Tag Archive for: अभीप्सा

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – १४४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा दाटून आलेला आढळला. आणि आजवर मी यासाठीच आसुसलेलो होतो असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मला अन्य कोणतीच इच्छा नाही, असे मला वाटले. मला ‘अहैतुकी भक्ती’ लाभावी, असे आपण वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस असे म्हणत की, ‘भक्तीची इच्छा ही काही इच्छा-वासना म्हणता यायची नाही.’ त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की, मीही अशाच भक्तीची इच्छा बाळगत आहे म्हणजेच, मी काही कोणताही व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे भक्तीसाठी मी केलेली मागणी रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ‘ईश्वरा’विषयी इच्छा किंवा ‘ईश्वरा’विषयी भक्ती ही एक अशी इच्छा असते की, जी इच्छा व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते. त्या इच्छेच्या अगदी गाभ्यात शिरून जर आपण पाहिले तर असे आढळते की, ती इच्छा नसते तर ती ‘अभीप्सा’ असते, ती ‘आत्म्याची निकड’ असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि त्यामुळेच तिची गणना इच्छा-वासना यांच्यामध्ये होत नाही.

साधक : श्रीमाताजींविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध उपासना, आराधना, कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ‘ईश्वरा’विषयी प्रेम बाळगणे याला म्हणतात ‘शुद्ध भक्ती’.

साधक : ती आपल्यामध्ये कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476)

साधना, योग आणि रूपांतरण – ११५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला अजून जरी सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका. कोणतेही काम करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे आणि त्याला ते अर्पण करणे आणि ते संपल्यावर (‘ईश्वरा’प्रति) कृतज्ञता व्यक्त करणे हे (तुमच्या) सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा काम करत असताना मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवावे.

…लोकं काम करताना जेव्हा सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते स्मरण त्यांच्या मनाच्या मागे असते. किंवा त्यांच्यामध्ये एकाच वेळी दोन विचारांची किंवा दोन चेतनांची एक क्षमता हळूहळू निर्माण झालेली असते. त्यापैकी एक चेतना पृष्ठभागी राहून कर्म करत असते आणि दुसरी चेतना साक्षी असते व स्मरण ठेवत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग राहिलेला होता. अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआप घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्यासरळ सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही.

कर्म करण्यासाठी महत्तर ‘शक्ती’ला आवाहन करत, अभीप्सा बाळगणे आणि आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की, जिच्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही लोकांना जरी त्यासाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयत्नांनीच करण्यापेक्षा, (आपल्या) अंतःस्थित असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’द्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे हे साधनेचे महान रहस्य आहे.

मनाद्वारे केलेले प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या मनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तसे करणे अध्यात्मामध्ये निपुण असणाऱ्यांना शक्य असते, पण इतरांना मात्र फार कष्टदायक ठरते.

…धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्येच आवश्यक असतात. बलवंतांसाठी सामर्थ्य हे ठीक आहे परंतु अभीप्सा आणि तिला ‘ईश्वरी कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे सर्वस्वी दंतकथा (myths) आहेत, असे नाही; तर या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 214-215)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

साधना, योग आणि रूपांतरण – ६३

(साधना, उपासना काहीच घडत नाहीये असे वाटावे) अशा प्रकारचे कालावधी नेहमीच असतात. तुम्ही अस्वस्थ होता कामा नये, अन्यथा ते कालावधी दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात आणि साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि कोणत्याही आवेशाविना स्थिरपणे अभीप्सा बाळगली पाहिजे. किंवा तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने जोर लावत असाल तर तोसुद्धा अविचल, स्थिर असला पाहिजे.

*

नेहमीच काही कालावधी असे असतात की, जेव्हा तुम्ही शांत, स्थिर राहून फक्त अभीप्साच बाळगू शकता. जेव्हा संपूर्ण अस्तित्व सज्ज झालेले असते आणि अंतरात्मा सातत्याने अग्रभागी आलेला असतो तेव्हाच फक्त प्रकाश आणि शक्तीची अव्याहत क्रिया शक्य असते.

*

चेतना झाकोळली गेली आहे (असे वाटण्याचे) असे कालावधी प्रत्येकाच्या बाबतीतच येत असतात. तसे असले तरी, तुम्ही साधना करत राहिले पाहिजे आणि तुम्ही ‘श्रीमाताजीं’कडे कडे वळलात आणि तुमच्या अभीप्सेमध्ये सातत्य ठेवलेत तर, असे कालावधी हळूहळू कमी होत जातील आणि मग तुमची चेतना ‘श्रीमाताजी’प्रति अधिकाधिक खुली होत जाईल.
अशा कालावधींमध्ये (निराशा, वैफल्य, निरसता इत्यादी) गोष्टींना तुमचा ताबा घेऊ देण्यास मुभा देऊ नका, त्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलग केले पाहिजे आणि त्या गोष्टी जणू काही परक्या आहेत आणि तुम्हाला त्यांना नकार द्यायचा आहे, असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 63)

साधना, योग आणि रूपांतरण – ४४

तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद दिलीत तर तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०

आपले (समग्र) अस्तित्व ‘श्रीमाताजीं’नी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

*

साधक : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे असते. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा अधिक कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे (हृदय-केंद्रावर) चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही तेथेच प्रथम चैत्य अस्तित्वाच्या (psychic) संपर्कात येता. परंतु जर का तुम्ही मस्तकामध्ये चित्त एकाग्र केलेत तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी (psychic being) एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, मस्तकाकडून हृदयाकडे जावे लागते.

तसेच तुम्ही तुमच्या ऊर्जा एकत्र करून (चित्ताची) एकाग्रता करणार असाल तर, त्या ऊर्जांचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक चांगले; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. मस्तकामधून उदित होणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 389)

साधना, योग आणि रूपांतरण – २९

‘ईश्वरा’विषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सतर्क व जीवित ठेवायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रतेची! ईश्वरी ‘संकल्प’ व ईश्वरी ‘प्रयोजन’ यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. इतरत्र दूरवर पसरलेले तुमच्या चेतनेचे सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि (हृदयामध्ये) आत बुडी मारा, आत खोल खोल जा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्रं आहेत. एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते भ्रूमध्यामध्ये! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात. रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व तळमळ, आच आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 01)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)