Tag Archive for: व्यावहारिक जीवन

विकृती हा मानवी रोग आहे, विकृती प्राण्यांमध्ये क्वचितच आढळून येते आणि ती सुद्धा त्याच प्राण्यांमध्ये आढळते जे प्राणी माणसाच्या निकट आलेले असतात आणि त्यांना त्या माणसांच्या विकृतीचा संसर्ग झालेला असतो.

उत्तर आफ्रिकेमधील – अल्जेरियातील काही अधिकाऱ्यांची ही गोष्ट आहे. त्यांनी एक माकड दत्तक घेतले होते. ते माकड त्यांच्याबरोबर राहत असे. एके दिवशी रात्री जेवणाच्या वेळी त्या अधिकाऱ्यांच्या मनात एक विचित्र कल्पना आली आणि त्यांनी त्या माकडाला मद्य प्यायला दिले. इतर लोक पित आहेत असे सुरुवातीला त्या माकडाने पाहिले, त्याला ते काहीतरी चांगले असेल असे वाटले आणि मग त्याने आख्खा पेलाभर वाईन प्यायली. आणि नंतर ते आजारी पडले, ते इतके आजारी पडले की, ते टेबलाखाली वेदनेने गडबडा लोळू लागले. शारीरिक प्रकृती ही विकृत झालेली नसते तेव्हा, अल्कोहोलचा शरीरावर कसा त्वरित परिणाम होतो याचे उदाहरण माणसांनी लक्षात घेण्याजोगे आहे. ते माकड त्या विषामुळे जवळजवळ मृतवतच झाले होते पण नंतर त्याची प्रकृती सुधारली.

आणि ते बरे झाल्यामुळे, त्याला परत कालांतराने जेवणाच्या टेबलावर रात्रीच्या वेळी बसविण्यात आले आणि कोणीतरी त्याच्या समोर परत वाईनचा पेला ठेवला. त्याने तो इतक्या प्रचंड रागाने उचलला आणि ज्या माणसाने तो पेला देऊ केला होता त्या माणसाच्या डोक्यावर हाणला. यातून असे दिसून येते की, त्या माणसांपेक्षा ते माकड जास्त शहाणे होते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 101)

प्रश्न : तंबाखू आणि दारू स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती नष्ट का करतात?

श्रीमाताजी : का? कारण त्या गोष्टी तसे करतात. याला काही नैतिक कारण नाहीये. तर ती वस्तुस्थिती आहे. दारुमध्ये विष असते, तंबाखूमध्ये विष असते आणि हे विष पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना इजा पोहोचविते. अल्कोहोल शरीरातून कधीच बाहेर पडत नाही; ते मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये साठत राहते. आणि अशा रीतीने ते तेथे साठत राहिले की, मग मेंदूतील त्या पेशी कार्य करेनाशा होतात – काही जण तर यामुळे वेडेही होतात, (यालाच अतिसेवनामुळे होणारा भ्रम असे म्हणतात.) अतिप्रचंड प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ती, ज्या पद्धतीने मेंदूमध्ये साठून राहते त्याचा परिणाम वेड लागण्यात होतो. आणि हे इतके तीव्र रूप धारण करते की….

फ्रान्समध्ये असा एक प्रांत आहे, जिथे वाईन तयार केली जाते. या वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. मला वाटते चार किंवा पाच टक्के, अगदी कमी प्रमाण असते. आणि मग ही लोकं, स्वतःच ती वाईन बनवत असल्यामुळे, ते जणू काही पाणी प्यायल्यासारखी वाईन पितात. ते पद्धतशीरपणे तिचे सेवन करतात पण कालांतराने ते आजारी पडतात. त्यांना मेंदूचे आजार होतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत, त्यांचा मेंदू नीट काम करू शकत नसे.

