ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ईश्वरी आदेशानुसार श्री. अरविंद घोष चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच आणखी एका ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने दि. ०१ एप्रिल रोजी ते द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले होते. प्रवासासाठी खासगी कक्षाची तिकिटे काढण्यात आली. गंतव्य ठिकाणही पाँडिचेरी न सांगता कोलोम्बो सांगितले, ते दिशाभूल करण्याच्या हेतूनेच! अशा रीतीने दि. ४ एप्रिल १९१० रोजी श्री. अरविंद घोष पाँडिचेरीला येऊन पोहोचले. या आदेशांविषयी खुलासा करताना ते एके ठिकाणी म्हणतात – ”….मी केवळ माझ्या आंतरिक मार्गदर्शकाचेच आदेश मानत आलो आणि ईश्वराच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करत आलो. कारावासात असताना माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली होती त्यानंतर तर तो माझ्या अस्तित्वाचा एक निरपवाद नियमच बनून गेला. मला जो आदेश प्राप्त झाला त्यानुसार आज्ञापालन करून, त्वरित कृती करणे मला आवश्यकच होते.”

पाँडिचेरीला आल्यानंतरही, ‘कर्मयोगिन्’मधील To my countrymen या त्यांच्या लेखाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले पण ते लिखाण राष्ट्रद्रोही नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि वॉरंट मागे घेण्यात आले. ब्रिटिशव्याप्त इंडियाच्या हद्दीतून त्यांच्या निघून जाण्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. आणि म्हणून, आपण कोठे आहोत, कोणत्या कारणासाठी पाँडिचेरीला आलो आहोत आणि आता राजकारणाशी आपला संबंध कसा नाही याचे कथन करणारे जाहीर निवेदन त्यांनी सुप्रसिद्ध ‘द हिंदू’ (मद्रास) या वृत्तपत्रातून दि. ०८ नोव्हेंबर १९१० रोजी प्रकाशित केले.

पुढे अनेक वर्षानंतर अरविंद घोष यांनी आपल्या पाँडिचेरीला येण्याचे कारण स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात ते लिहितात – “एका निश्चित उद्दिष्टासाठी मला मोकळीक आणि स्थिरचित्तता हवी होती म्हणून मी पाँडिचेरीला आलो, त्या उद्दिष्टाचा वर्तमान राजकारणाशी काही संबंध नाही – माझ्या येथे येण्यानंतर मी राजकारणामध्ये थेट सहभागी झालेलो नाही, आणि असे असूनसुद्धा मला माझ्या पद्धतीने या देशासाठी जे करता येणे शक्य होते ते मी कायमच करत आलो आहे – माझे ते उद्दिष्ट (योगसाधना) पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कृतिकार्यक्रमात पुन्हा सहभागी होणे मला शक्य होणार नाही. पाँडिचेरी ही माझ्या तपस्येची गुहा आहे; हे माझ्या आश्रमाचे स्थान आहे, हा आश्रम संन्यासमार्गी प्रकारचा नाही तर, माझ्या स्वतःच्या शोधामुळे त्याचा स्वतःचाच असा एक वेगळा ठसा निर्माण झाला आहे. मी (पाँडिचेरी सोडून) परत निघण्यापूर्वी मला माझे ते कार्य पूर्ण केलेच पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी स्वत:ला आंतरिकरित्या सक्षम आणि सुसज्ज केलेच पाहिजे.” (क्रमश:)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

मनुष्याकडे असणारी अद्भुत क्षमता

  (मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो…

12 hours ago

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

1 day ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago