Tag Archive for: चैत्य पुरुष

साधना, योग आणि रूपांतरण – ८७

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांच्यामधील अडथळा भेदला गेला की काय होते याचा काहीसा विचार आपण कालच्या भागात केला.)

कोणत्या न् कोणत्या पद्धतीने एकदा का तो अडथळा मोडून पडला की मग तुम्हाला असे आढळू लागते की, योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया आणि गतिविधी या गोष्टी तुमच्या बाह्य मनाला जितक्या कठीण किंवा अशक्यप्राय वाटत होत्या तेवढ्या त्या कठीण नाहीत. त्या तुमच्या आवाक्यातील आहेत. तुमच्या आंतरतम चैत्य पुरुषामध्ये अगोदरपासूनच एक योगी आणि एक भक्त अस्तित्वात आहे आणि तो जर पूर्णपणे उदयाला आला आणि त्याने पुढाकार घेतला तर, तुमच्या बाह्य जीवनाला आध्यात्मिक वळण लागणे हे पूर्वनियोजित आणि अपरिहार्य आहे.

प्रारंभापासूनच जे साधक यशस्वी होतात त्यांच्याबाबतीत योगमय आणि आध्यात्मिक अशा सखोल आंतरिक जीवनाची घडण आधीपासूनच झालेली असते. एवढेच की, त्यांच्या विचारी मनाला आणि कनिष्ठ प्राणिक भागांना शिक्षण आणि गतकालीन कृतींमुळे बलशाली बाह्य वळण दिले गेलेले असते आणि त्यामुळे त्यांचे आंतरिक जीवन पडद्याआड गेलेले असते. मनाला लागलेल्या बाह्यवर्ती वळणामध्ये सुधारणा घडविणे आणि तो पडदा भेदणे यासाठीच त्या साधकाला परिश्रमपूर्वक योगसाधना करण्याची आवश्यकता असते.

एकदा हा आंतरिक पुरुष प्रभावीपणे आविष्कृत झाला, भले मग तो अंतराभिमुख जाण्याने असेल किंवा बाह्याभिमुख येण्याने असेल, त्याचा दबाव पुन्हा प्रस्थापित होणार आणि मार्ग मोकळा होऊन तो त्याचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करणार हे निश्चित! आत्ता जे घडते आहे ते, येथून पुढे मोठ्या प्रमाणावर जे घडणार आहे त्याची नांदी आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218-219)

साधना, योग आणि रूपांतरण – ८६

(रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, तर ते केवळ पडद्याआडून, अंतरंगामधून आलेल्या प्रेरणांचे अनुसरण करत असते. तुमच्यामधील आंतरिक चैत्य पुरुष हा भक्त आहे, तो आनंदाचा आणि (ईश्वराच्या) सायुज्याचा शोध घेत आहे. बाह्य प्रकृती जशी आहे तशीच तिला सोडून दिली तर ती जे कधीच करू शकली नसती ते परिपूर्णतेने करणे तिला, तो अडथळा मोडून पडल्यावर आणि अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर शक्य होते. कारण ज्या क्षणी अंतरात्मा प्रभावीपणे अग्रस्थानी येतो किंवा तो जेव्हा चेतना स्वतःमध्ये सबळपणे ओढून घेतो तेव्हापासून शांती, आनंद, मुक्तता, विशालता, प्रकाशाप्रति उन्मुखता, उच्चतर ज्ञान या गोष्टी स्वाभाविक, सहजस्फूर्त होण्यास सुरुवात होते; बऱ्याचदा त्यांचा उदय अगदी त्वरेने होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218)

साधना, योग आणि रूपांतरण – ३२

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वांप्रत आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे या दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय हे चैत्य पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते.

पहिली उन्मुखता
‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून आणि त्याने चैत्य पुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो त्या मार्गात अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे हे देखील आवश्यक असते.

दुसरी उन्मुखता
चेतनेची एकाग्रता आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर केल्याने तसेच ईश्वरी ‘शांती’, (आधी केवळ शांती, किंवा शांती व सामर्थ्य एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे जिवामध्ये अवतरण घडून यावे म्हणून त्यांना आवाहन केल्याने आणि त्याविषयी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा तर काही जणांना प्रथम ‘आनंदा’चा किंवा काही जणांना अचानकपणे होणाऱ्या ‘ज्ञानवर्षावा’चा अनुभव येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१

साधक : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जोपर्यंत तुमची चेतना उन्नत होत नाही तोपर्यंत पूर्णयोगामध्ये एकाग्रतेचे मुख्य केंद्र हे हृदय-केंद्रच असले पाहिजे.” परंतु प्रत्येकाची चेतना ही वेगवेगळ्या स्तरावर असते ना?

