Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कृतज्ञता – ०६

‘कृतज्ञता’ ही एक आंतरात्मिक भावना आहे आणि जे जे काही आंतरात्मिक असते ते आत्म्याला विकसित होण्यासाठी साहाय्य करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता भावनांमध्ये गैर असे काही नाही. फक्त एवढेच की त्या भावना (अध्यात्म) मार्गावरील बंधन ठरता कामा नयेत.

– श्रीअरविंद
(SABCL 24 : 1768)

कृतज्ञता – ०५

कृतज्ञतेचे प्रकार :

‘ईश्वरी कृपे’च्या तपशीलांविषयी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणारी जी कृतज्ञता असते ती म्हणजे ‘तपशीलवार कृतज्ञता’.

जिच्याद्वारे आपले संपूर्ण अस्तित्व, स्वतःला पूर्ण विश्वासानिशी, त्या ‘प्रभू’पाशी समर्पित करते, ती असते ‘परिपूर्ण कृतज्ञता’.

मनाची अशी कृतज्ञता की जिच्यामुळे मन प्रगती करू शकते ती म्हणजे ‘मानसिक कृतज्ञता’

– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)

कृतज्ञता – ०४

करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच चेतनेमध्ये हे गुण प्रकट होऊ लागतात. वास्तविक हे गुण सामर्थ्यशक्तीवर आधारित असतात परंतु, मन व प्राणाला हे गुण म्हणजे दुबळेपणा आहे असे वाटते. कारण ते मनाच्या आणि प्राणाच्या आवेगांना स्वैरपणे प्रकट होण्यापासून रोखतात.

पुरेसे शिक्षित नसलेले मन, हे बहुधा नेहमीच प्राणाचे साथीदार असते आणि शारीर प्रकृतीचे गुलाम असते आणि अशा मनाचे कायदे प्राणाच्या व शरीराच्या अर्धजागृत यंत्रणेमध्ये इतके काही बळकट असतात की, त्यांना करुणा आणि कृतज्ञता या गुणांचा अर्थच नेमकेपणाने समजत नाही. जेव्हा मन प्रथमत: चैत्य हालचालींविषयी जागृत होऊ लागते तेव्हा स्वत:च्या अज्ञानामुळे त्या हालचालींचा ते पार विपर्यास करून टाकते आणि करुणेचे रूपांतर दया किंवा कणव यांमध्ये करून टाकते किंवा फार फार तर त्याचे रूपांतर भूतदयेमध्ये करते. कृतज्ञतेचे रूपांतर परतफेडीच्या इच्छेमध्ये करते…

जेव्हा व्यक्तीमध्ये चैत्य जाणीव ही पूर्णपणे प्रभावी झालेली असते तेव्हाच फक्त ज्या ज्या कोणाला मदतीची गरज भासते, त्या व्यक्तींविषयी तिला करुणा वाटते; मग ती मदत कोणत्याही क्षेत्रातली का असेना. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमधून ईश्वरी अस्तित्वाची आणि कृपेची अभिव्यक्ती होते अशा सर्व गोष्टींविषयी, मग त्या गोष्टी कोणत्याही रूपामध्ये असू देत, त्या जर त्यांच्या अगदी मूळरूपात आणि तेजोमय शुद्धतेने अभिव्यक्त होत असतील तर, कोणत्याही मेहेरबानीचा लवलेशही नसलेली अमिश्रित अशी करुणा किंवा न्यूनगंडाची कोणतीही भावना नसलेली अशी कृतज्ञता, (चैत्य जाणीव प्रभावी झालेल्या व्यक्तीमध्ये) आढळून येते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 277)

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)

कृतज्ञता – ०२

कोणे एके काळी एक भव्य राजवाडा होता, त्याच्या गाभ्यामध्ये एक गुप्त असे देवालय होते. त्याचा उंबरठा आजवर कोणीच ओलांडलेला नव्हता. एवढेच नव्हे तर, त्या देवालयाचा अगदी बाह्य भागसुद्धा मर्त्य जिवांसाठी जवळजवळ अप्राप्य असाच होता, कारण तो राजवाडा एका अतिशय उंच ढगावर उभारलेला होता आणि कोणत्याही युगातील अगदी मोजकीच मंडळी त्याच्याप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधू शकत असत.

