Tag Archive for: पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३७

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील पूर्णयोग आपल्या कवेत घेतो; आणि त्यामुळे पूर्णयोग व्यक्तिगत मोक्ष किंवा व्यक्तिगत सुटका एवढ्यापुरताच मर्यादित राहू शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो; त्यामुळे त्याचे या विश्वातील दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 270)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३५

मर्यादित बहिर्मुख अहंभावाला हद्दपार करून, त्याच्या जागी प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता म्हणून ईश्वराला सिंहासनावर बसविणे, हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. प्रथमतः वासनेचा वारसा रद्द करणे, आणि त्यानंतर, वासनाभोगाला आपल्या जीवनाचे शासन करण्यास संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. वासनेमधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळविणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यामधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळवेल. वासनेचा शिक्का असलेली आपली जी प्राणिक प्रकृती आहे, केवळ तिलाच नवा जन्म, नवे रूपांतर आवश्यक आहे असे नाही, तर आपल्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे. आपला भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त विचार व तशाच प्रकारची बुद्धी नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या जागी छायाविरहित दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश प्रवाहित झाला पाहिजे; या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी त्याची परिणती, चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यापासून मुक्त अशा स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणिवेमध्ये झाली पाहिजे. आपली गोंधळलेली आणि खजिल झालेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, सुबोध स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन लाभलेल्या शक्तीने घेतली पाहिजे; ईश्वराच्या इच्छेशी आपली इच्छा स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आपली श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आपल्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे. आपल्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, असंतुष्ट, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्याच्या जागी स्वतःच्या संधीची वाट पाहात असणाऱ्या, गुप्त, खोल, व्यापक आंतरात्मिक हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाने प्रेरित झालेल्या आपल्या भावना तेव्हा मग, दिव्य प्रेम व बहुविध आनंद यांच्या शांत, जोरकस दुहेरी व्यापारांमध्ये रुपांतरित होतील. दिव्य मानवता किंवा अतिमानसिक मानवजात कशी असेल त्याची ही व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये असामान्य कोटीची वा परिशुद्ध अशी मानवी बुद्धी आणि मानवी कृती आहे, अशा तऱ्हेचा अतिमानव नव्हे तर, उपरोक्त स्वरूपाचा, लक्षणाचा अतिमानव, आमच्या योगाच्या द्वारा आम्ही विकसित करावा, अशी हाक आम्हाला आली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 90-91)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३४

 

आमचा योग-समन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा असण्यापेक्षा, मनोमय आत्मा आहे असे धरून चालतो; म्हणजेच मनाच्या पातळीवर मानव आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; आणि उच्चतर आध्यात्मिक शक्तीला आणि अस्तित्वाला स्वतः थेट खुला होत, मानव मनामधील आत्मशक्तीच्या योगे, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो, असे मानतो; त्या उच्चतर शक्तीने परिव्याप्त (Possessed) झालेला तो, स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि आपल्या समग्र प्रकृतीमध्ये या गोष्टी तो कृतीत उतरवू शकतो, अशी क्षमता मानवाकडे असते, असे आमचा समन्वय-योग मानतो. याप्रमाणे आमची दृष्टी असल्याने, आमचा प्रारंभिक जोर मनामध्ये असणाऱ्या आत्मशक्तीच्या उपयोगावर आहे; आत्म्याच्या कुलुपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली वापरून, ती कुलुपं उघडण्यावर आमचा भर आहे; तेव्हा आमच्या समन्वययोगात हठयोग-पद्धती उपयोगात आणावी लागत नाही; मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही. राजयोगपद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते. आध्यात्मिक शक्तीच्या आणि आध्यात्मिक अस्तित्वाच्या अधिकात अधिक विकसनाप्रत, सर्वांत जवळच्या मार्गाने जाऊन पोहोचावे आणि त्यायोगे दिव्य झालेली आणि मानवी जीवनाच्या सर्व प्रांतात जिचा अत्युच्च मुक्ताविष्कार असेल अशी प्रकृती असावी, अशी आमची स्फूर्तिदायक प्रेरणा आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-613)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३३

आपल्याला जी पद्धती उपयोगात आणावी लागते ती अशी असते की, आपण आपल्या सर्व जाणीवयुक्त अस्तित्वाने ईश्वराशी संपर्क साधावा, त्याच्याशी नाते जुळवावे; आणि आपले समग्र अस्तित्व हे त्याने त्याच्या रूपामध्ये रूपांतरित करावे म्हणून, आपण त्याला आवाहन करावे. म्हणजेच एक प्रकारे, आपल्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनतो आणि तोच योगाचा प्रभुही बनतो. आणि मग या ईश्वराद्वारे, आपले कनिष्ठ व्यक्तिमत्त्व हे त्याच्या स्वतःच्या पूर्णतेचे साधन म्हणून, तसेच दिव्य रूपांतराचे केंद्र म्हणून उपयोगात आणले जाते….

या पद्धतीचे मानसशास्त्रीय तथ्य सांगायचे तर असे म्हणता येईल की, ह्या पद्धतीमध्ये अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रांसह, सर्व साधनसंभारासह क्रमश: अहंभावातीत परमतत्त्वाप्रत समर्पित होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, किंवा हा मार्ग जवळचादेखील नाही. येथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहूनही अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. कारण या मार्गात तीन टप्पे असतात आणि त्यापैकी केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमयी असते.