श्रीमाताजी : हो, ती व्यक्तिगणिक भिन्नभिन्न स्तरावर असते. मात्र असे नेहमीच सांगितले जाते की, “येथे हृदय-केंद्रावर, छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र करा. कारण याच ठिकाणी सर्वाधिक सहजतेने तुम्हाला अंतरात्म्याचा किंवा चैत्य अस्तित्वाचा (psychic) शोध लागू शकतो. येथेच तुम्ही अंतरात्म्याच्या संपर्कात येऊ शकता.” आणि म्हणूनच तसे म्हटले आहे.

साधक : चेतना उन्नत झाली तर व्यक्तीला ती कोठे आढळते ?

श्रीमाताजी : मस्तकाच्या वर, मनाच्या वर. श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, व्यक्ती जोपर्यंत मनाच्या पलीकडे, आणि सर्वस्वी उच्चतर प्रांतांमध्ये गेलेली नसते, तसेच जोपर्यंत ती मानवी चेतनेमध्ये, म्हणजे मानसिक, प्राणिक, शारीरिक चेतनेमध्येच असते तोपर्यंत व्यक्तीने अंतरात्म्याचाच शोध घेण्याच्या दृष्टीने एकाग्रता केली पाहिजे. फक्त जर तुम्ही मानवी चेतनेपासून उन्नत झाला असाल आणि मनाच्या वर असणाऱ्या, खूप वर असणाऱ्या उच्चतर प्रांतांमध्ये जाणीवपूर्वकपणे प्रवेश केला असेल तर तुम्हाला अंतरात्म्यावर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकता नसते; कारण तुम्हाला त्याचा शोध स्वाभाविकपणेच लागेल.

परंतु मानसिक चेतनेच्या वर उन्नत होणे, म्हणजे उच्चतर तार्किक, कल्पनाशील मनामध्ये उन्नत होणे असे नाही तर, सर्व मानसिक गतिविधींच्या अतीत होणे, (आणि) ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याची सुरुवात करायची झाली तर, मन हे पूर्णपणे शांत, स्थिर असले पाहिजे, अन्यथा व्यक्ती तसे करू शकणार नाही. मन जेव्हा संपूर्ण शांतीमध्ये, परिपूर्ण अचंचलतेमध्ये प्रवेश करते, तसेच जेव्हा मन हे, वर जे काही आहे त्याचे प्रतिबिंब दाखविणारे जणू एक आरसाच बनते; तेव्हा व्यक्ती (मनाच्या वर) उन्नत होऊ शकते. परंतु जोपर्यंत मनाची चंचलता चालू असते तोपर्यंत मनाच्या अतीत जाण्याची अजिबातच आशा नसते.

पण भावभावना आणि अंतरात्मिक गोष्टी यांची तुम्ही गल्लत करता कामा नये. या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना नेहमी असे वाटते की त्यांच्यामध्ये भावभावना जागृत होत आहेत म्हणजे ते आता अंतरात्मिक प्रांतामध्ये प्रवेश करत आहेत. परंतु भावभावनांचा अंतरात्मिक गोष्टींशी काही संबंध नसतो, भावभावना या निव्वळ प्राणिक असतात. तुम्हाला म्हणायचे असेल तर फार फार तर असे म्हणता येईल की, भावभावना हा प्राणशक्तीचा सर्वात सूक्ष्म भाग असतो; पण तरीसुद्धा त्या प्राणिकच असतात. तुम्ही भावभावनांच्या माध्यमातून अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. तर अत्यंत उत्कट अभीप्सेद्वारे आणि ‘स्व’पासून अलिप्त झाल्यावर तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता.

– श्रीमाताजी (CWM 07 : 248-249)

साधना, योग आणि रूपांतरण – २७

साधक : मानसिक उपासनेचे प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणती साधना करायची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट असते. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय (surface) असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुह्य (hidden) चेतना असते आणि तिच्यामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते; आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे रूपांतर घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

खऱ्या चेतनेची या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त आणखी दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये असते. (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे (Psychic being) ज्ञान होते. अनावरण (unveiled) झालेला हा चैत्य पुरुष मग अग्रभागी येण्यास सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’ च्या दिशेने, ‘ईश्वरा’ च्या दिशेने वळवू लागतो, आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला आवाहन करतो. त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, ऊर्ध्वस्थित राहून आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आर्जव करतो.

