ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

दुःखाचे प्रयोजन

विचार शलाका – २२

व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आनंदात व मौजमजेत मश्गुल असते आणि जीवनात गोष्टी जशा येतात तसतशी जगत राहते तसतशी ती त्यांना सामोरी जाते, त्यातील गांभीर्याकडे डोळेझाक करते आणि जीवन प्रत्यक्षात जसे आहे तसे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे टाळते, एका शब्दात सांगायचे तर हे ‘विसरण्याचा’ प्रयत्न करते की, येथे सोडवण्यासाठी एक समस्या आहे, काहीतरी असे आहे की जे आपणास शोधायचे आहे. आपणास जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी एक कारण आहे, आपण इथे नुसता वेळ घालविणे आणि काहीही न शिकता किंवा काहीही न करता निघून जाणे यासाठी आलेलो नाही. या सर्व गोष्टी व्यक्ती विसरत असते तेव्हा ती खरोखरीच स्वत:चा वेळ व्यर्थ दवडत असते. आपल्याला जी संधी दिली गेली आहे ती संधी व्यक्ती वाया घालवत असते – अशी संधी – जिला मी अद्वितीय म्हणू शकत नाही, पण ती अद्भुत अशी अस्तित्वाची संधी असून, ते प्रगतीचे क्षेत्र असते. ती संधी अनंतातील एक असा क्षण असते की, जेव्हा तुम्ही जीवनाचे रहस्य शोधू शकता. कारण भौतिक, जडदेहात्मक अस्तित्व हे एका आश्चर्यकारक सुसंधीचे रूप असते; जीवनाचे प्रयोजन शोधण्यासाठी प्रदान केली गेलेली ती एक शक्यता (possibility) असते. गहनतर सत्याच्या दिशेने तुमचे एक पाऊल पुढे पडावे, तसेच जे तुम्हाला दिव्य जीवनाच्या शाश्वत हर्षाच्या संपर्कात आणून ठेवते ते रहस्य तुम्ही शोधून काढावे म्हणून मिळालेली ही सुसंधी असते.

मी तुम्हाला पूर्वी अनेकदा सांगितलेले आहे की, दुःखाची आणि वेदनांची इच्छा बाळगणे ही एक रोगट वृत्ती असते, ती टाळली पाहिजे, परंतु विसराळूपणाच्या नावाखाली त्यापासून दूर पळणे, वरवरच्या, उच्छृंखल क्रियाकलापाच्या माध्यमातून, वेगळेच वळण घेऊन त्यापासून दूर पळणे हा भ्याडपणा असतो. जेव्हा दुःख येते तेव्हा आपल्याला ते काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. जितक्या लवकर त्यापासून आपण धडा घेऊ तितक्या प्रमाणात दुःखाची आवश्यकता कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्या मागचे रहस्य कळते, तेव्हा दुःखभोगाची शक्यताच मावळून जाते. ते रहस्य आपल्याला त्या दु:खाचा हेतू, त्याचे मूळ, त्याचे कारण यांचा उलगडा करून देते आणि त्या दु:खाच्या अतीत जाण्याचा मार्ग दाखवून देते. अहंभावातून वर उठावे हे ते रहस्य आहे, दु:खाच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, ‘त्या’च्यामध्ये विलीन व्हावे, कुठल्याही गोष्टीला ‘त्या’च्यापासून स्वत:ला विभक्त करू देण्यास संधी देऊ नये. एकदा का हे रहस्य व्यक्तीने शोधून काढले आणि स्वत:च्या अस्तित्वात त्याची अनुभूती घेतली की, दुःखाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग पळून जातात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून केवळ अस्तित्वाच्या सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान असतो असे नव्हे, तर जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 42-43)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago