Tag Archive for: प्रामाणिकपणा

साधक : प्राण रूपांतरणाची आस बाळगत असतो पण तो नेहमीच बाहेरून येणाऱ्या आवेगांना, गोष्टींना बळी पडत असतो. (म्हणून असा प्रश्न पडतो की) तो स्वतः स्वतःच्या रूपांतरणासाठी प्रयत्नशील नसतो का?

श्रीमाताजी : तो जर रूपांतरणाची आस बाळगत असेल तर ती गोष्ट खरंच खूप चांगली आहे. जर तो रूपांतरणाची अभीप्सा बाळगत असेल तर तो (स्वतःच्या कमतरतांपासून, दुर्बलतेपासून) स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. प्राणशक्ती दुबळी असेल तर तिची अभीप्साही क्षीण असते.

हे लक्षात घ्या की, दुर्बलता हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणा असतो. (दुर्बळ) व्यक्ती स्वतःलाच कोणत्या ना कोणत्या तरी सबबी देत राहते. कदाचित ती हे सारे नकळत करत असते. पण तुम्हाला हे अवश्य सांगितले पाहिजे की, अवचेतना (subconscient) ही अशी एक जागा असते की, जेथे अप्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. “मला अमुक एक गोष्ट करायला आवडली असती पण मला ती जमत नाहीये,” असे व्यक्ती जेव्हा दुर्बलतेच्या नावाखाली सांगत असते तेव्हा (ती दुर्बलता नसते, तर) तो त्या व्यक्तीचा अप्रमाणिकपणा असतो. कारण ती व्यक्ती जर खरंच प्रामाणिक असेल तर, ती आज जे करू शकत नाही, ते ती उद्या करू शकेल, आणि जे ती उद्या करू शकणार नाही ते ती परवा करू शकेल. तिला ती गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहते.

तुम्ही एकदाच कायमसाठी हे माहीत करून घ्या की, हे संपूर्ण विश्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, स्वतःचेच विस्मरण झालेला ईश्वर आहे. (किंवा इथे तुम्हाला हवे तर तुम्ही संपूर्ण विश्वाऐवजी संपूर्ण पृथ्वी, असेही म्हणू शकता.) त्यामुळे इथे दुर्बलतेला जागा कोठे आहे? (कारण) ईश्वरामध्ये दुर्बलता तर नक्कीच असू शकत नाही ना? मग दुर्बलता जर कुठे असेल तर ती कोठेतरी विस्मरणात असली पाहिजे. म्हणून, तुम्ही जर (उपरोक्त गोष्टीचे) विस्मरण होऊ नये म्हणून प्रयत्न केलेत तर, जेवढ्या प्रमाणात तुम्ही ईश्वराच्या निकट जाल तेवढ्या प्रमाणात तुमच्यामधून दुर्बलता नाहीशी होईल. आणि हे फक्त मनाच्या बाबतीतच खरे आहे असे नाही तर, तीच गोष्ट प्राणाला आणि शरीराला देखील लागू पडते.

सर्व प्रकारचे दु:खभोग, सर्व दुर्बलता, सर्व अक्षमता यांचे विश्लेषण केले तर या सर्व गोष्टींचे मूळ अप्रामाणिकपणामध्ये असल्याचे आढळते. बरेचजण मला सांगत असतात की ‘ते अगदी पूर्ण प्रामाणिक आहेत’, पण अप्रामाणिकपणा जिथे ठाण मांडून बसलेला असतो अशा अनेक जागा असतात. आणि म्हणूनच, ‘मी पूर्ण प्रामाणिक आहे,’ असे व्यक्तीने कधीच म्हणता कामा नये. “मी कधीच खोटे बोललेलो नाही,” असे माणसे छातीठोकपणे सांगत असतात, त्याप्रमाणेच हे आहे.

तुम्ही जर खरोखर पूर्ण प्रामाणिक असता, तर तुम्ही ईश्वरच झाले असता; तुम्ही जर खरोखर कधीच खोटे बोलला नसता, (पण ते काही खरे नसते) तर तुम्ही सत्यरूप झाले असता. पण, तुम्ही ईश्वरही नाही किंवा सत्यरूपही झालेले नाहीत. (खरंतर, मूळरूपात तुम्ही तसे आहात पण प्रत्यक्षात मात्र नाही.) त्यामुळे, सत्य आणि प्रामाणिकपणा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बरीच दीर्घ वाटचाल करावी लागणार आहे, हे निश्चित.