आणि तंबाखू – निकोटिन हे तर अतिशयच खतरनाक असे विष आहे. पेशी नष्ट करून टाकणारे हे विष असते. मी म्हणाले तसे, हे मंद विष आहे कारण व्यक्तीला त्याचे सेवन केल्यावर लगेचच त्याची जाणीव होत नाही. अपवाद, व्यक्ती पहिल्या वेळी सिगारेट ओढते आणि आजारी पडते, त्याचा !

आणि त्यातूनच तुम्हाला समजायले हवे की, व्यक्तीने त्याचे सेवन करता कामा नये. माणसं इतकी मूर्ख असतात की, त्यांना वाटते की, ही दुर्बलता आहे आणि जोवर त्यांना त्या विषाची सवय होत नाही तोवर ते त्याचे सेवन करतच राहतात. आणि मग त्याचे शरीर हे प्रतिक्रिया देईनासे होते, ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच, स्वतःच्या नाश पावण्याला संमती देते : तुम्हाला त्या सेवनाचे शरीरावर काही परिणाम दिसेनासे होऊ लागलेले असतात. आणि ही गोष्ट शरीर तसेच नैतिकतेच्या बाबतीतही समानच आहे.

जेव्हा तुम्ही करू नये अशी एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला तुमचा चैत्य पुरुष अगदी क्षीण आवाजात का होईना सांगत असतो की, तुम्ही हे करता कामा नये आणि तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही करता, कालांतराने तो तुम्हाला काही सांगेनासा होतो आणि मग तुमच्या कोणत्याही वाईट कृत्यांना आतून कोणतीच प्रतिक्रिया मिळेनाशी होते कारण जेव्हा तो आवाज काही सांगत होता, तेव्हा तुम्हीच त्याचे म्हणणे ऐकणे नाकारलेले असते. आणि मग तेव्हा तुम्ही साहजिकपणेच, वाईटाकडून अधिक वाईटाकडे जाता आणि एका गर्ततेत जाऊन पडता. तंबाखूच्या बाबतीतही अगदी नेमके असेच आहे : पहिल्यांदा जेव्हा तिचे सेवन केले जाते तेव्हा शरीर जोरदार प्रतिक्रिया देते, ते उलटी करते आणि सांगू पाहते की, “काहीही झाले तरी मला हे अजिबात नकोय.” तुम्ही तुमच्या मानसिक आणि प्राणिक मूर्खपणाच्या जोरावर शरीराला तसे करण्यास भाग पाडता आणि मग ते शरीर प्रतिक्रिया देईनासे होते आणि त्याचे विघटन होत नाही तोपर्यंत ते स्वतःमध्ये हळूहळू विष भिनवू देते. त्याचे कार्य बिघडून जाते; त्याच्या नसांवर परिणाम होतो; त्या इच्छेचे संक्रमण करेनाशा होतात कारण त्यांच्यावर परिणाम झालेला असतो, त्यांच्यामध्ये विष भिनलेले असते. इच्छाशक्तीचे वहन करण्याची ताकदच त्यांच्यात शिल्लक उरलेली नसते. आणि सरतेशेवटी मग अशा माणसांचे हात थरथर कापायला लागतात, मेंदूचा ताबा सुटल्यासारख्या त्यांच्या हालचाली होतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 74-76)

प्रत्येक देशामध्ये असे काही समूह असतात की जे मद्याचा निषेध करतात किंवा पूर्ण वर्ण्य करतात. मदिरेला स्पर्शही करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यातील सदस्य करतात. आणि काही ठरावीक शहरांमध्ये त्यांच्या विक्रीला बंदी असते. पण इतर ठिकाणी, जिथे दारूचे सेवन आधी माहीत नव्हते, तिथेही आता त्याचा प्रभाव वाढत आहे.

