Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कधीतरी असे सुद्धा होते, म्हणजे असे की, समग्र अस्तित्व प्रगती करत असते, चढत्या वाढत्या संतुलनासहित ते प्रगती करत असते आणि लक्षणीय प्रगती देखील करून घेते; तुम्हाला वाटू लागते की, तुम्ही खूपच अनुकूल स्थितीत आहात, सारे काही चांगले चालू आहे, तुम्हाला खात्री असते आणि तुम्ही तुमच्या मार्गावर समृद्धपणे वाटचाल करत आहात हे तुम्ही पाहत असता… आणि अचानक ! अचानक आजारपण येते. तुम्हाला असे वाटते : हे असे कसे काय ? मी इतक्या चांगल्या अवस्थेत होतो आणि आता मी आजारी पडलो. हे काही योग्य नाही.

परंतु तुम्ही पूर्णपणे सजग नसल्यामुळे ते घडलेले असते. तुमच्याच मध्ये असा एक छोटासा भाग होता, ज्याला हालचाल करायची इच्छाच नव्हती. बहुधा तुमच्या प्राणामध्ये असे काहीतरी असते, किंवा कधीकधी ती एक मानसिक रचना असते, तिला त्याचे अनुसरण करण्याची तयारी नसते; तर कधीतरी तुमच्या शरीरातीलच असे काही असते, की जे अगदी जड असते किंवा ज्याची वाटचाल करण्याची यत्किंचितही इच्छा नसते, गोष्टी जशा आहेत तशाच नेहमी असाव्यात असे त्याला वाटत असते. ती गोष्ट तुम्हाला मागे खेचत असते, हेतूपूर्वक स्वतःला ती विलग करत असते.

आणि साहजिकपणे, ती गोष्ट अगदी छोटीशी जरी असली तरी, ती जीवामध्ये एवढे असंतुलन निर्माण करते की, त्यामुळे तुम्ही आजारी पडता. आणि तुम्ही स्वतःशीच म्हणता की, “खरोखर किती दयनीय अवस्था आहे ही, माझे इतके चांगले चालू होते, पण जे चालू आहे ते मात्र काही बरोबर नाही. खरंच देव दयाळू नाहीये. …मी इतकी छान प्रगती करत होतो, आजारपणापासून त्याने मला वाचवायला हवे होते.” हे असे आहे…
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

अजूनही काही प्रकारचे असमतोल असतात. (आता मी जे योगसाधना करतात किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत असते आणि त्यानुसार, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी बोलत आहे.) तुमच्या अंतरंगातील एखाद्या भागाला, मग तो मानसिक असेल, प्राणिक असेल किंवा शारीरिक सुद्धा असू शकेल, त्याला नीटसे काहीतरी उमगलेले असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभीप्सा असते, विशिष्ट दृष्टिकोन असतात. आणि तो भाग चांगल्या रीतीने शक्तिग्रहण करत असतो आणि चांगली प्रगती करत असतो. आणि असे काही भाग असतात की, जे अशी प्रगती करू शकत नाहीत, आणखीही असे काही भाग असतात की, ज्यांना हे काही नकोच असते (अर्थात हे खूपच वाईट आहे.) पण असेही काही भाग असतात, की ज्यांना इच्छा असते पण ते काही करू शकत नसतात, त्यांच्याकडे तशी क्षमता नसते, ते तयार नसतात.

म्हणजे, तुमच्यामध्ये असे काही असते की, जे ऊर्ध्वमुखी उन्नत होत असते आणि काही असेही असते की, जे जागचे हालत नाही. आणि तेच प्रचंड असमतोल निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याचे प्रतिबिंब कोणत्या ना कोणत्या आजारमध्ये पडते, कारण तुम्ही आंतरिकरित्या इतक्या तणावपूर्ण अवस्थेत असता – कोणीतरी अक्षम असते किंवा कोणीतरी अडून राहते, ते अजिबात हालचाल करत नाही आणि एखाद्या कोणालातरी मात्र वाटचाल करावयाची असते. आणि यातूनच एक अत्यंत भीतीदायक अस्वस्थता येते आणि त्याचा परिणाम हा बहुधा आजारपणात होतो.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

अजून काही आंतरिक संघर्षदेखील असतात. ती भांडणे असतात. तुमच्याच विविध भागांमध्ये परस्परांमध्ये आंतरिक संघर्ष असतो. समजा, एकाचवेळी तुमच्यातील एखाद्या भागाला विश्रांती आवश्यक असते आणि दुसऱ्या एखाद्या भागाला काम करावेसे वाटत असते अशावेळी, तुम्ही हे प्रकरण कसे हाताळणार? (आणि हे असे बरेचदा घडते) ते भांडायला सुरुवात करतात. एकाला जे हवे आहे ते तुम्ही केलेत, तर त्याला दुसरा विरोध करतो. आणि अशावेळी तुम्हाला त्यांच्यामध्ये सुसंवाद राखायचा झाला तर, तुम्हाला मध्यम मार्ग शोधून काढावा लागतो.

