Tag Archive for: साधना

 

(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका व्यक्तीने श्रीअरविंद यांना विचारला असावा असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

व्यक्तीने संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगामध्ये, तिच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहायला शिकू शकली आणि पृष्ठवर्ती मनामुळे व प्राणशक्तीमुळे झाकल्या गेलेल्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या खऱ्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ शकली आणि स्वत:चे अस्तित्व अतिचेतन वास्तविकतेप्रत (superconscient Reality) जर ती खुले करू शकली तर तेवढे पुरेसे असते. पण व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असल्याखेरीज आणि तिचे प्रयत्न एकाच ध्येयासाठी एकदिश झालेले असल्याखेरीज तिला उपरोक्त गोष्टीमध्ये यश मिळू शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 380)

 

अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या स्वतःच्या कार्याचा भाग असतो. तसेच जे काम प्रामाणिकपणे केलेले असते आणि जे श्रीमाताजींना अर्पण केले जाते ते कामसुद्धा त्यांचेच कार्य असते, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. परंतु ‘कर्मा’मध्ये फक्त कामाचाच समावेश होतो असे नाही तर, सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश होतो.

*

ईश्वराच्या कार्यासाठी तुम्ही जे आत्मनिवेदन (consecration) करत आहात, त्यामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा. तो प्रामाणिकपणाच तुम्हाला निश्चितपणे शक्ती व यश देईल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 417), (CWM 14 : 65)

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

साधना करत असताना सुरुवातीला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे, शक्य तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे. दररोज काही वेळ हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करावे. शक्य तितका, त्या ‘दिव्य माता’ आहेत या भूमिकेतून त्यांचा विचार करावा. त्या तुमच्या अंतरंगामध्येच आहेत ही जाणीव तुम्हाला व्हावी अशी अभीप्सा बाळगावी, तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करावे आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे व तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी. हा प्राथमिक टप्पा आहे पण बहुतेक वेळा हा टप्पा ओलांडण्यासाठीच बराच वेळ लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीने हा टप्पा ओलांडला तर मग हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, ज्यामुळे साधकाला अंतरंगामधून श्रीमाताजींच्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. प्रकृतीमधील आणि जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला अन्य काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आणि त्यामधून साक्षात्काराच्या दिशेने द्वारं खुली होऊ लागतात.

*

तुम्ही तुमचे कर्म ईश्वराच्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर ध्यानामधून जेवढे तुमचे कल्याण होईल तेवढेच कर्मामधूनही होऊ शकेल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 186), (CWM 16 : 178)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

आम्हाला (मला व श्रीमाताजींना) तुमच्यामध्ये नेहमीच एक प्रकारची गहन अभीप्सा असल्याचे आणि त्या अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे आढळून आले आहे. आणि तीच सतत तुम्हाला आमच्या निकट संपर्कात ठेवते. जिथे अशा प्रकारची अभीप्सेची गहनता असते, प्रामाणिकपणा असतो आणि अशी निकटता आढळते तिथे व्यक्ती (ईश्वरी शक्तीप्रत) हळूहळू खुली होत जाणार हे निश्चित असते. आणि तुमच्यामध्ये तर हा खुलेपणा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेबाबत चिंता किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 52)

 

वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही योगमार्गामध्ये प्रवेश करण्याची स्वयमेव सर्वोत्तम साधने नाहीत. तर अंतरंगातून होणारे आत्मसमर्पण हे त्यासाठी उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे आणि प्रामाणिकपणे आत्म्याच्या अधिपत्याखाली आलेले मन, हृदय आणि संकल्प या गोष्टी (self-consecration) त्यासाठीची साधनं असतात.

श्रीमाताजींनी नेमून दिलेले काम हे त्यासाठी नेहमीच आत्म-निवेदनाचे क्षेत्र मानले जाते. ते काम श्रीमाताजींना अर्पण करण्याच्या भावनेतूनच केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या (self-offering) माध्यमातून व्यक्तीला, श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल आणि श्रीमाताजींची शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करत आहे हे तिला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 246)

 

साधक : मी कोणती गोष्ट सर्वाधिक विकसित केली पाहिजे? आणि मी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला नकार देण्याची गरज आहे?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणा विकसित करा. प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराच्या मार्गाशी समग्र निष्ठा बाळगणे. जुन्या मानवी सवयींकडे आपला ओढा असतो, त्याला नकार द्या.

*

साधक : मला वैयक्तिकरित्या श्रीअरविंदांना एक सर्वोत्तम गोष्ट अर्पण करायची आहे. मी काय अर्पण करू?

श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.

साधक : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?