उदाहरणार्थ, भारतामध्ये जिथे अनेक शतके दारूबंदीचे साम्राज्य होते, तिथे प्राचीन गोष्टींमध्ये असलेल्या राक्षसांपेक्षाही अधिक भयानक स्वरूपात तिचा शिरकाव झाला आहे. कारण ज्या भयानक राक्षसांविषयी ते बोलत ते राक्षस केवळ शरीरालाच इजा करणारे असत, तर दारूमध्ये मात्र विचार आणि चारित्र्य नष्ट करण्याची ताकद असते. त्यातील पहिली सुरुवात शरीरापासून होते. जे पालक खूप जास्त प्रमाणात तिचे सेवन करतात, त्यांच्या मुलांना त्रास होतो. ती माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करते आणि खरंतर जे मानवतेचे सेवक असायला हवेत त्यांना दारू तिचे गुलाम बनवून टाकते.

आपण प्रत्येकानेच खरंतर मानवतेचे सेवक असले पाहिजे. आणि जर का आपण आपल्या खाण्याने किंवा पिण्याने, आपली मनं व शरीरं कमकुवत करून टाकू, तर जे नोकर, नीटपणे काम करू शकत नाहीत अशा वाईट नोकरांमध्ये आपली गणना होईल.

शस्त्र तुटून गेल्यावर एखाद्या सैनिकाची स्थिती काय होईल ? जहाजाचे शीडच गमावल्यावर खलाशाची काय स्थिती होईल ? घोडा लुळापांगळा झाला तर घोडेस्वाराची स्थिती काय होईल? त्याप्रमाणेच, माणसाला प्राप्त झालेल्या सर्वात मौल्यवान अशा त्याच्या क्षमता त्याने गमावल्या तर माणूस काय करू शकेल ? एखाद्या चांगल्या प्राण्याइतकी सुद्धा त्याची किंमत उरणार नाही. कारण प्राणी निदान त्यांना घातक असणाऱ्या अन्नाचे किंवा द्रव्याचे सेवन तरी वर्ज्य करतात.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 208)

तीन गोष्टींपासून माणसाने स्वतःला जपले पाहिजे.

एक म्हणजे रोगाची सामूहिक सूचना. रोग हा निःसंशयपणे अस्तित्वात असणारी गोष्ट आहे, म्हणजे कार्यामध्ये विलंब करण्याचा, कार्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विरोधी शक्ती असतातच, ह्या अर्थाने म्हणावयाचे आहे.

बाह्यतः ते रोग काही कल्पनांवर आधारलेले असतात; रोगजंतुंविषयीच्या, जीवजंतुंविषयीच्या आणि तत्सम गोष्टींविषयीच्या ज्ञानावर ते आधारलेले असतात. (त्याला लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात.) पण रोगजंतुंमुळे रोग होतात असे म्हणणे म्हणजे गोष्टी उलट्यापालट्या करण्यासारखे आहे, खाली डोकं वर पाय करण्यासारखे आहे कारण हे रोगजंतू, जीवजंतू आणि तत्सम गोष्टी ह्या कारण नसून परिणाम असतात.

तीन गोष्टींच्या एकत्रिकरणाचा त्या परिणाम असतात.

दुरिच्छा, कमीअधिक प्रमाणातील पूर्णपणे वाईट अशी इच्छा; नियम व त्याचे परिणाम यांविषयीचे अज्ञान म्हणजे कारण व त्याचा परिणाम यांविषयीचे घोर अज्ञान; आणि अर्थातच, एक प्रकारचे जडत्व – या सगळ्याच गोष्टी जडत्वाचीच रूपं आहेत पण जडत्वाचे सर्वात मोठे रूप म्हणजे स्वीकारण्याची आणि प्रतिसाद देण्याची अक्षमता. या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून रोग निर्माण होतात आणि मग अंतिम परिणाम म्हणजे मृत्यु. म्हणजे तयार झालेल्या सुमेळाचे विघटन.

