Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – २१

आपण असे म्हणू शकतो की, मनुष्य हा त्याच्या प्रकृतीच्या अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचा सर्वशक्तिशाली स्वामी आहे. पण ते तो विसरला आहे.

सर्वसामर्थ्यवान अशी ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे पण त्याचे त्याला विस्मरण झाले आहे…

उत्क्रांतीच्या वळणावर, माणसाने त्याची सर्वशक्तिमानता विसरणेच आवश्यक होते, कारण या सर्वशक्तिमानतेमुळे त्याची छाती गर्व आणि अभिमान याने फुलली होती आणि तो पूर्णत: विकृत बनला होता. म्हणून त्यासाठी इतर कितीतरी गोष्टी त्याच्यापेक्षा अधिक बलवान आणि शक्तिशाली आहेत याची त्याला जाणीव करून देणे भागच होते; पण मूलत: ते तसे नव्हते. ती प्रगतीच्या वळणाची आवश्यकता होती इतकेच!

मनुष्य हा संभाव्यतेच्या दृष्टीने देव आहे. मात्र तो स्वत:ला प्रत्यक्षातच देव समजू लागला होता. पण एखाद्या किड्यामुंगीपेक्षा आपण अधिक सरस नाही हे त्याने शिकण्याची गरज होती. आणि त्यामुळे जीवनाने त्याला इतके आणि अशा तऱ्हेने पिळवटून काढले की, जेणेकरून त्याला ते उमगावे… अगदीच काहीनाही तर, त्याला निदान त्या गोष्टीची थोडी जाणीव तरी व्हावी. माणूस जेव्हा अगदी योग्य दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला लगेचच समजून येते की, संभाव्यतेच्या दृष्टीने तो देवच आहे. मात्र त्याने तसे बनले पाहिजे, म्हणजे, जे जे तसे (दैवी) नाही त्यावर त्याने मात केली पाहिजे.

देवांबरोबरचे हे नाते खूपच स्वारस्यपूर्ण असते… दिव्य जिवांच्या शक्तिमानतेमुळे, त्यांच्या सौंदर्यामुळे, दिव्य जिवांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या सिद्धींमुळे जोवर मनुष्य स्तंभित होत असतो, जोवर तो त्यांच्या स्तुतीमध्ये हरवून जात असतो, तोवर तो त्यांचा गुलाम असतो. पण ते दिव्य जीव म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची विविध रूपं असल्याचे जेव्हा त्याला उमगते आणि तो स्वत:सुद्धा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचेच आणखी एक वेगळे रूप आहे, हे त्याला जाणवते – जे रूप त्याने बनले मात्र पाहिजे – तेव्हा मग, दिव्य जीव आणि मनुष्य यांच्यातील नाते बदलते. तेव्हा तो त्यांचा गुलाम राहात नाही. – तो मग त्यांचा गुलाम असत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 38-39)

विचार शलाका – १९

व्यक्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलेली असते, हेच त्याच्या पार्थिव अस्तित्वाचे औचित्य आहे.

अन्यथा या प्रयोजनाविना त्याचे पार्थिव जीवन म्हणजे एक राक्षसीपणा ठरला असता.

‘ईश्वरा’चा पुनर्शोध घेणे आणि स्वत:च ‘तो’ बनणे, ‘त्या’चे आविष्करण करणे, बाह्य जीवनात सुद्धा ‘त्या’चा अनुभव घेणे हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन (जीवनात) नसते, तर हे पार्थिव जीवन म्हणजे एक भयंकर, अघोरी अशी बाब ठरली असती.

साहजिकच आहे, लोक जेवढे जास्त जाणीवशून्य असतात तेवढीच त्यांना ही गोष्ट कळण्याची शक्यता कमी असते. कारण ते वस्तुनिष्ठपणे पाहात नाहीत, स्वत:च्या जीवनसरणीविषयी जागरुक नसतानाही, किंवा त्रयस्थ होऊन स्वत:चा वस्तुनिष्ठपणे विचार न करता ते केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे जगत राहतात. आणि मग जसजशी जाणीव, चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे त्यांना कळू लागते की हे जीवन – जसे ते आत्ता आहे – तसे जीवन हा किती भयप्रद नरक आहे.

