Tag Archive for: साधना

(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)

साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?

श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.

अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.

आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 324)

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले जातात, या बाबतीतले तथ्य श्रीमाताजी येथे उलगडवून दाखवीत आहेत. हा भाग विस्तृत असल्यामुळे क्रमशः देत आहोत.)

श्रीमाताजी : प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच तुमच्यावर वारंवार आघात होत राहतात. कधीकधी तर ते आघात अधिकच भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा नाहीसा करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो; संकटे का कोसळतात त्याचे हे कारण आहे. जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हाच तुमच्यातील मूर्खपणा थोड्याफार प्रमाणात तरी नाहीसा होतो. पण तो थोडा नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये थोडातरी शिल्लक असतोच आणि म्हणूनच दुःखसंकटादी साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर जाण येण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी आघात आवश्यक असतात.

ज्या क्षणी व्यक्तीला या गोष्टीची जाण येते त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात; सारी संकटे, अडचणी दूर होतात. व्यक्तीला जेव्हा हे पूर्णपणे कळते तेव्हा दिव्य चेतनेला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 323-324)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी शक्तीच ते कर्म करत आहे, असा अनुभव साधकाला आला पाहिजे, असे श्रीअरविंद सांगत आहेत. पण असे करत असताना प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो हेदेखील ते येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकाने त्याच्या माध्यमातून ती दिव्य शक्ती, दिव्य उपस्थिती, दिव्य संकल्प कार्य करत आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. परंतु ही जाणीव बाळगण्याचा प्रयत्न करत असताना एक धोकासुद्धा असतो. तो असा की, छुप्या अहंकाराला किंवा एखाद्या निम्नस्तरीय शक्तीलाच तो ईश्वर समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मागण्या हाच ‘ईश्वरी आदेश‌’ आहे, असे तो समजण्याची शक्यता असते. त्याच्यावर या कनिष्ठ प्रकृतीचा हल्ला होण्याचा धोका असतो. आणि उच्चतर शक्तीप्रत असणाऱ्या त्याच्या या तथाकथित समर्पणात विकार निर्माण होण्याची शक्यता असते. (म्हणजे ते समर्पण, समर्पण न ठरता उलट,) स्व-इच्छा आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांमध्ये अधिकत्वाने आणि अनियंत्रितपणे रममाण होण्याचे निमित्त ठरू शकते.

आणि असे होऊ नये यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. आणि हा प्रामाणिकपणा त्याने फक्त स्वतःच्या सचेत मनामध्येच बाणवला पाहिजे असे नाही तर, त्यापेक्षाही, गुप्त गतिविधींनी भरलेल्या स्वतःच्याच अंतस्तलीय (subliminal) भागामध्येसुद्धा बाणवण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक असते. कारण, तेथे म्हणजे विशेषतः त्याच्या अंतस्तलीय प्राणिक प्रकृतीमध्ये, एक नाटकं करणारा आणि निगरगट्ट असा भोंदू वसलेला असतो. साधकाने त्याच्या कर्माचे ओझे ईश्वराकडे सोपविण्यापूर्वी, योगमार्गावर त्याची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे. म्हणजे, इच्छावासनांचे निर्मूलन व्हावे या दिशेने आणि सर्व कर्म व सर्व घटना यांच्याकडे पाहण्याची एक स्थिर समत्वबुद्धी यावी यासाठी त्या साधकाची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 23 : 229-230)

साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का?

श्रीमाताजी : ती शरणागती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती खरोखरच प्रामाणिक असेल तर ती आनंददायी होते. जोपर्यंत शरणागती स्वीकारण्यात आनंद वाटत नाही तोपर्यंत ती शरणागती पूर्णपणे प्रामाणिक नाही, असे निश्चित समजा; कारण जर ती शरणागती खरोखरच प्रामाणिक असेल तर, ती नेहमीच आनंददायी असते.

जर ती आनंददायी नसेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या व्यक्तित्वातील काहीतरी तुम्हाला मागे खेचत आहे, तुमच्यामधील एखाद्या भागाला शरणागती स्वीकारणे नको आहे, त्याला त्याची स्वतःची म्हणून काही इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, त्याचे स्वतःचे असे काही प्रयोजन आहे आणि तो भाग संतुष्ट नाहीये आणि म्हणून तो पूर्णपणे समर्पित होत नाहीये आणि म्हणून त्याच्या समर्पणामध्ये प्रामाणिकपणा नाहीये.

पण जर व्यक्ती समर्पणामध्ये प्रामाणिक असेल तर ती अगदी स्वाभाविकपणे परिपूर्णतया आनंदी असते. खरंतर व्यक्तीला आपोआपच अवर्णनीय असा आनंद अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला असा अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रामाणिक नसल्याची ती खात्रीशीर खूण आहे असे समजा. म्हणजे तुमच्यामधील एखादा भाग, एखादा लहान किंवा मोठा भाग प्रामाणिक नाहीये असे निश्चित समजा.

