक फरक करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा थेट भौतिक संपर्क साधणे शक्य झाले.”

झालेल्या अपघातामुळे, २४ नोव्हेंबर आणि २१ फेब्रुवारी १९३९ ला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. साधकांच्या विनंतीला मान देत श्रीअरविंदांनी दि. २४ एप्रिल १९३९ ला विशेष दर्शन दिले, श्रीमाताजी १९२० साली जेव्हा पाँडिचेरीला कायमच्या वास्तव्यास आल्या तो हा दिवस होता. तेव्हापासून हा दिवस ‘दर्शनदिन’ म्हणून संबोधण्यात येऊ लागला.

अपघाताचा परिणाम म्हणून आता श्रीअरविंद यांनी साधकांबरोबरचा पत्रव्यवहार थांबविला होता. परंतु त्यांच्या बरोबरच्या संपर्काचे एक नवीनच रूप उदयाला आले. तो संपर्क आता अधिक मर्यादित होता पण तो अधिक निकटचा होता. या अपघातानंतर श्रीअरविंदांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईपर्यंत सहासात साधकांवर, (त्यामध्ये बहुतांशी डॉक्टर मंडळी होती) श्रीअरविंदांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीमध्ये या साधकांसमवेत श्रीअरविंद यांची अनेकानेक विषयांवर चर्चा होत असे. या चर्चामधूनच श्री. निरोदबरन लिखित ‘Twelve years with Sri Aurobindo’ या पुस्तकाची निर्मिती झाली. बरेचदा चालू जागतिक घडामोडींवर या चर्चा चालत असत. १९३९ मध्ये जेव्हा युरोपामध्ये युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा श्रीअरविंद वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि रेडिओच्या माध्यमातून युद्धाची खबरबात घेऊ लागले. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

9 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

18 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago