ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ईश्वरी आदेशानुसार श्री. अरविंद घोष चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच आणखी एका ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने दि. ०१ एप्रिल रोजी ते द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले होते. प्रवासासाठी खासगी कक्षाची तिकिटे काढण्यात आली. गंतव्य ठिकाणही पाँडिचेरी न सांगता कोलोम्बो सांगितले, ते दिशाभूल करण्याच्या हेतूनेच! अशा रीतीने दि. ४ एप्रिल १९१० रोजी श्री. अरविंद घोष पाँडिचेरीला येऊन पोहोचले. या आदेशांविषयी खुलासा करताना ते एके ठिकाणी म्हणतात – ”….मी केवळ माझ्या आंतरिक मार्गदर्शकाचेच आदेश मानत आलो आणि ईश्वराच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करत आलो. कारावासात असताना माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली होती त्यानंतर तर तो माझ्या अस्तित्वाचा एक निरपवाद नियमच बनून गेला. मला जो आदेश प्राप्त झाला त्यानुसार आज्ञापालन करून, त्वरित कृती करणे मला आवश्यकच होते.”

पाँडिचेरीला आल्यानंतरही, ‘कर्मयोगिन्’मधील To my countrymen या त्यांच्या लेखाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले पण ते लिखाण राष्ट्रद्रोही नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि वॉरंट मागे घेण्यात आले. ब्रिटिशव्याप्त इंडियाच्या हद्दीतून त्यांच्या निघून जाण्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. आणि म्हणून, आपण कोठे आहोत, कोणत्या कारणासाठी पाँडिचेरीला आलो आहोत आणि आता राजकारणाशी आपला संबंध कसा नाही याचे कथन करणारे जाहीर निवेदन त्यांनी सुप्रसिद्ध ‘द हिंदू’ (मद्रास) या वृत्तपत्रातून दि. ०८ नोव्हेंबर १९१० रोजी प्रकाशित केले.

पुढे अनेक वर्षानंतर अरविंद घोष यांनी आपल्या पाँडिचेरीला येण्याचे कारण स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात ते लिहितात – “एका निश्चित उद्दिष्टासाठी मला मोकळीक आणि स्थिरचित्तता हवी होती म्हणून मी पाँडिचेरीला आलो, त्या उद्दिष्टाचा वर्तमान राजकारणाशी काही संबंध नाही – माझ्या येथे येण्यानंतर मी राजकारणामध्ये थेट सहभागी झालेलो नाही, आणि असे असूनसुद्धा मला माझ्या पद्धतीने या देशासाठी जे करता येणे शक्य होते ते मी कायमच करत आलो आहे – माझे ते उद्दिष्ट (योगसाधना) पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कृतिकार्यक्रमात पुन्हा सहभागी होणे मला शक्य होणार नाही. पाँडिचेरी ही माझ्या तपस्येची गुहा आहे; हे माझ्या आश्रमाचे स्थान आहे, हा आश्रम संन्यासमार्गी प्रकारचा नाही तर, माझ्या स्वतःच्या शोधामुळे त्याचा स्वतःचाच असा एक वेगळा ठसा निर्माण झाला आहे. मी (पाँडिचेरी सोडून) परत निघण्यापूर्वी मला माझे ते कार्य पूर्ण केलेच पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी स्वत:ला आंतरिकरित्या सक्षम आणि सुसज्ज केलेच पाहिजे.” (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

12 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

20 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

3 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

4 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

5 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

6 days ago