– श्रीमाताजी (CWM 04 : 252-253)

 

साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी केली गेली आहे. यांपैकी कोणतीही गोष्ट जर पूर्णपणे पारदर्शक असेल तर, कोणताही विपर्यास न होता, त्यामधून प्रकाश जसा आरपार जातो, त्याचप्रमाणे प्रामाणिक चेतना, दिव्य स्पंदनांमध्ये कोणताही विपर्यास न होऊ देता, त्याचे आरपार संक्रमण करते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 382)

 

मानसिक, प्राणिक किंवा शारीरिक प्राधान्यक्रम (preferences) आणि पूर्वकल्पना या गोष्टी म्हणजे परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे शत्रू असतात. या अडथळ्यांवर मात केलीच पाहिजे.

*

योगमार्गाचे जो कोणी प्रामाणिकपणे आचरण करतो त्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभणे क्रमप्राप्तच असते. पण बहुसंख्य लोक स्वत:लाच फसवत असतात. ते योगमार्गाचे अनुसरण करत आहेत अशी त्यांची समजूत असते, पण त्यांच्या व्यक्तित्वामध्ये विरोधाभास मात्र अजूनही जसेच्या तसे शिल्लक असतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 71, 70)

 

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा, उन्मुखता असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते किंवा कालांतराने त्यामध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 528)

 

(व्यक्तीला अमुक एखादी वाईट सवय सोडावी, असे वाटत असते पण तसे करणे तिला जमत नसते. अशा वेळी काय करावे असे श्रीमाताजींना एका साधकाने विचारले आहे, त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)

प्रामाणिकपणा अंगी बाणवा. अन्यथा एखाद्या फळामध्ये जशी लहानशी अळी लपून बसलेली असते, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये एखादी सवय सोडण्याविषयीची अनिच्छा दडून बसलेली असते. व्यक्ती स्वत:शीच म्हणत राहते की, ”नाही, मला हे जमत नाहीये.” पण हे काही खरे नसते, व्यक्तीची इच्छा असेल तर ती निश्चितपणे ठरवलेली गोष्ट करू शकते.

काही जण मला म्हणतात की, त्यांच्याकडे इच्छाशक्ती (willpower) नाहीये. तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ते प्रामाणिक नसतात. कारण जगातील कोणत्याही इच्छांपेक्षा प्रामाणिकपणा ही अधिक बलशाली शक्ती आहे. प्रामाणिकपणा कोणत्याही गोष्टीत निमिषार्धात बदल घडवून आणू शकतो, तो त्या इच्छेचा ताबा घेतो, तिला बाहेर ओढून काढतो आणि मग ती इच्छा संपून गेलेली असते. पण तुम्ही मात्र डोळेझाक करता आणि तुमच्या (इच्छावासनांसाठी) सबबी शोधून काढता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 19)

 

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही व्यक्तीमध्ये अजूनही कोठेतरी अप्रामाणिकपणा शिल्लक असल्याची खूण असते. सामान्यतः तो अप्रामाणिकपणा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो (जे मुळातच खूप मोठे पाऊल उचलण्यासारखे आहे) म्हणजे जेव्हा तो ठरवितो की, तो सुद्धा सहकार्य करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो खर्च करणार आहे, तेव्हासुद्धा आतमध्ये कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते. सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील; अशी एक अपेक्षा तिथे दडलेली असते. ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक अशी गोष्ट असते आणि तीच प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे व्यक्तीला स्वत:चे दोष, स्वत:च्या चुका दिसत नाहीत.

परंतु, व्यक्ती जर पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, जेव्हा ती करता कामा नये अशी एखादी गोष्ट करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे, म्हणजे जोरकसपणे नव्हे पण तरीही अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, ‘नाही, ही गोष्ट मी करता कामा नये.’ अशा वेळी, व्यक्ती जर अनासक्त असेल तर ती चुकीची गोष्ट करणे व्यक्ती लगेचच थांबविते, अगदी त्वरित थांबविते.

पण व्यक्तीमध्ये आसक्ती असते, अगदी निष्काम कर्माबाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे जीवन जरी अगदी नि:स्वार्थ अशा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलेले असले, तरी तेथेही अहंकार शिल्लक असतोच. ते कार्य करण्याची तुमची स्वतःची अशी एक खास, वैयक्तिक पद्धत असते; तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल इत्यादी इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की, ते कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता; पण जेव्हा ते कार्य तुम्ही हाती घेता, तेव्हा ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे तुम्हाला व्यक्तिश: असे नव्हे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य यशस्वी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे कोणतीतरी एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते पण तिची तुम्हाला जाणीव नसते… परंतु तशी अपेक्षासुद्धा जर तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, ‘माझी चूक झाली आहे.’