• श्रीमाताजी (CWM 06 : 210–211)

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न अतिशय अवघड आहे आणि त्यासाठी निरपवाद आणि दृढ प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. ज्यांच्यापाशी प्रबळ संकल्पशक्ती आहे, उत्कट अभीप्सा आणि अविचल प्रामाणिकपणा आहे, त्यांनी हा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

• श्रीमाताजी (CWM 16 : 425)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे ठीक आहे. पण आणखी काहीतरी गरजेचे आहे. कारण ती फक्त पहिली आवश्यक गोष्ट आहे. साधकाने संपूर्ण आत्मदान केले पाहिजे आणि समर्पित असले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मनमानी करत राहणे हे काही योग्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, अन्नग्रहण वर्ज्य करणे हा वासनांपासून सुटका करून घेण्याचा योग्य मार्ग आहे, ही तुमची संकल्पना अशीच आहे. तुमची ही संकल्पना हास्यास्पद आहे कारण एखादी व्यक्ती उपासतापास करत असूनही, वासनामय जीवन जगणारी असू शकते. श्रीमाताजी आणि मी अशा रितीने स्वतःची उपासमार करण्यास संमती देत नाही, हे तुम्हाला चांगले माहीत आहे आणि असे असूनही तुम्ही एखादी संधी मिळण्याचा अवकाश, तसेच वागू इच्छिता. या व यासारख्या उदाहरणांमध्ये दिसून येतात त्याप्रमाणे, तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत.

इच्छा-वासनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्या वासनांपासून सुटका व्हावी अशी प्रामाणिक आस बाळगणे आणि श्रीमाताजींच्या शक्तीने तुमच्यामध्ये कार्य करावे म्हणून त्यांना आवाहन करणे, हा योग्य मार्ग आहे. श्रीमाताजींचा प्रकाश आणि त्यांची शक्ती जेव्हा तुमच्यामध्ये कार्य करू लागेल तेव्हा ती शक्ती व तो प्रकाशच तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवणे आवश्यक आहेत ते दाखवून देतील आणि तुम्ही जर त्यास प्रामाणिकपणाने, पूर्ण सहमती दिलीत तर तसे परिवर्तन ती शक्ती आणि तो प्रकाश तुमच्यामध्ये घडवून आणेल.

• श्रीअरविंद (CWSA 32 : 393)

 

मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात ती, – भलेही त्यांनी तसे बोलून दाखविले नाही तरी – नेहमी स्वतःवरच अतिशय संतुष्ट असतात. त्यांच्याबाबतीत जे काही घडत असते त्यावर ती अतिशय संतुष्ट असतात आणि त्यांच्यातील आवेगांबाबत (impulses) ते म्हणत असतात, “अमुक गोष्ट किती स्वारस्यपूर्ण आहे, किती रोचक आहे.” आणि म्हणून, प्राणाने रूपांतरणाचा निर्णय घेईपर्यंत जर तुम्ही वाट पाहायचे ठरविलेत तर, कदाचित अनंत काळपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहावी लागेल. ‘आज्ञापालन केले पाहिजे,’ हा धडा तुम्ही प्राणाला दिलाच पाहिजे. तो संतुष्ट होण्याआधीच, त्याला ही समज दिली गेली पाहिजे की, त्याने अन्य काही करायचे नाही, तर फक्त आज्ञापालन करायचे आहे. आणि म्हणूनच, “योगसाधनेला आरंभ करणे सोपे नाही; तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका,” असे मी सांगत असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 78-79)

 

(साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका साधकाने विचारलेला दिसतो. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही जोवर शक्तिशाली असता, अगदी विशुद्ध स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआप त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच शक्तीनिशी त्यांच्यावर जाऊन आदळते आणि अशा रितीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध जादुटोणा करण्यात आला होता, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.

अशा उदाहरणात, या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करायचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असली पाहिजे, म्हणजे ती प्राणाच्या स्तरावर आध्यात्मिक योद्धा असली पाहिजे. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी अशा प्रकारचा योद्धा बनलेच पाहिजे. आणि जेव्हा ते तसे होतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित झालेले असतात.

पण त्यासाठी एक पूर्वअट असते ती म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रितीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, तुमच्यावर त्यांच्याकडून आघात होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 05 : 179)

‘आम्हाला विरोधी शक्ती त्रास का देतात आणि त्यांना आमच्या प्रगतीमध्ये अशी ढवळाढावळ करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न साधक मला नेहमी विचारत असतात.

मी त्यांना सांगते की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते आणि ती आवश्यक असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 353)