आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१७)

‘दिव्य’ चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्यपूर्ण सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून त्या ‘ईश्वरा’प्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती त्या ‘ईश्वरा’विषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की त्या ‘ईश्वरा’प्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान करायचे.

या आत्मदानाचा अर्थ असा की, कशाचीही मागणी न करता, त्या ‘दिव्य चेतने’च्या सतत संपर्कात राहायचे किंवा तिच्याशी ऐक्य राखायचे; तिची शांती, शक्ती, प्रकाश, आणि आनंद यांबद्दल अभीप्सा बाळगायची; मात्र अन्य कशाचीही मागणी करायची नाही. या जगामध्ये व्यक्तीला जे कार्य नेमून देण्यात आले आहे ते कार्य, जीवनात व कृतीमध्ये उतरविण्यासाठी त्या ‘दिव्य शक्ती’चे माध्यम बनायचे. व्यक्तीला एकदा का मन, हृदय व शरीर यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘आत्मशक्ती’ची, ‘दिव्य शक्ती’ची जाणीव होऊ शकली आणि त्याप्रत व्यक्ती खुली होऊ शकली, म्हणजे मग शिल्लक उरते ते म्हणजे त्या ‘दिव्य शक्ती’शी एकनिष्ठ राहणे, सातत्याने तिला आवाहन करणे, आणि जेव्हा ती अवतरते, तेव्हा तिला तिचे कार्य करू देणे आणि निम्नतर चेतनेशी व निम्नतर प्रकृतीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व गोष्टींना आणि कनिष्ठ ‘शक्तीं’ना नकार देणे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 441)

श्रीअरविंद