काहीही झाले तरी चालेल पण तुमच्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्यातरी भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा परिपूर्ण प्रामाणिकपणा काहीही घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ अगदी एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तो तयार असतो परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच मन आणि प्राण, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात; मग तो वैयक्तिक समाधानाचा लाभ असेल किंवा एखाद्या आनंदाचा लाभ असेल, किंवा तुमच्या मनात स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा असते तिच्या लाभासाठी असेल, हे मन किंवा प्राण तो लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असतात. (आणि म्हणूनच) स्वतःला न फसविणे ही गोष्ट अतिशय अवघड असते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 54-55)

 

आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा असुरसुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, बरेचदा दिवसाच्या धावपळीत व्यक्ती स्वत:लाच फसवत असते आणि तिला त्याची जाणीवसुद्धा नसते. अगदी सहजपणे, अगदी अभावितपणे व्यक्ती अशी फसवणूक करत असते. ती नेहमीच स्वत:च्या शब्दांचे आणि कृतींचे समर्थन करत असते. सुरुवाती-सुरुवातीला नेहमी हेच घडत असते. ”चूक दुसऱ्याचीच आहे,” असे भांडणामध्ये व्यक्ती म्हणत असते, पण यांसारख्या अगदी उघड गोष्टींविषयी मी सांगत नाहीये, तर मी दैनंदिन जीवनातील लहान-सहान गोष्टींविषयी सांगत आहे.

मी एकदा असा एक छोटा मुलगा पाहिला होता की जो खेळता-खेळता अनवधानामुळे एका दारावर धडकला पण (स्वत:च्या चुकीकडे लक्ष देण्याऐवजी तो त्या दारावरच चिडला आणि) त्याने दारालाच जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी दुसरी व्यक्तीच चुकीची असते, तीच चूक करत राहते, असे व्यक्तीला वाटत असते. बाल्यावस्था पार केल्यावर पुरेशी समज आल्यानंतरसुद्धा तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करत असता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण मग असा वागलो नसतो.’’ वास्तविक, हे याच्या अगदी उलट असले पाहिजे.

समजा तुमच्या सोबत कोणीतरी आहे; तुमच्या सोबतची ती व्यक्ती भलेही प्रामाणिकपणे वागो किंवा न वागो, पण तुम्ही जर प्रामाणिक असाल, तर तुमची सहज-स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असेल तर, त्यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला आहे. अशा वेळी, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. खरंतर, ही गोष्ट तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे. आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. तुम्ही सर्वसाधारणपणे कितीही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा, तुम्ही भेदक नजरेने स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. आणि मग प्रामाणिकपणे वागणे किती अवघड असते, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी (CWM 05 : 06)

 

(भाग ०४)

व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं आहे. पण प्रत्येक वेळी या अप्रामाणिकपणाचा उद्भव एक सारख्याच गतीविधीतून होतो — ती गतीविधी कधी इच्छांमधून उद्भवलेली असते तर, कधी व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक उद्दिष्टांसाठी जी धडपड करत असते, त्यातून उद्भवलेली असते. म्हणजे अहंभावामधून, अहंकारातून निर्माण झालेल्या मर्यादांच्या सरमिसळीतून आणि वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकृतींमधून या अप्रामाणिकपणाचा उद्भव होतो.

व्यक्ती जरी प्रामाणिक बनण्याची धडपड करत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत ‘मी पूर्णपणे प्रामाणिक आहे,’ असे ती व्यक्ती म्हणू शकत नाही. व्यक्तीने अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे, स्वत:ला संपूर्णपणे दिव्य संकल्पा‌च्या (divine Will) हाती सोपविले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता आणि लाभहानीचा कोणताही विचार मनात न ठेवता हे समर्पण केले पाहिजे… तेव्हाच व्यक्ती संपूर्णतया प्रामाणिक असू शकते, तत्पूर्वी मात्र ती प्रामाणिक नसते.

अर्थात, व्यक्तीने आहे त्यापेक्षा अधिक प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करू नये, असा याचा अर्थ नाही. एखादी व्यक्ती असेही म्हणण्याची शक्यता आहे की, ‘ठीक आहे, मी माझा अहंकार नाहीसा होण्याची वाट पाहीन आणि मग प्रामाणिक होईन,’ (परंतु असे करता कामा नये.) व्यक्तीने ती सध्या जेवढी प्रामाणिक आहे त्यापेक्षा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की, व्यक्तीने जर प्रामाणिकपणे प्रयत्नच केला नाही, तर तिचा अहंकार कधीच नाहीसा होणार नाही.

