‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०७
व्यक्ती त्या ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते किंवा नाही यावरच पूर्णयोगामध्ये सारे काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल, आणि कितीही अडथळे आले तरी, उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याची धीरयुक्त इच्छा असेल तर, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुलेपण निश्चित येते. यासाठी जास्त वेळ लागेल की कमी ते मन, हृदय आणि शरीराची तयारी असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून असते. आणि म्हणून आवश्यक तो धीर व्यक्तीकडे नसेल तर, आरंभीच्या अडचणीमुळेच व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल अशी शक्यता असते. एकाग्र होणे, शक्यतो हृदयकेंद्रावर एकाग्र होणे आणि श्रीमाताजींनी अस्तित्वाचा स्वीकार करावा, म्हणून श्रीमाताजींच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तीद्वारे चेतनेमध्ये परिवर्तन घडून येणे, याव्यतिरिक्त या योगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. व्यक्ती मस्तककेंद्रावर किंवा भ्रूमध्यामध्येही एकाग्रता करू शकते परंतु बऱ्याच जणांसाठी येथील खुलेपण अधिक अवघड असते. जेव्हा मन निश्चल होते आणि जेव्हा एकाग्रता दृढ होते आणि जेव्हा अभीप्सा उत्कट होते, तेव्हा तेथे अनुभूतीचा प्रारंभ होतो. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम शीघ्र गतीने प्राप्त होण्याची शक्यता अधिक. इतर बाबींसाठी व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क आणि श्रीमाताजींच्या शक्तीप्रत व त्यांच्या उपस्थितीप्रत ग्रहणशीलता प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 107)
- भारत – एक दर्शन ३२ - March 24, 2024
- चिरंतन हिंदुधर्म (भाग ०२) - March 22, 2024
- चिरंतन हिंदुधर्म (भाग ०१) - March 21, 2024