मानसिक परिपूर्णत्व – १४
ज्याचे अजूनपर्यंत आविष्करण झाले नाही, जे प्राप्त झाले नाही किंवा साध्य झाले नाही अशा गोष्टींकडे आत्म्याच्या साक्षीत्वाने पाहणे म्हणजे श्रद्धा. आपल्या अंतरंगामध्ये असणारा जो ज्ञाता, त्याला, कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ही जाणीव असते की, हे सत्य आहे किंवा अनुसरण्याजोगी वा प्राप्त करून घेण्याजोगी ही परमोच्च गोष्ट आहे. आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही गोष्ट अशी असते की, जी मनाला निश्चित खात्री नसली, अगदी प्राण संघर्ष करत असला, बंड करत असला किंवा नकार देत असला तरीसुद्धा ती टिकून राहते. जो योगसाधना करतो आणि तरीही अशा तऱ्हेचे निराशेचे, अपयशाचे, अश्रद्धेचे आणि अंधाराचे दीर्घ कालावधी त्याच्या आयुष्यात आलेले नाहीत, असा कोण आहे? – पण तरीसुद्धा त्यामध्ये असे काहीतरी असते की, ज्यामुळे तो तग धरून राहतो. इतकेच नाही तर, वाटचाल करत राहतो, कारण त्याला जाणवत असते की, ज्याचे तो अनुसरण करत आहे ती गोष्ट सत्य आहे. आणि जाणवत असते म्हणण्यापेक्षा त्याला हे नक्की माहीत असते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ईश्वर अस्तित्वात आहे आणि तीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, त्याच्या तुलनेत जीवनातील दुसरी कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जीवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योगमार्गामधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगाकडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि अतूट झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळेयुक्त असू दे, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असू दे तरी, आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असू दे तरीसुद्धा, व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…