हा ‘सत्या’चा राजवाडा होता.

एके दिवशी तेथे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता, तो माणसांसाठी नव्हता, तर तो अत्यंत वेगळ्या जीवयोनींसाठी होता. ज्या देवदेवतांना पृथ्वीवर त्यांच्या ‘गुणवैशिष्ट्यां’नुसार पूजले जाते, अशा लहानमोठ्या देवदेवतांसाठी तो उत्सव होता.

त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक भलेमोठे सभागृह होते. त्याच्या भिंती, त्याची जमीन, त्याचे छत, सारे काही प्रकाशमान होते. ते असंख्य लखलखणाऱ्या अग्नींनी उजळून निघालेले होते. ते ‘बुद्धिमत्ते’चे सभागृह होते. जमिनीजवळ अतिशय सौम्य प्रकाश होता आणि त्याला एक सुंदरशी नीलवर्णी छटा होती, पण छताकडे मात्र ती क्रमाक्रमाने अधिकाधिक सुस्पष्ट होत गेली होती, तेथे हिऱ्यांचे झुबके छताला झुंबरासारखे लटकलेले होते आणि त्यातून असंख्य किरण झगमगत होते.

तेथे प्रत्येक ‘सद्गुणा’ने स्वतंत्रपणे प्रवेश केला होता, पण लवकरच त्यांचे समविचारी असे छोटेछोटे समूह तयार झाले. एकदा का होईना, पण सारे एकत्र जमल्यामुळे ते आनंदात होते, कारण अन्यवेळी ते सारे या विश्वामध्ये आणि अन्य लोकांमध्येही दूरदूर पसरलेले असतात, भिन्न भिन्न जिवांमध्ये विखुरलेले असतात.

त्या उत्सवावर ‘प्रामाणिकते’ची (Sincerity) सत्ता होती. तिने नितळ पाण्यासारखा, पारदर्शक असा एक पोषाख परिधान केलेला होता, तिच्या हातामध्ये एक अतिशय शुद्ध असे घनाकार स्फटिक होते आणि त्यामधून साऱ्या गोष्टी एरवी जशा दिसतात त्यापेक्षा भिन्न अशा म्हणजे वास्तविक त्या जशा आहेत तशा दिसत होत्या, कारण तेथे त्यांची प्रतिमा कोणत्याही विकृतीविना प्रतिबिंबित होत होती.

तिच्या जवळच, जणू तिच्या विश्वासू रक्षकांप्रमाणे वाटावेत असे ‘विनम्रता’ आणि ‘धैर्य’ हे दोन गुण उभे होते. विनम्रता ही आदरणीय होती आणि त्याच वेळी ती स्वाभिमानी होती. तर धैर्य हा उन्नत-माथा असलेला, स्वच्छ डोळ्यांचा होता, त्याचे ओठ दृढ आणि हसणारे होते, त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण शांत आणि निर्णायक होते.

‘धैर्या’च्या जवळच, त्याच्या हातात हात घालून एक स्त्री उभी होती, तिने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलेले होते, तिने परिधान केलेल्या त्या अंगरख्यामधून तिच्या शोधक नजरेव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते; अंगरख्याआडून फक्त तिचे डोळे चमकताना दिसत होते, ती ‘विवेकबुद्धी’ होती.

त्या सगळ्यांमध्ये वावरणारी, इकडून तिकडे ये-जा करणारी आणि तरीही सतत प्रत्येकाजवळच आहे असे वाटावी अशी एक व्यक्ती होती, तिचे नाव ‘उदारता’ असे होते. ती एकाच वेळी सतर्क आणि शांत होती, ती सक्रिय होती आणि तरीदेखील सर्वांपासून स्वतंत्र होती.

