Tag Archive for: साधना

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १८

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : नैतिक नियमांचे पालन करून किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने किंवा ध्यानधारणेच्या सरावाने, किंवा विजनवासातील जीवन जगण्याने वा विचाराने व्यक्तीला खराखुरा आनंद प्राप्त होत नाही; तर वासनामुक्तीतूनच खराखुरा आनंद प्राप्त होतो. इच्छावासनांपासून सुटका होणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. कधीकधी तर ह्यासाठी उभे आयुष्य खर्ची पडते. पण खरे सांगायचे तर, जरी विकासाच्या एका ठरावीक टप्प्यावर, अशा प्रकारची साधना पुष्कळ उपयुक्त, किंवा अनिवार्य असली तरी देखील मला हा नकारार्थी मार्ग वाटतो. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही मोठ्या प्रबळ वासनांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करता, की ज्या अगदी स्पष्ट असतात आणि त्यांचा तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याबद्दल तुमच्या मनात तीळमात्रही शंका नसते.

नंतर क्रम लागतो तो सूक्ष्म अशा वासनांचा, की ज्या कधीकधी कर्तव्याचे रूप धारण करून समोर येतात, अत्यंत निकडीच्या असल्याप्रमाणे त्या भासतात, कधीकधी तर आंतरिक आदेशाच्या रूपात समोर येतात आणि त्यांचा शोध लागण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी पुष्कळ प्रामाणिकपणा व वेळ देण्याची आवश्यकता असते.

सरतेशेवटी या बाह्य गोष्टींमधून, भावभावना, संवेदना यांच्या विश्वामधून, कल्पनांच्या मानसिक विश्वामधून, भौतिक जगातील पापी वासनांपासून तुमची सुटका झाल्यासारखे तुम्हाला वाटते, पण पुढे गेल्यावर, परत एकदा त्या तुम्हाला आध्यात्मिक विश्वामध्येही आढळतात. तेथे त्या अधिक भयंकर, अधिक सूक्ष्म, अधिक तीक्ष्णभेदक, अधिक अदृश्य आणि सात्विकतेच्या पडद्याआड दडलेल्या असतात की त्यांना वासना म्हणण्यासदेखील कोणी धजावणार नाही.

आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांच्यावरदेखील मात करण्यात यशस्वी होते; त्यांचा शोध लावण्यात, त्यांना दूर करण्यात, त्यांचे निर्मूलन करण्यात यशस्वी होते, तरीदेखील वासनामुक्तीच्या कार्यातील ही केवळ अकरणात्मक बाजूच (Negative Side) पूर्ण झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १७

धम्मपद : जो नेहमीच दुसऱ्यांच्या दोषांवर टिका करतो आणि त्याने संत्रस्त होऊन जातो तो स्वत:च्या दोषांपासून मुक्त होण्याऐवजी, उलट स्वत:चे अवगुण अधिकच वाढवितो.

श्रीमाताजी : जर तुम्ही सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही शुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, जर तुम्ही निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगावयाचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता उपयोगी नाही, किंवा त्याला खतपाणीही घालता कामा नये…खरेतर ह्याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्याचवेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते.

मी लोकांना अनेक वेळा असे बोलताना ऐकले आहे की, “आता मी चांगले वागायचा प्रयत्न करत आहे तर प्रत्येकजणच माझ्याशी वाईट वागतो आहे.” पण असे घडते कारण यातून तुम्ही शिकले पाहिजे की, काहीतरी अंतस्थ हेतू बाळगून तुम्ही चांगले वागता कामा नये, दुसरे आपल्याशी चांगले वागावेत म्हणून आपण चांगले वागले पाहिजे, असे नाही. तर केवळ चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमी हाच एक धडा शिकण्याजोगा आहे – तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त चांगले करता येईल तेवढे उत्तम करा, पण फळाची अपेक्षा बाळगू नका. फळ मिळावे या अपेक्षेने कृती करू नका. सत्कृत्यासाठी बक्षिसाची अपेक्षा बाळगणे, आयुष्य सोपे होईल म्हणून चांगले बनणे ह्या अशा प्रकारच्या वृत्तीमुळेच त्या सत्कृत्याची सर्व किंमत मातीमोल होते.

