ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

दुःखाचे प्रयोजन

विचार शलाका – २२

व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आनंदात व मौजमजेत मश्गुल असते आणि जीवनात गोष्टी जशा येतात तसतशी जगत राहते तसतशी ती त्यांना सामोरी जाते, त्यातील गांभीर्याकडे डोळेझाक करते आणि जीवन प्रत्यक्षात जसे आहे तसे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे टाळते, एका शब्दात सांगायचे तर हे ‘विसरण्याचा’ प्रयत्न करते की, येथे सोडवण्यासाठी एक समस्या आहे, काहीतरी असे आहे की जे आपणास शोधायचे आहे. आपणास जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी एक कारण आहे, आपण इथे नुसता वेळ घालविणे आणि काहीही न शिकता किंवा काहीही न करता निघून जाणे यासाठी आलेलो नाही. या सर्व गोष्टी व्यक्ती विसरत असते तेव्हा ती खरोखरीच स्वत:चा वेळ व्यर्थ दवडत असते. आपल्याला जी संधी दिली गेली आहे ती संधी व्यक्ती वाया घालवत असते – अशी संधी – जिला मी अद्वितीय म्हणू शकत नाही, पण ती अद्भुत अशी अस्तित्वाची संधी असून, ते प्रगतीचे क्षेत्र असते. ती संधी अनंतातील एक असा क्षण असते की, जेव्हा तुम्ही जीवनाचे रहस्य शोधू शकता. कारण भौतिक, जडदेहात्मक अस्तित्व हे एका आश्चर्यकारक सुसंधीचे रूप असते; जीवनाचे प्रयोजन शोधण्यासाठी प्रदान केली गेलेली ती एक शक्यता (possibility) असते. गहनतर सत्याच्या दिशेने तुमचे एक पाऊल पुढे पडावे, तसेच जे तुम्हाला दिव्य जीवनाच्या शाश्वत हर्षाच्या संपर्कात आणून ठेवते ते रहस्य तुम्ही शोधून काढावे म्हणून मिळालेली ही सुसंधी असते.

मी तुम्हाला पूर्वी अनेकदा सांगितलेले आहे की, दुःखाची आणि वेदनांची इच्छा बाळगणे ही एक रोगट वृत्ती असते, ती टाळली पाहिजे, परंतु विसराळूपणाच्या नावाखाली त्यापासून दूर पळणे, वरवरच्या, उच्छृंखल क्रियाकलापाच्या माध्यमातून, वेगळेच वळण घेऊन त्यापासून दूर पळणे हा भ्याडपणा असतो. जेव्हा दुःख येते तेव्हा आपल्याला ते काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. जितक्या लवकर त्यापासून आपण धडा घेऊ तितक्या प्रमाणात दुःखाची आवश्यकता कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्या मागचे रहस्य कळते, तेव्हा दुःखभोगाची शक्यताच मावळून जाते. ते रहस्य आपल्याला त्या दु:खाचा हेतू, त्याचे मूळ, त्याचे कारण यांचा उलगडा करून देते आणि त्या दु:खाच्या अतीत जाण्याचा मार्ग दाखवून देते. अहंभावातून वर उठावे हे ते रहस्य आहे, दु:खाच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, ‘त्या’च्यामध्ये विलीन व्हावे, कुठल्याही गोष्टीला ‘त्या’च्यापासून स्वत:ला विभक्त करू देण्यास संधी देऊ नये. एकदा का हे रहस्य व्यक्तीने शोधून काढले आणि स्वत:च्या अस्तित्वात त्याची अनुभूती घेतली की, दुःखाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग पळून जातात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून केवळ अस्तित्वाच्या सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान असतो असे नव्हे, तर जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 42-43)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago