Tag Archive for: तत्त्वज्ञान

ईश्वरी कृपा – २२

एके काळी माणसाची आध्यात्मिक अभीप्सा सगळ्या लौकिक गोष्टींपासून अलिप्त होत, जीवनापासून पलायन करत, नेमकेपणाने सांगायचे तर लढाई टाळत, संघर्षाच्या अतीत होत, साऱ्या प्रयत्नांपासून स्वतःची सुटका करून घेत, शांत, निष्क्रिय शांतिकडे वळलेली होती; या आध्यात्मिक शांतिमध्ये, संघर्ष, प्रयत्न, सर्व प्रकारच्या ताणतणावांची समाप्ती होत असेच; पण त्याबरोबरच सर्व त-हेच्या दुःखभोगांचीदेखील समाप्ती होत असे आणि यालाच आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाची खरी आणि एकमेव अभिव्यक्ती मानले जात असे. यालाच ईश्वरी कृपा, ईश्वरी साहाय्य आणि ईश्वरी मध्यस्थी असे मानले जात असे.

आणि अगदी आत्तादेखील, यातनामय, तणावपूर्ण, अतितणावपूर्ण अशा या काळामध्ये, या सार्वभौम शांतिचे सर्वांकडून सर्वोत्तम व सर्वाधिक स्वागत केले जाते. हे सांत्वन लोकांना हवे असते आणि ते त्याची आशा बाळगून असतात. अजूनदेखील अनेकांसाठी हे ईश्वरी मध्यस्थीचे, ईश्वरी कृपेचे खरे लक्षण आहे.

खरे तर, व्यक्ती कोणताही साक्षात्कार करून घेऊ इच्छित असली तरी, तिने हिच परिपूर्ण व अक्षय शांती प्रस्थापित करून सुरुवात केली पाहिजे; या शांतिच्या आधारावरच व्यक्तिने कर्म केले पाहिजे; व्यक्ती अनन्य, वैयक्तिक आणि अहंभावात्मक मुक्तिचे स्वप्न पाहत असेल तर गोष्ट वेगळी, अन्यथा व्यक्ती तेवढ्यावरच थांबू शकत नाही. ईश्वरी कृपेचा अजूनही एक वेगळा पैलू आहे, प्रगतिचा हा पैलू जो सर्व अडथळ्यांवर विजय मिळवेल, हा पैलू जो मानवाला एका नवीन साक्षात्काराच्या दिशेने प्रेरित करेल, हा पैलू जो एका नवीनच जगताची द्वारे खुली करेल आणि या दिव्य साक्षात्काराचा लाभ केवळ थोड्या निवडक लोकांसाठीच शक्य होईल असे नाही तर, त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या उदाहरणाने, त्यांच्या शक्तिमुळे उर्वरित मानवजातिलादेखील नवीन आणि अधिक चांगली परिस्थिती प्राप्त होईल. त्यामुळे, ज्या मार्गांच्या शक्यता आधीच दिसलेल्या होत्या असे भविष्यकालीन साक्षात्काराप्रत जाणारे मार्ग खुले होतील. ज्या व्यक्तींनी जाणिवपूर्वकतेने किंवा अजाणतेपणाने या नवीन शक्तींप्रत स्वतःला खुले केले असेल, अशा मानवांची एक संपूर्ण फळीच अधिक उच्च, अधिक सुसंवादी, अधिक परिपूर्ण अशा जीवनामध्ये उन्नत केली जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 298)

ईश्वरी कृपा – १९

तुम्हाला जे ध्येय प्राप्त करून घ्यायचे आहे त्या दिशेने जाण्यास तुम्हाला प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे ‘कृपा’. तुमच्या मनाद्वारे तिचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका, त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही, कारण ती अशी एक महान गोष्ट आहे की, मानवी शब्द किंवा भावना यांद्वारे तिचे स्पष्टीकरण करता येत नाही. ‘ईश्वरी कृपे’मुळे जीवनात सारे काही सुरळीत होते असे लोकांना वाटते. पण हे खरे नाही…

जेव्हा कृपा कार्य करते तेव्हा तिचे परिणाम सुखद असतील किंवा नसतील देखील – ती कोणतीही मानवी मूल्य विचारात घेत नाही, सामान्य आणि वरवरच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, कधीकधी ती आपत्तीदेखील ठरू शकते. पण ते नेहमीच त्या व्यक्तिसाठी सर्वोत्तम असेच असते. अत्यंत त्वरेने प्रगती घडावी म्हणून ईश्वराने केलेला तो आघात असतो. ‘ईश्वरी कृपा’ ही साक्षात्काराच्या दिशेने तुम्हाला अगदी वेगाने वाटचाल करायला प्रवृत्त करते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 97)

ईश्वरी कृपा – १७

प्रश्न : तुम्ही असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो”, पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते…

श्रीमाताजी : हो अगदी पूर्णपणे, ‘ईश्वरी कृपा’ कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते जसे वितळून जाईल, तसे होते.