आणि कधीकधी तर असेही होते की, जर तुम्ही या शारीरिक गोष्टींमध्ये अजून प्राणिक आणि मानसिक गोष्टींची भर घातलीत, (मी कल्पना करत बसणाऱ्या मनाविषयी किंवा स्वतंत्र अशा प्राणाविषयी बोलत नाहीये. मी शरीराच्याच मानसिक आणि प्राणिक भागांविषयी बोलत आहे. कारण एक शारीरिक प्राण आणि शारीरिक मन देखील असते; आणि हे शारीरिक मन व शारीरिक प्राण हे सर्वात वाईट असतात, त्यांचे संघर्ष सदासर्वकाळ चालूच राहतात आणि त्यांना थांबविण्यामध्येच तुम्हाला खूप जास्त कष्ट पडतात – ते चालूच राहते, चालूच राहते.)

जर त्यांच्यामध्ये काही वादविवाद असतील, म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्ये जर काही संघर्ष असतील तर, तुमच्या स्वतःमध्येच एक रणक्षेत्र असते. आणि हे रणक्षेत्रच मग सर्व संभाव्य आजारांचे निमित्तकारण ठरते. ते खूप आक्रमकपणे मारामारी करतात. एकाला एक हवे असते, दुसऱ्याला ते नको असते, मग ते भांडणं करतात आणि तुमची अवस्था जणु काही एखाद्या आंतरिक वादळामध्ये सापडल्यासारखी होते. त्यातून तुम्हाला ताप येऊ शकतो किंवा मग तुम्हाला आतूनच थंडी वाजायला लागते आणि मग त्यावर तुमचे काहीच नियंत्रण राहत नाही.

शारीरिक आजारपणाची जी अनेकविध कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण कोणते असेल तर ते हे की, शरीर अस्वस्थ होऊ लागते, ते भयकंपित व्हायला लागते आणि मग ही भीती वाढत जाते, अधिकाधिक वाढत जाते आणि मग तुम्हाला असे वाटू लागते की, तुम्हाला कधीच परत समतोल प्रस्थापित करता येणार नाही, यामुळे तुमची फसवणूक होते. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून विसंवाद आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे, आणि तुमच्यामधीलच या लोकांचा एकमेकांशी ताळमेळ कसा घालायचा हे तुम्हाला कळले पाहिजे. हे सारे ‘कार्यप्रणालीतील असमतोल’ असतात.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी म्हणजे मग त्याने तंदुरुस्त होण्यासाठी, काय करायला हवे ते तुम्ही त्याला ताबडतोब सांगू शकाल. म्हणजे लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे, त्यांना समजावून सांगायचे. म्हणजे ते जेव्हा अहितकारक गोष्टींमध्ये गुंतू लागतात (हाच तो क्षण असतो जेव्हा त्यांना सांगितले गेले पाहिजे) तेव्हा तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे की, नाही, या पद्धतीने काम करता कामा नये, तर ते अमुक अशा पद्धतीने केले पाहिजे.

उदाहरणार्थ असे समजा की, तुमचे हृदय वेड्यासारखे धडधडायला लागले तर, तेव्हा तुम्ही त्याला शांत केले पाहिजे. त्याला सांगितले पाहिजे की, असे वागता कामा नये आणि त्याच वेळी (केवळ त्याच्या मदतीसाठी म्हणून) तुम्ही दीर्घ, तालबद्ध, नियमित असा श्वासोच्छ्वास करू लागाल, तर अशा वेळी तुमची फुफ्फुसे ही हृदयाची मार्गदर्शक होतील आणि योग्य रीतीने काम कसे करायचे असते, हे ती हृदयाला शिकवतील. अशी मी हजारो उदाहरणे तुम्हाला देऊ शकते. तर… जीवाच्या विविध भागांमध्ये असंतुलन असते, त्यांच्या कार्यामध्ये विसंवाद असतो, हे मी तुम्हाला आत्ता सांगितले.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

मी म्हटल्याप्रमाणे कारणे असंख्य असतात, आंतरिक कारणे तर असतातच, म्हणजे जी तुमची व्यक्तिगत असतात अशी कारणे असतातच आणि बाकीची बाह्यवर्ती कारणेही असतात, जी तुमच्यामध्ये बाहेरून येतात. म्हणजे आता दोन मुख्य प्रकार पडले.