भलेपणावरील प्रेमापोटी तुम्ही भले असले पाहिजे, न्यायावरील प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजे, शुद्धतेवरील प्रेमापोटी तुम्ही शुद्ध, पवित्र असले पाहिजे, निरपेक्षतेच्या प्रेमापायी तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे; असे असेल तरच मार्गावर प्रगती करण्याची खात्री बाळगता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १५

धम्मपद : जी सावधचित्त व्यक्ती परित्याग आणि एकांतवास यामध्ये समाधानी होऊन जीवन जगते तिचा, जी जागृत झालेली आहे अशा व्यक्तीचा, आणि जे सत्पुरुष ध्यानधारणा करतात अशा साऱ्या व्यक्तींचा देवालासुद्धा हेवा वाटतो.

श्रीमाताजी : जेव्हा तुम्हाला थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वत:ला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ ध्यानासाठी, विखुरलेल्या ‘मी’ चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, सत्य आणि शाश्वताप्रत स्वत:ला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.” जेव्हा तुम्ही बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता अशा प्रत्येक वेळी तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर, तुम्ही ह्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची जाणीव ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच खऱ्या कारणांसाठी वेळ खर्च करणे अधिक उत्तम. कारण वेळ मुळातच इतका कमी असतो, आणि तो अधिकच कमी असल्याचे लक्षात येते. जेव्हा जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, मिळालेली संधी तीनचतुर्थांश वेळेला तुम्ही गमावलेली आहे – अशा वेळी तुम्ही मिळालेल्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्यानेही काही उपयोग होत नाही – त्यापेक्षा मध्यममार्गी, समतोल, चिकाटीने, शांतपणे काम करीत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी न गमावणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या कारणासाठी खर्च करणे हे अधिक उत्तम.

जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता, तुम्ही सैरभैर होता, तुम्ही मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता, परत लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये. ते करीत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा, आणि पुढील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय करावयास हवे ह्याचे चिंतन करण्यात, तसेच ज्यामध्ये तुम्ही जगत असता त्या अज्ञान, मिथ्यत्व आणि दु:खभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यामध्ये, त्या प्रत्यक्षात उतरविण्यामध्ये वेळ खर्च करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 250-251)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १४

धम्मपद : अज्ञानी मनुष्य हा नुसताच एखाद्या बैलाप्रमाणे वयाने वाढत राहतो, त्याचे वजन वाढते पण त्याची बुद्धी विकसित होत नाही.

जे आत्म-नियंत्रित जीवन जगत नाहीत आणि ज्यांना त्यांच्या तरुणपणी, खरी संपत्ती कशी जमा करावी ते माहीत नसते असे लोक, ज्या तळ्यामध्ये मासे नाहीत त्या तळ्याकाठी राहणाऱ्या वृद्ध बगळ्याप्रमाणे नामशेष होतात.

श्रीमाताजी : येथे एक गोष्ट सांगितलेली नाही पण ती इतर गोष्टींइतकीच महत्त्वाची आहे. ती अशी की, असे एक म्हातारपण आहे की जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा उन्नती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता, म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात, की जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रुपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर, आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची, अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत, असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १३

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा, सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितले तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही…

तुम्हाला हे कळत नाही कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

तुमच्या मनात काही नाही, फक्त सद्भावना व सद्हेतूच आहेत आणि तुम्ही जे सारे काही करता ते फक्त चांगल्यासाठीच करता, असे समजून तुम्ही तुमची पाठ थोपटून घेता – हो, जोपर्यंत तुम्ही जागृत आहात आणि तुमचे स्वत:वर नियंत्रण आहे तोपर्यंत, पण ज्या क्षणी तुम्ही सावधानता गमावता, त्या क्षणीच तुमच्या आतमध्ये अशा काही गोष्टी घडतात की, त्याची तुम्हाला जाणीव नसते, आणि त्या फार काही सुखकर नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १२

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत, कारण तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरेल.