आणि जीवन त्याला ज्या दिशेने घेऊन जात असते त्याविषयी जेव्हा तो सचेत (conscious) होतो, तेव्हाच तो जीवनाचा स्वीकार करू शकतो, आणि त्याचे आकलन करून घेऊ शकतो. केवळ जीवनाच्या या प्रयोजनामुळेच जीवन स्वीकारार्ह होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 119)

विचार शलाका – १३

योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून घेतले पाहिजे की, सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसांची नियती ही व्यामिश्र (complex) असते, कधी कधी विसंगतही वाटावी इतकी ती टोकाची असते. ह्या व्यामिश्रतेमुळेच आपणाला ती अनपेक्षित, अनिश्चित, आणि परिणामतः असंभाव्य आहे असे भासत नाही का?

हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, ….स्वत:च्या सर्वोच्च चेतनेमध्ये स्वत:ला कायम राखणे आणि अशा प्रकारे, स्वतःच्या सर्वोच्च नियतीला कृती व जीवनाच्या इतर भागांवर प्रभुत्व गाजविण्यास अनुमती देणे, यातच जीवनाची कला सामावलेली आहे. तेव्हा चूक होण्याची यत्किंचितही आशंका न बाळगता व्यक्ती असे म्हणू शकते की, कायम चेतनेच्या सर्वोच्च शिखरस्थानी राहा म्हणजे तुमच्या बाबतीत सर्वोत्तम तेच घडेल. पण ते सर्वोच्च शिखर गाठणे इतके सोपे नसते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 77-78)

विचार शलाका – १२

लोकांची मनं, चारित्र्य व अभिरुची उच्च पातळीवर नेणे, स्वभावाचा प्राचीन उमदेपणा परत प्राप्त करून घेणे, सामर्थ्यशाली असे ‘आर्य’ चारित्र्य आणि उच्च कोटीचा ‘आर्य’ दृष्टिकोन, पार्थिव जीवन सुंदर व अद्भुतरम्य बनवणारी समज यांचे पुनरुज्जीवन करणे आणि अशी नेत्रदीपक अभीप्सा, आध्यात्मिक अनुभव, साक्षात्कार की ज्यामुळे आपण या भूतलावरील सर्व मानवसमूहांमध्ये अधिक विशाल-हृदयी, सखोल विचारांचे गणले गेलो, आणि सर्वाधिक सखोल सूक्ष्मतेने जीवनाची ज्ञानोपासना करणारे गणले गेलो, त्या साऱ्याचे पुनरुज्जीवन करणे हे आता आपल्यापुढील तातडीचे व महत्त्वाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 246)

विचार शलाका – १०

स्वत:च्या अहंकारामध्ये जो जगतो, स्वत:च्या अहंकारासाठी जो जगतो, स्वत:चा अहंकार सुखावेल या आशेने जो जगतो तो मूर्ख असतो. तुम्ही जोपर्यंत अहंकाराच्या वर उठत नाही, जेथे अहंकाराची आवश्यकताच उरत नाही, अशा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेप्रत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही; तोपर्यंत ध्येय प्राप्त होईल अशी आशाच तुम्ही बाळगू शकत नाही.

एके काळी व्यक्तिगत चेतनेच्या घडणीसाठी अहंकार अनिवार्य आहे असे वाटत होते पण अहंकारासोबतच सर्व अडथळे, दुःखभोग, अडचणी यांचाही जन्म झाला की ज्या गोष्टी आज आपल्याला विरोधी शक्ती आणि अदिव्य शक्ती वाटतात. पण आंतरिक शुद्धी व अहंकार-मुक्ती यांसाठी अशा विरोधी शक्ती देखील आवश्यक होत्या. अहंकार हा एकाच वेळी त्या विरोधी शक्तींच्या कृतीचा परिणाम आणि त्यांच्या दीर्घकाळ टिकून राहण्याचे कारणदेखील असतो. जेव्हा अहंकार नाहीसा होईल, त्याच्याबरोबरच विरोधी शक्तीदेखील नाहीशा होतील. कारण त्यांना या जगात अस्तित्वात राहण्याचे काही कारणच उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 218)

विचार शलाका – ०३

सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही.

आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच दुःखभोगाचे खरेखुरे रूपांतरण झालेले असेल, आणि येथे एक नवजीवन, नवनिर्माण व नव-प्रचिती असेल. हा आनंद सर्वप्रथम चेतनेमध्येच स्थापित झाला पाहिजे. तसे झाले म्हणजे मगच भौतिकाचे रूपांतरण होईल, तत्पूर्वी नाही.

