Tag Archive for: अभीप्सा

प्रश्न : चैत्य व्यक्तिमत्त्वाचा विकास व्यक्तीने कसा घडवावा?

श्रीमाताजी : अनेकानेक जीवनानुभवामधून चैत्य व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते, ते वृद्धिंगत होत असते, विकसित होत असते आणि अंतत: ते एक परिपूर्ण, जागृत आणि मुक्त अस्तित्व बनते. असंख्य जन्मांमधून ही विकासाची प्रक्रिया अथकपणे चालू असते आणि जर व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर, ती याचमुळे असत नाही कारण की, व्यक्ती स्वत:च्या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत नसते. – चैत्य अस्तित्वाविषयी जागृत असणे हा अटळ असा आरंभबिंदू असतो.

अंतरंगात वळणे आणि एकाग्र होणे यातून व्यक्तीने स्वत:च्या चैत्य अस्तित्वाच्या जागृत संपर्कात यावयास हवे. चैत्य अस्तित्वाचा प्रभाव नेहमीच बाह्यवर्ती अस्तित्वावर पडत असतो, परंतु हा प्रभाव बहुधा नेहमीच गूढ असतो, तो दिसत नाही, त्याचे आकलन होत नाही, जाणवत नाही; जाणवलाच तर तो अगदी खरोखर अपवादात्मक परिस्थितीत जाणवतो.

हा संपर्क आणि त्याचे साहाय्य बळकट करण्यासाठी आणि शक्य झाल्यास, जागृत चैत्य व्यक्तिमत्त्वाच्या विकसनासाठी, व्यक्तीने एकाग्रतेच्या वेळी लक्ष तिकडे वळविले पाहिजे, त्याला जाणून घेण्याची, संवेद्य करण्याची आस बाळगली पाहिजे; त्याचा प्रभाव स्वीकारण्यासाठी स्वत:ला खुले केले पाहिजे आणि जेव्हा कधी त्याच्यापासून कोणते संकेत, संदेश मिळतील तेव्हा प्रत्येक वेळी ते संदेश अगदी काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.

थोर अभीप्सा बाळगत जीवन जगणे, आंतरिकरित्या शांत बनण्याची, आणि शक्य तितक्या वेळी नेहमीच तसे शांत राहण्याची काळजी घेणे, व्यक्ती ज्या कोणत्या कृती करते त्या प्रत्येक कृतीबाबत परिपूर्ण प्रामाणिकता जोपासणे – या चैत्य पुरुषाच्या अभिवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 221-222)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)

सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि केवळ ईश्वराभिमुख होण्याची इच्छा – ही चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची सर्वाधिक उत्तम साधने आहेत, हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा; शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाशी संपर्क साधायचा आहे अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा विचार करा. जरी तुम्हाला त्यात ताबडतोब यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 363)

आत्मज्ञान आणि आत्मनियंत्रण यासाठी जी साधना करणे आवश्यक आहे; त्या साधनेचा आरंभबिंदू म्हणजे ‘चैत्य साधना’ होय. आपल्यामधील आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च सत्याचे स्थान असलेल्या मनोवैज्ञानिक केंद्राला आपण ‘चैत्य’ असे म्हणतो. ते केंद्र, या सर्वोच्च सत्याला जाणून घेऊ शकते आणि त्या सत्याला ते गतिशील, कृतिप्रवण करू शकते. त्यामुळे या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते अस्तित्व हे जोवर आपल्यासाठी एक जिवंत असे वास्तव बनत नाही आणि आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत, त्या अस्तित्वावर लक्ष एकाग्र करणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्या आकलनासाठी आणि अंतिमत: त्याच्याशी तादात्म्य प्राप्त करून घेण्यासाठी अनेकविध पद्धती विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती मनोवैज्ञानिक आहेत, काही धार्मिक आहेत तर काही अगदी यांत्रिक आहेत.

प्रत्यक्षात, प्रत्येक व्यक्तीने तिला सर्वाधिक योग्य असणारी पद्धत शोधून काढावयास हवी आणि जर व्यक्तीकडे अगदी तळमळीची, अविचल अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) असेल, सातत्यपूर्ण व गतिशील इच्छा असेल तर, व्यक्तीला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मदत म्हणून कोणता ना कोणता तरी मार्ग निश्चितच सापडतो – बाह्यत: पाहता वाचन व अभ्यास, आणि आंतरिकदृष्टीने पाहता एकाग्रता, ध्यान, साक्षात्कार आणि अनुभूती या त्या पद्धती आहेत.

परंतु एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे; ती म्हणजे शोध घेण्याची आणि साक्षात्कार करून घेण्याची अनिवार इच्छा. त्याचा शोध आणि साक्षात्कार हा आपल्या जीवाचा अगदी मूलभूत असा एकाग्रतेचा विषय असला पाहिजे, हा असा किमती मोती आहे की जो, आपण कोणतीही किंमत देऊन प्राप्त करून घ्यायलाच हवा. तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही कोणत्याही उद्योगात, कामात व्यग्र असलात तरीही, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्याशी एकत्व पावणे ही गोष्ट तुमच्यामध्ये नेहमीच जिवंत असली पाहिजे; तुम्हाला जे काही जाणवते, तुम्ही जो काही विचार करता, तुम्ही ज्या कोणत्या कृती करता त्या पाठीमागे कायम तोच ध्यास असला पाहिजे.

आंतरिक शोधाच्या ह्या मोहिमेला पूरक म्हणून, मनाच्या विकसनाकडे दुर्लक्ष न करणे हेसुद्धा हिताचे ठरते. कारण हे मनरूपी साधन खूप साहाय्यकारी ठरू शकते किंवा तितकेच ते मार्गातील मोठी धोंडदेखील ठरू शकते. स्वाभाविक स्थितीत असताना मानवी मनाची दृष्टी नेहमीच संकुचित असते, त्याची समज मर्यादित असते, ते त्याच्या संकल्पनांच्या बाबतीत खूप हटवादी असते आणि म्हणून त्याला व्यापक करण्यासाठी, त्याला अधिक लवचीक आणि अधिक सखोल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे शक्य तेवढे सर्व दृष्टिकोन विचारात घेतले गेले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 4-5)

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्याच्या’ महान अशा तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला सत्यसूर्याप्रत, परमप्रकाशाप्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. त्यांनी असे सांगितले आहे की : ”तुमची हृदये करूणेने भरून जाऊ देत, आणि त्यानंतर, दुःखपीडेने छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा, प्रशिक्षक व्हा, आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप पेटवा.”

– श्रीमाताजी
(CWM 02 : 29)

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या (Aspiration) आधारे शोधावयास हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट बनते. ती मांडणी कमी अधिक तंतोतंत असू शकते.

…ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते…

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:चा आक्रमिला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 407)