जीवन जगण्याचे शास्त्र – ३२
माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.
– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)