खरे तर, ‘विरोधी'(शक्ती) सोबतच दुःखभोग या जगात आले. आणि असा आनंदच केवळ त्या दुःखभोगांना पराभूत करू शकतो, त्या दुःखभोगांचा अंतिमतः निर्णायक पराभव करू शकेल असे अन्य कोणीही नाही.

‘दिव्यानंदा’नेच निर्मिती केली आहे आणि पूर्णतेस नेणाराही ‘दिव्यानंद’च असेल.

हे मात्र नीट लक्षात ठेवा की, सामान्यतः लोक ज्याला आनंद म्हणतात, त्या आनंदाविषयी मी हे बोलत नाहीये. तो आनंद म्हणजे खऱ्याखुऱ्या आनंदाचे व्यंगचित्रही शोभणार नाही. मला वाटते, इंद्रियसुख, आत्मभानशून्यता आणि बेपर्वाई यांपासून मिळणारा आनंद हा व्यक्तीला मार्गच्युत करणारा राक्षसी आविष्कार असतो.

मी ज्या आनंदाविषयी बोलते आहे, तो आनंद म्हणजे परिपूर्ण शांती, छायाविरहित प्रकाश, सुसंवाद, संपूर्ण व सर्वांगीण सौंदर्य, अनिरुद्ध सामर्थ्य होय. तो असा आनंद आहे की, जो अर्करूपाने, ‘संकल्प’रूपाने आणि त्याच्या ‘जाणिवे’ने, स्वत:च एक ईश्वरी ‘अस्तित्व’ आहे!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396-397)

विचार शलाका – ०२

दुःखभोग हे प्रथमतः अज्ञानामुळे येतात आणि दुसरे कारण म्हणजे, व्यक्तिरूप चेतनचे ‘दिव्य चेतना’ व ‘दिव्य अस्तित्व’ यांपासून विलगीकरण झालेले असल्यामुळे ते येतात.

जेव्हा ही विलगता नाहीशी होते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विभक्त अशा छोट्याशा ‘स्व’मध्ये न जगता संपूर्णतया ‘दिव्यत्वा’मध्ये जगू लागते तेव्हाच केवळ दुःखभोग पूर्णत: नाहीसे होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 527)

सद्भावना – २७

एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले.

त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा हा एक विधायक मार्ग आहे.”

मला हे फार रोचक वाटले. (हे पत्र काही वर्षांपूर्वी, किमान एक वर्षभर तरी आधी लिहिलेले होते, आणि पवित्रने मला सांगितले की, ते इतर फाईलींमध्ये गहाळ झाले होते, त्यांना ते सापडलेच नव्हते.) आणि ते पत्र जणू मला सांगत होते, “बघ, तू हे आधीच सांगून ठेवले आहेस.” कारण ‘सद्भावना’ म्हणजे सुसंवाद (अर्थात मनोवैज्ञानिक स्तरावरील) होय, सारे काही चांगले व्हावे अशी मानसिक स्तरावरील ती इच्छा असते. मला हे मोठे रोचक वाटले.

पण ते पत्र परत सापडले हे बरे झाले; सद्भावना हे प्रत्येकाच्याच आवाक्यात येऊ शकेल असे एक रूप आहे, जे कोणालाही उमजू शकते. तुमच्याकडून कोणत्याही असाधारण गोष्टींची अपेक्षा केली जात नाही, तर फक्त सद्भावना असावी, एवढीच माफक अपेक्षा केली जाते. मला हे पत्र जेव्हा परत सापडले तेव्हा मी हसले आणि मला ते गमतीशीर वाटले आणि मी म्हणाले, “असेच विधान कदाचित मी प्रसन्नतेबद्दल देखील केले असेल.” मी असे म्हटलेले असेल की, ”प्रसन्न राहा आणि बघा, तुम्हाला सर्वत्र प्रसन्नताच दिसून येईल.” बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. अशा वेळी मला नेहमीच शोभादर्शक यंत्राची (कॅलिडोस्कोप) आठवण येते; ज्यामध्ये काहीतरी निराळेच अभिव्यक्त करण्यासाठी रंगांची अशी एक रचना असते की, ज्या क्षणी ती गोष्ट अभिव्यक्त होते त्याच क्षणी…ती बदलते, नाहीशी होते, साधीसोपी होऊन जाते आणि अंतिमतः ती सर्वांच्या आवाक्यात येते.