– श्रीमाताजी
(Conversation with a disciple : March 02, 1968)

अगदी भौतिक वातावरणामध्येदेखील, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, असंख्य छोटेछोटे जीव असतात, जे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुमची दृष्टी ही खूपच मर्यादित असते, पण ते मात्र तुमच्या वातावरणात इतस्ततः फिरत असतात. त्यातील काहीकाही चांगलेसुद्धा असतात, इतर दुष्ट असतात. सामान्यतः प्राणिक अस्तित्वाच्या विघटनामधून हे छोटे छोटे जीव तयार होतात – त्यांची पैदास होत राहते – आणि त्यांचा एक असुखद असा पुंजकाच तयार होतो. त्यातील काही जण काही चांगल्या गोष्टीही करतात.

या छोट्याछोट्या क्षुद्र जीवांचे गट असतात आणि मग त्यांच्यात एकमेकांमध्ये झगडे होतात. कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा ते शांततामय जीवन जगत नसतात, तर त्यांच्या परस्परांमध्ये मारामाऱ्या, लढाईझगडे, भांडणतंटे चालू असतात. ते एकमेकांना मारु पाहत असतात, विनाश घडवून आणू पहात असतात आणि हेच रोगजंतुंचे उगमस्थान असते. त्या शक्ती विघटनकारी असतात. आणि अशा त्या दुभंगलेल्या, छिन्नविछिन्न झालेल्या रूपातसुद्धा ते जिवंत राहतात आणि तेच सूक्ष्म जीवजंतु आणि रोगजंतुंचे मूळ असते. म्हणूनच बऱ्याचशा रोगजंतूंच्या मागे ही दुरिच्छा असते आणि त्यामुळे ते एवढे भयानक बनतात. आणि या रोगजंतुंचा दर्जा, त्यांच्या दुरिच्छेचे स्वरूप समजल्याशिवाय आणि त्यांच्यावर कार्य करण्याची क्षमता असल्याशिवाय, नव्याण्णव टक्के वेळा पूर्ण खात्रीशीर इलाज सापडणे शक्य नसते.

सूक्ष्म भौतिक विश्वात जिवंत असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचे एक अगदी जडभौतिक रूप म्हणजे हे रोगजंतू असतात. आणि ते तुमच्या अवतीभोवती वावरत असतात, तुमच्यामध्ये वावरत असतात, अनेक वर्षे ते तुम्हाला काहीही इजा पोहोचवीत नाहीत. नंतर कधीतरी अचानकपणे तुम्हाला ते आजारी पाडतात आणि इथेच दुसरे कारण महत्त्वाचे ठरते.

रोगजंतुंचे मूळ आणि त्यांना साहाय्य लाभते ते विसंवादामध्ये आणि विरोधी शक्तींविषयीची व्यक्तीची जी ग्रहणशीलता असते त्यामध्ये ! त्यासंबंधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

अशा उदाहरणात, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावयाचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असावयास हवी, म्हणजे ती प्राणामध्ये आध्यात्मिक योद्धा असावयास हवी. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी तेच बनावयास हवे आणि जेव्हा ते तसे बनतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित असतात.

पण तसे बनण्याची एक पूर्वअट म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रीतीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, त्यांच्याकडून तुमच्यावर आघात होण्याची शक्यता असतेच असते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

दुर्दैवाने, या जगामध्ये मोठ्या प्रमाणात दुरिच्छा सुद्धा आहे. आणि त्या विविध प्रकारच्या दुरिच्छांमध्ये, काही अज्ञान व मूर्खपणातून येणाऱ्या छोट्या छोट्या दुरिच्छा असतात; दुष्टपणातून येणाऱ्या काही वाईट दुरिच्छा असतात आणि अदैवी शक्तींचा परिणाम म्हणून उद्भवणाऱ्या अत्यंत भयावह अशा दुरिच्छासुद्धा असतात. तर, अशा सगळ्या दुरिच्छा वातावरणात असतात (मी हे तुम्हाला घाबरविण्यासाठी सांगत नाहीये. कारण व्यक्तीने कशालाच घाबरता कामा नये.)