आपण म्हणालो तसे, तुमच्यामध्ये मेंदू, फुफ्फुसे, हृदय, पोट, यकृत इ. इ. घटक असतात. जर प्रत्येक जण त्याचे त्याचे कर्तव्य आणि त्याचे कार्य सामान्य पद्धतीने करेल आणि दिलेल्या वेळी सर्व जण एकदिलाने एकत्रितपणे, योग्य प्रकारे चालतील; असे आपण गृहीत धरू की, ते परस्परांशी सुसंवादी आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांचे एकमेकांशी चांगले जुळते आणि जो तो आपापले काम करत आहे; अगदी प्रत्येक हालचाल योग्य वेळी, इतरांशी संवादी राहत, कोणी खूप लवकरही नाही किंवा उशीराही नाही, कोणी खूप वेगाने किंवा कोणी अगदीच सावकाश, असेही नाही, खरोखर, सारे काही सुरळीत चालू असेल तर, तुम्ही अगदी ठणठणीत असता. (हे लक्षात घ्या की, जर तुम्हाला त्या सगळ्याचा विचार करत बसावे लागले असते तर, ते किती गुंतागुंतीचे झाले असते आणि जर का ते तसे असते तर, ते सर्व काही नेहमीच योग्य प्रकारे झाले असते की नाही, याविषयी मला शंका आहे.)

आता असे समजा की, त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण, या ना त्या कारणाने, वाईट मनःस्थितीत असेल – म्हणजे तो आवश्यक तेवढ्या जोशाने काम करत नाही, एखाद्या नेमक्या क्षणीच तो संपावर जातो. तेव्हा तो एकटाच आजारी पडतो असे समजू नका, तर सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते आणि मग तुम्हाला अगदीच आजारी असल्याचे वाटायला लागते.

आणि जर का दुर्दैवाने, प्राणिक असंतुलनही असेल, म्हणजे, जसे की तुम्ही निराश असाल किंवा एखादी भावना खूप आक्रमक असेल, किंवा एखादा आवेग खूप तीव्र असेल किंवा तुमच्या प्राणाला बिनसवणारे असे दुसरे काही असेल, तर त्याची त्यामध्ये भरच पडते. आणि त्यात भरीस भर म्हणून, तुमचे विचार सैरभैर झाले असतील आणि तुम्ही नको त्या कल्पना करू लागलात, आणि मनामध्ये भीतीदायक गोष्टी आणि भयानक संकटांची कल्पना करू लागलात, तर मग मात्र तुम्ही नक्कीच पूर्णपणे आजारी पडता…. गोष्टी किती गुंतागुंतीच्या असतात, हे लक्षात आले ? एखादी बारकीशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने वागू लागली तर, आंतरिक संसर्गाने ती अधिक गंभीर गोष्टींकडे घेऊन जाणारी ठरते. म्हणून गोष्टी तत्काळ नियंत्रणात आणणे किती महत्त्वाचे असते, लक्षात आले ?
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

अगदी केवळ शरीराच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले तर, दोन प्रकारची असंतुलने आढळून येतात – कार्यात्मक असंतुलन (functional disequilibrium) आणि इंद्रियगत असंतुलन (organic disequilibrium). तुम्हाला या दोन्हीतील फरक माहीत आहे की नाही, ते मला माहीत नाही. परंतु तुम्हाला अवयव असतात आणि तुमच्या शरीराचे सगळे भाग देखील असतात उदा. नसा, स्नायू, हाडे आणि अशा इतर सगळ्या गोष्टी.

इंद्रियगत असंतुलन

आता, जर का एकादा अवयव स्वतःच असंतुलित असेल तर, ते झाले इंद्रियगत असंतुलन. तेव्हा मग तुम्हाला सांगण्यात येते की, हा अवयव आजारी आहे किंवा मग त्याची घडण नीट झालेली नाही किंवा अमुक एक अवयव सामान्य स्थितीत नाही किंवा त्याच्या बाबतीत एखादा अपघात झालेला आहे इ. इ. म्हणजे येथे एखादा अवयव आजारी असतो.