पण एक गोष्ट आहे : पृथ्वीवर सध्या एक ‘भयंकर’ संघर्ष चालू आहे, परंतु त्याच बरोबर एक अद्भुत दिव्य कृपाही आहे, जी नेहमीच साहाय्य करत असते, ती नेहमीच अधिक चांगल्यासाठी धडपडत असते आणि दबाव टाकत असते, “या, प्रसन्न राहा, आणि सद्भावना बाळगा, या, समाधानयुक्त आंतरिक सुसंवाद, आशा, श्रद्धा बाळगा. विघटनाची स्पंदने – म्हणजेच ऱ्हासकारक, पतित करणारी, आणि विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारी स्पंदने स्वीकारू नका.”

– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Vol – 08, May 3, 1967)

सद्भावना – ०२

तुम्ही खरोखर जर अभीप्सेच्या उत्कट अवस्थेमध्ये असाल, तर ती अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी साहाय्यभूत ठरणार नाही, अशी कोणतीच परिस्थिती नसते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित हे ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ते पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ झालेले असता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्हाला हे माहीत आहे का की, एक संकल्प, परम सद्भाव (Good will) हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत असतो आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक प्रभावीपणे कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

विचार शलाका – ३८

आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट असली तरी, वैयक्तिक ‘मुक्ती’ हे त्याचे उद्दिष्ट नाही; तर मानवाची मुक्ती आणि त्याचे रूपांतरण हे या योगाचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक ‘आनंद’ नव्हे, तर दिव्य ‘आनंद’ खाली भूतलावर उतरविणे, ‘ख्रिस्ता’चे स्वर्गसाम्राज्य आणि आपले ‘सत्ययुग’ या पृथ्वीवर अवतरविणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. मोक्षाबाबत म्हणाल तर, आपल्याला वैयक्तिकरित्या त्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा नित्यमुक्तच असतो आणि बंधन हा भ्रम आहे. वास्तविक आपण बद्ध नाही परंतु आपण बद्ध असल्याप्रमाणे लीलेमध्ये सहभागी होतो. जेव्हा ‘देवाची’ इच्छा होईल तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. कारण तो, आपला परम ‘आत्मा’ हाच या खेळाचा स्वामी आहे आणि त्याच्या कृपेविना आणि त्याच्या अनुमतीविना कोणताही जीव हा खेळ सोडून जाऊ शकत नाही. बरेचदा आपल्यातील ‘देवाची’ इच्छाच आपल्या मनाला अज्ञानाच्या भोगामधून, द्वैतामधून, सुख आणि दुःखामधून, मौजमजा आणि वेदना यांतून, पापपुण्यामधून, भोग आणि त्यागामधून घेऊन जात असते. युगानुयुगे, अनेकानेक देशांमध्ये त्याच्या मनाला योगाचा विचार देखील शिवत नाही आणि तो शतकानुशतके हा खेळ अथकपणे खेळत राहतो. यामध्ये गैर असे काही नाही किंवा आपण ज्याचा धिक्कार करावा असेही त्यात काही नाही किंवा आपण स्वतःचा संकोच करावा असेही त्यात काही नाही, कारण ही ‘देवाची’ लीला आहे. खरा ज्ञानी मनुष्य तोच की, जो हे सत्य ओळखतो, स्वतःचे स्वातंत्र्य ज्ञात करून घेतो आणि तरीही ‘देवा’च्या या खेळामध्ये सहभागी होतो आणि या खेळाची पद्धत बदलण्यासाठी म्हणून त्याच्या आज्ञेची वाट पाहात राहतो.

आता ही आज्ञा झाली आहे. सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून देव स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या चतुर्युगामध्ये तरी तो देश भारत आहे. जेव्हा तो देव अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रूंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे कालीच्या लीलेचे पूर्ण सौख्य उपभोगण्याचे ठरवितो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंदावतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो, जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीमधून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील नारायण हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की ज्यामुळे, भारताने ज्ञान व त्याच्या परिणामस्वरूप येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा भारतातील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर भारताचा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)