…तुमच्याकडे जर पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे काहीतरी खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते. एक अगदी मर्यादित असे छोटेसे उदाहरण देता येईल की, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजून येतील. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तिने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तिच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तिने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतिवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तिच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणी दगावत नाही. येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तिचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

…मी आत्ता म्हणाले त्याप्रमाणे, पुरेशी प्रामाणिक अभीप्सा किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना हा तो उपाय होय. मी “किंवा’’ असे म्हटले आहे, परंतु मला “किंवा” असे अभिप्रेत नाही. …दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. कर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी फार मोठी विनम्रता आणि प्रचंड इच्छाशक्ती हवी.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

ईश्वरी कृपा – १६

भविष्यामध्ये जो मार्ग उलगडत जाणार आहे, त्या मार्गाला बदलू शकण्यास; पुरेशी प्रामाणिक अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना या दोन गोष्टी सक्षम नसतात, असे कोण म्हणेल बरे?

ह्याचाच अर्थ असा की, सर्व काही शक्य आहे.

व्यक्तीकडे पुरेशी अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना मात्र हवी. मानवी प्रकृतिला ती देणगी देण्यात आलेली आहे. ईश्वरी कृपेद्वारे मानवी प्रकृतिला देण्यात आलेल्या बहुमूल्य देणग्यांपैकी ही एक देणगी आहे; मात्र, तिचा उपयोग कसा करायचा हे व्यक्तीला माहीत नसते.

म्हणजे असे म्हणता येईल की, दैववादाच्या आडव्या रेषा असल्या तरीदेखील ह्या आडव्या रेषा ओलांडून पलीकडे कसे जायचे आणि चेतनेच्या सर्वोच्च बिंदुपर्यंत कसे जाऊन पोहोचायचे हे ज्या व्यक्तीला माहीत आहे अशी व्यक्ती गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते; वरकरणी, ज्या गोष्टी अगदी पूर्णत: पूर्वनिर्धारित असल्यासारख्या दिसतात त्या गोष्टींमध्येदेखील अशी व्यक्ती परिवर्तन घडवू शकते…

– श्रीमाताजी
(CWM 05 : 88)

ईश्वरी कृपा – १५

व्यक्ती अज्ञानामध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तिच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आम्ही ज्याला नियती म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या उर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा, आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तिची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो. पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनियोजित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ईश्वरी कृपेचा, कर्मशक्तिपेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ईश्वरी शक्तिच्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतिच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. आणि इथेच, भूतकालीन प्रकृतिच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतिची गती रोखण्यासाठी आणि प्रगतिची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तिंच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतःहून विरोधी शक्तिंची बाजू घेतात आणि आध्यात्मिक सिद्धिंपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 509-510)

ईश्वरी कृपा – १२

आत्यंतिक जडभौतिक चेतनेला, आत्यंतिक जडभौतिक मनाला चाबकाने फटकारल्यावरच काम करण्याची, प्रयत्न करण्याची आणि प्रगत होण्याची सवय झालेली असते; अन्यथा ते तमस असते. आणि जेव्हा कधी मन कल्पना करते, तेव्हा ते नेहमी अडीअडचणींची, अडथळ्यांची व विरोधाचीच कल्पना करते आणि त्यामुळे गती मोठ्या प्रमाणात मंदावते. सर्व अपयशांच्या पाठीमागे ‘यश’ असते; सर्व वेदना, दुःखभोग, विरोधाभास या साऱ्यांच्या पाठीमागे ‘आनंद’ असतो; सर्व अडीअडचणींच्या पाठीमागे ‘ईश्वरी कृपा’ असते, हे पटवून देण्यासाठी अत्यंत सघन, अत्यंत स्पर्श्य आणि बरेचदा पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 02)

ईश्वरी कृपा – ०३

“एखादी व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, तिला जर ईश्वरी कृपा सर्वत्र दिसू लागली तर, अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्व-शक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे, जीवन जगू लागेल. आणि असे जीवन जगणे हाच ईश्वरी कार्यातील सर्वोत्तम शक्य असा सहयोग ठरेल.”

(श्रीमाताजींचे वरील वचन त्यांनी स्वत: वाचून दाखविले आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण केले. ते असे -)

यातील पहिली अवस्था प्रत्यक्षात उतरविणे हे तितकेसे सोपे नाही. जीवनात जाणिवपूर्वक विकास, नित्य निरीक्षण आणि सतत आलेले अनुभव यांचा तो परिणाम असतो.