कार्यात्मक असंतुलन

परंतु कधीकधी अवयव सुस्थितीत असू शकतो, तुमचे सगळे अवयव अगदी जागच्या जागी सुस्थितीत असू शकतात पण तरीही, ते नीट काम करत नसतात, म्हणूनही आजारपण येऊ शकते. तिथे कार्यपद्धतीमध्ये संतुलनाचा अभाव असतो. तुमचे पोट व्यवस्थित असते, पण अचानक असे काहीतरी होते आणि ते नीट कार्य करत नाही; किंवा तुमचे शरीर पण अगदी उत्तम असू शकेल, पण त्याला असे काहीतरी होते आणि मग ते योग्य प्रकारे काम करत नाही. तेव्हा हे जे आजारपण असते ते, इंद्रियगत असंतुलनामुळे नसून, कार्यात्मक असंतुलनामुळे घडून आलेले असते. साधारणपणे कार्यात्मक असंतुलनातून उद्भवलेले असे जे आजार असतात, ते इतरांपेक्षा अधिक लवकर आणि सहजपणे बरे होतात. इतर आजार मात्र काहीसे अधिक गंभीर बनतात. कधीकधी तर ते फारच जास्त गंभीर बनतात. तेव्हा आता निरीक्षणासाठी आणि जाणून घेण्यासाठी ही दोन क्षेत्रं आहेतच, परंतु जर तुम्हाला तुमच्या शरीराचे थोडेसे जरी ज्ञान असेल आणि त्याच्या कार्याचे निरीक्षण करण्याची तुम्हाला जर सवय असेल तर, तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारचे असंतुलन घडून आले आहे हे तुम्हाला समजू शकते.

जेव्हा तुम्ही लहान असता आणि सामान्य जीवन जगत असता, तेव्हा बऱ्याचदा हे असंतुलन निव्वळ कार्यात्मक असते. ज्यांच्याबाबतीत काही अपघात घडून आलेला आहे किंवा जन्मापूर्वीच काही असंतुलन घडले आहे, अशी काही कारणे असणारे थोडेच जण असतात. अशा लोकांमध्ये असे काही असते की, जे बरे होण्यासाठी अधिक कठीण असते (ते बरे होण्यासारखेच नसतात, असे मात्र नाही कारण सैद्धान्तिक दृष्ट्या, बरे न होण्यासारखे असे काहीच नाही.) परंतु ते बरे करणे अधिक कठीण असते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

सर्व आजार हे संतुलनातील बिघाड दर्शवितात. याला कोणताही अपवाद नाही, पण या संतुलनातील बिघाडांचे अनेक प्रकार असतात. मी आत्ता फक्त शरीराबद्दलच बोलत आहे, मी प्राणाच्या नाडीगत आजारांबद्दल किंवा मानसिक आजारांबाबत बोलत नाहीये. ते आपण नंतर पाहू. आत्ता आपण फक्त या गरीबबिचाऱ्या लहानशा शरीराबद्दल बोलत आहोत. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व आजार, अगदी सर्व आजार, मग ते कोणतेही असू देत, मी त्यामध्ये अगदी अपघातसुद्धा समाविष्ट करेन, ह्या साऱ्या गोष्टी संतुलन बिघडल्यामुळे होतात.

म्हणजे असे की, तुमच्या शरीराचे सगळे अवयव, सगळे सदस्य आणि तुमच्या शरीराचे सर्व भाग हे एकमेकांशी सुसंवादी स्थितीत असतील तर, तुम्ही पूर्ण निरोगी स्थितीत असता. पण जर का कोठे अगदी थोडेसेही असंतुलन घडून आले तर, लगेच तुम्ही थोडेसे किंवा जास्त आजारी पडता, अगदी खूप जास्तसुद्धा आजारी पडता, अन्यथा मग अपघात तरी घडून येतो. जेव्हा जेव्हा आंतरिक असंतुलन असते, तेव्हा नेहमीच या गोष्टी घडून येतात.

पण तेव्हाही, तुम्ही शारीरिक संतुलनाला प्राणाच्या आणि मनाच्या संतुलनाची जोड दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या गोष्टी सुरक्षितपणे करता येणे शक्य व्हावे यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत कोणताही अपघात घडून येऊ नये म्हणून, तुमच्याकडे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक असे तिहेरी संतुलन असायलाच हवे; आणि ते संतुलन केवळ प्रत्येक भागातच असून उपयोगाचे नाही; तर पुन्हा ते तीनही भाग परस्परांशीही सुसंवादी असायला हवेत.