ती त्या समूहामधून बाहेर पडताना, तिच्या मागे एक सौम्य पांढऱ्या रंगाची प्रकाशरेषा सोडून जात होती. ‘उदारता’ जो प्रकाश प्रस्फुरित करत असते, जो ती सौम्यपणे पसरवित जात असते, त्या प्रकाशाची प्रभा इतकी सूक्ष्म असते की, बहुसंख्य डोळ्यांना ती अदृश्यच असते. ती प्रभा उदारतेला तिच्या अगदी घनिष्ठ मैत्रिणीपासून, कधीही विलग होऊ न शकणाऱ्या अशा सहचारिणीपासून, तिच्या जुळ्या बहिणीपासून म्हणजे ‘न्यायबुद्धी’कडून प्राप्त होत असते.

‘उदारते’च्या आजूबाजूला ‘दयाळूपणा’, ‘सहनशीलता’, ‘मृदुता’, ‘उत्कंठा’ आणि तत्सम इतरांनी दिमाखदार घोळका केला होता. सारे जण तेथे उपस्थित होते. पण एकाएकी, त्या सुवर्णमय उंबरठ्यावर एका नवागत स्त्रीचे आगमन झाले.

दरवाज्यापाशी राखण करणाऱ्या द्वारपालांनी मोठ्या नाखुषीने तिला आत प्रवेश करण्यास संमती दिली. त्यांनी तिला यापूर्वी कधी पाहिले नव्हते किंवा त्यांच्यावर प्रभाव पडावा असे तिचे रंगरूपही नव्हते. ती खरोखरच अगदी लहानशा चणीची आणि सडपातळ होती आणि तिने जो पोशाख परिधान केलेला होता तोही अगदी साधासा, गरिबासारखा होता. ती काहीशी संकोचून, अवघडल्यासारखी काही पावले टाकत पुढे आली. त्या एवढ्या मोठ्या ऐश्वर्यसंपन्न आणि तेजःपुंज लोकांमध्ये, नक्की कोणाकडे जावे हे न कळल्याने, गोंधळून गेलेली ती तिथेच थबकली.

सख्यासोबत्यांबरोबर झालेल्या काही जुजबी संभाषणानंतर, त्यांच्याच विनंतीवरून ‘विवेकबुद्धी’ पुढे झाली आणि त्या नवख्या व्यक्तीच्या दिशेने गेली. त्या नवख्या स्त्रीला विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विवेकबुद्धीने दोन क्षण जाऊ दिले आणि मग त्या स्त्रीकडे बघून ती म्हणाली, ”आत्ता इथे जमलेल्यांपैकी आम्ही सर्व जण नावानिशी आणि प्रत्येकाच्या गुणांनुसार एकमेकांना ओळखतो. आम्ही सारे तुझ्या येण्याने आश्चर्यचकित झालो आहोत कारण तू आमच्यासाठी नवखी आहेस, किंवा किमान आम्ही तुला याआधी कधी पाहिले असल्याचे स्मरत नाही. तू कोण आहेस, ते कृपा करून आम्हाला सांगशील का?”

एक निःश्वास टाकत ती नवखी व्यक्ती उद्गारली, ”या राजवाड्यामध्ये सर्वांना मी अनोळखी असल्याचे वाटत आहे, यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाहीये, कारण मला क्वचितच कोठे आमंत्रित केले जाते. माझे नाव ‘कृतज्ञता’!”

(तात्पर्य : कृतज्ञता हा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 02 : 05-07)

साधनेची मुळाक्षरे – १५

प्रश्न : मनामध्ये चालणाऱ्या चर्चा कशा थांबवाव्यात?

श्रीमाताजी : पहिली अट म्हणजे शक्य तितके कमी बोला.

