चैत्य शिक्षणाचा आरंभबिंदू असा की, तुमच्यामध्येच अशा कशाचा तरी शोध घ्यावयाचा की, जे तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या जीवनातील परिस्थितीहून स्व-तंत्र असेल; तुम्हाला देण्यात आलेल्या मानसिक घडणीतून त्याचा जन्म झालेला नसेल; तुमची भाषा, तुमच्या प्रथापरंपरा, सवयी, तुमचा देश, युग ह्या सर्वांपासून ते निरपेक्ष, स्व-तंत्र असे असेल.
ज्या युगामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता तेथील प्रथापरंपरा, चालीरिती, सवयी, तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा या साऱ्यांच्या सापेक्ष नसणाऱ्या ह्या गोष्टीचा; तुमची घडण ज्या मानसिक ठेवणीमधून झाली त्यामधून जिचा उदय झालेला नाही अशी, तुमचे शरीर आणि तुमच्या जीवनातील परिस्थिती यांच्या सापेक्ष नसलेली, स्व-तंत्र अशी, तुमच्या अस्तित्वामध्येच दडलेली जी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा शोध घ्यावयाचा हा या चैत्य शिक्षणाचा (Psychic Education) आरंभबिंदू आहे.
तुमच्या अस्तित्वाच्या आत खोलवर अशी एक गोष्ट आहे की, जी स्वत:मध्ये विश्वव्यापकता, अमर्याद विस्तार, अखंड सातत्याची एक भावना बाळगून आहे, त्या गोष्टीचा शोध तुम्ही घ्यावयास हवा.
त्यानंतर तुम्ही स्वत:ला विकेंद्रित करता, विस्तृत करता, व्यापक करता; तुम्ही सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये जगू लागता; एकमेकांना परस्परांपासून विभिन्न करणारे सारे बांध ढासळून पडतात. तुम्ही त्यांच्या विचारांनी विचार करू लागता, त्यांच्या संवेदनांनी स्पंदित होता, त्यांच्या भावभावना तुम्हाला संवेदित होतात, तुम्ही त्यांचे जीवन जगू लागता. आजवर जे जड, अक्रिय वाटत होते ते एकदम जिवंत होऊन जाते, दगडसुद्धा जणु जिवंत होतात, वनस्पतींना संवेदना होतात, त्या इच्छा बाळगतात, त्यांना सुख-दुःख होते, कमीअधिक अस्फुट परंतु स्पष्ट आणि बोलक्या अशा भाषेत प्राणी बोलू लागतात; कालातीत किंवा मर्यादातीत अशा एका अद्भुत चेतनेमध्ये प्रत्येक गोष्ट जिवंत होऊन जाते.
चैत्य साक्षात्काराचा हा केवळ एक पैलू आहे, अजून पुष्कळ पैलू आहेत. तुमच्या अहंकाराचे अडथळे भेदण्यासाठी, तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या भिंती पाडण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रियांच्या वीर्यहीनतेच्या, आणि तुमच्या इच्छाशक्तीच्या अक्षमतेच्या साऱ्या मर्यादा भेदण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला साहाय्यभूत होतात.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-33)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…