श्रीमाताजी : मानवीप्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे, पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे, ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरी ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की, अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, ज्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १०

धम्मपद : तुम्ही स्वत:ला निष्काळजी बनू देऊ नका, किंवा इंद्रियोपभोगामध्येही रममाण होऊ नका. जो सावधचित्त आहे आणि ज्याने आपले चित्त ध्यानमग्न केले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो.

श्रीमाताजी : असावधानता ह्याचा खरा अर्थ म्हणजे, इच्छाशक्तीची शिथिलता की, ज्यामुळे व्यक्ती तिचे उद्दिष्ट विसरून जाते आणि जे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे त्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ खर्च करते. त्यामुळे ती व्यक्ती एकप्रकारे मार्गात एकाच जागी थांबून राहते आणि बरेचदा तर ही शिथिलता व्यक्तीला मार्गापासून परावृत्त करते. अभीप्सेची ज्वालाच भिक्षूच्या असावधानतेचा निरास करते. दर क्षणाला त्याला ह्या गोष्टीची आठवण असते की, त्याच्या हाती असलेला अवधी अगदी अल्प आहे, त्यामुळे क्षणभरदेखील वेळ वाया न घालविता, शक्य तितक्या त्वरेने मार्गक्रमण केले पाहिजे. आणि जो अशा रीतीने सावध आहे, जो वेळ वाया घालवीत नाही, त्याच्यावरील सर्व बंधने, लहानमोठी सर्व बंधने एकापाठोपाठ एक गळून पडताना त्याला दिसतात. त्याच्या सर्व अडीअडचणी या सावधानतेमुळे नाहीशा होतात. आणि त्याचा हा दृष्टिकोन जर असाच कायम राहिला, आणि त्यातच त्याला संपूर्ण समाधान गवसू लागले तर, कालांतराने त्याला या सावधानतेतच इतका प्रगाढ आनंद अनुभवायला मिळतो की, लवकरच अशी वेळ येते की, जेव्हा तो सावधचित्त नसतो तेव्हा, त्याला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते, त्याला अस्वस्थ वाटू लागते.

ही वस्तुस्थिती आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वेळ व्यर्थ न घालविण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा वाया घालविलेला प्रत्येक क्षण हा तिच्यासाठी दुःखदायक असतो आणि त्यात तिला कोणताही आनंद लाभत नाही. आणि एकदा का तुम्ही या अवस्थेप्रत जाऊन पोहोचलात, प्रगती आणि रूपांतरणासाठीचे प्रयत्न ही तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट बनली, तुम्ही तिचाच सातत्याने विचार करू लागलात, तर खरोखरच तुम्ही शाश्वत अस्तित्वाच्या, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याच्या मार्गावर आहात, असे समजायला हरकत नाही.

या आंतरिक विकासाच्या वाटचालीमध्ये एक क्षण असा निश्चितपणे येतो की, जेव्हा एकाग्रता साधण्यासाठी, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये निमग्न होण्यासाठी आणि सत्यशोधनासाठी व त्याचे सर्वोत्तम आविष्करण करण्यासाठी – ज्याला बुद्धमार्गी लोक ‘ध्यान’ म्हणतात – ते करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत तर उलट, त्यामध्ये एक प्रकारची विश्रांती, आनंद, सुटकेचा मोकळा श्वास अनुभवास येतो आणि त्या अवस्थेमधून बाहेर पडून, ज्या गोष्टी खरोखरीच आवश्यक नाहीत, अशा गोष्टी करण्यासाठी वेळ खर्च करावा लागणे, यामध्ये वेळेचा अपव्यय आहे असे त्याला वाटू लागते; त्या गोष्टी त्याच्यासाठी भयंकर वेदनादायक वाटू लागतात. सर्व प्रकारच्या बाह्य गतिविधी, कृती ह्या अगदी अनिवार्यपणे आवश्यक अशा गोष्टींपुरत्याच सीमित होऊन, ईश्वरोपासना म्हणून केलेल्या कृतींपुरत्याच त्या शिल्लक राहतात. व्यर्थ, निरुपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टी निश्चितपणे काळाचा व प्रयत्नांचा अपव्यय करणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टी, तीळमात्रही समाधान देत नाहीत तर, उलट असमाधान व थकवा उत्पन्न करतात. जेव्हा तुमचे लक्ष त्या एकमेव उद्दिष्टावर केंद्रित झालेले असते तेव्हाच तुम्हाला आनंद वाटतो. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गावर आहात, असे समजावे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 209)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०९

धम्मपद : अशा रीतीने सावधानता, जागृती म्हणजे काय हे समजल्यानंतर, मुनी लोक त्यातच आनंद मानतात, व पूर्वसुरींच्या, श्रेष्ठ लोकांच्या उपस्थितीमध्ये आनंद मिळवितात.