आणि मग या गोष्टी तुमच्यावर हल्ला करतात, कधीकधी हेतुपुरस्सर, तर कधी अहेतुकपणे. अहेतुकपणे कशा? तर इतर व्यक्तींच्या माध्यमातून. ज्यांच्यावर हल्ला झालेला असतो, त्याविषयी त्यांना काहीच माहीत नसते आणि त्याविषयी काही कल्पनाही नसताना, त्या व्यक्ती तो संक्रमित करतात. खरंतर, ते पहिले शिकार झालेले असतात. आणि ते त्यांचा आजार दुसऱ्यामध्ये संक्रमित करतात.

पण काही हल्ले हे हेतुपुरस्सर केलेले असतात. आपण एके दिवशी दुष्ट माणसं आणि त्यांच्या मानसिक रचनांविषयी बोलत होतो, ती माणसं तुमचं नुकसान व्हावं म्हणून हेतुपूर्वक तशा मानसिक रचना निर्माण करतात. आणि याहीपलीकडे जाणारी काही माणसं असतात.

ज्याला ‘काळी जादू’ म्हणतात, ते म्हणजे दिशाभूल झालेले विकृत गूढशास्त्र आहे, व्यक्तीने कधीही त्याच्या वाट्यास जाता कामा नये. पण दुर्दैवाने काही जण मात्र अगदी दुष्टपणाने त्याच्या नादी लागतात. तो भ्रम असतो किंवा ती अंधश्रद्धा असते, असे मानू नका, कारण ते खरेखुरे आहे. अशी काही माणसं असतात, त्यांना ही जादू कशी करावयाची ते माहीत असते आणि ती ते करतात. आणि त्यांच्या त्या जादूने ते अत्यंत घृणास्पद असे परिणाम घडवून आणतात.

अर्थात हे लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा तुमच्यामध्ये भीती नसते आणि तुम्ही संरक्षणामध्ये रहात असता तेव्हा तुम्ही सुरक्षित असता. पण हे केव्हा, ती अट महत्त्वाची आहे. आणि जर ती अट तुम्ही सदासर्वकाळ पाळली नाहीत तर, अत्यंत अनिष्ट अशा गोष्टीसुद्धा घडू शकतात. जोवर तुम्ही ताकदवान अशा स्थितीत असता, अगदी शुद्ध अशा स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआपपणे त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच ताकदवान बनून जाते आणि अशा रीतीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध ती काळी जादू करण्यात आली होती, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

आता बाह्य कारणांचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करू. …अडचणी जशा आतमध्ये असतात तशाच त्या बाहेरदेखील असतात. तुम्ही एका मर्यादेपर्यंत स्वतःमध्ये आंतरिक संतुलन प्रस्थापित करू शकता, पण तुम्ही असमतोलाने भरलेल्या वातावरणात जीवन जगत असता. जोवर तुम्ही स्वतःला एखाद्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेत नाही (अर्थात हे केवळ अवघडच आहे असे नव्हे, तर ते तसे करणे नेहमीच ग्राह्य असते असे नाही.) तोवर जे काही बाहेरून येत असते, त्याचा स्वीकार करणे तुम्हाला भागच पडते. तुम्ही देता आणि तुम्ही घेता. तुम्ही श्वासोच्छ्वासाबरोबरच काहीतरी आत घेत असता. तेव्हा तिथे सगळी सरमिसळ असते आणि म्हणूनच तुम्ही असे म्हणू शकता की, सारे काही संसर्गजन्य असते, कारण तुम्ही सतत स्पंदनाच्या स्थितीतच वावरत असता. तुम्ही तुमची स्पंदने देत असता आणि दुसऱ्यांची स्पंदनेसुद्धा स्वीकारत असता आणि ती स्पंदने खूप जटिल स्वरूपाची असतात.