‘ईश्वरा’प्रति स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि आंतरिक उन्मुखतेची व हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. आणि एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने शांत अशा मानसिक चेतनेस ऊर्ध्वाभिमुख करत मनाच्या वर असणाऱ्या सर्व गोष्टींप्रत खुले केले पाहिजे.

कालांतराने (आपली) चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः ती चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘परमानंदा’ च्या संपर्कात येऊ लागते आणि त्यामध्ये प्रवेश करू लागते आणि त्यांच्यासारखीच होऊन जाते. आणि तिला प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास येऊ लागते.

अचंचलतेसाठी आणि ऊर्ध्वस्थित ‘आत्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारासाठी मनामध्ये अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये जीवन जगण्यासाठी तेथे चढून जाण्याऐवजी ती फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’ चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; तर काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. पण हृदयकेंद्रापासून सुरुवात करणे अधिक इष्ट असते. अर्थात, जर व्यक्तीला तसे करणे शक्य असेल तर!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०७)

(काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला पाहिजे आणि त्याला पूरक ठरतील अशा इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत… हे श्रीअरविंद एका साधकाला सांगत आहेत. ते सांगत असताना ‘साधना म्हणजे काय’ हे त्यांनी स्पष्ट केले आहे.)

साधना हीच मुख्य गोष्ट असली पाहिजे आणि साधना म्हणजे प्रकृतीचे शुद्धीकरण, आत्म-निवेदन (Consecration), चैत्य पुरुष, अंतर्मन, प्राण यांचे खुले होणे (Opening), आणि ‘ईश्वरा’शी संपर्क आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव, सर्व गोष्टींमध्ये ‘ईश्वरा’ची प्रचिती; साधना म्हणजे समर्पण, भक्ती, चेतनेचे विश्वचेतनेमध्ये विस्तृतीकरण, सर्वांभूती एकाच ‘आत्म्या’च्या अस्तित्वाचा अनुभव, प्रकृतीचे आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतर.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 78)

अमृतवर्षा २६

(आपल्या व्यक्तित्वामधील विभिन्न घटकांमध्ये ऐक्य, एकजिनसीपणा कसा निर्माण करावा, हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

संकल्प दृढ ठेवा. आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे योग्य वळण लावले जाते त्याप्रमाणे, तुमच्यातील अडेलतट्टू, हट्टी भागांना वळण लावा. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष (Psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. या केंद्राभोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व भागांचे, तुमच्या अस्तित्वातील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा प्राप्त झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतिमत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित!

एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन राहायचे आहे”, आणि तो जर “हो” म्हणाला असेल, तर हे अखिल जग सुद्धा तुम्हाला त्यापासून रोखू शकणार नाही. अंतरात्मा (Inner being) जेव्हा स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते.

बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके टणक आणि जाड असते की, त्यामुळे त्यांना त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची यत्किंचितही जाणीव नसते. (परंतु) एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, “मी इथे आहे आणि मी तुझाच आहे” तर जणू एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ होत जाते. जोपर्यंत अंतरंग व बहिरंग भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकत्व पावत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 07]

विचारशलाका ४१

 

भाग – ०३

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

तुम्हाला नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले असतात पण आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी (Psychic being) क्षणभरापुरता आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेला मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करायचे असते – हा असा एक क्षण असतो की, जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करायची हे दाखवून देतो….

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच चेतना उदयास येते. व्यक्तीच्या ऐकण्यात काहीतरी येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेल्या प्रयासाची उत्कटता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी ‘खरी चेतना’ काय याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो. (क्रमश: …)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

विचारशलाका ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी (साधनेमध्ये) सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. कारण हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात. चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते.

‘ईश्वरा’ने आमच्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आमच्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो, त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते.

मस्तकामध्ये (आणि नंतर मस्तकाच्या वर) चेतनेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. (प्रथम फक्त शांती, किंवा शक्ती व शांती एकत्रितपणे) अशा ईश्वरी ‘शांती’चे, आणि ईश्वरी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे व्यक्तित्वामध्ये अवतरण घडून यावे यासाठी आवाहन केल्याने, आणि तशी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता (opening) घडून येते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 327-328]