…इथेच या समस्येचे निराकरणही आहे. अशी असंख्य संयुगे (combinations) असतात आणि परिणामतः आजारपणाची कारणेही असंख्य असतात आणि अपघातांची कारणेही अगणित असतात. तरीही आपल्याला समजून घेणे सोपे व्हावे म्हणून, आपण त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

पहिली कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, सर्वत्र पूर्ण समता राखणे आणि अस्वस्थ चिंताजनक विचारांना किंवा निराशेला तुमच्यामध्ये प्रवेश न करू देणे. एन्फ्लुएंझाच्या या तीव्र हल्ल्यानंतर, अशक्तपणा येणे किंवा बरे होण्याच्या प्रगतीमध्ये चढउतार असणे हे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही काय केले पाहिजे, तर शांत आणि विश्वासाने राहिले पाहिजे, कोणतीही काळजी करता कामा नये किंवा अस्वस्थ होता कामा नये. अगदी पूर्णपणे शांत राहिले पाहिजे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्यास तयार असले पाहिजे. चिंता करण्यासारखे काही नाही; विश्रांती घ्या म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 587)

व्यक्ती निश्चितपणे आजारपणावर आतून कार्य करू शकते आणि तो आजार बरा करू शकते. फक्त एवढेच की, हे नेहमीच सोपे असते असे नाही. कारण जडभौतिकामध्ये खूप प्रतिरोध असतो, तो जडत्वाचा विरोध असतो. येथे अथक असे प्रयत्नसातत्य आवश्यक असते. प्रथमतः व्यक्तीला त्यात कदाचित सपशेल अपयश येईल किंवा आजाराची लक्षणे वाढतील; पण हळूहळू शरीरावरील किंवा एखाद्या विशिष्ट आजारावरील नियंत्रण दृढ होत जाईल. त्यातही, आजारपणाचा कधीतरी झालेला हल्ला असतो, तो आंतरिक साधनांनी बरा करणे तुलनेने अधिक सोपे असते; पण भविष्यातही त्या आजारापासून शरीर सुरक्षित ठेवणे हे अधिक अवघड असते.

दीर्घकालीन आजार असेल, तर तो बरा करण्यास अधिकच कठीण असतो, शरीराच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारींपेक्षा, असे जुनाट आजार शरीरातून पूर्णपणे नाहीसे होण्यास अधिक नाखूष असतात. जोवर शरीरावरील नियंत्रण हे सदोष असते, तोपर्यंत आंतरिक शक्तीच्या वापरामध्ये या सर्व व इतर अपूर्णता आणि अडचणी राहणारच. आंतरिक कार्याच्या आधारे, जरी तुम्ही आजारपण वाढू देण्यापासून रोखू शकलात, तरी पुष्कळ झाले; जोपर्यंत तुम्ही तो आजार पूर्ण बरा करण्याच्या क्षमतेचे होत नाही तोपर्यंत, ‘अभ्यासा’ने तुम्हाला ती आंतरिक शक्ती अधिक बळकट करत नेली पाहिजे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत ती आंतरिक शक्ती संपूर्णतया तिथे कार्यरत नसेल तोपर्यंत, भौतिक उपचारांची मदत घेणे सोडता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579-580)

श्रीअरविंद एका साधकाला पत्रात लिहितात की, शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला बरे व्हायचे असेल तर, त्यातील मुख्य अडथळा म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्राणिक हालचाली. तुमच्या स्वतःच्या कल्पना, दावे, अग्रक्रम यावर अहंयुक्त भर – तुमच्या स्वतःच्या नीतिपरायणतेबद्दलची तुमची प्रौढी आणि दुसऱ्या बाजूला इतरांचा दुष्टपणा, तक्रारी, भांडणे, वादविवाद, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांविषयीचा द्वेष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया – ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या यकृतावर, पोटावर व नसांवर परिणाम झाला आहे.

जर तुम्ही या साऱ्या गोष्टी सोडून द्याल आणि शांतपणे जगाल, इतरांबरोबर शांतिपूर्ण रीतीने जगाल, स्वतःविषयी आणि इतरांविषयी कमी विचार करत आणि ईश्वराचा जास्त विचार करत जगाल तर, गोष्टी अधिक सोप्या होतील आणि तुमची तब्येत सुधारण्यास मदत करतील. आजारपणाला सामोरे जाताना, मनाची शांतचित्तता देखील आवश्यक आहे. कारण मनाची चलबिचल शक्तीचे कार्य थांबविते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579)