मी हे तुम्हाला या आधीही अनेक वेळा सांगितले आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितिमध्ये असता आणि काही विशिष्ट घटना घडतात, तेव्हा या घटना तुमच्या इच्छाआकांक्षांच्या किंवा तुम्हाला जे सर्वात चांगले आहे असे वाटत असते, त्याच्या बरेचदा विरोधात जाणाऱ्या असतात आणि मग बरेचदा तुम्हाला या साऱ्याचे वाईट वाटते आणि तुम्ही स्वतःच्याच मनाशी म्हणता, “जर ते तसे झाले असते तर किती बरे झाले असते, ते जर असे झाले असते तर किंवा ते जर तसे झाले असते तर…” अगदी लहानसहान आणि मोठ्या गोष्टींबाबतही असेच चाललेले असते. आणि मग वर्षांमागून वर्ष निघून जातात, घटना उलगडत जातात, तुमची प्रगती होत राहते, तुम्ही अधिक जागरूक होता, तुम्हाला गोष्टींचे आकलन अधिक चांगल्या रितीने होऊ लागते आणि मग जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते – सुरुवातीला तुम्हाला अचंबा वाटतो आणि नंतर त्याकडे तुम्ही हसत हसत पाहता – तेव्हा जी परिस्थिती तुम्हाला अगदी अनर्थकारक किंवा प्रतिकूल वाटली होती आज तीच परिस्थिती तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम गोष्ट ठरलेली असते; तुमची प्रगती होण्यासाठी जे घडून येणे आवश्यक होते आणि शक्य होते तेच घडून आलेले असते. आणि तुम्ही थोडे जरी समजूतदार असाल तर तुम्ही स्वतःलाच सांगता, “खरोखर, ‘ईश्वरी कृपा’ अगाध आहे.”

तर यासारख्या गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात तेव्हा तुम्हाला जाणवू लागते की, बाह्यरूपे फसवी असली आणि माणसाचा आंधळेपणा असला तरीदेखील, ‘ईश्वरी कृपा’ मात्र सर्वत्र कार्यरत असते, आणि त्यामुळे जग त्या क्षणाला ज्या अवस्थेत असते त्या परिस्थितिमध्ये जे सर्वोत्तम घडणे शक्य असते तेच त्या प्रत्येक क्षणी घडून येते. आपली दृष्टी मर्यादित असल्यामुळे किंबहुना, आपल्या पसंती-नापसंतीने आपण अंध झालेलो असल्याने, गोष्टी अशा अशा असतात, हे आपल्याला उमगत नाही.

व्यक्ती जेव्हा या गोष्टींकडे पाहू लागते तेव्हा ती एका अवर्णनीय अशा आश्चर्यकारक स्थितीमध्ये प्रवेश करते. कारण या बाह्य रूपांपाठीमागे असणाऱ्या अनंत, अद्भुत, सर्वशक्तिमान अशा ईश्वरी कृपेची तिला जाणीव होऊ लागते – ही ‘ईश्वरी कृपा’ सारे काही जाणते, ती साऱ्या गोष्टींचे संघटन करते, त्यांची व्यवस्था लावते आणि आपल्याला आवडो वा न आवडो, आपल्याला ती ज्ञात असो वा नसो, तरीसुद्धा ती आपल्याला परमश्रेष्ठ अशा ध्येयाकडे, ईश्वराशी ऐक्य या ध्येयाकडे, ईश्वराबद्दलची जाणीव आणि त्याच्याशी ऐक्य या ध्येयाकडे घेऊन जात असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 255-256)

ईश्वरी कृपा – ०२

‘ईश्वरी कृपे’वरील तुमचा विश्वास आणि श्रद्धा कितीही अगाध असली; प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणाला, जीवनातील प्रत्येक अवस्थेत ‘ईश्वरी कृपा’च कार्यरत आहे, हे पाहण्याची तुमची क्षमता कितीही महान असली तरी, तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची अद्भुत विशालता, त्या कार्यपूर्तीमधील बारकावा, त्यातील अचूकता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. जगातील परिस्थिती विचारात घेता, ईश्वरी साक्षात्काराप्रत चाललेली वाटचाल ही अधिक वेगवान, अधिक परिपूर्ण, शक्य तेवढी अधिक समग्र आणि सुसंवादी व्हावी या दृष्टीने, ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते, सर्व गोष्टींच्या पाठीमागे तीच कशी असते, सर्व गोष्टी ती कशा सुसंघटित करते, त्यांचे संयोजन कसे करते, हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही.

