Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – ३०

 

व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त होतात अशा उच्चतर आध्यात्मिक चेतनेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ‘कर्मा’च्या परिणामांचे बंधन शिल्लक असते. शांतीबाबत सांगायचे तर, ‘ईश्वरा’वर पूर्ण भरवसा आणि ‘ईश्वरी संकल्पा’प्रत समर्पण यातून ती प्राप्त होऊ शकते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 520)

विचार शलाका – २५

(‘पूर्णयोग’ साध्य करायचा असेल तर व्यक्तीने कोणती गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, ती गोष्ट श्रीमाताजी येथे सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीची ईश्वरविषयक जी काही संकल्पना असते, ती म्हणजेच केवळ ईश्वर नाही, तर इतरांच्या त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनांनुसार देखील ईश्वर असू शकतो, आणि कोणाच्याच संकल्पनेत बसू शकणार नाही असाही तो असू शकतो, हे व्यक्तीने समजून घेतले पाहिजे असे श्रीमाताजी सांगत आहेत. त्या पुढे म्हणतात..)

सहजस्फूर्तपणे किंवा ईश्वराबाबत पुसटशीही जाणीव नसताना देखील, लोक त्यांच्या त्यांच्या संकल्पनेला साजेसे ‘ईश्वरा’ने असावे असा आग्रह धरतात. विचार न करताच अगदी उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला सांगतात, “हा ईश्वर आहे, हा ईश्वर नाही!’ वास्तविक, ईश्वराबद्दल ते असे कितीसे जाणत असतात?

… “दिव्यत्व म्हणजे काय?” असे तुम्ही त्यांना विचारले तर मात्र उत्तर देणे त्यांना कठीण जाते, त्यांना काहीच माहीत नसते. …एखाद्या व्यक्तीला जाण जेवढी कमी, तेवढी ती व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी अधिक मतं बनविते, हे निखालस सत्य आहे. आणि जेवढी एखाद्या व्यक्तीला जाण अधिक, तेवढी ती मतप्रदर्शन कमी करते. आणि पुढे पुढे तर एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्ती निरीक्षण करू लागते पण कोणतेही मत बनविणे तिला अशक्य होऊन बसते. व्यक्ती गोष्टी पाहू शकते, त्या जशा आहेत अगदी तशा त्या पाहू शकते, त्यांच्यातील परस्परसंबंध ती पाहू शकते, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून त्या गोष्टी ती पाहू शकते, त्या सद्यस्थितीत जिथे आहेत आणि जिथे त्या असायला पाहिजेत यातील फरक व्यक्तीला उमगतो. – या दोहोंमधील ही तफावत ही जगातील एक फार मोठी अव्यवस्था आहे हे सुद्धा अशा व्यक्तीला दिसते – पण ती व्यक्ती त्यावर टिप्पणी करत नाही, ती फक्त निरीक्षण करते.

आणि एक क्षण असा येतो की जेव्हा, “हा ईश्वर आहे आणि तो ईश्वर नाही” असे म्हणणे देखील त्या व्यक्तीला अवघड जाते. कारण, खरे सांगायचे तर, एक काळ असा येतो की, तिच्या दृष्टीला संपूर्ण विश्वच अशा समग्रपणे, सर्वंकष रीतीने दिसू लागते की तिला हे कळून चुकते की, येथे कशालाही धक्का न पोहोचू देता, येथील एकही गोष्ट या विश्वापासून वेगळी काढता येणे अशक्य आहे.

आणि अजून एकदोन पावले पुढे गेल्यावर व्यक्तीला निश्चितपणे असे कळते की, ‘ईश्वर-विरोधी’ वाटल्यामुळे आपल्याला ज्याचा धक्का बसला होता, ती गोष्ट केवळ तिच्या योग्य जागी नाही इतकेच. प्रत्येक गोष्ट अगदी तिच्या अचूक जागीच असली पाहिजे. तसेच, या आविष्कृत झालेल्या विश्वामध्ये सातत्याने नवनवीन तत्त्वांची, घटकांची भर घातली जात असते, त्या घटकांच्या सुसंवादी प्रगतिशील अशा व्यवस्थेमध्ये जेणेकरून तिचा प्रवेश होणे शक्य होईल, इतपत ती गोष्ट लवचिक, घडणसुलभ (plastic) देखील असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 01-02)

विचार शलाका – २१

आपण असे म्हणू शकतो की, मनुष्य हा त्याच्या प्रकृतीच्या अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचा सर्वशक्तिशाली स्वामी आहे. पण ते तो विसरला आहे.