श्रीमाताजी : तुम्ही ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी दिवसभरातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे एखादे पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग निश्चल-नीरव राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक निश्चल-नीरवता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत याची रोज पुन्हा नव्याने सुरूवात करा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 67), (CWM 12 : 205)

 

अंतःकरणाची शुद्धी ही (आध्यात्मिक साक्षात्कारासाठी) केंद्रभूत आवश्यकता असतेच; पण मन, प्राण, शरीर यांच्या शुद्धीकरणाची देखील आवश्यकता असते. परंतु अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संपूर्ण प्रामाणिकपणा. कोणतेही ढोंग करता कामा नये. ईश्वरापासून, स्वतःपासून किंवा सद्गुरूपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे काटेकोर निरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःमधील दुष्प्रवृत्तींमध्ये सुधारणा करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना किती वेळ लागतो हे फारसे महत्त्वाचे नाही. ईश्वरप्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे अशी व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही काही साधीसुधी उपलब्धी नाही. आणि म्हणून, ती झाली नाही म्हणून हताश, निराश होण्याचे काही कारण नाही. कारण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन केले पाहिजे अशा गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये वेळोवेळी आढळतच राहतात. परंतु व्यक्तीने जर खरी इच्छा आणि योग्य दृष्टिकोन बाळगला असेल तर, अंतरंगातून येणाऱ्या सूचना किंवा अंतःप्रेरणा वाढीस लागतात, त्या अधिक सुस्पष्ट, नेमक्या, अचूक व्हायला लागतात आणि त्यांचे पालन करण्याची व्यक्तीची ताकदसुद्धा वाढीला लागते.

आणि तेव्हा मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी, तो ईश्वरच तुमच्याबाबतीत समाधानी होईल आणि मानवजात ज्या महान गोष्टीचे (परमेश्वराचे), आकलन करून घेण्याची आस बाळगू शकते त्या महान गोष्टीचे मानवजातीला तिची पुरेशी तयारी झालेली नसताना आकलन होऊ नये आणि त्यामुळे तिला धोका पोहोचू नये म्हणून, ईश्वर व साधक यांच्यामध्ये ईश्वरानेच जो पडदा निर्माण केलेला असतो आणि ज्या पडद्याच्या पाठीमागे राहून, तो स्वतःचे व साधकाचे संरक्षण करत असतो तो पडदा आता ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

 

प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेलच, हे अगदी खरे आहे. पण म्हणून कोणताही विलंब न होता तो, अगदी लगेच, अगदी सहजपणे ईश्वरापर्यंत पोहोचेल, असा याचा अर्थ होत नाही. ईश्वरप्राप्ती पाच-सहा वर्षातच झाली पाहिजे अशी काहीतरी एक मुदत तुम्ही ठरवत आहात आणि अजूनपर्यंत तसा कोणताच परिणाम तुम्हाला दिसत नाहीये म्हणून तुम्ही (ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच) शंका घेत आहात, हीच तुमची खरी अडचण आहे.

एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असूनसुद्धा साक्षात्कार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्यांमध्ये परिवर्तन व्हावे लागते. त्याच्यापाशी असलेल्या प्रामाणिकपणाने त्याला चिकाटी बाळगण्यासाठी नेहमीच सक्षम बनविले पाहिजे. कारण ईश्वराबद्दलची आस इतर कशानेही मावळत नाही. विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी यांच्यामुळे ती मावळू शकत नाही.

तुम्ही पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहात कारण तुम्ही तुमच्या मनाला पुन्हा त्याच्या अज्ञानामध्ये, शंकेखोरपणामध्ये सक्रिय होण्यास मुभा दिली आहे. परिणामी, अगदी साधीसरळ आणि अगदी सुप्रस्थापित असणारी अशी जी आध्यात्मिक सत्यं आहेत ती तुम्ही नाकारू पाहात आहात. आंतरिक ज्ञान मिळण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही (ईश्वरच अस्तित्वात नाही असे) ठरवून मोकळे होत आहात. या साऱ्या गोष्टी तुमच्यामधून काढून टाका आणि तुम्ही ईश्वरप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहात ते तसेच अविचलपणे करत राहा. त्यासाठी किंवा चेतना खुली होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तो कमी आहे की जास्त आहे, याचा कोणताही विचार तुम्ही करू नका. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा तुम्ही निर्धार केला होतात (याचे स्मरण ठेवा.) तो निर्धार कायम ठेवा. म्हणजे मग भलेही सावकाशपणे का होईना, पण एक ना एक दिवस तुमची चेतना खुली होईल आणि प्रकाश अवतरेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116–117)