पहिला टप्पा : या टप्प्यात आपला अहंभाव हा ईश्वराशी व्यापकतेने आणि समग्रतेने संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यात केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याद्वारे होत असते, वरिष्ठ प्रकृतीला कनिष्ठ प्रकृतीने ग्रहण करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे, ह्यासाठी कनिष्ठ प्रकृतीची तयारी केली जात असते.

तिसरा टप्पा : या टप्प्यात कनिष्ठ प्रकृतीचे वरिष्ठ प्रकृतीमध्ये अंतिम रूपांतर होत असते. तथापि, वास्तवात ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आपल्याकडे बघत असते व आपला दुबळेपणा पाहून, ती स्वत:च पुढे सरसावते आणि आपल्याला आधार देते. आपली श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी ती आपल्याला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती “आंधळ्याला पाहाण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते.” आपल्या बुद्धीला ही जाणीव होते की, आपल्याला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आपल्या मदतीला आहे; सर्व वस्तुजातांचा स्वामी असणाऱ्या, मानवांचा सखा असणाऱ्या ईश्वराबद्दल किंवा विश्वमातेबद्दल आपले हृदय आपल्याला सांगत असते की, आपण जेथे जेथे अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व ही विश्वमाता आपल्याला हात देऊन सावरतात. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाचे उद्दिष्ट यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 45-46)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०५

 

योग म्हणजे ऐक्य. मानवी आत्म्याचे सर्वोच्च आत्म्याशी ऐक्य आणि मानवजातीच्या सद्यस्थितीतील प्रकृतीचे शाश्वत, परम किंवा ईश्वरी प्रकृतीशी ऐक्य, हे योगाचे समग्र उद्दिष्ट आहे.

जेवढे हे ऐक्य महान, तेवढा तो योग महान आणि जेवढे हे ऐक्य परिपूर्ण, तेवढा तो योग परिपूर्ण.

….जो योग जगतातील ईश्वराचा स्वीकार करतो, जो योग सर्व जीवांमध्ये एकत्व पाहतो, जो योग मानवजातीशी ऐक्य साधतो आणि जो योग हे जीवन आणि अस्तित्व ईश्वरी चेतनेने भरून टाकतो आणि जो योग कोणा एका मनुष्याला व्यक्तिशः नव्हे, तर संपूर्ण मानववंशालाच समग्र परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जातो, तो योग ‘पूर्ण योग’ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 334-335)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०१

श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग’ हा सर्व पारंपरिक योगांचा समन्वय आहे आणि त्याहूनही अधिक असे काही त्यामध्ये आहे. हा समन्वय करताना, पारंपरिक योगमार्गांचे स्वतः आधी अनुसरण करून, तसे प्रयोग करून, श्रीअरविंदांनी त्याआधारे प्रत्येक पारंपरिक योगामधील बलस्थानं आणि त्यांच्या मर्यादा स्वतः ज्ञात करून घेतल्या. पारंपरिक योगमार्गांच्या आधारे व्यक्ती आंशिक साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचते, परंतु पूर्ण साक्षात्काराप्रत जाण्यासाठी त्या पारंपरिक योगमार्गांमधील क्रियाप्रकियांना जो नवीन अर्थ, जो नवीन संदर्भ प्राप्त करून द्यावा लागतो, तो नवीन अर्थ, नवीन संदर्भ नेमका कोणता, तो श्रीअरविंदांनी त्यांच्या लेखनातून स्पष्ट केला आहे. विशेषतः त्यांच्या ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये पारंपरिक योग, त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांचा खूप सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या या शिकवणीतील अंशभागाचा समावेश, आजपासून सुरु होणाऱ्या ‘पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग’ या मालिकेत केला आहे.

धन्यवाद
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव,त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.

मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (SupraMental consciousness) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)

जीवन आणि त्यातील संकटांना संयमाने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्यापाशी नाही, अशा व्यक्तीला साधनेमध्ये येणाऱ्या त्याहूनही खडतर अशा आंतरिक विघ्नांमधून पार होणे कधीच शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या कसोट्यांना शांत मनाने, निश्चल धैर्याने आणि ईश्वरी शक्तीवरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे, हाच पूर्णयोगाच्या साधनेमधील अगदी पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 111)

श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगाच्या महान साहसामध्ये जर त्यांचे अनुसरण करायचे असेल तर, व्यक्तीकडे योद्ध्याची जिगर असावी लागते आणि आता तर, जेव्हा श्रीअरविंद आपल्यातून भौतिकदृष्टया निघून गेले आहेत तेव्हा तर व्यक्ती शूरवीरच असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 184)

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या दिव्य सत्याशी एकत्व, हे या योगाचे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ईश्वरासाठी अंगीकारलेला आहे.

आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेखातर नाही; तर आपण प्रयत्नशील असतो ते दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे यासाठी ! ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतेनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतेनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्यतेनिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर, तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो.

अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे, असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील; पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे.

ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 280)