सर्वसामर्थ्यवान अशी ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे पण त्याचे त्याला विस्मरण झाले आहे…

उत्क्रांतीच्या वळणावर, माणसाने त्याची सर्वशक्तिमानता विसरणेच आवश्यक होते, कारण या सर्वशक्तिमानतेमुळे त्याची छाती गर्व आणि अभिमान याने फुलली होती आणि तो पूर्णत: विकृत बनला होता. म्हणून त्यासाठी इतर कितीतरी गोष्टी त्याच्यापेक्षा अधिक बलवान आणि शक्तिशाली आहेत याची त्याला जाणीव करून देणे भागच होते; पण मूलत: ते तसे नव्हते. ती प्रगतीच्या वळणाची आवश्यकता होती इतकेच!

मनुष्य हा संभाव्यतेच्या दृष्टीने देव आहे. मात्र तो स्वत:ला प्रत्यक्षातच देव समजू लागला होता. पण एखाद्या किड्यामुंगीपेक्षा आपण अधिक सरस नाही हे त्याने शिकण्याची गरज होती. आणि त्यामुळे जीवनाने त्याला इतके आणि अशा तऱ्हेने पिळवटून काढले की, जेणेकरून त्याला ते उमगावे… अगदीच काहीनाही तर, त्याला निदान त्या गोष्टीची थोडी जाणीव तरी व्हावी. माणूस जेव्हा अगदी योग्य दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला लगेचच समजून येते की, संभाव्यतेच्या दृष्टीने तो देवच आहे. मात्र त्याने तसे बनले पाहिजे, म्हणजे, जे जे तसे (दैवी) नाही त्यावर त्याने मात केली पाहिजे.

देवांबरोबरचे हे नाते खूपच स्वारस्यपूर्ण असते… दिव्य जिवांच्या शक्तिमानतेमुळे, त्यांच्या सौंदर्यामुळे, दिव्य जिवांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या सिद्धींमुळे जोवर मनुष्य स्तंभित होत असतो, जोवर तो त्यांच्या स्तुतीमध्ये हरवून जात असतो, तोवर तो त्यांचा गुलाम असतो. पण ते दिव्य जीव म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची विविध रूपं असल्याचे जेव्हा त्याला उमगते आणि तो स्वत:सुद्धा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचेच आणखी एक वेगळे रूप आहे, हे त्याला जाणवते – जे रूप त्याने बनले मात्र पाहिजे – तेव्हा मग, दिव्य जीव आणि मनुष्य यांच्यातील नाते बदलते. तेव्हा तो त्यांचा गुलाम राहात नाही. – तो मग त्यांचा गुलाम असत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 38-39)

विचार शलाका – १९

व्यक्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलेली असते, हेच त्याच्या पार्थिव अस्तित्वाचे औचित्य आहे.

अन्यथा या प्रयोजनाविना त्याचे पार्थिव जीवन म्हणजे एक राक्षसीपणा ठरला असता.

‘ईश्वरा’चा पुनर्शोध घेणे आणि स्वत:च ‘तो’ बनणे, ‘त्या’चे आविष्करण करणे, बाह्य जीवनात सुद्धा ‘त्या’चा अनुभव घेणे हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन (जीवनात) नसते, तर हे पार्थिव जीवन म्हणजे एक भयंकर, अघोरी अशी बाब ठरली असती.

साहजिकच आहे, लोक जेवढे जास्त जाणीवशून्य असतात तेवढीच त्यांना ही गोष्ट कळण्याची शक्यता कमी असते. कारण ते वस्तुनिष्ठपणे पाहात नाहीत, स्वत:च्या जीवनसरणीविषयी जागरुक नसतानाही, किंवा त्रयस्थ होऊन स्वत:चा वस्तुनिष्ठपणे विचार न करता ते केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे जगत राहतात. आणि मग जसजशी जाणीव, चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे त्यांना कळू लागते की हे जीवन – जसे ते आत्ता आहे – तसे जीवन हा किती भयप्रद नरक आहे.

आणि जीवन त्याला ज्या दिशेने घेऊन जात असते त्याविषयी जेव्हा तो सचेत (conscious) होतो, तेव्हाच तो जीवनाचा स्वीकार करू शकतो, आणि त्याचे आकलन करून घेऊ शकतो. केवळ जीवनाच्या या प्रयोजनामुळेच जीवन स्वीकारार्ह होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 119)

विचार शलाका – १३

योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून घेतले पाहिजे की, सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसांची नियती ही व्यामिश्र (complex) असते, कधी कधी विसंगतही वाटावी इतकी ती टोकाची असते. ह्या व्यामिश्रतेमुळेच आपणाला ती अनपेक्षित, अनिश्चित, आणि परिणामतः असंभाव्य आहे असे भासत नाही का?

हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, ….स्वत:च्या सर्वोच्च चेतनेमध्ये स्वत:ला कायम राखणे आणि अशा प्रकारे, स्वतःच्या सर्वोच्च नियतीला कृती व जीवनाच्या इतर भागांवर प्रभुत्व गाजविण्यास अनुमती देणे, यातच जीवनाची कला सामावलेली आहे. तेव्हा चूक होण्याची यत्किंचितही आशंका न बाळगता व्यक्ती असे म्हणू शकते की, कायम चेतनेच्या सर्वोच्च शिखरस्थानी राहा म्हणजे तुमच्या बाबतीत सर्वोत्तम तेच घडेल. पण ते सर्वोच्च शिखर गाठणे इतके सोपे नसते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 77-78)

विचार शलाका – १२

लोकांची मनं, चारित्र्य व अभिरुची उच्च पातळीवर नेणे, स्वभावाचा प्राचीन उमदेपणा परत प्राप्त करून घेणे, सामर्थ्यशाली असे ‘आर्य’ चारित्र्य आणि उच्च कोटीचा ‘आर्य’ दृष्टिकोन, पार्थिव जीवन सुंदर व अद्भुतरम्य बनवणारी समज यांचे पुनरुज्जीवन करणे आणि अशी नेत्रदीपक अभीप्सा, आध्यात्मिक अनुभव, साक्षात्कार की ज्यामुळे आपण या भूतलावरील सर्व मानवसमूहांमध्ये अधिक विशाल-हृदयी, सखोल विचारांचे गणले गेलो, आणि सर्वाधिक सखोल सूक्ष्मतेने जीवनाची ज्ञानोपासना करणारे गणले गेलो, त्या साऱ्याचे पुनरुज्जीवन करणे हे आता आपल्यापुढील तातडीचे व महत्त्वाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 246)

विचार शलाका – १०

स्वत:च्या अहंकारामध्ये जो जगतो, स्वत:च्या अहंकारासाठी जो जगतो, स्वत:चा अहंकार सुखावेल या आशेने जो जगतो तो मूर्ख असतो. तुम्ही जोपर्यंत अहंकाराच्या वर उठत नाही, जेथे अहंकाराची आवश्यकताच उरत नाही, अशा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेप्रत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही; तोपर्यंत ध्येय प्राप्त होईल अशी आशाच तुम्ही बाळगू शकत नाही.

एके काळी व्यक्तिगत चेतनेच्या घडणीसाठी अहंकार अनिवार्य आहे असे वाटत होते पण अहंकारासोबतच सर्व अडथळे, दुःखभोग, अडचणी यांचाही जन्म झाला की ज्या गोष्टी आज आपल्याला विरोधी शक्ती आणि अदिव्य शक्ती वाटतात. पण आंतरिक शुद्धी व अहंकार-मुक्ती यांसाठी अशा विरोधी शक्ती देखील आवश्यक होत्या. अहंकार हा एकाच वेळी त्या विरोधी शक्तींच्या कृतीचा परिणाम आणि त्यांच्या दीर्घकाळ टिकून राहण्याचे कारणदेखील असतो. जेव्हा अहंकार नाहीसा होईल, त्याच्याबरोबरच विरोधी शक्तीदेखील नाहीशा होतील. कारण त्यांना या जगात अस्तित्वात राहण्याचे काही कारणच उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 218)

विचार शलाका – ०३

सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही.

आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच दुःखभोगाचे खरेखुरे रूपांतरण झालेले असेल, आणि येथे एक नवजीवन, नवनिर्माण व नव-प्रचिती असेल. हा आनंद सर्वप्रथम चेतनेमध्येच स्थापित झाला पाहिजे. तसे झाले म्हणजे मगच भौतिकाचे रूपांतरण होईल, तत्पूर्वी नाही.

खरे तर, ‘विरोधी'(शक्ती) सोबतच दुःखभोग या जगात आले. आणि असा आनंदच केवळ त्या दुःखभोगांना पराभूत करू शकतो, त्या दुःखभोगांचा अंतिमतः निर्णायक पराभव करू शकेल असे अन्य कोणीही नाही.

‘दिव्यानंदा’नेच निर्मिती केली आहे आणि पूर्णतेस नेणाराही ‘दिव्यानंद’च असेल.