श्रीमाताजी : या संपूर्ण शिकवणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती अशी की : उत्तम जीवन जगणे किंवा चांगला विचार करणे हा खूप प्रयासांचा वा त्यागाचा परिणाम असतो, असे तुम्हाला सांगण्यात आलेले नाही; उलटपक्षी, उत्तम जीवन जगणे ही अशी एक आनंदमय स्थिती आहे की, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या दुख:भोगांवर उपाय सापडतो, दुःखभोग दूर होतात. त्याकाळी, म्हणजे बुद्धांच्या काळात, आध्यात्मिक जीवन जगणे ही एक आनंदमय, सौंदर्यपूर्ण आणि परमानंदाची स्थिती होती, की जी तुम्हाला या पार्थिव जगताच्या सर्व समस्या, दुःखभोग, चिंता, काळज्या यांपासून मुक्त करून आनंदी, समाधानी, संतुष्ट बनवीत असे.

आधुनिक काळातील जडवादाने, आध्यात्मिक साधना करणे म्हणजे कठीण संघर्ष आहे; आध्यात्मिक साधनेसाठी जीवनातील सर्व तथाकथित मौजमजा, आनंद यांचा परित्याग करावा लागतो, वेदनादायक सर्वसंगपरित्याग करावा लागतो, अशी आपली समजूत करून दिली आहे.

मानवी संस्कृतीच्या जडवादी, भौतिकवादी दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून, भौतिक सुखसमृद्धी, भौतिक मौजमजा, भौतिक सोयीसुविधा, केवळ भौतिक जगताचेच अस्तित्व मान्य करणे, या गोष्टींवर आता अधिक भर देण्यात येऊ लागला आहे. प्राचीन काळात ह्या गोष्टीचा विचारच मनाला शिवत नसे. उलट, निवृत्ती, ध्यानधारणा, सर्व भौतिक काळज्या, चिंता यांपासून सुटका, आध्यात्मिक आनंदासाठी जीवनाचे समर्पण ह्यातच खराखुरा आनंद सामावलेला असे. ह्या दृष्टिकोनातून विचार केला असता, मानववंश प्रगतिपथापासून खूप दूर आहे, असेच म्हणावे लागेल. आणि ज्यांचा जन्म या जडवादी संस्कृतीचे आगारच म्हणावे अशा ठिकाणी झाला आहे अशा लोकांच्या अबोध मनात एका भयंकर कल्पनेने घर केले आहे, ती कल्पना अशी की : भौतिक गोष्टीच खऱ्या आहेत आणि ज्यांना वास्तवाचा, भौतिकाचा आधार नाही, ज्या भौतिकाशी संबंधित नाहीत अशा गोष्टी म्हणजे महत्प्रयासाचे काम आहे, त्यामध्ये फार मोठा जीवनाचा त्याग अंतर्भूत आहे असे त्यांना वाटते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसरात्र क्षुल्लक अशा भौतिक सुखसोयी, भौतिक आनंद, भौतिक इंद्रियसुख, भौतिक कामांमध्ये गुंतलेले नसणे म्हणजे तो जणू काही अद्भुत, जगावेगळा जीव आहे असे त्यांना वाटते. आपल्याला कळत नाही, पण संपूर्ण आधुनिक संस्कृती ह्या संकल्पनेवर आधारलेली आहे : ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करू शकता, तिच्या सत्यतेविषयी तुम्हाला खात्री असते; जी गोष्ट तुम्ही पाहू शकता तिच्या सत्यतेविषयी तुम्हाला खात्री असते; पण त्याव्यतिरिक्त इतर गोष्टी म्हणजे केवळ कल्पनाविलास तर नाही ना आणि आपण ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे तर लागत नाही ना ?’ असे त्यांना वाटते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 203-204)