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच एक साध्य आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर, तुम्ही हमखास असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला व इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते.

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे एक फल अंतर्भूत असते. आपले शुद्धिकरण झाले आहे ही भावना किंवा ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे किंवा व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे तिला मिळालेला मुक्तीचा अनुभव या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे फलित असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकपणा ही एक रूपांतरकारी शक्ती असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 399-400)

 

(भाग ०३)

अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. विचार एक करायचा आणि बोलायचे निराळेच, अमुक एक गोष्ट करत असल्याचा आव आणायचा आणि करायची दुसरीच गोष्ट किंवा एखादी इच्छा नसतानासुद्धा ती आहे, असे दाखवायचे; ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. धादांत खोटे बोलण्याविषयी तर मी बोलतच नाहीये; पण अमुक एक विशिष्ट परिणाम साधावा म्हणून, हेतुपुरस्सर नाटकीपणा करायचा, किंवा अमुक एखाद्या अंतस्थ हेतुने गोडीगुलाबीने बोलायचे हा प्रकारसुद्धा तसाच आहे. असे सर्व प्रकार स्वाभाविकपणे, तुम्ही जसे नाही तसे तुम्हाला वागायला भाग पाडतात आणि अशा प्रकारची विसंगती ही इतकी नजरेत भरण्यासारखी असते की, ती कोणालाही सहज ओळखता येते.

परंतु, अन्य काही गोष्टी अधिक सूक्ष्म असल्यामुळे त्या ओळखायला कठीण असतात. उदाहरणार्थ, जोपर्यंत तुमच्यामध्ये सहानुभूती आणि नावड या गोष्टी असतात तोपर्यंत अगदी स्वाभाविकपणे, जे तुमच्या आवडीचे असते, ज्याविषयी तुम्हाला सहानुभूती वाटत असते त्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन अनुकूल होतो आणि जी वस्तू किंवा व्यक्ती तुमची नावडती असते तिच्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन प्रतिकूल होतो आणि तिथे देखील प्रामाणिकपणाचा अभाव असतो. अशा रितीने तुम्ही स्वत:ला फसवत असता पण तुम्ही अप्रामाणिक आहात हे तेव्हा तुमच्या लक्षातसुद्धा येत नाही. तेव्हा, त्या परिस्थितीत तुम्हाला जणू काही मानसिक अप्रामाणिकपणाची साथसंगत मिळालेली असते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 398-399)

 

भाग ०२

(व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक का होऊ शकत नाही हे श्रीमाताजी खुलासेवार सांगत आहेत.)

ज्ञानेंद्रियांची कार्यंसुद्धा अशीच विपर्यस्त होऊन जातात. व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती असते तोपर्यंत गोष्टी वास्तवात जशा असतात, त्यानुसार व्यक्ती त्यांच्याकडे पाहत नाही, ऐकत नाही, त्यांचा आस्वाद घेत नाही किंवा त्या गोष्टी वास्तवात जशा असतात त्यानुसार व्यक्तीला त्या संवेदित होत नाहीत. जोपर्यंत काही गोष्टी तुम्हाला सुखावणाऱ्या आणि काही गोष्टी तुम्हाला न सुखावणाऱ्या वाटतात, जोपर्यंत तुम्ही काही विशिष्ट गोष्टींनी आकर्षित होता आणि इतर काही गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या प्रतिक्रियांच्या, तुमच्या आवडीनिवडीच्या किंवा तिरस्काराच्या दृष्टिकोनातूनच पाहत असता; आणि तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींमधील सत्य दिसू शकत नाही. ज्ञानेंद्रियं ही साधनं असतात आणि संवेदना, भावना व विचार यांच्याप्रमाणेच तीसुद्धा नीट काम करेनाशी होतात (म्हणजे ती वस्तुंचे सत्य रूप न दाखविता, त्यांचे विपरित रूप प्रस्तुत करतात.)

म्हणून तुम्ही जे काही पाहता, तुम्हाला जे संवेदित होते, तुम्ही जे अनुभवता आणि जो विचार करता त्याविषयी खात्री असण्यासाठी तुम्ही संपूर्णपणे अनासक्त असले पाहिजे. आणि ही गोष्ट काही सोपी नाही, हे अगदी उघड आहे. म्हणून तोपर्यंत (तुम्ही संपूर्णपणे अनासक्त नसाल तर) तुम्हाला झालेले आकलन हे पूर्णत: सत्य असू शकत नाही आणि म्हणून ते प्रामाणिक नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 398)