हे मात्र नीट लक्षात ठेवा की, सामान्यतः लोक ज्याला आनंद म्हणतात, त्या आनंदाविषयी मी हे बोलत नाहीये. तो आनंद म्हणजे खऱ्याखुऱ्या आनंदाचे व्यंगचित्रही शोभणार नाही. मला वाटते, इंद्रियसुख, आत्मभानशून्यता आणि बेपर्वाई यांपासून मिळणारा आनंद हा व्यक्तीला मार्गच्युत करणारा राक्षसी आविष्कार असतो.

मी ज्या आनंदाविषयी बोलते आहे, तो आनंद म्हणजे परिपूर्ण शांती, छायाविरहित प्रकाश, सुसंवाद, संपूर्ण व सर्वांगीण सौंदर्य, अनिरुद्ध सामर्थ्य होय. तो असा आनंद आहे की, जो अर्करूपाने, ‘संकल्प’रूपाने आणि त्याच्या ‘जाणिवे’ने, स्वत:च एक ईश्वरी ‘अस्तित्व’ आहे!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396-397)

विचार शलाका – ०२

दुःखभोग हे प्रथमतः अज्ञानामुळे येतात आणि दुसरे कारण म्हणजे, व्यक्तिरूप चेतनचे ‘दिव्य चेतना’ व ‘दिव्य अस्तित्व’ यांपासून विलगीकरण झालेले असल्यामुळे ते येतात.

जेव्हा ही विलगता नाहीशी होते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विभक्त अशा छोट्याशा ‘स्व’मध्ये न जगता संपूर्णतया ‘दिव्यत्वा’मध्ये जगू लागते तेव्हाच केवळ दुःखभोग पूर्णत: नाहीसे होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 527)

सद्भावना – २७

एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले.

त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा हा एक विधायक मार्ग आहे.”

मला हे फार रोचक वाटले. (हे पत्र काही वर्षांपूर्वी, किमान एक वर्षभर तरी आधी लिहिलेले होते, आणि पवित्रने मला सांगितले की, ते इतर फाईलींमध्ये गहाळ झाले होते, त्यांना ते सापडलेच नव्हते.) आणि ते पत्र जणू मला सांगत होते, “बघ, तू हे आधीच सांगून ठेवले आहेस.” कारण ‘सद्भावना’ म्हणजे सुसंवाद (अर्थात मनोवैज्ञानिक स्तरावरील) होय, सारे काही चांगले व्हावे अशी मानसिक स्तरावरील ती इच्छा असते. मला हे मोठे रोचक वाटले.

पण ते पत्र परत सापडले हे बरे झाले; सद्भावना हे प्रत्येकाच्याच आवाक्यात येऊ शकेल असे एक रूप आहे, जे कोणालाही उमजू शकते. तुमच्याकडून कोणत्याही असाधारण गोष्टींची अपेक्षा केली जात नाही, तर फक्त सद्भावना असावी, एवढीच माफक अपेक्षा केली जाते. मला हे पत्र जेव्हा परत सापडले तेव्हा मी हसले आणि मला ते गमतीशीर वाटले आणि मी म्हणाले, “असेच विधान कदाचित मी प्रसन्नतेबद्दल देखील केले असेल.” मी असे म्हटलेले असेल की, ”प्रसन्न राहा आणि बघा, तुम्हाला सर्वत्र प्रसन्नताच दिसून येईल.” बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. अशा वेळी मला नेहमीच शोभादर्शक यंत्राची (कॅलिडोस्कोप) आठवण येते; ज्यामध्ये काहीतरी निराळेच अभिव्यक्त करण्यासाठी रंगांची अशी एक रचना असते की, ज्या क्षणी ती गोष्ट अभिव्यक्त होते त्याच क्षणी…ती बदलते, नाहीशी होते, साधीसोपी होऊन जाते आणि अंतिमतः ती सर्वांच्या आवाक्यात येते.

पण एक गोष्ट आहे : पृथ्वीवर सध्या एक ‘भयंकर’ संघर्ष चालू आहे, परंतु त्याच बरोबर एक अद्भुत दिव्य कृपाही आहे, जी नेहमीच साहाय्य करत असते, ती नेहमीच अधिक चांगल्यासाठी धडपडत असते आणि दबाव टाकत असते, “या, प्रसन्न राहा, आणि सद्भावना बाळगा, या, समाधानयुक्त आंतरिक सुसंवाद, आशा, श्रद्धा बाळगा. विघटनाची स्पंदने – म्हणजेच ऱ्हासकारक, पतित करणारी, आणि विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारी स्पंदने स्वीकारू नका.”

– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Vol – 08, May 3, 1967)