सोप्या भाषेत सांगावयाचे तर, मानसिक, प्राणिक, शारीरिक आणि इतरही पुष्कळ स्पंदने असतात. तुम्ही देता, तुम्ही घेता. देणे-घेणे हा सतत चालणारा खेळ असतो. अगदी असे गृहीत धरू की, तिथे दुरिच्छा नाहीये, तरीदेखील संसर्ग हा अपरिहार्यपणे असतोच असतो. आणि मी तुम्हाला आत्ता तेच सांगत होते की, सारे काही संसर्गजन्य असते.

समजा, तुम्ही एखाद्या अपघाताचा परिणाम काय झाला ते पाहत आहात; अशा वेळी तुम्ही ते विशिष्ट स्पंदन ओढून घेता. आणि जर का तुम्ही जास्तच संवेदनाशील असाल आणि त्यात भरीस भर म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटली किंवा घृणा वाटली (अर्थात ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत; घृणा हे शारीरिक भीतीचे फक्त नैतिक रूप आहे.) तर तो अपघात तुमच्या शरीरामध्ये अगदी शारीरिकदृष्ट्या प्रतिबिंबित होतो. तेव्हा साहजिकपणे तुम्हाला असे सांगण्यात येते की, ज्यांच्याबाबत अशा प्रतिक्रिया आढळून आल्या त्या व्यक्ती नाडीगत असमतोलाच्या स्थितीमध्ये होत्या. पण यात काही तथ्य नाही. त्या व्यक्ती प्राणिक दृष्ट्या आत्यंतिक संवेदनाशील होत्या, इतकेच. आणि हे काही न्यूनतेचे द्योतक नाही.

कारण जसजसे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होऊ लागता, तसतशी नसांमध्ये एकप्रकारची विशिष्ट अशी अतिसंवेदनशीलता आढळून येते. आणि जर का तुमच्या संवेदनशीलतेच्या प्रमाणात तुमचे आत्म-नियंत्रण वाढले नाही तर, तुमच्या बाबतीत सर्व तऱ्हेच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. पण ही तर केवळ एक बाब झाली.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)

तर अशी अशी कारणे असतात – असंख्य कारणे, अगणित कारणे असतात. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय असामान्य पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि आजारपण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तो बरा करावयाचा असेल तर, व्यक्तीला त्या आजाराचे कारण समजले पाहिजे, त्याचे रोगजंतु नव्हे. कारण असे घडते की, जेव्हा रोगजंतु असतात, तेव्हा डॉक्टर्स त्यांना मारण्यासाठी काहीतरी रामबाण उपाय शोधून काढतात, पण त्याने हा आजार बरा होतो आणि दुसराच कोणतातरी अधिक मोठा आजार उद्भवतो! कोणालाच समजत नाही की असे का? …पण कदाचित मला माहीत आहे.

कारण त्या आजाराचे कारण हे निव्वळ शारीरिक नसते, तर दुसरेच काही असते. जे पहिले लक्षण होते, ते कोणत्यातरी दुसऱ्याच अव्यवस्थेचे केवळ बाह्य लक्षण होते. आणि जोवर तुम्ही त्यात हात घालत नाही, ती अव्यवस्था शोधून काढत नाही, तोवर त्या येणाऱ्या आजाराला तुम्ही रोखू शकत नाही. ती अव्यवस्था शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे गहनगाढ असे गूढशास्त्राचे ज्ञान हवे आणि प्रत्येकाच्या आंतरिक कार्याविषयीचे सखोल ज्ञान हवे. तर आपण आत्ता इथे थोडक्यात, आंतरिक कारणांचा धावता आढावा घेतला.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