दुसरी अट अशी की, तुम्ही आधी काय केले आहे किंवा काय करायचे आहे याचा विचार न करता, तुम्ही ज्या क्षणाला जे करत आहात केवळ त्याच गोष्टीचा विचार करा. भूतकाळाबद्दल खेद करत बसू नका किंवा भविष्य काय असेल याची कल्पना करत बसू नका.

तुम्ही तुमच्या विचारांमधील निराशावादाला आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 141)

….‘निसर्गा’मध्ये स्वतःला पूर्णतः कसे झोकून द्यायचे हे जर एखाद्याला माहीत असेल, आणि तो जर ‘निसर्गा’च्या कार्याला विरोध करत नसेल, तर तो कधीच आजारी पडणार नाही. ‘निसर्गा’ची स्वतःची अशी काही साधने असतात आणि व्यक्तीने भीतीपोटी किंवा संकोचापोटी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, निसर्ग तुम्हाला आश्चर्यकारकरित्या त्वरेने बरे करतो. ‘निसर्गा’च्या तालाशी ताल जुळवून कसे जगायचे हे व्यक्तीला समजले तर तो ‘निसर्ग’च तुम्हाला सर्व संकटांतून काळजीपूर्वकपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितो. ‘निसर्गा’च्या प्रवाहाबरोबर वाटचाल कशी करायची ते व्यक्तीने स्वतः शिकले पाहिजे – मग त्या लाटाच तुम्हाला अगदी हळूवारपणे तुमच्या अंतिम गंतव्यापर्यंत घेऊन जातात.

…स्वतःला झोकून देणे, ‘प्रकृती’च्या हाती स्वतःला सोपविणे, तिच्या लाटेवर प्रवाहित होणे… (असे करता आले तर) अडीअडचणी आणि धोके पूर्णतः नाहीसे होतात. जणू काही व्यक्ती स्वतःला मोकळे सोडते – पूर्णतः खुले करते – जणू काही व्यक्ती त्यावर तरंगत राहते… मग अशा या स्थितीमध्ये, पाण्याच्या तळाशी असलेल्या काळोखाकडे न पाहता, आकाशाकडे पाहत, प्रकाशाकडे पाहत, व्यक्तीने मार्गदर्शन मिळावे म्हणून स्वतःला ‘प्रकृती’च्या हाती सोपवले तर… व्यक्ती जेव्हा अशा रीतीने वागेल, तेव्हा तिला कोणतीही वेदना स्पर्श करू शकणार नाही.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 139)

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)

विचार शलाका – २९

रूपांतरणाचा योग (पूर्णयोग) हा सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. व्यक्तीला जर का असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे, आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दु:खे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी हरकत नाही ते तितकेसे महत्त्वाचे नाही. “मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी जर व्यक्तीची अवस्था असेल तर मात्र गोष्ट निराळी.

 

अन्यथा मी म्हणेन, “चांगले वागा, सुखी असा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे.” चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होतात ती अपवादात्मक अशी परिस्थिती होती हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग चेतनेचा काही अंश, तिचा प्रकाश, तिचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल. आणि ते खूप चांगले असेल. पण, एकदा का तुम्ही योगमार्गावर पाऊल ठेवलेत की, तुमचा निर्णय वज्रकठोर असला पाहिजे आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी तुम्ही थेट ध्येयाकडे वाटचाल केलीच पाहिजे.

 

– श्रीमाताजी

(CWM 07 : 200)

विचार शलाका – २८

सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने आपली कर्मं आणि आपले जीवन ‘ईश्वरा’ला समर्पित केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगातील ‘दिव्य’ शांतीसाठी त्या ‘ईश्वरा’ची प्रार्थना केली पाहिजे. मन जेव्हा शांत, स्थिर होते तेव्हा, ‘दिव्यमाता’च आपल्या जीवनाला आधार देत आहे असे व्यक्ती अनुभवू शकते आणि तेव्हा मग ती व्यक्ती सर्वकाही त्या ‘दिव्यमाते’च्या हाती सोपवून देते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 31 : 345)