मात्र ज्या क्षणी तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या संपर्कात येता, तत्क्षणी अवकाशातील एकेक बिंदू, आणि काळातील प्रत्येक क्षण, तुम्हाला त्या ‘ईश्वरी कृपे’चे निरंतर चालणारे कार्य, ‘ईश्वरी कृपे’ची सातत्यपूर्ण मध्यस्थी (Intervention) नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो.

आणि एकदा का तुम्हाला त्याचे दर्शन झाले की, मग तुमच्या लक्षात येते की, तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला कधीही भीती, अस्वस्थता, पश्चात्ताप किंवा संकोच वाटता कामा नये, किंवा अगदी दुःखभोगही जाणवता कामा नयेत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, जर तिला ‘ईश्वरी कृपा’ सर्वत्र दिसू लागली की, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे जीवन जगू लागेल.

आणि असे जीवन जगणे हाच ‘ईश्वरी कार्या’तील सर्वोत्तम शक्य असा सहयोग असेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 250)

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. तुम्ही जेव्हा अगदी लहान असता तेव्हा तुमच्या सभोवार जे असते ते तुम्हाला अगदी सहज-स्वाभाविक असे वाटत असते कारण तुम्ही त्यामध्येच जन्माला आलेले असता आणि तुम्हाला त्याची सवय झालेली असते. परंतु कालांतराने, तुमच्यामध्ये आध्यात्मिक अभीप्सा जागृत होते, तेव्हा ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच वातावरणात तुम्हाला पूर्णतया अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागते. कारण उदाहरणच घ्यायचे झाले तर, ज्या लोकांनी तुमचे संगोपन केलेले असते त्यांच्यामध्ये तुमच्यासारखी अभीप्सा नसते किंवा तुमच्यामध्ये ज्या कल्पना विकसित होत असतात, त्याच्याशी पूर्णत: विरोधी अशा त्यांच्या कल्पना असतात. अशावेळी “बघा, माझे कुटुंब हे असे आहे, आता मी तरी काय करू?…” वगैरे गोष्टी सांगत बसण्यापेक्षा तुम्ही शोधार्थ बाहेर पडू शकता. (अगदी प्रवासालाच निघाले पाहिजे असे नाही.) ज्यांना तुमच्याविषयी आत्मीयता वाटते अशा जीवांच्या शोधात, ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखीच अभीप्सा आहे, अशा व्यक्तींच्या शोधार्थ तुम्ही बाहेर पडू शकता. तुमच्याप्रमाणेच कशाच्या तरी प्राप्तीची आस असणाऱ्या व्यक्तींशी तुमची गाठ पडावी अशी तुमची जर प्रामाणिक असेल तर, तशा व्यक्ती तुम्हाला या ना त्या प्रकारे भेटण्याचे प्रसंग तुमच्या जीवनात नेहमीच येतात, कधीकधी अशी परिस्थिती अगदी अवचितपणे जुळून येते. आणि तुमच्या मानसिक स्थितीशी अगदी मिळतीजुळती मानसिकता असणाऱ्या अशा एक वा अधिक व्यक्तींशी जेव्हा तुमची गाठभेट होते, तेव्हा अगदी सहजस्वाभाविकपणे तुमच्यामध्ये जवळीक, आत्मीयता, मैत्री यांचे अनुबंध निर्माण होतात. आणि तुमच्या आपापसांत एक प्रकारचे बंधुत्वाचे नाते तयार होते, त्याला एक ‘खरेखुरे कुटुंब’ असे म्हणता येईल. तुम्ही एकत्र असता कारण तुम्ही एकमेकांच्या जवळचे असता. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्यामध्ये समान अभीप्सा असते. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्या जीवनात तुम्ही समान ध्येय प्राप्त करून घेऊ इच्छित असता. तुमच्या परस्परांमध्ये एक प्रकारचा आंतरिक सुसंवाद असतो आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला सहजपणे त्याचे आकलन होते, चर्चा करत बसण्याची गरज भासत नाही. हेच असते खरेखुरे कुटुंब, अभीप्सा बाळगणारे आणि आध्यात्मिकतेकडे वळलेले खरेखुरे कुटुंब!

– श्रीमाताजी
(CWM 04 : 258-259)

मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांना आध्यात्मिक जीवनात काही किंमत नाही – किंबहुना ते प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; कारण मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच काय पण, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर उभ्या करणे हा असतो; आणि या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णतया एकात्म पावलेली असते. तोपर्यंत व्यक्तीमध्ये सर्वांबाबत एक स्थिर सद्भावना असली पाहिजे, परंतु प्राणिक प्रकारच्या नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही कारण ते नातेसंबंध व्यक्तीची चेतना प्राणिक स्तरावरच ठेवतात आणि चेतनेला उच्च स्तराप्रत उन्नत होण्यास प्रतिबंध करतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)