आणखीही एक गोष्ट असते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार योगसाधना करत असता. तुम्हाला असे सांगण्यात आले असते की, “स्वतःला खुले करा, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल.” तुम्हाला असे सांगण्यात आलेले असते की, ”श्रद्धा आणि सदिच्छा बाळगा, तुमचे संरक्षण केले जाईल.” आणि तुम्ही खरोखरच त्या चैतन्यामध्ये न्हाऊन निघता, त्या शक्तीमध्ये न्हाऊन निघता, त्या संरक्षणात न्हाऊन निघता आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्यामध्ये श्रद्धा असते, जितके तुम्ही स्वतःला खुले करता, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते सारे लाभते ; काही छोटे आंतरिक अडथळे आलेच तर, त्याचे निराकरण करण्यास, तसेच ते अडथळे आल्यानंतर, पुन्हा व्यवस्था प्रस्थापित करण्यास आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यामध्ये त्या चैतन्याची तुम्हाला मदत होते. जे छोटेमोठे आघात तुमच्यावर झाले असते किंवा कदाचित जे अपघात होऊ शकले असते त्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते.

पण जर का तुमच्यामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा अगदी प्राणामध्ये किंवा मनामध्ये, किंवा अनेक भागांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येही – ही अवतरित होणारी शक्ती ग्रहण करण्याची जर क्षमता नसेल, तर ती गोष्ट यंत्रामध्ये येणाऱ्या एखाद्या वाळूच्या कणाप्रमाणे गडबड करून जाते. सर्व काही सुरळीत चालू असणारे असे एक चांगले सुस्थितीतील यंत्र सुरु असते आणि अशावेळी तुम्ही जर त्यामध्ये एखादा वाळूचा कण टाकलात, तर अचानक सर्व काही बिघडून जाते आणि ते यंत्र थांबते. तर असा कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा अभाव असतो, येणारी शक्ती ग्रहण करण्यास कोणीतरी अक्षम असते, म्हणजे त्याने स्वतःला पूर्णपणे बंद करून घेतलेले असते (जेव्हा व्यक्ती त्याकडे पाहू लागते तेव्हा, कोठेतरी एखादा छोटासा काळा ठिपका असावा असे ते बनून जाते; दगडासारखी छोटीशी अगदी कठीण गोष्ट बनून जाते – शक्ती त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, ती गोष्ट शक्ती ग्रहण करणे नाकारते, एकतर ती करू शकत नाही किंवा ग्रहण करण्याची तिची इच्छा नसते) आणि त्यातूनच ताबडतोब एक मोठा असमतोल निर्माण होतो; आणि मग हीच गोष्ट, जी खरंतर ऊर्ध्वगामी वाटचाल करत होती, अद्भुतरित्या बहरत होती, तिला स्वतःलाच आजारी पडल्यासारखे वाटू लागते आणि याउलट जेव्हा तुम्ही अगदी सर्वसामान्य जीवन जगत असता, तेव्हा मात्र तुमचे आरोग्य उत्तम असते, सर्वकाही सुरळीत चालू असते, तक्रार करण्याजोगे काहीच नसते.

एखाद्या दिवशी तुम्ही एखादी नवीन संकल्पना समजावून घेतलेली असते, एक नवीनच आवेग निर्माण झालेला असतो, तुमच्यामध्ये जोरदार अभीप्सा असते आणि बरीच मोठी शक्ती तुम्ही ग्रहण केलेली असते आणि एखादी अद्भुत अनुभूती तुम्हाला आलेली असते, आंतरिक द्वारे खुली करणारा असा एखादा अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्यातून तुम्हाला पूर्वी नसलेले ज्ञान मिळून गेलेले असते; अशा वेळी तुम्हाला खात्री असते की, सारे काही सुरळीत चालू आहे… आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी आजारी पडलेले असता. मग तुम्ही म्हणता, “हे काय? हे असे अजूनही चालूच आहे ? हे अशक्य आहे, असे घडता कामा नये.” पण मी अगदी आत्ता सांगितले त्याप्रमाणे ती गोष्ट म्हणजे वाळूचा कण होती. असे काहीतरी होते की जे ग्रहण करू शकत नव्हते. आणि ताबडतोब त्यातूनच असंतुलितपणा येतो. जरी तो अगदी छोटासा असला तरीही मग तुम्ही आजारी पडता.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)